Monday, March 4, 2024

कृषि तंत्र विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण यशस्वी संपन्न

कौशल्‍य आधारित कृषि तंत्र अभ्यासक्रमाचे महत्व वाढणार ...... कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि

नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणामध्‍ये कौशल्‍य आधारित पदवी अभ्‍यासक्रमास महत्‍व दिले असुन कृषि तंत्र अभ्‍यासक्रमाचे महत्‍व वाढणार आहे. प्रत्येक कृषि तंत्र विद्यालयांमध्ये विशेष प्राविण्य असणारे कृषि तंत्रज्ञान शिक्षण शिकवण्याची व्यवस्था व्हावी, जेणेकरून ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्याच भागात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे मत कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील निम्नस्तर कृषि शिक्षण विद्याशाखाच्‍या वतीने मराठवाडा विभागातील सलग्न कृषि तंत्र विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक १ आणि २ मार्च रोजी करण्‍यात आले होते, उदघाट्न कार्यक्रमाच्‍या  अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते.  उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर शिक्षण  संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. जगदीश जहागीरदार, विस्तार शिक्षण संचालक, डॉ. धर्मराज गोखले, संचालक बियाणे व रोप रोपे डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, सहयोगी अधिष्ठता डॉ. सय्यद इस्माईल आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके म्हणाले की, कृषि तंत्र विद्यालयातील अभिलेखे व अभ्यासक्रम या दोन्ही बाबतीत आयोजित केलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे निम्नस्तर कृषि शिक्षण अभ्यासक्रमाला उर्जित अवस्था प्राप्त करून देईल. या प्रशिक्षणाद्वारे कृषि तंत्र अभ्‍यासक्रमाचे शिक्षक यांनी प्राप्त केलेल्या अद्यावत ज्ञानाचा उपयोग  करून उत्कृष्ठ विद्यार्थी घडवतील.

प्रास्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजेंद्र लोंढे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील ५७ कृषि तंत्र विद्यालयांमध्ये  दरवर्षी जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी हे कृषि पदविका शिक्षण घेत असून त्यांच्या या शिक्षणाचा स्तर उंचावणे व या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे, याकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. तसेच कृषि तंत्र पदविका प्राप्त विद्यर्थ्यांना  शासकीय नोकऱ्यांमध्ये  पुरेशी संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आणि प्राथमिक शालेय शिक्षणात कृषि अभ्यासक्रमाचे शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी प्रयन्त केला जाईल असे नमूद केले. 

सूत्रसंचालन श्री अशोक खिल्लारे यांनी केले तर आभार डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यापीठाच्या घटक  कृषि तंत्र विद्यालयांचे प्राचार्य  डॉ. मधुकर खळगे, अंबाजोगाई, डॉ.अशोक  घोटमोकुळे, लातूर, डॉ.पंडित मुंडे ,छत्रपती संभाजीनगर, डॉ. प्रल्हाद जायभाय जालना, आणि डॉ. संतोष पिल्लेवाड ,परभणी  यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणास घटक  व संलग्न कृषि तंत्र विद्यालयातील ३७५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.