Friday, December 12, 2025

लातूर येथे जाऊन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी माजी केंद्रीय मंत्री कै. शिवराज पाटील यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी लातूर येथे भेट देऊन माजी केंद्रीय गृहमंत्री व ज्येष्ठ नेते कै. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कै. शिवराज पाटील यांचे चिरंजीव श्री. शैलेश पाटील चाकूरकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक सांत्वन केले.

या प्रसंगी माननीय कुलगुरू यांच्या समवेत विद्यापीठाच्या लातूर, चाकूर, परळी आणि उदगीर येथील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता तसेच विविध कार्यालयांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. यामध्ये सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. दिनेश चौव्हाण, डॉ. अच्युत भरोसे, डॉ. एस. एच. कांबळे; प्रभारी अधिकारी डॉ. मोहन धुप्पे; प्राचार्य डॉ. अशोक घोटमुकळे; श्री. एस. बी. सूर्यवंशी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कै. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या समाजकारणातील मोलाच्या योगदानाचा उल्लेख करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी भावपूर्ण प्रार्थना व्यक्त केली. तसेच विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांच्या वतीने कै. शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.





Thursday, December 11, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ उत्सहात संपन्न

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय श्री श्रीरंग देवबा लाड यांना डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच एकूण २९६८ स्‍नातकांना विविध पदव्या प्रदान करून गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग वैयक्तिक प्रगतीसोबतच राष्ट्रीय विकासासाठी करावा. — माननीय माजी महासंचालक डॉ. मंगला राय

विद्या, धन आणि शक्ती यांचा सदुपयोग समाजहितासाठी व्हावा. — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले
माननीय श्री श्रीरंग देवबा लाड यांना डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले 

माजी महासंचालक तथा माजी सचिव माननीय डॉ. मंगला राय
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग वैयक्तिक, कौटुंबिक आणि राष्ट्रीय विकासासाठी करावा, तसेच जागरूक राहून सातत्याने कार्य करावे. आपल्यात सामर्थ्य निर्माण करणारी कृती सतत ठेवावी आणि मानवी मूल्यांची जपणूक करावी, असे प्रतिपादन भारतीय कृषि संशोधन परिषदेचे (ICAR) माजी महासंचालक तथा कृषि संशोधन आणि शिक्षण विभागाचे (DARE) माजी सचिव माननीय डॉ. मंगला राय यांनी केले. ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या २७व्या दीक्षांत समारंभातील अभिभाषणात बोलत होते. हा समारंभ दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला.

अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. व्यासपीठावर पं.दे.कृ.वि.चे माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख, म.फु.कृ.वि.चे माननीय कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण, मनपा आयुक्त माननीय श्री. नितीन नार्वेकर, प्रगतिशील शेतकरी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड, तसेच वनामाकृविचे माननीय माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील, डॉ. के. पी. गोरे, डॉ. अशोक ढवण, कृषि परिषदेचे सदस्य श्री. जनार्धन कातकडे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, उपजिल्हाधिकारी श्री. उदय भोसले, विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. पी. आर. शिवपूजे, डॉ. धर्मराज गोखले, डॉ. एस.डी. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी विद्यापीठाच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संपूर्ण विद्यापीठ परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या दीक्षांत समारंभात काही विद्यार्थ्यांनी तीन-तीन पुरस्कार मिळवले असल्याचे नमूद करत त्यांनी समाधान व्यक्त केले. मेहनत केल्यास पुरस्कार मिळतात आणि कार्यक्षमता वाढते, हे यातून स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

भारतीय कृषीच्या बदलत्या दिशा आणि भविष्यातील संधींबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड, संशोधनाधिष्ठित मार्गदर्शन आणि योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ती अधिक उंची गाठू शकते. हवामानबदल, पाणीटंचाई, मृदा आरोग्य आणि बदलत्या बाजारपेठेची आव्हाने सक्षमपणे हाताळण्याची भारतीय शेतकऱ्यांची क्षमता मोठी आहे; फक्त त्यांना अचूक माहिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, अचूक शेती (Precision Farming), जलसंधारण तंत्र, बीज सुधारणा, कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच डिजिटल कृषी — हे घटक पुढील दशकात कृषी विकासाला नवी चालना देणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण–2020 नुसार अभ्यासक्रमातील सुधारणा, उत्कृष्ट संशोधन व तंत्रज्ञान हस्तांतरण, शिक्षणातील मूल्याधिष्ठित दृष्टिकोन, कृषी विकासासाठी ‘गुंतवणूक आणि अधिक गुंतवणूक’ ही मूलभूत गरज, कृषी व शेतकरी विकासासाठी एकात्मिक आणि आधुनिक कृषि प्रणालींची निर्मिती, प्रदेशनिहाय शाश्वत उत्पादन प्रणालींची उभारणी, माती–पाणी–जैवविविधता संवर्धन, पिकसंरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, इनपुट–आउटपुट आधारित कृषी मॉडेल्स आणि बहुआयामी अ‍ॅग्रो-इकोसिस्टमची निर्मिती — या मुद्द्यांवर त्यांनी विशेषत्वाने प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रत आणि माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री दत्तात्रय भरणे यांनी पाठविलेल्या शुभेच्छांचा उल्लेख केला. माननीय कुलगुरूंनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रगतशील शेतकरी श्री श्रीरंग उर्फ दादा लाड यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवीने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रयोगशील शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. हा पुरस्कार केवळ एका शेतकऱ्याचा नसून संपूर्ण शेतीव्यवस्थेचा आणि शेतीत कार्य करणाऱ्या सर्व घटकांचा सन्मान आहे, असे ते म्हणाले. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भवः’ या भावनेतून कार्यरत असून विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तारकार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन या तत्त्वांवर कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाच्या सर्व विभागांनी या कार्यात मनापासून योगदान दिले आहे. संशोधनाच्या आघाडीवरही विद्यापीठ जोखीम व्यवस्थापन, उत्पादनवाढ आणि आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांच्या संशोधनात विद्यापीठाने लक्षणीय योगदान दिले आहे. काही शेतकऱ्यांचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी येत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि संशोधकांनी या समस्येवर अधिक लक्ष केंद्रीत करून संशोधनाची दिशा ठरवावी, असे आवाहन केले. शेतीसाठी विद्वत्तेबरोबरच प्रत्येक पिकासाठी लागवडीची वैज्ञानिक मानके ठरविणे आवश्यक आहे. उत्पादन खर्चात बचत करून सकस व गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळावे, यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रत हे नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला विशेष प्रोत्साहन देत आहेत. या कार्यात विद्यापीठ सक्रियतेने सहभागी असून ‘बायोमिक्स’ आणि इतर सेंद्रिय घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत आहे. संशोधनासाठी चालू प्रकल्पांबरोबरच सिरसाद्वारे नवे प्रकल्प उभारले जात असून, त्यातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांचे सहकार्य लाभत आहे. आजच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री संजयसिंह चव्हाण आणि आयुक्त श्री नितीन नार्वेकर यांची उपस्थिती हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विस्तारकार्याच्या संदर्भात त्यांनी सांगितले की, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ तसेच आठवड्यातून दोन वेळा ‘ऑनलाइन शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद’ आयोजित केला जातो. यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात लक्षणीय भर पडत असून, विद्यापीठाच्या कुलगुरूंना ‘शेतकऱ्यांचे कुलगुरू’ म्हणून ओळख मिळत आहे.

विद्यार्थ्यांना संदेश देताना त्यांनी सांगितले की, शिक्षण घेऊन केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योजकतेकडे वळावे. विद्या घेऊन चारित्र्य जोपासावे; चारित्र्यातून विनम्रता येते, विनम्रतेतून पात्रता निर्माण होते आणि पात्रतेतून धन व समाधान प्राप्त होते. विद्या, धन आणि शक्ती यांचा सदुपयोग करावा. तसेच नीतीमूल्ये जपत इतरांच्या अडचणी व व्यथा समजून घ्याव्यात आणि ‘सर्वांच्या भल्याचा’ दृष्टिकोन ठेवावा. आपल्या इच्छा–अपेक्षा सजगतेने ठरवून त्यांची पूर्तता करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असेही त्यांनी सांगितले.

समारंभाच्या स्वागतपर भाषणात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले. त्यांनी विद्यापीठाच्या प्रगती व कार्याची माहिती देत सांगितले की, विद्यापीठाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून भारतीय कृषी संशोधन परिषदेने ‘अ’ दर्जाची अधिस्वीकृती प्राप्त केली आहे. विद्यापीठाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान-सन्मानही मिळाले आहेत. तसेच, जुने व नवीन महाविद्यालयांमार्फत विद्यापीठाने आजपर्यंत एकूण १,२९,२८४ विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण प्रदान केले असून, शेतकऱ्यांसाठी सक्षम व प्रभावी मनुष्यबळ घडवले आहे.

दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेती व शेतकरी विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले असून धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, तसेच  ‘स्मार्ट प्रोजेक्ट’, ‘पोक्रा’ तसेच महाराष्ट्र कृषी एआय धोरण यामुळे महाराष्ट्र आज भारतातील कृषी क्षेत्रातील ‘लाइट हाऊस स्टेट’ म्हणून उदयास येत आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे महाॲग्री एआय पॉलिसी २०२५–२०२९’ जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यासोबतच जलयुक्त शिवार अभियान, शेतीमालाला हमीभाव आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा व सिंचन प्रकल्पांचा विस्तार, पाणी संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, अन्नप्रक्रिया व मूल्यसाखळी विकास, बाजार सुधारणा तसेच डिजिटल शेती यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी राज्यातील शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची नोंद घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित केले.

तसेच परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील प्रगतीशील शेतकरी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड यांनाही ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांचा शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण आणि घनिष्ठ संपर्क, तसेच राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त “दादा लाड कापूस तंत्रज्ञान” हे त्यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. सन २००२ – ०३ पासून शेतकरी-आधारित संशोधनातून त्यांनी कापूस पिकातील उत्पादकता कमी करणाऱ्या गळफांदी (मोनोपोडियल) फांद्यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या प्रारंभीक छाटणीची प्रभावी पद्धत विकसित केली. शेंडा खुडणी, अतीघन लागवड, ठिबक सिंचन आणि आच्छादन या तंत्रांचा एकत्रित अवलंब करून त्यांनी कापूस पिकासाठी समग्र, वैज्ञानिक आणि नफावर्धक तंत्रज्ञान विकसित केले. या पद्धतीमुळे उत्पादक फांद्यांकडे अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो, बोंडांचे वजन अधिक होते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, पीक कालावधी कमी होतो आणि शेतकऱ्यांचा नफा मोठ्या प्रमाणात वाढतो. याचबरोबर, चार दशकांहून अधिक काळ लाल कांधारी या देशी गायीच्या जातीच्या संवर्धन आणि प्रसारासाठी त्यांनी उल्लेखनीय आणि व्यापक कार्य केले आहे.

दीक्षांत समारंभात सन २०२४–२५ या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखांतील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकूण २९६८ स्नातकांना पदव्या अनुग्रहीत करण्यात आल्या. यामध्ये आचार्य पदवीचे ४४, पदव्युत्तर पदवीचे ३३३, आणि पदवी अभ्यासक्रमाचे २५९१ स्नातकांचा समावेश आहे. यासोबतच, दीक्षांत समारंभात सन २०२४–२५ या शैक्षणिक वर्षातील विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ आणि दात्यांकडून निश्चित केलेली सुवर्ण पदके, रौप्य पदके आणि रोख पारितोषिके पात्र स्नातकांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. एकूण ६३ पदके आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यामध्ये १४ विद्यापीठ सुवर्ण पदके, ११ दात्यांकडून प्रदान केलेली सुवर्ण पदके, १ रौप्य पदक, १२ रोख पारितोषिके, तसेच २५ पदव्युत्तर गुणवत्ताप्रमाणपत्रांचा समावेश आहे.

पीएच.डी. पदवी प्रमाणपत्रे, पदके आणि इतर प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभास उपस्थित असलेल्या पदवीधारकांना प्रदान करण्यात आली. तसेच इतर स्नातकांना त्यांच्या संबंधित महाविद्यालये व विभागांमध्ये याच दिवशी पदवी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

याबरोबरच, माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेत प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ प्रदान करण्याची सूचना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार, विद्यापीठाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधून निवड समितीच्या अहवालानुसार सर्वसाधारण गटातील नऊ आणि महिला गटातील दोन, अशा एकूण अकरा शेतकऱ्यांची निवड करून त्यांना दीक्षांत समारंभात ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

यावर्षीच्या दीक्षांत समारंभात विद्यावस्त्रांमध्ये सकारात्मक बदल करण्यात आला. विद्यार्थी तसेच अधिकारी, कर्मचारी आणि प्राध्यापकवर्ग यांनी पांढरा कुर्ता-पायजमा परिधान केला, तर विद्यार्थिनी तसेच महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी क्रीम रंगाची साडी व ब्लाउज परिधान केला. हा सकारात्मक बदल यापूर्वी राष्ट्रीय पातळीवरील अनेक विद्यापीठांनी स्वीकारला असून, या विद्यापीठानेही यावर्षी तो अवलंबिला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजित चव्हाण यांनी केले. दीक्षांत समारंभास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, प्रगतशील शेतकरी तसेच विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, स्नातक आणि त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

२७ व्या दीक्षांत समारंभातील पदके, बक्षिसे व प्रमाणपत्रे

सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सागर प्रमोद (पीएच.डी. – कृषी वनस्पतीशास्त्र), गोरे शुभम (पीएच.डी. – कृषी कीटकशास्त्र), प्रलीप्ता स्वेन (पीजी – मृदशास्त्र; तीन पदके), तोरणाळे सिद्धी (युजी – अन्न तंत्रज्ञान; तीन पदके), बंडला काव्या (पीजी – पीक रोगशास्त्र), दसारी श्रावणी (पीजी – कृषी वनस्पतीशास्त्र), नवले पूजा (पीजी – कृषी विद्याशास्त्र), प्रियंका एस. एम. (पीजी – कृषी कीटकशास्त्र), गुडीपती व्यंकटा (पीजी – अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान), सुमा बनकर (पीजी – सामुदायिक विज्ञान), मंजिमा ए. पी. (पीजी – उद्यानविद्या), जाधव पूजा (पीजी – जैवतंत्रज्ञान) आणि विश्वब्रह्म कोमल (पीजी – कृषी व्यवसाय व्यवस्थापन) यांचा समावेश आहे. तसेच युजी अभ्यासक्रमांत वाणी गायत्री (कृषी अभियांत्रिकी; दोन पदके), धरजाने लोकश्री (कृषी), बनछोड भाग्यश्री (कृषी), शिंदे पल्लवी (सामुदायिक विज्ञान), पुंड स्वाती (उद्यानविद्या), देसाई प्राजक्ता (जैवतंत्रज्ञान) आणि थावरी नितेश (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) यांचाही समावेश आहे.

रोख पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये पीएच.डी. स्तरावर आवटे शुभांगी (मृद विज्ञान – दोन पुरस्कार), तर पदव्युत्तर स्तरावर दुन्ना नोहिता (मानव विकास व कौटुंबिक अभ्यास – दोन पुरस्कार), भोसले ओंकार (मृद विज्ञान), प्रियांका एस. एम. (कृषी कीटकशास्त्र), प्रलीप्ता स्वेन (मृद विज्ञान) आणि सात्विक पंडा (हवामानशास्त्र) यांचा समावेश आहे. तसेच, पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांत शिंदे पल्लवी (सामुदायिक विज्ञान), वाणी गायत्री (कृषी अभियांत्रिकी) आणि देसाई प्राजक्ता (जैवतंत्रज्ञान) यांचा समावेश आहे.

विशेष प्राविण्य प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये नवले पूजा, दसारी श्रावणी, चौधरी आचल, पठाण सोहेल, देविका ए., अनुसया के., मुळे नागेंद्र, वाघ श्रेयश, प्रियंका एस. एम., बंडला काव्या, प्रलीप्ता स्वेन, सात्विक पंडा, जाधव पूजा, गुडीपती व्यंकटा, दसारी प्रियंका, सुमा बनकर, दुन्ना नोहिता, पवित्रा एस., वाकळे प्रतीक्षा, मुंजिमा ए. पी. आणि विश्वब्रह्म कोमल यांचा समावेश आहे.

शेतकरी शास्त्रज्ञ’ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांची नावे

सर्वसाधारण गटातील निवड:

श्री. चंद्रकांत अंबादासराव देशमुख, मु. वरपूड, ता. परभणी, जि. परभणी

श्री. यज्ञेश वसंतराव काटबणे, मु. धनेगाव, पोस्ट ढोरकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

श्री. प्रताप किशनराव काळे, मु. धानोरा (काळे), पोस्ट कळगाव, ता. पूर्णा, जि. परभणी

श्री. श्रीकांत बेलेश्वर आखाडे, मु. वालसावंगी, ता. भोकरदन, जि. जालना

श्री. सुदर्शन शिवाजी जाधव, मु. गंजेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव

श्री. शरद बाबुराव पाटील, मु. मावलगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर

श्री. भगवान रामजी इंगोले, मु. मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड

श्री. अण्णासाहेब अर्जुनराव जगताप, मु. सावरगाव, ता. माजलगाव, जि. बीड

श्री. सदाशिव वामनराव अडकिने, मु. इंजनगाव, ता. वसमत, जि. हिंगोली

महिला शेतकरी गट:

श्रीमती मीरा जनार्धन आवरगंड, मु. माखणी, ता. पूर्णा, जि. परभणी

          श्रीमती सुनंदा शिवाजी क्षीरसागर, मु. पांगरा, पोस्ट चितेगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

कुलसचिव श्री. संतोष वेणीकर

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार












मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत वनामकृविने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ उपक्रम उत्साहात राबविला

विद्यापीठाचे तंत्रज्ञान अवलंबनामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले; प्रगतशील शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ’ सन्मान — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमितपणे आयोजित केला जातो. त्या अनुषंगाने दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी हा उपक्रम विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील १२ चमूतील ३१ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळावे यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या शास्त्रज्ञांनी सुमारे ४०० शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने पिकांच्या सद्य व्यवस्थापनासोबतच खर्चात बचत होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. शास्त्रज्ञांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती, कीडनियंत्रण, पिकसंरक्षण, मृदा आरोग्य संवर्धन, सुधारित वाणांचा वापर, पीक उत्पादनवाढीसाठी आवश्यक लागवड तंत्रज्ञान तसेच पशुधन आणि फळबाग व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

या उपक्रमात मौजे साळापुरी (ता. जि. परभणी) येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम शेतकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाने तुरीचा गोदावरी वाण, सोयाबीन, कापूस, हरभऱ्याचा परभणी चना वाण यासह विविध पिकांसाठी विकसित केलेल्या विविध आधुनिक, शाश्वत आणि परिणामकारक तंत्रज्ञानांची माहिती देताना सांगितले की, या तंत्रज्ञानांच्या अवलंबामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्पादनक्षमता वाढवून आपले जीवनमान उंचावण्यास मोठे यश मिळवले आहे. विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार उपक्रमांचा प्रत्यक्ष लाभ ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ सारख्या उपक्रमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी असेही नमूद केले की, तंत्रज्ञान अवलंबनातून उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभात शेतकरी शास्त्रज्ञ’ या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. माननीय कुलगुरूंनी विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यापीठ–शेतकरी नातेसंबंध अधिक दृढ करण्यावर भर देत, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालय, गोळेगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, तसेच सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे माजी विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. उद्धव आळसे, प्रा. उद्धव घाटगे, डॉ. डी. एम. नाईक, डॉ. खरवडे, परभणीचे सुप्रसिद्ध डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. केदार कटिंग, प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपूडकर आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या उपक्रमात परभणी येथील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र,  छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, फळ संशोधन केंद्र. बदनापूर येथील कृषि महाविद्यालय, कृषि संशोधन केंद्र, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी), कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, खामगाव, तुळजापूर, बदनापूर) आणि लातूरचे गळीत धान्य संशोधन केंद्र आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहयोगी अधिष्ठाता तथा तुर संशोधक डॉ. दीपक के. पाटील, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. संजय पाटील, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. हनुमान गरुड, डॉ. तुकेश सुरपाम, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. एफ आर तडवी, डॉ.आर एल. कदम, डॉ. सचिन दिग्रसे, श्री. मधुकर मांडगे, श्री रामेश्वर ठोंबरे, श्री आनंद नंदनवरे तसेच कृषि विभागातीलअधिकारी श्री.प्रकाश देशमुख, प्रा. नरेंद्र जोशी, डॉ. गायकवाड, श्री साळवे, श्री गरजे, यांनी मार्गदर्शन केले.












Wednesday, December 10, 2025

वनामकृवितील २७व्या दीक्षांत समारंभात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस व प्रगतिशील शेतकरी माननीय श्रीरंग लाड यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या मानद डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीला महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रत यांनी मंजुरी दिली आहे.

या मानद पदवीसाठी दोन मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेती व शेतकरी विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले व धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. स्मार्ट प्रोजेक्ट आणि पोक्रा तसेच महाराष्ट्र कृषी एआय धोरणामुळे महाराष्ट्र आज भारतातील कृषी क्षेत्रातील ‘लाइट हाऊस स्टेट’ म्हणून उदयास येत आहे. दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे ‘महाॲग्री एआय पॉलिसी २०२५–२०२९’ जाहीर करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.याबरोबरच जलयुक्त शिवार अभियान, शेतीमालाला हमीभाव व बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा व सिंचन प्रकल्पांचा विस्तार, पाणी संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, अन्नप्रक्रिया व मूल्यसाखळी विकास, बाजार सुधारणा तसेच डिजिटल शेती यांसारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी राज्यातील शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणले. ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाच्या दृष्टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करणार आहे.

तसेच परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथील प्रगतीशील शेतकरी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड यांचीही या डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवीसाठी निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांशी त्यांचा सातत्यपूर्ण आणि घनिष्ठ संपर्क तसेच राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त “दादा लाड कापूस तंत्रज्ञान” हे त्यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. सन 2002–03 पासून शेतकरी-आधारित संशोधनातून त्यांनी कापूस पिकातील उत्पादकता घटवणाऱ्या गळफांदी (मोनोपोडियल) फांद्यांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या प्रारंभीक छाटणीची प्रभावी पद्धत विकसित केली. शेंडा खुडणी, अती घन लागवड, ठिबक सिंचन आणि आच्छादन या तंत्रांचा एकत्रित अवलंब करून त्यांनी कापूस पिकासाठी समग्र, वैज्ञानिक आणि नफावर्धक तंत्रज्ञान विकसित केले. या पद्धतीमुळे उत्पादक फांद्यांकडे अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढतो, बोंडांचे वजन जास्त होते, किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, पीक कालावधी कमी होतो आणि शेतकऱ्यांचा नफा मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच चार दशकांहून अधिक काळ लाल कांधारी या देशी गायीच्या जातीच्या संवर्धनासाठी त्यांनी उल्लेखनीय आणि व्यापक कार्य केले आहे. या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन विद्यापीठ त्यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स’ (मानद) पदवी प्रदान करून सन्मानित करणार आहे.

हा सन्मान केवळ एका व्यक्तीपुरताच मर्यादित नसून, शेती क्षेत्रात प्रगतशील विचार आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

याबरोबरच, माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेमध्ये प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ देण्याची सूचना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार विद्यापीठाने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून निवड समितीच्या अहवालानुसार सर्वसाधारण गटातील नऊ आणि महिला गटातील दोन अशा एकूण अकरा शेतकऱ्यांची निवड केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या दीक्षांत समारंभात शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

‘शेतकरी शास्त्रज्ञ’ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांची नावे

सर्वसाधारण गटातील निवड

श्री.चंद्रकांत अंबादासराव देशमुख, मु.वरपूड ता.जि. परभणी

श्री. यज्ञेश वसंतराव कात बने,  मु. धनेगाव पोस्ट ढोरकीन, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर

श्री. प्रताप किशनराव काळे,  मु. धानोरा (काळे) पोस्ट कळगाव, ता. पूर्णा, जिल्हा परभणी

श्री. श्रीकांत बेलेश्वर आखाडे, मु. वालसावंगी, ता. भोकरदन, जिल्हा जालना

श्री. सुदर्शन शिवाजी जाधव, मु. गंजेवाडी, ता. तुळजापूर जिल्हा धाराशिव

श्री. शरद बाबुराव पाटील मु. मावलगाव, ता. अहमदपूर, जिल्हा लातूर

श्री. भगवान रामजी इंगोले, मु. पोस्ट मालेगाव, ता. अर्धापूर, जिल्हा नांदेड

श्री. अण्णासाहेब अर्जुनराव जगताप, मु. सावरगाव, ता. माजलगाव, जिल्हा बीड

श्री. सदाशिव वामनराव अडकिने, मु. हिंगणगाव, ता. वसमत, जिल्हा हिंगोली

महिला शेतकरी गट

श्रीमती मीरा जनार्धन आवरगंड मु. माखणी, ता. पूर्णा, जिल्हा परभणी

श्रीमती सुनंदा शिवाजी क्षीरसागर, मु. पांगरा, पोस्ट चितेगाव, ता. पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर


Tuesday, December 9, 2025

वनामकृवि व वेस्टर्न सिडनी विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यासाठी सामंजस्य करार

दुहेरी पदवी, विद्यार्थी देवाणघेवाण आणि संयुक्त संशोधन कार्यक्रमास नवे बळ... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया  यांच्यात उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणास चालना देण्यासाठी, तसेच दुहेरी पदवी आणि संयुक्त संशोधन (Dual/Joint Higher Degree by Research) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पाच वर्षांच्या कालावधीचा व्यापक सामंजस्य करार (MoU) दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी स्वाक्षरीत करण्यात आला. हा करार स्वाक्षरीत होताच दोन्ही संस्थांमध्ये संशोधन सहकार्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे.

या करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील प्राधिकृत प्रतिनिधी प्रा. देबोराह स्वीन्ये यांनी स्वाक्षरी केली. या महत्वपूर्ण करारामुळे विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांसाठी नव्या संधींचा मार्ग मोकळा झाला.

करारानुसार, दोन्ही विद्यापीठे एकत्रितपणे दुहेरी पदवी आणि संयुक्त पीएच.डी. कार्यक्रम, विद्यार्थी आणि प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, आधुनिक संशोधन सुविधा व प्रयोगशाळांचा परस्पर वापर, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करतील.

करारात विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया, निवासी कालावधी, संशोधन पायाभूत सुविधा, अनुशासन आणि नैतिकता, परीक्षा पद्धती, बौद्धिक संपदा हक्क, शिष्यवृत्ती, शुल्क संरचना, तसेच इतर शैक्षणिक बाबींचे स्पष्ट नियम समाविष्ट करण्यात आले आहेत. या करारामध्ये जागतिक शिक्षण मानकांचे पालन तसेच भारतातील विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) नियम आणि ऑस्ट्रेलियातील उच्च शिक्षण मानक आराखडा (Higher Education Standards Framework) यांचा सुसंगत विचार करण्यात आला आहे.

या सामंजस्य करारामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील संशोधन विद्यार्थ्यांना जगातील अत्याधुनिक संशोधन पद्धती, जागतिक दर्जाचे मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशात येणार असल्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, आधुनिक कृषि, हवामान बदल, अन्न-तंत्रज्ञान, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये उन्नत संशोधनाला चालना देण्यासाठी हा करार मार्गदर्शक ठरेल.

वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या प्रतिनिधी प्रा. देबोराह स्वीन्ये यांनी सांगितले की, हा उपक्रम भारत-ऑस्ट्रेलिया शैक्षणिक संबंध दृढ करण्यासोबतच नवीन संशोधन निर्मितीस हातभार लावेल. विद्यार्थ्यांनी परस्पर विद्यापीठांमध्ये ठराविक कालावधीसाठी संशोधन करणे, संयुक्त मार्गदर्शनाखाली प्रबंध तयार करणे आणि दोन्ही विद्यापीठांकडून पदवी प्राप्त करणे ही या कराराची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत.

या सहकार्यातून मराठवाड्यासह राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे आंतरराष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि करिअर विकासाच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असल्याची माहिती शिक्षण व संशोधन क्षेत्रातून देण्यात येत आहे.