Thursday, November 2, 2023

निक्रा प्रकल्‍पांतर्गत रबी हंगामातील पिक नियोजन चर्चासत्र संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प येथील हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत (निक्रा प्रकल्‍प) दिनांक १८ ऑक्‍टोबर रोजी रबी हंगामाचे नियोजन यावर चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास निक्रा प्रकल्‍पात संशोधनात्मक पीक प्रात्यक्षिक योजनेसाठी निवडलेल्या उजळांबा, बाभुळगाव व सोन्ना या गावामधील ३८ शेतकऱ्यांना सहभाग घेतला होता. चर्चासत्रा रबी ज्वारी, हरभरा व करडई या पिकांच्या व्यवस्थापनाबाबत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यापीठ विकसित करडईचे पीबीएनएस-१२, ज्वारीचे परभणी ज्योती, हरभरा पिकाचे आकाश या सुधारीत वाणाच्‍या बियाणे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाकरिता वितरीत करण्यात आले. हवामान बदलानुरुप परिस्थितीत या पिकांच्या वाणांचा अभ्यास शेतकऱ्यांच्या शेतावर करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी मार्गदर्शनात मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वा. नि. नारखेडे म्‍हणाले की, सोयाबीन काढणीनंतर लगेच रब्बी पिकांची जमिनीतील ओलावा उडून जाण्यापूर्वी लागवड करावी. विद्यापीठ विकसित वाणांच्या बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करावा. रब्बी पिकांमध्ये आंतरपीक पध्दतीचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला देऊन त्‍यांनी हरभरा अधिक करडई, रब्बी ज्वार अधिक हरभरा या आंतरपीक पध्‍दतीबाबत मागदर्शन केले. कृषि अभियंता डॉ. एम. एस. पेंडके यांनी ठिबक सिचंन व तुषार सिंचन पध्‍दतीबाबत मार्गदर्शन करतांना पिकांना पीक फुलोऱ्यावर असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाणी देण्‍याचा सलला दिला. वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. अे. के. गोरे म्‍हणाले की, तेलबिया व दाळवर्गीय पिकांमध्ये स्फुरद व गंधकयुक्त खतांचा वापर करावा. याशिवाय रब्बी पिकांमध्ये वेळेवर पेरणी, लागवडीचे अंतर रब्बी ज्वारी व करडई ४५ सें.मी तर कोरडवाहू हरभरा ३० सें.मी. तर बागायत हरभरा ४५ सें. मी. अंतरावर लागवड करावी, बीज प्रक्रिया, वेळेवर पीक संरक्षण व संरक्षीत सिंचन पंचसुत्रीचा अवलंब करावा असे सांगितले. सुत्रसंचालन मृदशास्त्रज्ञ डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी केली.

कार्यक्रमास सरंपच (बाभुळगाव) श्रीमती सपना रामदास दळवे, सरंपच (उजळांबा) श्री विठ्ठलराव धोतरे, व सोन्नाचे सरंपच श्री बाळासाहेब देशमुख आदीसह दत्‍तक गांवातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रा. आर. एस. राऊत, श्रीमती ए. एस. गुंजकर, एस. पी. काळे, एम. ए. राऊत, व्ही.जे. रिठ्ठे, आर.बी. तुरे, एम. डी. गवळी, एस. एस. सुर्यवंशी, एस. एन. शेख, डी. एस. भुमरे आदींनी परिश्रम घेतले.