Tuesday, March 19, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

विद्यापीठाचे माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन यांनी वनामकृवितील ११००२ स्नातकांना विविध पदवीने केले अनुग्रहित

हवामान बदलास अनुरूप पीक पद्धती विकसित करावी.....मा.राज्यपाल श्री. रमेश बैस


भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला आहे. यासाठी कृषि क्षेत्रांनी महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल. कृषि मध्ये आता व्यापारीकरण आणि उच्च किमतीच्या पिकांच्या उत्पादनावर भर दिला जात आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कृषि हा कणा असून कृषि क्षेत्राचे घरगुती उत्पादनामध्ये जवळपास १५ % आणि निर्यातीमध्ये १३ टक्के वाटा असून जवळपास ५०ते ६० टक्के लोकसंख्या ही कृषि आणि संबंधित रोजगारावर अवलंबून आहेत. भारताने स्वातंत्र्यानंतर कृषि क्षेत्रात अनेक क्रांती केल्या. सध्या कृषि क्षेत्र इंद्रधनुष्य क्रांतीकडे वाटचाल करत आहे. असे प्रतिपादन माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन श्री. रमेश बैस यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ १९ मार्च रोजी संपन्न झाला, यावेळी ते दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.

दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन श्री रमेश बैस यांनी आभासी माध्यमातून द्वारे भूषविले आणि प्रमुख अतिथी भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉ. संजय कुमार यांनी दीक्षांत अभिभाषण केले तर वनामकृविचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, पदेकृविचे कुलगुरू डॉ शरद गडाख, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील,  विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. आर. . मराठे, श्री. दिलीप देशमुख, विद्वत परिषदेचे सदस्य डॉ. पी जी इंगोले, वनामकृविचे माजी कुलगुरु डॉ. सी. डी. मायी, डॉ. के. पी. गोरे,  डॉ. बी व्यंकटेश्वरलू, डॉ. अशोक ढवण, वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, कुलसचिव श्री पुरभा काळे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ जगदीश जहागीरदार, संचालक बियाणे डॉ. देवराव देवसरकर, मकृशिसंपचे शिक्षण संचालक डॉ. हेमंत पाटील, वनामकृविचे उपपुलसचिव डॉ. गजानन भालेराव, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ आणि सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात वनामकृविचे माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री.रमेश बैस यांनी सर्व स्नातकांचे आणि त्यांच्या माता पित्यांचे स्नातकांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण २०२० मुळे भारतीय शैक्षणिक व्यवस्थेमध्ये नव्या युगाची सुरुवात होत असून यामध्ये विद्यार्थी केंद्रीत, सर्व समावेशक आणि भविष्यातील शैक्षणिक व्यवस्थेचा मार्ग प्रशस्त होणार असून वनामकृवि हे यामध्ये अग्रेसर आहे. या विद्यापीठातील ३५ टक्के पेक्षा  अधिक पदवी स्नातक आणि ६१ पेक्षा अधिक पदव्युत्तर स्नातक यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला रोजगार मिळवला असून काही स्नातकांनी आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारला आहे, ही एक आनंदाची बाब आहे. या विद्यापीठाने ३० पेक्षा अधिक राष्ट्रीय संस्था सात आंतरराष्ट्रीय संस्था १४ उद्योग क्षेत्रे आणि २५० शेतकरी उत्पादक कंपन्यासोबत सामंजस्य करार केले असून  अमेरिकेतील जागतिक दर्जाचे विद्यापीठ आणि जर्मन फेडरल सरकारचे जर्मनी येथील जीआयझेड कंपनी सोबत संशोधन कार्य सुरू केले आहे. यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्यास प्रोत्साहन मिळणार आहे. भविष्यात विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. भारत जगातील सर्वात अधिक लोकसंख्येचा देश होऊ पाहत असून जमीनधारणा घटत आहे. आपणास अन्नधान्य उत्पादनामध्ये आत्मनिर्भर व्हावयाचे आहे. यासाठी गरजेनुसार आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यावा लागेल तसेच हवामान बदलावर आधारित पीक पद्धती विकसित करून त्याचे प्रभावीपणे विस्तार कार्याद्वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाव्या लागतील. यासाठी वनामकृविने उल्लेखनीय कार्य केलेले असून भविष्यात सुद्धा हे विद्यापीठ आणि विद्यापीठाचे स्नातक उत्कृष्ट कार्य करून आपले योगदान देतील असे संबोधित करून विद्यापीठास आणि सर्व स्नातकांना शुभेच्छा दिल्या.

माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री. रमेश बैस यांनी स्नातकांना सत्याच्या मार्गावर राहून देशाप्रती समाजाप्रती प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याची शपथ देऊन विविध विद्याशाखेतील ११००२ स्नातकांना विविध पदवी,  पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीने अनुग्रहित केले.

दीक्षांत अभिभाषणा बोलताना भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉ. संजय कुमार यांनी असे नमूद केले की, कृषि शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी बांधवांच्या कल्याणाकरिता करावा. दीक्षांत समारंभाच्या दिवसाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात, हा समारंभ म्हणजे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फलित होय. आज पासून आपल्या जीवनाला एक नवी दिशा आणि चालना मिळणार आहे. अनेक हुशार विद्यार्थी कृषि शिक्षणाची मुद्दामहून निवड करतात, यामुळे कृषि क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन होण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये नावीन्य शोधण्याबरोबरच चिकित्सक वृत्ती, सकारात्मक दृष्टीकोन आणि सांघीकरित्या प्रश्न सोडवण्याची कला विकसित होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनाची ओळख होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने आपल्या ५५ विद्यार्थ्यांना आणि २५ अधिकाऱ्यांना नाहेप प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जेच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन, हंगेरी, मलेशिया, थायलंड, कॅनडा आणि ब्राझील येथील विद्यापीठात पाठवून सक्षम मनुष्यबळाची निर्मिती केली यातून शैक्षणिक आणि संशोधन कार्यास नवी दिशा मिळणार आहे. भविष्यामध्ये कृषि उत्पादनाची गरज भागवण्यासाठी अधिक उत्पादन देणारे वाण विकसीत करणे, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवडीवर भर, बियाणांचा दर्जा वाढवून बियाणे सहज उपलब्ध करणे, कृषि संशोधनामध्ये आणि विकासामध्ये भरीव गुंतवणूक करणे, अचूक शेती पद्धती, शेतीमध्ये यांत्रिकीकरण, काढणी पश्चात तंत्रज्ञानावर संशोधन करून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना द्यावे लागेल शिवाय शाश्वत बाजार व्यवस्था उभारून शेतीमालास चांगला भाव मिळवून देऊन शेतकऱ्यांना समृद्ध करावे लागेल. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करावा. यासाठी विद्यापीठ आणि  स्नातक त्यांच्या ज्ञानाचा उपयोग रून हे कार्य पुढाकाराने करतील असे त्यांनी आपल्या अभिभाषणात नमूद केले.

स्वागतपर भाषणात वनामकृवीचे मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर करताना म्हणाले की, विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तार कार्य, विद्याथी केंद्रीत शिक्षण, नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन हा दृष्टीकोन ठेऊन कार्य करत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. डी. जी. मोरे यांनी केले. दीक्षांत समारंभास शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्रगतशील शेतकरी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या युट्यूब चॅनल वरून करण्यात आले होते.

२५ व्या दीक्षांत समारंभातील पदके व बक्षिसे

दीक्षांत समारंभात विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने निश्चित केलेले २९ सुवर्णपदके आणि दात्याने निश्चित केलेले १९ सुवर्णपदके दोन रोप्य पदके तसेच २० रोख पारितोषिके असे एकूण ७० पदके आणि पारितोषिके पात्र असणाया विद्यार्थ्यांना प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये, सायली चांदगुडे (दोन पदके), राधा लोलगे,शुभम काळे, शीजागुरुमयुम रमालक्ष्मी देवी, अंबरीश एस., क्रांती कांबळे, प्रतीक मोघे, राजकुमारी ज्योतिका, योगेश होट्टीगोदर, हिना शेख (दोन पदके), निकिता गोरडे, श्वेता बी. एस. (पदक व रोख पारितोषिक), योगेश मात्रे, मोहम्मदी बेगम (तीन पदके), प्राजक्ता चव्हाण, कोंडापल्ली  श्रीवैष्णवी, सुषमा माने, अमलाज्योती सार,  प्रतीक्षा जाधव, ऋतुजा सातपुते, कुरापती कृष्णवेणी, शितल मामडी, रमालक्ष्मी गुडीपती, नेहा माटरा, या पदव्युत्तर स्नातकांना आणि भक्ती बिनगे, इंद्रजीत पोळ (तीन पदके), विशाल कुलकर्णी, प्राची गट्टानी, श्याम अभाळे, कोमल कदम,  कृणाल पाटील, समृद्धी वांगस्कर, श्रुतिका सोळंके, शैल बाला, नंदिनी बावनकर (तीन पदके), अपेक्षा गागरे, गायत्री काबरा, अद्या शैबू, गौरी चौधरी, यश एंगडे, वैष्णवी काकडे या पदवीधारक स्नातकांना विद्यापीठ सुवर्ण पदकांनी गौरविण्यात आले तर राकेश बागमारे, प्रियंका लोखंडे, प्रियांका नखाते, प्रियंका पाटील, शीजागुरुमयुम रमालक्ष्मी देवी, प्राची गट्टानी, विशाल कुलकर्णी, रमालक्ष्मी गुडीपती, मयूरी बहीर, सुषमा माने, अपेक्षा गागरे या स्नातकांना रोख पारितोषकांनी गौरविण्यात आले.