Thursday, August 7, 2025

हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त वनामकृवित शाश्वत शेती दिन उत्साहात साजरा

भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या योगदानाला राष्ट्रीय सन्मान मिळत असल्याचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आनंद व्यक्त केला


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, कृषि विभाग, आत्मा, परभणी व कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत शेती दिन’ कार्यक्रमाचे दिनांक ७ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम हरित क्रांतीचे जनक, भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आला असून, शाश्वत शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले, उप प्रकल्प संचालक, आत्मा श्री अभिजित घोडके, उपविभागीय कृषि अधिकारी प्रिया नवने, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे आदींची उपस्थिती लाभली.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, ते नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषि शास्त्र केंद्रात, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित शाश्वत शेती दिनाच्या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमातून त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित शाश्वत शेती दिनात ऑनलाईन सहभाग नोंदवला.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, माननीय पंतप्रधानांच्या भाषणात भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ‘युगपुरुष’ म्हणून गौरवण्यात आले. तसेच, "शोधापासून वितरणापर्यंत आणि प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत" (discovery to delivery... lab to land) या संकल्पनेचा अवलंब करून गुजरातमध्ये शेती विकास साधल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच माननीय कुलगुरूंनी अधोरेखित केले की, महाराष्ट्र हे राज्य शेतीसह सर्व आघाड्यांवर अग्रेसर आहे, आणि आजच्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री, माननीय नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचा विशेष सहभाग आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. एम. एस.स्वामीनाथन यांनी शेतकरी व कृषि क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाला मान्यता आणि सन्मान दिला जात असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय स्तरावर विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या निमित्ताने विद्यापीठांमार्फत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून, सन्मानित सर्व शेतकऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी शाश्वत शेती दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी सांगितली. हा कार्यक्रम हरित क्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या हरित क्रांतीतील योगदानाच्या सन्मानार्थ साजरा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कार्याची माहिती मांडली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करताना शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करावा, जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढवावे, जैवविविधता जपावी तसेच जैविक खतांचा वापर करून शेती पुढील पिढ्यांसाठी शाश्वत ठेवावी, असे आवाहन केले.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण यांनी शाश्वत शेती दिन साजरा करताना सांगितले की, हरित क्रांती घडवण्यासाठी शेतकऱ्यांचे कष्ट मोलाचे आहेत. यावेळी त्यांनी शेतकरी कल्याणासाठी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शेतीमध्ये शाश्वतता निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीस प्राधान्य द्यावे, विशेषतः आंबा, संत्रा, मोसंबी, हळद आणि अद्रक या पिकांवर भर द्यावा, तसेच प्रक्रिया उद्योगात सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाशी संपर्क ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. जमिनीच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची दखल घेऊन सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रविण वैद्य यांनी मृद संवर्धनातून शाश्वत शेती, प्रभारी अधिकारी डॉ.आनंद गोरे नैसर्गिक शाश्वत शेतीचा मार्ग, हवामान शास्त्रज्ञ डॉ.कैलास डाखोरे यांनी बदलत्या हवामानाविषयी मार्गदर्शन केले. तर शाश्वत शेतीबाबत श्री. नरेंद्र शिंदे (सनपुरी ), श्री. मधुकर घुगे (केहाळ) श्री. बालासाहेब रणेर (बाभळगाव) या शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले

कार्यक्रमात शाश्वत शेतीतील विशेष योगदानाबद्दल शेतक-याचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यामध्ये श्री. नरेंद्र शिंदे, श्री. मधुकर घुगे, श्री. बालासाहेब रणेर, श्री. दिलीप अंभोरे, श्री. सोमेश्वर गिराम, श्री. जर्नाधन आवरगंड, श्री. प्रताप काळे, श्री. पशुपतीनाथ शेवटे, श्री. भगवान कुगे, श्री. नंदकुमार जोगदंड, श्री. ज्ञानेश्वर देशमाने, श्रीमती छाया भास्करराव कदम, श्रीमती अर्चना पंडितराव थोरात, श्रीमती प्रिती श्रीधर डोंबे, सुप्रिया शाहाजी घुले आदी शेतकऱ्यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील शास्त्रज्ञांसह २०० हून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.








वनामकृवित ‘नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन तंत्रज्ञानातील उत्कृष्टतेद्वारे अन्न प्रणाली टिकविणे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

 विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी व्याख्यान लाभदायक.... माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

कृषि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मूलभूत परिवर्तन आवश्यक  – डॉ. एस. एस. राठोर

माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

प्रमुख मार्गदर्शक डॉ. एस. एस. राठोर 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या कृषिविद्या शाखेअंतर्गत कार्यरत 'परभणी चॅप्टर ऑफ इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमी' यांच्या वतीने भारतामध्ये नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन तंत्रज्ञानातील उत्कृष्टतेद्वारे आव्हानांवर मात करणे आणि कृषि अन्न प्रणाली टिकवून ठेवणे (Addressing challenges through excellence in NRM technologies and sustaining the agri food system in India) या विषयावर दिनांक  ६ ऑगस्ट रोजी नाविन्यपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते म्हणून भारतीय कृषि संशोधन संस्था (IARI), नवी दिल्ली येथील कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. राठोर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांची उपस्थिती लाभली. सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. राहुल रामटेके, कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, उप कुलसचिव डॉ. गजानन भालेराव  हेही कार्यक्रमात सहभागी होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, मातीचा पोत, ओलावा, पिकांची गरज आणि हवामान यांचा विचार करून अचूक खते व पाणी व्यवस्थापन करता येते. यामुळे संसाधनांचा कार्यक्षम वापर होतो आणि उत्पादनात वाढ होते. ठिबक व तुषार सिंचन तंत्रांचा वापर केल्यास पाण्याचा अपव्यय कमी करता येतो. पर्जन्य जलसंधारण व पाण्याच्या पुनर्वापराची व्यवस्था ही जलटंचाईवर प्रभावी उपाय ठरतात. स्थानिक जातींचा वापर, आंतरपिके आणि शाश्वत सेंद्रिय पद्धती यामुळे पर्यावरणस्नेही शेतीला चालना मिळते व अन्नसुरक्षा कायम राहते. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अल्पावधीत परिपक्व होणारी व ताण सहन करणारी पिके घेणे, तसेच हरितगृह वायूंमध्ये घट करणाऱ्या शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. या व्याख्यानातील माहिती अतिशय उपयुक्त असून कृषि विद्याशाखेतील प्राध्यापक, शास्त्रज्ञ तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधनासाठी उपयोग करून घ्यावा, असेही त्यांनी सूचित केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी जमिनीची धूप, हवामानातील बदल, आणि अन्नद्रव्यांना कमी प्रतिसाद देणारी पीक परिस्थिती अशा विविध आव्हानांचा उल्लेख केला. या समस्यांवर उपाय म्हणून त्यांनी अचूक शेती तंत्रज्ञान अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कृषि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून मूलभूत परिवर्तन आवश्यक आहे, यावर भर देत प्रमुख मार्गदर्शक डॉ. एस. एस. राठोर यांनी ‘भारतीय कृषिचे वैज्ञानिक रूपांतरण’ या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. आपल्या सादरीकरणात त्यांनी भारतातील दुष्काळांची माहिती, अन्नटंचाईपासून अन्न सुरळीततेपर्यंतचा प्रवास, हवामान अनुकूल शेती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, आणि कमी उत्पादन असलेल्या क्षेत्रांतील उत्पादकता वाढविण्याचे उपाय यांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, हरित क्रांतीपूर्वी भारताला अनेक दुष्काळांचा सामना करावा लागला आणि अन्नधान्याची तीव्र टंचाई होती. मात्र, १९७० नंतर हरित क्रांतीमुळे अन्न उत्पादनात मोठी वाढ झाली." त्याचबरोबर त्यांनी आधुनिक शेतीसमोरील आव्हानांकडेही लक्ष वेधले – जसे की नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास, पाण्याचा अपव्यय, जैवविविधतेचा अभाव, हवामान बदलाचे परिणाम, उत्पादन खर्चातील वाढ, तांत्रिक सुधारणांना घटत चाललेला प्रतिसाद इत्यादी. ते म्हणाले की, आज जगातील अन्न सुरक्षेसाठी आपण केवळ चार प्रमुख पिकांवर (गहू, तांदूळ, मका व सोयाबीन) अवलंबून आहोत. जैवविविधतेतील घट ही अत्यंत चिंताजनक बाब आहे." तापमानवाढ, अस्थिर पर्जन्यमान, सागरी पातळी वाढ, तसेच किड व रोगांचा प्रादुर्भाव यांचा सामना करण्यासाठी हवामान अनुकूल शेती (CSA) हा एकमेव शाश्वत पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी संरक्षणात्मक शेती पद्धतीच्या जागतिक स्वीकाराचा संदर्भ देत सांगितले की, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ही पद्धत मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. भारतातही सुमारे ३.५ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर संरक्षणात्मक शेतीचे तंत्र वापरले जात आहे. त्यांनी "हर खेत को पानी", "More crop per drop" आणि "परंपरागत कृषि विकास योजना" यांसारख्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याची गरजही अधोरेखित केली. पीक उत्पादनातील राज्य व जिल्हा पातळीवरील तफावत भरून काढण्यासाठी आधुनिक कृषिशास्त्र व योग्य तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेवटी, डॉ. एस. एस. राठोर यांनी शाश्वत कृषि विकासासाठी नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान प्रतिरोधक तंत्रज्ञान, संरक्षणात्मक शेती आणि जैवविविधतेचे संवर्धन हाच काळाचा मार्ग आहे, असे ठामपणे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख विभागाचे प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ मेघा सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ प्रीतम भुतडा यांनी मानले. कृषि विद्याशाखेचे प्राध्यापक, शास्त्रज्ञ तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.


शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार


Wednesday, August 6, 2025

तुती रेशीम उद्योगासाठी तीन दिवसीय कृषक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि केंद्रीय रेशीम बोर्डाचा संयुक्त उपक्रम

उद्योगाचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य प्राप्त होणे गरजेचे.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची रेशीम संशोधन योजना आणि केंद्रीय रेशीम बोर्ड, अनुसंधान विस्तार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय तुती रेशीम उद्योग - कृषक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या सभागृहात करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख उपस्थितीमध्ये संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, केंद्रीय रेशीम बोर्डाचे श्री. अशोक जाधव, किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. स्मिता सोळंकी, शुभांगी गोरे, रेशीम उद्योजक श्री. बालाजी पवार, श्री. अतुल लुगडे व श्री. संजय नाईकवाडे आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी तीन दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ करताना नमूद केले की, शाश्वत शेतीसाठी शेतीपूरक जोडधंदे अत्यंत आवश्यक आहेत, आणि त्यामध्ये रेशीम उद्योग हा एक महत्त्वाचा घटक आहे. या उद्योगाचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य प्राप्त होणे गरजेचे आहे. यासोबतच, भविष्यात सीएसआरटीआय, म्हैसूरच्या धर्तीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात एक महिन्याचे रेशीम उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी मराठवाड्यात १०,००० शेतकऱ्यांना रेशीम प्रशिक्षण दिल्याचा उल्लेख करत, सन २००४ मध्ये तुळजापूर कृषि विज्ञान केंद्रात एक महिन्याचे प्रशिक्षण राबवले असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. अशोक जाधव यांनी करताना रेशीम उद्योगाची आर्थिकदृष्ट्या फायदेशीर संधी म्हणून ओळख करून दिली. श्री. बालाजी पवार यांनी मनरेगाच्या अनुषंगाने अनुदान सुधारण्याचा सल्ला देत, एकरकमी रुपये ४ लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना दिल्यास रेशीम संगोपनगृह उभारणीस मदत होईल, असे सांगितले. त्यांनी शेडनेटऐवजी पक्क्या संगोपनगृहाच्या गरजेवर भर दिला. श्री. रामराव चौधर (ता. सोनपेठ, पारधवाडी) यांनी सेंद्रिय पद्धतीने तुती लागवड आणि कोंबडीपालनाची यशोगाथा सांगितली. तर खामकरवाडी (ता. वाशी) येथील श्री. अतुल लुगडे यांनी वर्षभरात ३ कोटी रुपयांची कोष उत्पादन उलाढाल झाल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धनंजय मोहोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संजोग बोकन यांनी केले. प्रशिक्षणासाठी परभणी, धाराशिव, नांदेड व अहिल्यानगर येथील सुमारे ४५ शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन विषयी वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन

 जैविक नियंत्रणाच्या तंत्रज्ञानावर विशेष भर द्यावा.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

‘शेतकरी देवो भव:’ याभावानेतून कृषि संशोधन आणि प्रशिक्षणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकत, केंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ऑगस्ट रोजी "सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन" या विषयावर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन आयोजित केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. आपल्या भाषणात त्यांनी नमूद केले की, सध्याचा काळ सोयाबीन पिकांवरील कीड नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या काळात प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी कीड व्यवस्थापनासाठी शाश्वत उपायांचा अवलंब करावा आणि जैविक नियंत्रणाच्या तंत्रज्ञानावर विशेष भर द्यावा, असे सुचविले.  कार्यक्रमास संचालक संशोधन डॉ. खिजर बेग हे प्रमुख पाहुणे होते.

मुख्य वक्ते म्हणून केंद्रीय शेती प्रशिक्षण केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र जाधव यांनी सोयाबीन पिकावरील प्रमुख किडींचे जीवनचक्र, नुकसानाचे स्वरूप, प्रतिबंधात्मक उपाय, तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी करून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त टिप्स दिल्या.

कार्यक्रमाचे समन्वयक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. रणजीत चव्हाण  चौहान सुत्रसंचालन व समारोप केले.

कार्यक्रमात ७० हून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होवून प्रश्न विचारले त्यास डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. आनंद गोरे यांनी यांनी सविस्तर माहिती देऊन त्यांचे समाधान केले. हा कार्यक्रम झूम प्लॅटफॉर्मवर तसेच शेकरूच्या यूट्यूब व फेसबुक चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.

Tuesday, August 5, 2025

वनामकृविच्या महिला शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा उपक्रम; जैविक हळद लागवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या (पं. नांदेड) महिला शास्त्रज्ञांनी गोदा फॉर्म, कळमनुरी (जि. हिंगोली) यांच्या वतीने दिनांक ५ ऑगस्ट रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात सहभागी होत जैविक, नैसर्गिक आणि शाश्वत शेतीसंदर्भात थेट शेतकऱ्यांपर्यंत जाऊन सखोल मार्गदर्शन केले.

सदर मेळाव्याचे आयोजन गिरामवाडी व सांडस (ता. कळमनुरी) येथे करण्यात आले होते. विशेष म्हणजे, शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना त्यांच्या कामावर जाण्यापूर्वीच भेट दिली आणि शेतपातळीवरच विविध विषयांवर संवाद साधला.

या मेळाव्याचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक संशोधन डॉ. के. एस. बेग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यामध्ये डॉ. आनंद गोरे आणि महिला शास्त्रज्ञा डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. पतिता गौरखेडे व प्रा. प्रितम भुतडा यांनी सक्रीय सहभाग घेतला. सांडस गावच्या उपसरपंच सौ. वनिता जाधव या मान्यवर पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

प्रा. प्रितम भुतडा यांनी जैविक पद्धतीने हळद लागवड कशी करावी, यावर सविस्तर माहिती दिली. डॉ. गौरखेडे यांनी सेंद्रिय खतांचे नियोजन, तर डॉ. पाटील यांनी हळदीमधील जैविक रोग नियंत्रण व बायोमिक्सच्या वापराचे तंत्र समजावून सांगितले.

या कार्यक्रमात जैविक हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. गोदा फॉर्मचे श्री दिग्विजय काटकर यांनी जैविक घटकांचा वापर केल्यास हळदीला उत्तम बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात मार्गदर्शक घडीपत्रिकांचे वाटपही करण्यात आले. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेला हा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम खरोखरच अनुकरणीय ठरला आहे.





Monday, August 4, 2025

वनामकृवित नैसर्गिक शेती व नवपिढी खतांद्वारे मृदा आरोग्य व्यवस्थापनावर अभिनव व्याख्यानाचे आयोजन

शाश्वत शेती आणि कृषि समृद्धीसाठी शुद्ध बियाणे आणि उत्तम मृदा आवश्यक... माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माजी मुख्य मृदा शास्त्रज्ञ डॉ. दीपक रंजन विश्वास यांचे प्रभावी मार्गदर्शन

माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माजी मुख्य मृदा शास्त्रज्ञ डॉ. दीपक रंजन विश्वास 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयातील मृदा शास्त्र विभाग, तसेच भारतीय मृदा शास्त्र संस्थेच्या परभणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने “नैसर्गिक शेती व नवपिढी खतांद्वारे मृदा आरोग्य व्यवस्थापन” या विषयावर अभिनव व्याख्यानाचे आयोजन दिनांक ४ ऑगस्ट रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील सिंपोजियम हॉल येथे संपन्न झाला. अध्यक्षस्थान माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून नवी दिल्ली येथील भाकृअप-भारतीय कृषि अनुसंधान संस्थेच्या मृदा विज्ञान व कृषि रसायन विभागाचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. दीपक रंजन विश्वास  यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी राष्ट्रीय पातळीवरील मृदशास्त्रज्ञ डॉ. विश्वास यांच्या प्रदीर्घ अनुभवसमृद्ध व्याख्यानाचा विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल, असे प्रतिपादन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मृदशास्त्र विभागाचा जवळपास ३० टक्के सहभाग अभियांत्रिकी विभागाच्या अभ्यासक्रमात असून इतर विभागांशीही या विभागाचा महत्त्वपूर्ण संबंध आहे. माननीय कुलगुरू हे अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी मृदशास्त्र विभागाचा पूर्वी सखोल अभ्यास केलेला असून, त्यांचं मार्गदर्शन अत्यंत उपयोगी ठरले आहे.

शाश्वत शेती आणि कृषिसमृद्धीसाठी शुद्ध बियाणे आणि उत्तम मृदा आवश्यक आहे, असे स्पष्ट करताना त्यांनी नमूद केले की, ग्रीन हाऊस व पॉली हाऊस पद्धतीने शेती करताना देखील मृदेचीच आवश्यकता भासते. ज्या मातीमध्ये जे पिकू शकते, तीच पिके घ्यावीत. अन्यथा खतांचा अनावश्यक वापर वाढतो, परिणामी जमीन कमी सुपीक होते आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. याचा थेट परिणाम मानवी जीवनावरही होतो. ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक शेती म्हणजेच रासायनिक खतांचा कमीत कमी वापर, आणि हेच आधुनिक काळातील गरजेचे आहे. आज मृदशास्त्रज्ञही खतांचा वापर कमी करण्याचे मार्ग सांगत आहेत. याच अनुषंगाने केंद्र शासनाने "पीएम-प्रणाम" योजना लागू करून राज्यांना खतांचे उत्पादन व वापर कमी करण्यासाठी प्रवृत्त केले आहे.

या अभ्यासपूर्ण व नाविन्यपूर्ण व्याख्यानातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आपले ज्ञान आणि कौशल्य वाढवावे, तसेच मराठवाड्यातील शेतीसाठी याचा प्रत्यक्ष उपयोग करावा. 'पोकरा योजना' अंतर्गत सल्ला देताना हे ज्ञान उपयुक्त ठरेल. पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी संशोधनाचे विषय निवडताना, तसेच प्रभावी संशोधन करताना या ज्ञानाचा आधार घ्यावा.

शेवटी, माननीय कुलगुरूंनी डॉ. विश्वास यांचे विद्यापीठास दिलेल्या भेटीसाठी आणि दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनासाठी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राची तसेच नुकतीच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून मिळालेली अ’ दर्जासह अधिस्वीकृती यासंदर्भातील माहिती सादर करून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीची माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पिकांच्या उत्पादनासाठी मातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या सुमारे दोन-तृतीयांश माती अतिरिक्त रासायनिक खतांच्या वापरामुळे खराब झाली आहे. यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर वाढविणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर, पुरेशी अन्नधान्य उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेतीसाठी किती क्षेत्र आवश्यक ठरेल, हे ठरवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

मुख्य मार्गदर्शक डॉ. दीपक रंजन विश्वास यांनी माती ही सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती सर्वांना सेवा देते, असे प्रतिपादन केले. त्यांनी शेती व्यवसायातील प्रमुख अडचणींवर प्रकाश टाकत देशातील मातीच्या सुपीकतेतील घट दर्शवली. १९५० च्या दशकात केवळ नत्राच्या स्वरूपात खतांचा वापर केला जात होता. मात्र, कालांतराने सर्व अन्नघटकांचा प्रमाणात किंवा अति प्रमाणात वापर सुरू झाला. आजच्या घडीला रासायनिक खतांना पिकांचा प्रतिसाद कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर अनिवार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाश्वत मृद व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना, संतुलित अन्नघटकांचे महत्त्व आणि त्यांच्या कार्यकारणभावाचे सखोल विश्लेषण त्यांनी केले. त्यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पनाही स्पष्ट करत बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, वापसा, मल्चिंग व वनस्पती संरक्षण या घटकांचा मातीच्या आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर भर दिला. हरित क्रांतीनंतर जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता सातत्याने वाढत गेली आहे. यामागील कारणांमध्ये केवळ नत्र स्फुरद पालाश वरचा अतिरेकी भर, सेंद्रिय खतांचा अपुरा वापर, तसेच पिकांचे अवशेष जाळणे किंवा काढून टाकणे यांचा समावेश होतो. डॉ. बिस्वास यांनी सांगितले की भारतातील सुमारे ३०% लागवडीयोग्य जमीन ऱ्हास पावली आहे. पाण्यामुळे आणि वाऱ्यामुळे होणारी धूप, तसेच रासायनिक, भौतिक व जैविक घटकांमुळे जमिनीचा दर्जा सतत घसरत आहे. भारतातील मातीतील सेंद्रिय कार्बन १% वरून ०.३% पर्यंत खाली आल्याचे त्यांनी नमूद केले. शाश्वत मृद व्यवस्थापनासाठी त्यांनी जमिनीची धूप टाळणे, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवणे, पोषणचक्र व समतोल राखणे, क्षारता व अल्कलिनतेचे व्यवस्थापन करणे, मातीतील जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि जल व्यवस्थापनात सुधारणा करणे आदी शिफारसी दिल्या.

पोषण व्यवस्थापनासाठी आधुनिक उपायांचा उल्लेख करत त्यांनी नॅनो खतांचे फायदे, बायोफर्टिलायझर्स, खतांचे सुधारित प्रकार व समन्वित पोषण व्यवस्थापन (INM) यांची गरज अधोरेखित केली. शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय व जैविक पर्यायांचा वापर केल्यास मृद आरोग्य सुधारता येईल व उत्पादनक्षमता टिकवून ठेवता येईल.

प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. यावेळी त्यांनी इंडियन सोसायटी ऑफ सोईल सायन्स परभणी चॅप्टर च्या कार्याचे आणि उद्देशाची मांडणी केली.

कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख तथा पीसीआयएसएस अध्यक्ष डॉ. हरिहर कौसडीकर, उपाध्यक्ष डॉ. अनिल धमक, सल्लागार डॉ. रामप्रसाद खंदारे, सचिव डॉ. सुदाम शिराळे, संयुक्त आयोजक सचिव डॉ. संतोष चिकशे, कोषाध्यक्ष डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ.सुरेश वाईकर,  डॉ. महेश देशमुख डॉ   स्वाती झाडे, डॉ संतोष पिल्लेवाड यांच्यातर्फे करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ  रामप्रसाद खंदारे यांनी केले तर आभार डॉ. सुदाम शिराळे यांनी मानले. कार्यक्रमास विभागातील पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.








Sunday, August 3, 2025

वनामकृविचा “विद्यापीठ आपल्या दारी – तंत्रज्ञान शेतावरी” उपक्रम हदगाव तालुक्यात यशस्वीरीत्या संपन्न

 मौजे ब्रम्हवाडी येथे आयोजित सांगता कार्यक्रमात माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन

वसंतराव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या “शेतकरी देवो भवः” या भावनेतून सुरू असलेल्या कृषि विस्तार उपक्रमाअंतर्गत “विद्यापीठ आपल्या दारी – तंत्रज्ञान शेतावरी” हा विशेष उपक्रम नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात यशस्वीपणे राबविण्यात आला.

माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली व विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. भागवत देवसरकर यांच्या पुढाकारातून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दिनांक ०१ व ०२ ऑगस्ट २०२५ रोजी विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आला.

दिनांक ०२ ऑगस्ट रोजी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या विविध विकासात्मक आणि जनकल्याणकारी योजनांचा तसेच पीएम किसान सन्मान निधीच्या वाटपाच्या निमित्ताने दिलेल्या प्रेरणादायी भाषणाचा थेट प्रक्षेपणात कार्यक्रमातील मान्यवरांसह सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होवून लाभ घेतला.

मौजे ब्रम्हवाडी येथे आयोजित सांगता कार्यक्रमात विद्यापीठाचे माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करताना, रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून पर्यायी निविष्ठांचा वापर करण्यावर भर देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यामुळे उत्पादन खर्चात कपात करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे, तसेच शेतकरी केंद्रित उपक्रम राबविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ ‘शेतकरी देवो भवःया भावनेतून कार्यरत असून, गेल्या महिन्यात बायोमिक्सचे दोन कोटी रुपयांचे उत्पादन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लावण्यात आला आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी माननीय आमदार श्री. बाबुराव कदम कोहळीकर, विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य श्री. भागवत देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके आदी मान्यवरांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमात तण, कीड व रोग व्यवस्थापन या विषयांवर शेतशिवार प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. दिनांक ०१ ऑगस्ट रोजी मौजे घोगरी, तामसा, वडगाव, कोळगाव, कांजरा, शिवणी, वाकळी, धानोरा आणि वाकळी (बु.) या गावांतील शेतांवर प्रत्यक्ष भेट देऊन हळद, ऊस, सोयाबीन, तूर व भाजीपाला पिकांवर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले, तर दिनांक ०२ ऑगस्ट रोजी मौजे उमरी, येवली, पिंपळगाव, राजवाडी, गवतवाडी, चिकाळा व ब्रम्हवाडी या गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हळद, ऊस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला पिकांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

या दौऱ्यात डॉ. राकेश आहिरे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. माणिक कल्याणकर तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. सदाशिव पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे कीड व रोग नियंत्रण तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच खरीप हंगामातील पिकांच्या आधुनिक व प्रभावी व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला आणि आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा लाभ घेतला. विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नविन उमेद निर्माण झाली असून, ते अधिक वैज्ञानिक पद्धतीने शेतीकडे वळत असल्याचे चित्र दिसूनआले.