Monday, September 12, 2022

वेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन

बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ उघडीप नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठे पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा मोठे पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.

आकस्मिक मर व्यवस्थापन

अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया अधिक १०० ग्रॅम पालाश (पोटॅश) अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली याप्रमाणे आळवणी करावी. किंवा १ किलो १३:००:४५ अधिक २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी. याप्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. सदरिल सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ गजानन गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ दिगांबर पटाईत, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राचे डॉ अरविंद पाडागळे यांनी दिला आहे. अधिक माहितीकरिता कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९००० यावर संपर्क साधवा.

संदर्भ :

संदेश क्रमांक: १०/२०२२  (१२ सप्टेंबर २०२२)

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी