Sunday, September 21, 2025

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सल्ला - दुर्लक्ष न करता, शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन वेळीच करा

 


मराठवाड्यात बऱ्याच भागात मोठ्या पावसानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर पडताना आढळून येते आहे, त्यामुळे सोयाबीन कापूस यासारख्या पिकामध्ये तसेच भाजीपाला व फळ बागेमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच लक्ष देऊन सामुहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे यांनी केले.

कसे कराला शंखी गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन...

नियंत्रणात्मक उपाययोजना

सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.

गोगलगायी जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच  करणे गरजेचे आहे.

शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.

गोगलगायींना आकर्षित करण्यासाठी शेतात ठिकठिकाणी गोणपाट ओले करून त्यावर पत्ताकोबी अथवा पपई ची पाने बारीक करून ठेवावीत, त्याला आकर्षित होऊन जमा झालेल्या गोगलगायींवर तंबाखूचा अर्क ५ लिटर (२५० ग्रॅम तंबाखू भुकटी ७.५ लिटर पाण्यात उकळून ५ लिटर तयार झालेले द्रावण) + कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद द्रावण ५ लिटर (३०० ग्रॅम कॉपर सल्फेट ५ लिटर पाण्यात) असे एकूण १० लिटर द्रावण फवारावे, त्याच्या संपर्कात आल्याने गोगलगायी मरतात.

लहान शंखीच्या नियंत्रणासाठी १० टक्के मिठाची (१०० ग्रॅम प्रती १ लिटर पाणी) फवारणी फायदेशीर दिसून आली आहे. बोर्डो मिश्रण (१ किलो मोरचूद + १ किलो चुना १०० लिटर पाण्यात), कॉपर सल्फेट (३०० ग्रॅम  १० लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम १० लिटर पाण्यात) इत्यादीच्या फवारण्या गोगलगाय नियंत्रणासाठी नोंदणीकृत नाहीत, परंतु गोगलगाय नियंत्रणासाठी किंवा त्यांना परावृत करण्यासाठी फळबागेत काही प्रमाणात परिणामकारक आहेत.

गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड दाणेदार या गोगलगायनाशकाचा वापर करावा.

कापसासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.

तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे.

शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात. मेटाल्डिहाईड चा वापर, जास्त तापमान व कमी आर्द्रता असते अशावेळी जास्त प्रभावी दिसून येतो.

जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे.

दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबविण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्झाम २५ टक्के ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.

सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे. वरील गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा.

अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या वरील प्रमाणे उपाय योजना सुरवातीपासूनच केल्यास गोगलगायीचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे होते.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.


वनामकृवि संदेश क्रमांक: ०५/२०२५ ( २० सप्टेंबर २०२५)

वनामकृविच्या नांदेड येथील शासकीय कृषि महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची पाहणी – उच्च दर्जाचे बांधकाम करण्याचे निर्देश

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथे गतवर्षी सुरू झालेल्या शासकीय कृषि महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी विद्यापीठ अभियंता आणि कामाचे कंत्राटदार यांना स्पष्ट सूचना देताना सांगितले की, बांधकाम उच्च दर्जाचे, मजबूत व शंभर वर्षे टिकेल असे असावे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणे ही विद्यापीठाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

माननीय कुलगुरूंनी पुढे असेही नमूद केले की बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वसतिगृह, प्रयोगशाळा, वाचनालय व वर्गखोल्या यांसारख्या सोयींचा लाभ लवकर मिळू शकेल. त्यांनी आधुनिक कृषिशिक्षणाच्या गरजांनुसार पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्याचे निर्देशही दिले.

या पाहणीवेळी माननीय आमदार श्री. बालाजी कल्याणकर, कृषि परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य श्री. जनार्दन कातकडे, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, शिक्षण प्रभारी डॉ. नरेशकुमार जायेवार, विद्यापीठ उपअभियंता श्री. सुहास धारासुरकर तसेच अभियंता कार्यालयातील इतर अधिकारी उपस्थित होते.






वनामकृविच्या नांदेड येथील शासकीय कृषि महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा संपन्न

 विद्येचे माहेरघर घडविण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यार्थ्यांना आवाहन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्न शासकीय कृषि महाविद्यालय, नांदेड येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा रविवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्रीमती श्रीजया चव्हाण, विधानसभा सदस्य मा. आ.श्री.बालाजी कल्याणकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील माननीय अपर जिल्हाधिकारी श्री. पी. एस. बोरगावकर हे उपस्थित होते. व्यासपीठावर कृषि परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य श्री. जनार्दन कातकडे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री. भागवत देवसरकर, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की, आपण स्वयंस्फूर्तीने या महाविद्यालयाची निवड केली आहे, ही आपल्या जीवनातील एक सुवर्णसंधीच आहे. या संधीचे सोने करून आपण केवळ आपल्या भविष्याची दिशा बदलणार नाही, तर समाजाला आणि राष्ट्राला नवीन उंचीवर नेणार आहात. त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीत सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते. अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, चारित्र्य, नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण आत्मसात करणे आवश्यक आहे. केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे हे शिक्षणाचे ध्येय नसून, जीवन जगण्याची कला आत्मसात करणे, समाजाला दिशा देणे आणि नव्या संधी निर्माण करणे हेच खरे शिक्षण आहे. माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, आपल्या ज्ञानाचा प्रकाश स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तो कुटुंब, समाज आणि शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या यशामुळे महाविद्यालयाचे, कुटुंबाचे आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल व्हावे.  शेवटी त्यांनी आशावादी शब्दांत म्हटले की, हे महाविद्यालय भविष्यात ‘विद्येचे माहेरघर’ ठरावे आणि येथे शिकलेला प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञान, विज्ञान आणि संस्कारांचा दीपस्तंभ होऊन समाजास  प्रकाशमान करावा.

माननीय आ. श्रीमती श्रीजया चव्हाण यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करून सांगितले की, महिला ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण शक्ती आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील शिक्षणाचा उपयोग करून आपले सबलीकरण साधावे, असे आवाहन त्यांनी केले.

माननीय आमदार श्री बालाजी कल्याणकर यांनीही मार्गदर्शन करताना हे महाविद्यालय नांदेड येथे सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. श्री जनार्दन कातकडे यांनी हे महाविद्यालय सुरू व्हावे म्हणून अनेक दिवस प्रयत्न झाले असून अखेर त्याला यश मिळाले, असे सांगितले. तसेच हे महाविद्यालय कृषी शिक्षणाच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच मा. श्री भागवत देवसरकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यापीठाने नवे शैक्षणिक धोरण अवलंबल्याचे सांगितले. या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवृद्धी होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठातील संशोधनाची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी भविष्यात उत्कृष्ट शास्त्रज्ञ होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

अपर जिल्हाधिकारी श्री पी. एस. बोरगावकर यांनी कृषी शिक्षणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ३५ ते ४० टक्के अधिकारी हे कृषी पदवीधर आहेत. ते अतिशय उत्कृष्टरीत्या जनतेची सेवा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही शेतीसोबत उद्योजकता व प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठी स्वतःला तयार ठेवावे, असे त्यांनी नमूद केले.

प्रस्ताविकात डॉ. राजेश कदम यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यप्रणालीचा आढावा घेतला तसेच महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा, नव्या उपक्रमांची माहिती दिली. शिस्त आणि नियमावली यांचे महत्त्व पटवून देताना त्यांनी विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून घडण्याचे आवाहन केले. महाविद्यालय हे केवळ शिक्षणाचेच नव्हे तर चारित्र्य, संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मअनुशासन, वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची जाणीव ठेवून प्रगतीकडे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थी भावेश जोशी आणि प्रणाली बिल्लेवाड यांनी आपली मते व्यक्त केली, तर पालक प्रतिनिधी म्हणून श्री. कच्छवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी समीक्षा पोकळे आणि निकिता कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी मानले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. पवन ढोके, डॉ. देवकुळे, डॉ. सुजाता धोतराज, प्रा. संजय पवार, प्रा. सिंगरवाड, कृष्णा वारकळ, जाधव, माधवी कल्याणकर तसेच महाविद्यालयातील इतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Saturday, September 20, 2025

वनामकृविच्या चाकूर येथील पदव्युत्तर कृषि व्यावसाय व्यवस्थापन संस्थेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर पराक्रम – ॲग्रीहॅकाथॉन २०२५ मधील सर्वच पारितोषिके पटकावली.

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या चाकूर येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रीबिझनेस मॅनेजमेंट (PGIABM) या संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश मिळवले आहे. वॉशिंग्टन येथे झालेल्या ऑनलाइन ॲग्रीहॅकाथॉन २०२५ (AgriHackathon 2025) या जागतिक स्पर्धेत संस्थेच्या टीम्सनी पहिले, दुसरे आणि तिसरे असे सर्व प्रमुख पारितोषिक पटकावून इतिहास रचला.

विद्यापीठाच्या या संस्थेच्या यशामुळे विद्यापीठाचा मान जगभर उंचावला आहे. हे यश कृषी क्षेत्रातील संशोधन, नवकल्पना आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांना नवी दिशा देणार आहे. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. संस्थेतील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अथक परिश्रमांचे हे फळ असल्याचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे यांनी सांगितले.

या स्पर्धेचे आयोजन क्लायमेट सोशल फोरम, वॉशिंग्टन यांनी त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डॉमेनिको विटो यांच्या नेतृत्वाखाली केले होते. या स्पर्धेत ब्रिटन, इटली, नायजेरिया, मॉस्को, आफ्रिका, केनिया आणि भारत यांसह एकूण ९३ सहभागी देशांतील संघांनी भाग घेतला. PGIABM च्या टीम्सनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना परीक्षकांकडून विशेष दाद मिळाली. परीक्षक मंडळात जॉन केर (इटली), मनोज कुमार (भारत), खुशी गंगवार (जर्मनी) व टिगिस्ट एन्दाशॉ (केनिया) यांचा समावेश होता.

या स्पर्धेतील विजेते प्रकल्प आणि संघ हे पुढील प्रमाणे आहेत. जेएसए सोलर सोयाबीन कृषी मित्र (JSA Solar Soya Krishi Mitra) यामध्ये डॉ. ज्योती झिरमिरे, डॉ. संतोष कांबळे आणि श्री. अभिषेक राठोड तर जॅकप्लास्ट (JackPlast) यामध्ये संस्कृती महाजन, प्रतिक्षा दवरे, ओंकार कानडे व कृष्णकुमार कुलकर्णी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित फसल सहाय्यक मॉडेल मध्ये श्रीपाद दिवेकर यांनी यश संपादन केले.

या सर्व प्रकल्पांचा उद्देश शाश्वत शेतीस चालना देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि हवामान बदलाच्या संकटाला उत्तर शोधणे हा आहे. JSA सोलार हे लहान शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर चालणारे सोयाबीन काढणी यंत्र आहे. JackPlast प्रकल्प प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करून पर्यावरणपूरक उपाय सुचवतो. तर AI आधारित फसल सहाय्यक मॉडेल शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत तात्काळ सल्ला देण्यास मदत करणार आहे.

Friday, September 19, 2025

वनामकृवित ‘नॅनो खते – संशोधन व पुढील दिशा’ या दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

 नॅनो खतांसाठी संशोधन आणि शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन महत्त्वाचे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि इंडियन फॉर्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नॅनो खते – संशोधन व पुढील दिशा’ या विषयावरील दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय भवनातील सिम्पोजियम हॉल (क्र.१८) येथे झाले.

या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील माजी उपमहानिदेशक (AE) तसेच देहरादून येथील दून विद्यापीठाचे संस्थापक माननीय कुलगुरू डॉ. गजेन्द्र सिंह उपस्थित होते. व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून कोयंबतूर येथील इंडियन फॉर्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडचे (IFFCO NVPL), व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. लक्ष्मणन आणि नवी दिल्ली येथील इफकोचे मुख्य कृषि अधिकारी डॉ. तरुनेंदु सिंह हे उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, इफको नेटवर्क प्रकल्पचे प्रमुख तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, इफको महाराष्ट्रचे राज्य विपणन व्यवस्थापक डॉ. एम. एस. पोवार आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांकडून होत असलेल्या रासायनिक खतांच्या वापर होत असल्याचे सांगितले. रासायनिक खतांचा कमीतकमी वापर करून सेंद्रिय घटकांचा वापर वाढवण्यासाठी नीती आयोगाने दोन वर्षांपूर्वी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यानंतर भारत सरकारने ‘पीएम प्रणाम’ ही योजना सुरू केली असल्याचे सांगून या योजनेची सविस्तर माहिती दिली. पुढे त्यांनी नॅनो खतांच्या वापराला चालना देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित येऊन संशोधन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यशाळेतून नॅनो खतांची निर्मिती व वापर यावर अधिकाधिक चर्चा होऊन उत्कृष्ट शिफारशी समोर येतील, आणि या शिफारशी पिकांच्या नियोजनासाठी, निरीक्षणासाठी, उत्पादन व्यवस्थापनासाठी किंवा माहिती संग्रहित करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान (लिस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी) ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या तंत्रज्ञानाच्या अवलंबनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. याबरोबरच शेतातील काडी कचरा विघटन करणारे सूक्ष्मजीव (वेस्ट डी-कंपोजर) याच्या वापराला चालना देण्यासाठी चर्चा करावी तसेच खतांच्या योग्य वापरासाठी पीकनिहाय मापदंड/मानके तयार करावीत, असेही त्यांनी सुचवले.  त्यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांचा आत्मविश्वासाशिवाय कोणतेही तंत्रज्ञान उपयुक्त ठरत नाही. शेतकऱ्यांचे समाधान हेच खरे यश असून विद्यापीठ याच भूमिकेतून कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

माननीय कुलगुरू डॉ. गजेन्द्र सिंह म्हणाले की, सध्या रासायनिक खतांचा वापर वाढलेला असून ही खते प्रामुख्याने मोठ्या बॅगमधून वापरली जातात. शाश्वत शेतीसाठी पिकांना योग्य प्रमाणात व अचूक ठिकाणी खत पडणे आवश्यक आहे. यावरचा उत्कृष्ट उपाय म्हणजे नॅनो खते. नॅनो खतांच्या वापरामुळे अचूक शेती साधता येते. शेतीमध्ये खतावर मोठा खर्च होतो, परंतु नॅनो खतांच्या वापरामुळे बचत होऊन आर्थिक नफा वाढतो. याबरोबरच पिकांची खत उपयोगात आणण्याची क्षमता सुधारण होते. मात्र, नॅनो खतांचा प्रभावी वापर करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती वाढवणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नॅनो खताचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, शाश्वत शेतीसाठी याचा अचूक वापर आवश्यक असून त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. यासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत असून, अधिक परिणामकारक पद्धती विकसित करण्यासाठी संशोधनाची आवश्यकता आहे. नॅनो खतांचा योग्य प्रमाणात व नियोजित वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढेल, उत्पादनक्षमता सुधारेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

इफकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ए. लक्ष्मणन यांनी नॅनो खतांमागील विज्ञान स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, खतांच्या कणांना अतिशय सूक्ष्म (नॅनो आकारमानाचे) केले जाते, ज्यामुळे ते पिकांच्या पानांद्वारे किंवा मुळांद्वारे जलद आणि प्रभावीरीत्या शोषले जातात. यामुळे कमी मात्रेत अधिक परिणाम मिळतो, पोषक द्रव्यांचा अपव्यय टाळला जातो, मातीचे आरोग्य सुधारते तसेच पर्यावरणावरील नकारात्मक परिणामही कमी होतो. परिणामी पिकांची उत्पादकता वाढते, असे त्यांनी नमूद केले.

इफकोचे मुख्य कृषि अधिकारी डॉ. तरुनेंदु सिंह यांनी नॅनो खतांवरील वैज्ञानिक चाचण्यांबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, पीक उत्पादन वाढ, खतांचा अचूक वापर, खर्चात बचत तसेच माती व पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी संशोधनात्मक प्रयोग आवश्यक आहेत. त्यांनी पुढे युरिया व डीएपी यांच्या वाढत्या किमतींबाबत माहिती देत सांगितले की, यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च वाढतो. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून नॅनो खतांचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. नॅनो खतांचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. तरुनेंदु सिंह म्हणाले की, वातावरणातील नत्र जमिनीत स्थिर करून अधिक उत्पादनक्षम विकास साधण्यासाठी संशोधनावर भर देणे गरजेचे आहे. तसेच, नॅनो खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी करताना विद्यापीठाद्वारे कार्यान्वित इफको नेटवर्क प्रकल्पाची प्रगती मांडली. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री. प्रताप काळे (जि. परभणी), श्री. सुरेंद्र रोडगे (जि. परभणी), श्री. सुरशिंगराव पवार (जि. अहिल्यानगर) आणि श्री. योगेश टेळे (जि. नाशिक) यांनी नॅनो खतांच्या वापराबाबतचे अनुभव सांगितले.

उद्घाटन समारंभास सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. व्ही.एस. खंदारे, तसेच विविध विभागांचे प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, प्रगतशील शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिता पवार यांनी केले, तर आभार डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मानले.






Thursday, September 18, 2025

विद्यार्थी उद्याचे शिल्पकार; प्रामाणिकपणा व कर्तव्यनिष्ठा अंगीकारा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ व पालक मेळावा संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा 'दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मार्गदर्शक माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची उपस्थिती लाभली. यावेळी शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपिठावर अंबाजोगाई येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक माननीय श्री ऋषिकेश शिंदे, पोलीस निरीक्षक श्री शरद जोगदंड, मानसोपचार तथा व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले यांची विशेष उपस्थिती होती.

उद्घाटनीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणच नव्हे तर संस्कारही अंगीकारले पाहिजेत. ज्ञानाबरोबरच चारित्र्य ही खरी ताकद आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्षाचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे, कारण संघर्षाशिवाय खऱ्या यशाची प्राप्ती होत नाही. आपण जे ज्ञान आणि कौशल्य विद्यापीठातून घेतो त्याचा उपयोग फक्त वैयक्तिक प्रगतीसाठी न करता सेवाभावी वृत्तीने शेतकरी, समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी करणे हीच खरी शिक्षणाची सार्थकता आहे. विद्यार्थी हे उद्याचे शिल्पकार आहेत; म्हणून त्यांच्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाभिमुख दृष्टिकोन दिसला पाहिजे. शिक्षणाचे अंतिम ध्येय फक्त पदवी नव्हे, तर जबाबदार नागरिक घडवणे हे असले पाहिजे.

संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना आपल्या विचारांमध्ये सांगितले की, शेती हा केवळ आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक नसून तो आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि जीवनशैलीचाही आधारस्तंभ आहे. शेतकरी व शेती यांचा विकास म्हणजेच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होय. त्यांनी असेही नमूद केले की, कृषि क्षेत्रातील सुधारणा व नवकल्पना अंगीकारल्याशिवाय प्रगत भारताची कल्पना पूर्ण होऊ शकत नाही. आजच्या पिढीने आधुनिक विज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीला एक उद्योग म्हणून पुढे न्यायला हवे. शेतकऱ्यांचा सन्मान आणि त्यांच्या घामाचे मोल हेच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे बळ आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःच्या करिअरसाठीच नव्हे तर समाज आणि शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी करणे हीच खरी देशसेवा असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश शिंदे यांनी तंत्रज्ञान विषयक मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अत्यंत डोळसपणे केला पाहिजे. समाजामध्ये हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे आपण व आपले कुटुंबीय अडचणीत येऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनापासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे.

पोलीस निरीक्षक श्री शरद जोगदंड यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थी हा घटक केंद्रीभूत ठेवून महाविद्यालयांनी आपली भूमिका निभावली पाहिजे. ज्ञानसंपन्न आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडले तर देशही घडत असतो. तेव्हा विद्यार्थ्यांनीही अभ्यासू आणि चिंतनशील वृत्ती अंगीकारली पाहिजे.

डॉ. राजेश इंगोले यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि चिकाटी या त्रिसुत्रीच्या बळावर यशाचं शिखर गाठता येते. संघर्ष हाच यशाचा खरा पाया आहे  असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले.

प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड यांनी केले. सूत्रसंचालन श्री राजेश रेवले यांनी केले तर आभार विद्यार्थिनी प्रतिनिधी अभिलाषा खोडके यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले तसेच त्यांनी प्रक्षेत्रावरील विविध पिकांची पाहणी केली. यावेळी पिकांची उत्तम स्थिती पाहून समाधान व्यक्त केले महाविद्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले.













Wednesday, September 17, 2025

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘रबी पीक परिसंवाद’ उत्साहात संपन्न

 शेतीचा विकास हा सर्वांगीण विकासाचा पाया – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने “रबी पीक परिसंवाद” दिनांक १७ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. या परिसंवादाच्या उद्घाटक माननीय राज्यमंत्रीसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणपाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याणसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. कार्यक्रमास माजी खासदार तथा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माननीय ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत, माजी खासदार श्री सुरेश जाधव, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य  श्री. भागवत देवसरकर, प्रगतशील शेतकरी श्री विकास शिंदे, विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक, डॉ. खिजर बेगशिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. दीपक पाटील, डॉ. प्रविण वैद्य, परभणी जिल्ह्याचे अधिक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण, सैनिक फेडरेशनचे सचिव श्री डी एम निंबाळकर आणि हिंगोली येथील श्री देवीप्रसाद ढोबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, आज भारत विविध शेती उत्पादनांमध्ये जगात प्रथम किंवा दुसऱ्या क्रमांकावर असून ट्रॅक्टर उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे, हे भारताच्या प्रगतीची क्षमता दर्शवते. ‘शेतीचा विकास झाला नाही तर कोणताही विकास होऊ शकत नाही, असे सांगताना त्यांनी भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचे विचार उद्धृत केले. तसेच भारताच्या कृषी क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर डळमळीत करण्याचा प्रयत्न होत असला तरी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश कृषी विकासासह सर्वच क्षेत्रात मोठी झेप घेत आहे, असे ते म्हणाले. यावेळी विद्यापीठाच्या वतीने त्यांनी माननीय पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीशेतकरी देव भव:” हा नारा दिला आहे. महिन्यातून “माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत” हा अभिनव उपक्रम राबवून कुलगुरूपासून सर्व शास्त्रज्ञ प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर उपस्थित राहतात. संशोधन व शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाने मोठी प्रगती साधली असून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे. अनेक राष्ट्रीय क्रमवारीत विद्यापीठ वरच्या स्थानावर पोहोचले असून हे सर्व यश त्यांनी शेतकऱ्यांना समर्पित केले.

शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणे मिळावे यासाठी अनेक वर्षे पडीत असलेली जवळपास ४००० एकर जमीन वहितीखाली आणून बीजोत्पादनात मोठी वाढ करण्यात आली आहे. यासोबतच सेंद्रिय व नैसर्गिक शेती तसेच हवामान-आनुकूल तंत्रज्ञान विकसित करण्यावरही भर दिला जात आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात व प्रत्यक्ष भेटण्यात समाधान मिळते, असे सांगून त्यांनी नमूद केले की, दर मंगळवारी आणि शुक्रवारीऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद” या माध्यमातून प्रभावी विस्तार कार्य राबवले जाते.

पुढे ते म्हणाले की, आपल्याला मिळालेली जबाबदारी ही एक संधी आहे. त्या संधीचे सोने करणे आपले कर्तव्य आहे. त्यांनी सांगितले की, कुलगुरूपद स्वीकारण्यापूर्वी ते परभणी विद्यापीठात एकदाही आले नव्हते. मात्र आज समर्पणभावनेने कार्य करताना शेतकरी आपुलकीने त्यांची वाट पाहतात, यातच खऱ्या अर्थाने समाधान लाभते. प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून कार्य केले पाहिजे. आज सर्वत्र पाऊस पडत असतानाही या परिसंवादात एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती हीच विद्यापीठाची खरी ताकद व क्षमता दर्शवते. शेवटी, त्यांनी सर्व शेतकऱ्यांचा मनस्वी गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

माननीय ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा इतिहास सविस्तरपणे मांडला. त्यांनी देशाने शेतीमध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा घेताना प्रख्यात कृषीशास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या योगदानाचा उल्लेख केला. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर शेती क्षेत्रात होत असलेले बदल, कर प्रणाली व त्याचे परिणाम यांचा ऊहापोह करताना हा एक वेगळ्या स्वरूपाचा नवीन लढा असल्याचे नमूद केले. प्रत्येक देश आपले प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि भारत या स्पर्धेत निश्चितच अग्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्याचा गौरव करत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याशेतकरी देवो भव:’ या भावनेतून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. विद्यापीठ सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी पुढे सांगितले की, सध्याच्या काळात शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असली तरी पारंपरिक तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून त्याचा योग्य अवलंब करणे आवश्यक आहे. नैसर्गिक शेतीस चालना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यकारी परिषद सदस्य  श्री. भागवत देवसरकर यांनी विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या यशस्वी कार्याचे अभिनंदन करून हे कार्य पुढेही यशस्वीपणे सुरू राहावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.

माजी खासदार श्री. सुरेश जाधव यांनी नमूद केले की, देशात पंजाब राज्य आणि महाराष्ट्रातील परभणी जिल्हा हे धान्याचे कोठार समजले जाते. येथील शेतकरी रात्रंदिवस कष्ट करण्यास सदैव तत्पर असतो. या शेतकऱ्यांना आधुनिक व हवामान-अनुकूल तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चढउतारांमध्ये शेतकरी सक्षमपणे टिकून राहावा यासाठी त्यांना अर्थसहाय्य, सिंचन सुविधा आणि शुद्ध बियाणे मिळणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रस्तावनेत विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून माननीय कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत विस्तारकार्य सुरू आहे असे सांगून त्यांनी विद्यापीठाच्या संशोधन व विस्तारकार्याचा आढावा मांडला.

कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने करण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यापिठाच्या प्रकाशाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. दरम्यान कृषिभूषण श्री. सोमेश्वर गिराम यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली सीताफळे मान्यवरांना भेट दिली.

तांत्रिक सत्रात हवामान अंदाज, पर्जन्यमानाची सद्यपरीस्थिती व पिकांचे व्यवस्थापन, सुधारित हरभरा, रबी तेलबिया, रबी ज्वार, गहू, रबी भाजीपाला या पिकांचे लागवड तंत्रज्ञान, शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचे महत्त्व, सद्य:स्थितीतील कापूस, तूर व हळद पिकांचे संरक्षण व व्यवस्थापन आदी विषयावर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. के. पाटील, डॉ. जी. के. लोंढे, डॉ. व्ही. एस. खंदारे, डॉ. एस. जे. शिंदे, डॉ. के. टी. जाधव, डॉ. एल. एन. जावळे, डॉ. जी. डी. गडदे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी, डॉ. एस. एम. उमाटे, डॉ. आर. एस. जाधव, डॉ. ए. जी. लाड, डॉ. दिगंबर पटाईत, यांच्यासह इतर शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. शेवटी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शेतीविषयक प्रश्नांना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमामध्ये सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी यांच्यासह १३०० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.