Thursday, January 22, 2026

सहिष्णुता, सत्य आणि त्यागाचा संदेश देणारे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी –माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

‘हिंद की चादर’श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात जनजागृती रॅली



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयांतर्गत परभणी येथील कृषि, उद्यानविद्या, अन्नतंत्रज्ञान, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी कृषी महाविद्यालय परिसरात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली.

हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

रॅलीमध्ये विद्यापीठ मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांतील व कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या पूर्व-प्रायोगिक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या महान कार्याचे स्मरण करणाऱ्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी त्यांच्या शहादतीला भावपूर्ण अभिवादन केले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी व धार्मिक स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करून संपूर्ण जगाला सहिष्णुता, सत्य आणि त्यागाचा मार्ग दाखविला आहे. पुढे ते म्हणाले की, आजच्या सामाजिक परिस्थितीत जाती–धर्मांमध्ये कोणताही तेढ निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येकाने परस्परांच्या श्रद्धेचा तसेच व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणे अत्यावश्यक आहे. सहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाल्यासच देशाची खरी प्रगती साध्य होऊ शकते. पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, देशाने तसेच महाराष्ट्राने घडवून आणलेल्या थोर महापुरुषांचा इतिहास, त्यांचे कार्य, त्याग व बलिदान यांची माहिती प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आपण सुखाने व शांततेत जीवन जगत आहोत, त्यामागे साडेतीनशे - चारशे वर्षांपूर्वीचा संघर्षमय इतिहास दडलेला आहे. हा इतिहास आजच्या पिढीने समजून घेणे आवश्यक असून भारताची अब्रू वाचवण्यासाठी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी अतुलनीय बलिदान दिले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवता व सत्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा गौरव केला. त्यांनी जोपासलेली मूल्येच आज त्यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त स्मरणात आणली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्यागमय जीवनकार्याची माहिती देत अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या विचारांतून युवकांना योग्य दिशा मिळते, असे नमूद केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फरिया खान, डॉ. प्रवीण घाडगे, डॉ. सुभाष विखे तसेच डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी विशेष परिश्रम घेतले.















‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विविध उपक्रमांची भव्य रॅलीने सांगता

 वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालय व कृषि तंत्र विद्यालयाचा संयुक्त उपक्रम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जनजागृतीपर विविध साप्ताहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार आणि सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या राबविण्यात आले.

या सप्ताहभर चाललेल्या उपक्रमांमध्ये ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, धर्मस्वातंत्र्य, मानवता व सहिष्णुतेचा संदेश युवकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला. यामध्ये त्यांच्या गौरवशाली जीवनकार्यावर आधारित चित्रफित प्रदर्शन, माहितीपर बॅनर्स, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा तसेच निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमांची सांगता म्हणून दि. २२ जानेवारी २०२६ रोजी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या प्रतिमेची भव्य रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत त्यांच्या बलिदानाचा जयघोष करत मानवता, धार्मिक सहिष्णुता व सामाजिक सलोखा यांचा संदेश समाजात पोहोचविण्यात आला. या रॅलीमध्ये सुमारे २०० हून अधिक विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

या वेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर खळगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमास कृषि महाविद्यालय व कृषि तंत्र विद्यालय अंबाजोगाई येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापकवर्ग, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये व मानवतेची भावना वृद्धिंगत झाली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.






Wednesday, January 21, 2026

वनामकृविद्वारा आयोजित राज्यस्तरीय एकदिवसीय कार्यशाळेतून महाराष्ट्रासाठी संशोधन कृती आराखड्याची दिशा निश्चित

विकसित कृषि संकल्प अभियान–२०२५ मधून पुढे आलेल्या शेतकरी प्रश्नांवर केंद्रित सखोल मंथन


भाकृअपचे माननीय महासंचालक डॉ. मांगी लाल जाट 
वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय अतिरिक्त मुख्य सचिव (कृषि) श्री. विकासचंद्र रस्तोगी (भा.प्र.से.)

पोकरा प्रकल्पाचे माननीय प्रकल्प संचालक श्री. परिमल सिंग (भा.प्र.से.) 

कृषि आयुक्‍त माननीय श्री सुरज मांढरे (भाप्रसे)

कृषि परिषदेच्‍या महासंचालिका माननीय श्रीमती वर्षा लड्डा - उंटवाल (भाप्रसे)

पीक विज्ञान विभागाचे माननीय उपमहासंचालक डॉ. डी. के. यादवा

विकसित कृषि संकल्प अभियान (VKSA–2025) अंतर्गत शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या समस्यांवर आधारित संशोधन योग्य मुद्द्यांचा आढावा घेऊन महाराष्ट्र राज्यासाठी ठोस व कृतीक्षम संशोधन आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारा एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. या कार्यशाळेचे यजमानपद भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो (NBSS&LUP) यांनी भूषविले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारा अमरावती रोड येथील ब्युरो परिसरात ही कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली.

देशभरात २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विकसित कृषि संकल्प अभियान–२०२५ अंतर्गत महाराष्ट्रात या अभियानाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे करण्यात आले होते. खरीप पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, शासनाच्या कृषि योजना व धोरणांचा प्रसार करणे, मृदा आरोग्य पत्रिकेवर आधारित पीक व खत व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करणे तसेच शेतकऱ्यांकडून थेट अभिप्राय संकलित करून नाविन्यपूर्ण दस्तऐवज तयार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. या अभियानात राज्य व केंद्र शासनाचे अधिकारी, कृषि विद्यापीठांतील शास्त्रज्ञ, आयसीएआर संस्थांचे तज्ज्ञ, अटारी, कृषि विज्ञान केंद्रे, कृषि विभाग, आत्‍मा, स्वयंसेवी संस्था तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अभियाना दरम्यान शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीतील अडचणी, हवामान बदलाचे परिणाम, उत्पादन खर्च, मृदा व पाणी व्यवस्थापन, कीड-रोग समस्या तसेच बाजारपेठेतील अडथळे याबाबत सखोल माहिती संकलित केली. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सदर कार्यशाळेत विकसित कृषि संकल्प अभियान (VKSA–2025) मधून समोर आलेल्या संशोधन योग्य मुद्द्यांचे विश्लेषण करून त्यांचे प्रत्यक्ष संशोधन कृती आराखड्यात रूपांतर करण्यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यशाळेस भारतीय कृषि संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक तथा कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे (DARE) माननीय सचिव डॉ. मांगी लाल जाट हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेचे स्वागताध्यक्ष माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तर अध्यक्षस्थान महाराष्ट्र शासनाचे माननीय अतिरिक्त मुख्य सचिव (कृषि) श्री. विकासचंद्र रस्तोगी (भा.प्र.से.) यांनी भूषविले. यावेळी व्यासपीठावर पोकरा प्रकल्पाचे माननीय प्रकल्प संचालक श्री. परिमल सिंग (भा.प्र.से.), भाकृअप, नवी दिल्ली येथील पीक विज्ञान विभागाचे माननीय उपमहासंचालक डॉ. डी. के. यादवा तसेच राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो (NBSS&LUP) चे माननीय संचालक डॉ. एन. जी. पाटील यांची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेस राज्‍याचे कृषि आयुक्‍त माननीय श्री सुरज मांढरे (भाप्रसे), कृषि परिषदेच्‍या महासंचालिका माननीय श्रीमती वर्षा लड्डा - उंटवाल (भाप्रसे), अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माननीय डॉ शरद गडाख, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माननीय डॉ विलास खर्चे, नागपुर येथील महाराष्‍ट्र पशु व मत्‍स विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ नितीन पाटील, राष्‍ट्रीय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संंस्‍थेचे संचालक डॉ के सामी रेड्डी, भाकृअपचे सहाय्यक महासंचालक डॉ अजित सिंह यादव, सांखिकी संस्‍थेचे संचालक डॉ के नरसय्या, ज्ञान व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ अंजनीकुमार झा, संगणक विभागाच्‍या डॉ अल्‍का अरोरा, राहुरी कृषि विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ सुनिल सुनिल गोरंटीवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. चर्चासत्रात चारही कृषि विद्यापीठ, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे राज्‍यातील संशोधन संंस्‍था व कृषि विभागातील संचालक, वरिष्‍ठ अधिकारी व संशोधक यांनी सहभाग घेतला होता.

मार्गदर्शन करताना माननीय सचिव डॉ. मांगी लाल जाट यांनी सांगितले की, विकसित कृषि संकल्प अभियान–२०२५ मधून प्राप्त झालेला शेतकरी अभिप्राय संशोधनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून कृषि संशोधन हे केवळआउटपुट” आधारित न राहताइम्पॅक्ट” आधारित असणे आवश्यक आहे.

उद्घाटन सत्रात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यशाळेची पार्श्वभूमी मांडली. विकसित कृषि संकल्प अभियान–२०२५ दरम्यान शेतकऱ्यांकडून थेट मिळालेल्या अनुभवांवर आधारित संशोधन प्राधान्यक्रम निश्चित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढे माननीय कुलगुरू म्हणाले की शेती संशोधनामध्ये संकल्पनेपासून व्यावसायिकीकरणापर्यंतची (कन्सेप्ट टू कमर्शिअलायझेशनप्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक व संशोधन संस्था, उद्योजक आणि शेतकरी यांच्यात प्रभावी समन्वय असणे गरजेचे आहे. शेतकरी जागतिक पातळीवर आपले उत्पादन घेऊन जाऊ शकला पाहिजे. त्यासाठी स्थाननिहाय (location specific), आर्थिकदृष्ट्या परवडणारे व हवामान-अनुकूल तंत्रज्ञान विकसित करण्याची नितांत आवश्यकता आहे.

तांत्रिक सत्रामध्ये विस्तार, संशोधन व शासनाच्या दृष्टीकोनातून शेतकरी अभिप्रायांचे सादरीकरण करण्यात आले. यात राज्‍याचे कृषि आयुक्‍त श्री सुरज मांढरे (भाप्रसे) यांनी राज्‍यातील शेतकरी बांधवाचे कृषि संशोधनाबाबतचे अभिप्राय यावर सादरिकरण केले तर कृषि परिषदेच्‍या महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा - उंटवाल (भाप्रसे) यांनी शेतकरी बांधवाच्‍या गरजेचे नुसार राज्‍यातील कृषि संशोधनातील दिशा यावर सादरीकरण केले तसेच तर अटारी पुणे चे शास्‍त्रज्ञ डॉ  सय्यद शाकेर अलि यांनी कृषि विस्‍ताराबाबत शेतकरी बांधवाचे अभिप्राय आणि राष्‍ट्रीय अजैविक ताण व्‍यवस्‍थापन संंस्‍थेचे संचालक डॉ के सामी रेड्डी यांनी भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या संशोधनाबाबत शेतकरी बांधवाचे अभिप्राय यावर तर राज्‍यातील कृषि विद्यापीठाच्‍या संशोधनाबाबतच्‍या अभिप्रायाचे सादरीकरण संशोधन संचालक डॉ के एस बेग यांनी केले. 

चर्चासत्रात अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, दापोली येथील डॉ बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे राज्‍यातील संशोधन संंस्‍था व कृषि विभागातील वरिष्‍ठ अधिकारी  व संशोधक यांनी सहभाग घेतला होता.

समारोप सत्रात सर्व गटांनी सादर केलेल्या शिफारशींवर चर्चा करून महाराष्ट्रासाठी एकसंधशेतकरी-केंद्रित व परिणामकारक संशोधन कृती आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. या सत्राचे अध्यक्षस्थान माननीय अतिरिक्त मुख्य सचिव (कृषि) श्री. विकासचंद्र रस्तोगी यांनी भूषविले.

कार्यशाळेत राज्‍यातील शेतीसमोरील प्रमुख आव्हाने, कोरडवाहू शेतीचे प्राबल्यहवामानातील अनिश्चिततावारंवार येणारे दुष्काळजमिनीच्या आरोग्यातील ऱ्हासपाणीटंचाईवाढता उत्पादन खर्चतुकड्यात विभागलेली जमीनधारणा तसेच बाजारातील चढउतार यांचा सखोल आढावा घेण्यात आला. कार्यशाळेत कृषि मूल्यसाखळीतील सर्व घटकांचा समावेश करत दहा विषयगत गटांमार्फत सामूहिक संशोधन पद्धती, संसाधनांचा कार्यक्षम वापर, पुनरावृत्ती टाळणे तसेच संशोधन निष्कर्षांचा वेगवान प्रसार यावर विशेष भर देण्यात आला. महाराष्ट्र राज्यासाठी एकत्रित व कृतीशील संशोधन आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने दहा विषयांवर समांतर तांत्रिक गट चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चांमध्ये पीक सुधारणा, हवामान-संवेदनशील शेती, मृदा आरोग्य व्यवस्थापन, कृषि यांत्रिकीकरण, कीड व रोग व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, फलोत्पादन, मूल्यवर्धन व बाजार संलग्नता, अचूक शेती, विस्तार संशोधन तसेच पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश होता.

या वेळी उपस्थित तज्ज्ञांनी मत व्यक्त केले की, आजच्या शेतकऱ्यांना प्रदेशनिहाय, हवामान-सहिष्णु, आर्थिकदृष्ट्या परवडणारे व तंत्रज्ञानाधारित उपायांची नितांत गरज असून त्यासाठी संशोधन, विस्तार व धोरण यांमध्ये अधिक सुसूत्र समन्वय आवश्यक आहे. ही कार्यशाळा राज्यातील कृषि संशोधन, विस्तार व धोरणनिर्मिती यामध्ये प्रभावी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या गरजांनुसार भविष्यातील संशोधनाची दिशा निश्चित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. 

भारतीय कृषि अनुसंधान संस्‍थेचे संचालक डॉ विजय वाघमारे, डॉ राजीव मराठे, डॉ एस के शुक्‍ला, डॉ विजय महाजन, डॉ कौशीक बॅनर्जी, डॉ के व्‍ही प्रसाद आदींची प्रमुख उपस्थिती होती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच विविध विषयातील प्रमुख शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला. शास्‍त्रज्ञ डॉ प्रविण वैद्य, डॉ आर बी क्षीरसागर, डॉ विश्‍वनाथ खंंदारे, डॉ गजेंद्र लोंढे, डॉ हरिहर कौसडीकर, डॉ गजेंद्र जगताप, डॉ आनंद गोरे, डॉ दत्‍ता पाटील, डॉ पवन कुलवाल, डॉ प्रशांत बोडखे, डॉ सचिन नलावडे आदींंनी कार्य केले. 

वनामकृविच्या समुदायिक विज्ञान महाविद्यालयात ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी शताब्दी निमित्त विविध उपक्रम

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या समुदायिक विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

कार्यक्रमांत शीख धर्माचे नववे गुरु, ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्य, धर्मस्वातंत्र्यासाठी केलेले अतुलनीय बलिदान आणि मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांतर्गत दिनांक १९ जानेवारी रोजी हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या गौरवशाली इतिहास व कार्याविषयी चित्रकला स्पर्धा, दिनांक २० जानेवारी रोजी भाषण स्पर्धा, तर दिनांक २१ जानेवारी रोजी निबंध स्पर्धा तसेच महाविद्यालय परिसरात जनजागृती रॅली (प्रभात फेरी) आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी तसेच पूर्व-प्रायोगिक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या महान कार्याचे स्मरण करणाऱ्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी त्यांच्या शहादतीला भावपूर्ण अभिवादन केले.

रॅली मध्ये महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, विभाग प्रमुख डॉ. नीता गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. शंकर पुरी, महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी, एलपीपी स्कूलच्या सर्व शिक्षिका तसेच महाविद्यालय व एलपीपी स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.















वनामकृविच्या बदनापूर येथील कृषि महाविद्यालयाद्वारा ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी शताब्दी निमित्त विविध उपक्रम

हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे समाजासाठीचे योगदान गौरवशाली – श्री. खडकसिंग ग्रंथी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि महाविद्यालयाद्वारा ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम दि. १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या माध्यमातून राबविण्यात आले.

हे सर्व उपक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

या उपक्रमांतर्गत दि. २१ जानेवारी २०२६ रोजी महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक पाटील यांनी विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक सलोखा, सहिष्णुता व राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.

छत्रपती संभाजीनगर येथील गुरुद्वाराचे  श्री. खडकसिंग ग्रंथी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या प्रभावी व ओघवत्या शैलीत त्यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्य, धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान, मानवता, सहिष्णुता व सत्याचा संदेश यावर सखोल मार्गदर्शन केले. समाजात अन्याय, अत्याचार आणि धार्मिक असहिष्णुता नष्ट करण्यासाठी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. त्यांनी केवळ एका धर्मासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या हक्कांसाठी आपले प्राण अर्पण केले, असे प्रतिपादन श्री. खडकसिंग ग्रंथी यांनी केले.

‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम निमित्त आयोजित निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य लेखन व इतर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्हे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक बांधिलकी व मूल्याधिष्ठित विचारांची रुजवणूक व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमास कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सोमवंशी, महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुनील माने, डॉ. रावसाहेब राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश तनपुरे व कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रवीण चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले.

या प्रसंगी महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.





‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील जिमखाना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दिनांक १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

हे सर्व कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या निर्देशानुसार सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या पार पडले.

दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या गौरवशाली इतिहासाचा संदर्भ देत सत्य, सहिष्णुता व धर्मनिरपेक्षतेची मूल्ये आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारी व नैतिक मूल्यांचे भान जपावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रास्ताविकात जिमखान्याचे डॉ. गजानन वसू यांनी ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत धर्मस्वातंत्र्य, मानवी मूल्यांचे रक्षण तसेच अन्यायाविरुद्ध निर्भीड भूमिका या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

शहीदी समागम वर्षानिमित्त महाविद्यालयात चित्रकला, निबंध लेखन व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, शौर्य व धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे सर्जनशील व अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधून इतिहास जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या निमित्ताने महाविद्यालय परिसरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी अमर रहें”, “धर्मस्वातंत्र्याचा जयघोष”, “सत्य व बलिदान अमर असो” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या रॅलीत प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीमय व प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला.

या कार्यक्रमास प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. सुमंत जाधव, डॉ. मधुकर मोरे, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. विशाल इंगळे, डॉ. अनिकेत वाईकर, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. शैलजा देशवेना, डॉ. ओंकार गुप्ता, इंजी. शंकर शिवणकर व श्री राजाराम वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच जिमखाना सचिव डॉ. गजानन वसू, श्री प्रमोद राठोड व श्री हनुमंत ढगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव निर्माण झाली असून मूल्याधिष्ठित, जबाबदार व सजग नागरिक घडविण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.