Thursday, July 10, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास आयआयआरएफ (IIRF) २०२५ मध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मानाची रँक

विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन, विस्तार व नवोपक्रमात्मक कार्यक्षमतेची पावती... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानी भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली (आयआयआरएफ – IIRF - Indian Institutional Ranking Framework) २०२५ च्या कृषी व उद्यानविद्या विद्यापीठांच्या गटात राष्ट्रीय स्तरावर ३३वा आणि राज्य स्तरावर २रा क्रमांक मिळवून एक मानाचा ठसा उमटवला आहे.

ही रँकिंग नवी दिल्ली  येथील संस्थात्मक संशोधन केंद्राच्या (ICIR- सेंटर फॉर इन्स्टिट्युशनल रिसर्च)  भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली यांच्यातर्फे जाहीर करण्यात आली असून, विद्यापीठास १० जुलै २०२५ रोजी अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली ही भारतातील उच्च शिक्षण संस्थांची स्वतंत्र आणि संशोधनाधिष्ठित रँकिंग व्यवस्था आहे. ॲक्शन कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या संशोधन भागीदार संस्थेमार्फत सर्वेक्षण व विश्लेषण करून विविध विद्यापीठांची रँक ठरवली जाते.

ही संस्था जागतिक रँकिंग संस्था क्यूएस (QS) किंवा भारत सरकारची  एनआयआरएफ (NIRF)  यासारख्या आंतरराष्ट्रीय किंवा सरकारी निकषांपेक्षा वेगळी असून ती भारत-केंद्रित दृष्टिकोनातून मूल्यांकन करते. भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणालीच्या रँकिंगमध्ये केंद्रीय विद्यापीठे, राज्य सरकारी विद्यापीठे, अभिमत (डीम्ड) विद्यापीठे आणि खाजगी विद्यापीठे अशा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करून मूल्यांकन केले जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी आणि उद्यानविद्या विद्यापीठांच्या गटात ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त होऊ शकले. यानिमित्ताने कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, ही मान्यता विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन, विस्तार व नवोपक्रमात्मक कार्यक्षमतेची पावती आहे. विद्यापीठातील सर्व शिक्षक, संशोधक, विस्तार अधिकारी आणि विद्यार्थ्यांचे हे सामूहिक यश आहे, असेही त्यांनी नमूद केले. विद्यापीठ सातत्याने यशाची शिखरे गाठत आहे. विद्यापीठाच्या कार्यास महाराष्ट्र शासनाचे, पुणे येथील कृषी परिषदेचे तसेच विद्यापीठाच्या कार्यकारी व विद्वत परिषदेचे अनमोल सहकार्य लाभत आहे, याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले.

या यशासाठी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, तसेच सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे.

तसेच मागील दोन ते अडीच वर्षांत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात राबविण्यात आलेले विविध विशेष उपक्रम रँकिंग मिळविण्यासाठी निर्णायक ठरले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, वसतिगृहांची दुरुस्ती, विद्यापीठ परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण, तसेच सीएसआर निधीतून ‘महाराष्ट्र यांत्रिकीकरण केंद्र’, कौशल्य विकास उपक्रम व ‘कॉमन इन्क्युबेशन सेंटर’ (सामायिक उद्योजकता संवर्धन केंद्र) ची स्थापना यांचा त्यात समावेश आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सहाव्या अधिष्ठाता समितीच्या पदवी अभ्यासक्रमांची तसेच पदव्युत्तर स्तरावरील बीएसएमए अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासोबतच बाह्यस्त्रोत निधीच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेले संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर करण्यात आलेले सामंजस्य करार, शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासोबत’ हा उपक्रम, नियमितपणे राबविण्यात येणारा ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम, संशोधनाद्वारे विकसित करण्यात आलेले विविध नवीन वाण, अवजारे व तंत्रज्ञान आणि त्यांचे प्रभावी विस्तार कार्य — या सर्व बाबींमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याला गती मिळाली असून, त्याचा सकारात्मक परिणाम विद्यापीठाच्या रँकिंगवर झाला आहे.

या रँकिंगमुळे विद्यापीठात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.


वनामकृविच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ उपक्रमाअंतर्गत मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ५५० हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद व मार्गदर्शन

 ऊसावरील पांढरी माशी नियंत्रण, प्रक्षेत्र भेटी, शेतकरी मेळावे व ऑनलाईन संवादावर भर; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा शेतकऱ्यांना विश्वास

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम विविध गावांमध्ये राबविण्यात येतो. या उपक्रमात प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांशी संवाद साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रदान केले जाते.

दिनांक ९ जुलै रोजी एकूण १२ चमूमधील ५१ शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ५५० हून अधिक शेतकऱ्यांना भेट दिली, त्यांची शेतीविषयक समस्या जाणून घेऊन त्यास समाधानकारक उत्तरे देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे मौजे, कंठेश्वर (ता. पुर्णा, जि. परभणी) येथे शेतकरी मेळावा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले, तर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, विद्यापीठाकडून शेतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात येईल. तसेच, सध्या परिसरातील ऊस पिकावर आलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विद्यापीठ तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी अंतर कमी करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे, दर मंगळवार व दर शुक्रवारी घेण्यात येणाऱ्या ‘ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद’ कार्यक्रमाची माहिती देऊन शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित केले.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी सांगितले की, या शुक्रवारी शेतकऱ्यांसाठी मागणीनुसार ऊस पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासोबतच ऊस, सोयाबीन व हळद या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान, रोग व्यवस्थापन व बायोमिक्सचा वापर याबाबत अनुक्रमे डॉ. गजानन गडदे, डॉ. प्रफुल्ल घंटे, आणि डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी तसेच फळबाग व्यवस्थापन व उसावरील पांढरी माशीच्या व्यवस्थापनाविषयी डॉ. दिगंबर पटाईत यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रादरम्यान शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने त्यातील अडचणी सोडविण्यात मदत झाली.

सर्व शास्त्रज्ञांनी मौजे कंठेश्वर परिसरातील पांढरी माशीने प्रादुर्भाव झालेल्या विविध ऊस प्रक्षेत्राची पाहणी केली व शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन दिले. या उपक्रमात तालुका कृषी अधिकारी श्री. संतोष भालेराव, मंडळ कृषी अधिकारी श्री. बालाजी गाडगे, तालुका तंत्र व्यवस्थापक श्री. रविराज माने आणि ८६हून अधिक शेतकरी सहभागी झाले.

विद्यापीठाचे मराठवाड्यातील परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती प्रकल्प, बदनापूर येथील कृषी महाविद्यालय, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र, तसेच छत्रपती संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर व परभणी येथील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रे, आणि कृषि विज्ञान केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, खामगाव, तुळजापूर) या कार्यालयांनी सहभाग नोंदविला. या कार्यालयातील डॉ. सुर्यकांत पवार प्रा. अरुण गुट्टे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. आनंद गोरे, डॉ. अरविंद पंडागळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. ज्ञानदेव मुटकुळे, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी, दिप्ती पाटगावकर, डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. तुकेश बा. सुरपाम, प्रा. किशोर ल. जगताप, श्री. रामेश्वर ठोंबरे, प्रा. चेनलवाड, श्री. प्रमोद कळसकर, श्री. किशोर शेरे, डॉ. सतीश कदम, रावे व उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून कृषि विभागाचे श्री. रविंद्रजी माने, श्री. अस्सलकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.




















Wednesday, July 9, 2025

वनामकृवि विकसित सार्वजनिक क्षेत्रातील बीटी कापसाच्या दोन सरळ वाणांची सघन लागवडीसाठी शिफारस

 वाण विकासासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन लाभले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेल्या एनएच २२०३७ बीटी बीजी २ व एनएच २२०३८ बीटी बीजी २ या दोन बीजी २ सरळ वाणांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत केंद्रीय वाण निवड समितीच्या दिनांक १९.०६.२०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीत, मध्य भारत विभागातील महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरडवाहू लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

या संशोधनामागे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन लाभले असून, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांचे मोलाचे योगदान आहे. एनएच २२०३७ बीटी बीजी २ व एनएच २२०३८ बीटी बीजी २ हे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बीजी २ तंत्रज्ञानाचे पहिलेच सरळ वाण असून, सघन लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहेत. हे वाण सरळ स्वरूपाचे असल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः उत्पादित बियाणे पुढील दोन ते तीन वर्षे वापरता येईल, त्यामुळे बियाण्यावरील खर्चात मोठी बचत होऊ शकते, असे या वाणाच्या विकासातील प्रमुख शास्त्रज्ञ यांनी सांगितले.

या वाणांच्या विकासामध्ये कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग, सहयोगी पैदासकार डॉ. विजयकुमार चिंचाणे, सहायक पैदासकार डॉ. अरुण गायकवाड तसेच कापूस संशोधन केंद्रातील इतर वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

या उल्लेखनीय संशोधनासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

वाणांची वैशिष्ट्ये

एनएच २२०३७ बीटी बीजी २

एनएच २२०३७ बीटी बीजी २ हा वाणही सघन लागवडीस योग्य असून त्याची उंची ९० ते ९५ सेमी आहे. याच्या धाग्याची लांबी २९ ते ३० मिमी असून धाग्याची मजबूती व तलमपणा विशेषतः चांगला आहे. बोंडाचे वजन ४.५ ते ४.७ ग्रॅम असूनहा वाण देखील रसशोषक कीड व विविध रोगांपासून सहनशील आहे.

एनएच २२०३८ बीटी बीजी २

एनएच २२०३८ बीटी बीजी २ हा वाण सुमारे १६० ते १७० दिवसात तयार होतो व प्रती हेक्टर १८ ते १९ क्विंटल उत्पादन देतो. सघन लागवडीसाठी तो अत्यंत उपयुक्त आहे. या वाणाच्या धाग्याची लांबी २९ ते ३० मिमी असून धाग्याची मजबूती २८ ते २९ ग्रॅम/टेक्स आहे. बोंडाचे वजन ४.८ ते ५.० ग्रॅम आहे. तसेच हा वाण रसशोषक कीड, जिवाणूजन्य करपा व पानावरील ठिपक्यांच्या रोगास सहनशील आहे.


एनएच २२०३७ बीटी बीजी २


एनएच २२०३८ बीटी बीजी २


Tuesday, July 8, 2025

"पीजीएस-इंडिया" सेंद्रिय प्रमाणीकरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

 देश-विदेशात नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची वाढती चर्चा... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद (ऑनलाईन) मालिकेत सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या " पीजीएस-इंडिया सेंद्रिय प्रमाणन " (PGS-INDIA Organic Certification) या योजनेविषयी माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते तर गाझियाबाद येथील राष्ट्रीय जैविक व नैसर्गिक शेती केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. वाचस्पति पांडेय यांनी या संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख आयोजक संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, डॉ. कैलास गाढे, डॉ. पपिता गौरखेडे यांची उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, की नैसर्गिक तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी प्रमाणीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. सध्या देश-विदेशात नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची चर्चा वाढत आहे. समाजात शाकाहारी आहाराला प्राधान्य दिलं जात आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक उत्पादनांमधून मिळणारे पोषक घटक अधिक लाभदायक ठरत आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्यरत आहे. या शेतकऱ्यांना नैसर्गिक व सेंद्रिय शेतीत प्राविण्य मिळावे तसेच त्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, यासाठी विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील नैसर्गिक व सेंद्रिय शेती प्रमाणीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेसाठी तांत्रिक मार्गदर्शनार्थ डॉ. वाचस्पति पांडे यांना आमंत्रित करण्यात आले.

माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, मराठवाड्यातील शेतकरी अभ्यासू व उत्साही आहेत. ते अनेक राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांना भेट देतात आणि स्वतःसोबत विद्यापीठाचं नावही उज्वल करतात. विद्यापीठ शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करत आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य विद्यापीठाला लाभत आहे. “प्रश्नोत्तर सत्र हा कार्यक्रमाचा गाभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक प्रश्न विचारून आपलं समाधान करून घ्यावं,” असं आवाहन त्यांनी केलं.

डॉ. वाचस्पति पांडे यांनी नैसर्गिक व सेंद्रिय पदार्थांचे आहारातील आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, कोणतीही वस्तू खरेदी करताना प्रमाणीकरण गरजेचे असते. नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादने खरेदी करताना सुद्धा प्रमाणीकरणाची आवश्यकता आहे. यासाठी ‘पीजीएस  इंडिया’ सेंद्रिय प्रमाणीकरण प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. या प्रक्रियेसाठी आवश्यक संकेतस्थळे, लागणारी कागदपत्रे व प्रक्रिया यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. त्यांनी ‘पीजीएस  इंडिया’ सेंद्रिय प्रमाणीकरण म्हणजे काय? ते कसे करावे? फायदे कोणते? प्रक्रिया कशी आहेप्रमाणीकरणाची गरज व महत्त्व, प्रमाणीकरणाचे प्रकार व पद्धती, या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च, आवश्यक कागदपत्रे आणि जबाबदाऱ्या, नैसर्गिक शेती करताना घ्यावयाची काळजी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबतच, शेतकऱ्यांकडे किमान एक पशुधन असणे आवश्यक असून गाईला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सुचविले.

त्यांनी जैविक प्रमाणनबददल सांगितले की, जैविक मानकांची पूर्तता होत आहे का, याबाबत निरीक्षण आणि मूल्यांकन केले जाते, प्रमाणपत्र, अटी व निर्बंध जारी करण्याचा निर्णय घेतला जातो, उत्पादन किंवा प्रक्रियेची काही मानके पाळली जात आहेत याची लेखी पुरावा दिला जातो, लेबलिंग नियम व कायदेशीर अटींची पूर्तता केली जात आहे का, याची खात्री केली जाते.

कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यावाचस्पती यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार डॉ कैलास गाढे  यांनी मानले

महत्वाच्या संकेतस्थळांवर अधिक माहिती उपलब्ध

शेतकरी, जैविक उत्पादक आणि ग्राहक यांच्यासाठी पुढील संकेतस्थळांवर अधिक माहिती उपलब्ध आहे:

🔗 https://pgsindia-ncof.gov.in/home.aspx
🔗 https://www.jaivikkheti.in/shop
🔗 https://ncof.dacnet.nic.in


ऊसावरील रसशोषक पांढरी माशी किडींचे व्यवस्थापन, वनामकृवि शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

मागील काही वर्षात ऊसाची दुय्यम कीड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांढरीमाशी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात ऊसावर दिसून येत आहे. विशेषतः खोडवा ऊसावर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो, या किडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस उत्पन्नात मोठी घट झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच ह्या किडीला ओळखून पुढील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. जेणेकरून किडीमुळे होणारे नुकसान वेळीच टाळता येईल. असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे यांनी दिला आहे.

किडीच्या उद्रेकाची संभाव्य कारणे : शेतामध्ये पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत व पिकाला पाण्याचा ताण पडल्यास अशा दोन्ही परिस्थितीत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो. रासायनिक खताचा असमतोल वापर विशेषतः नत्रयुक्त खताचा कमी, अधिक आणि अवेळी वापर हा किडीसाठी पोषक वातावरण तयार करतो. प्रदीर्घ काळ हवेतील जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण व उष्ण हवामान अशा प्रकारच्या अनुकूल परिस्थितीत प्रजनन क्षमता वाढते आणि जीवनक्रम कमी कालावधीचा होतो. यामुळे किडींच्या संख्येत वाढ होण्यास मदत होते. पावसाळ्यात जास्त प्रमाणात पावसाची उघडीप किंवा खंड पडणे. लांब व रुंद पानाच्या जाती जास्त प्रमाणात बळी पडतात. खोडव्याचे व्यवस्थापन योग्य न करणे. 

अनुकूल हवामान : ही कीड उष्ण आणि दमट परिस्थितीत जास्त प्रमाणात वाढते. विशेषतः,25-30° सेल्सिअस तापमान आणि मध्यम ते उच्च आर्द्रता त्यांच्या वाढीस अनुकूल असते. काही प्रयोगांती असे दिसुन आले आहे की, पाऊस जास्त झाल्यास पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी होते.  

नुकसानीचा प्रकार व प्रादुर्भावाची लक्षणे : या किडीची पिल्ले व प्रौढ दोन्ही पानातील रस शोषण करतात परंतु बाल्यावस्था पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते, या अवस्थेत कीड पानाच्या मागील बाजूने स्थिर राहून पानातील रस शोषण करते, त्यामुळे पान निस्तेज होतात, पिवळी व गुलाबी पडतात आणि कालांतराने वाळू लागतात बर्‍याचदा किड तिच्या शरीरातून करीत असलेल्या चिकट गोड स्त्रावामुळे कॅप्नोडियम बुरशीची पानावर वाढ होऊन पाने काळी पडू लागतात व अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. प्रादुर्भाव जास्त असल्यास एकाच पानावर 5000 पर्यंत कोष आढळून येतात. पानाची मागची बाजू कोषामुळे पूर्णपणे काळी पडते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात 86% व साखरेच्या उताऱ्यात 3 ते 4 युनिट पर्यंत घट होऊ शकते.

पर्यायी खाद्य वनस्पती : विविध तृणधान्ये आणि गवतवर्गिय तणे

किडीचे एकात्मिक व्यवस्थापन : सदरिल किडीच्‍या व्यवस्थापनाकरिता लखनऊ येथील केंद्रीय ऊस संशोधन संस्था लखनऊ आणि पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी पुढील उपाय योजनाचा सल्‍ला दिला आहे.

ऊसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी, त्यामुळे कीडनाशकांची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होईल. मार्च ते मे महिन्यात लागवड केलेल्या ऊसावर पांढरी माशी जुलै-ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आढळते, म्हणून उसाची लागवड किंवा तोड उशिरा करू नये. पांढऱ्या माशी ने प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये. खोडवा ऊसात खतांची मात्रा न दिल्यास ही कीड वाढते. त्यामुळे खोडवा ऊसाची काळजी घ्यावी. ऊसाच्या शेंड्या जवळील दुसऱ्या व तिसऱ्या पानांवर ही कीड जास्त अंडी घात घालते अशी 2 ते 3 पाने तोडून अंडी व कोषासह जमिनीत पुरून अथवा जाळून नष्ट करावीत. पांढऱ्या माशी ने प्रादुर्भावग्रस्त ऊस तुटल्यानंतर त्यामधील पाचट तसेच न ठेवता लवकरात लवकर नष्ट करावे म्हणजे अंडी, बाल्यावस्था व कोष मरतात. पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. सदरील सापळे वाऱ्याच्या दिशेने लावल्यास पांढऱ्या माशीचे प्रोढ आकर्षित होऊन चिकटतात त्यामुळे शेतातील पांढऱ्या माशीची संख्या कमी होण्यास मदत होते. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून फवारणी केल्यास किडींच्या कोषामध्ये कीटकनाशकाचा प्रवेश चांगल्या प्रकारे होतो व त्यामुळे किडीचे अधिक चांगले व्यवस्थापन होते. कीटकनाशकाच्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवस ऊस किंवा उसाचे वाढे जनावरांना घालू नये.

वरील किटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पावर पंपासाठी किटकनाशकाचे प्रमाण तीन पट करावे. आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.

पिकांमध्ये फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी: फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी. वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये. फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.

अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा दुरध्‍वनी क्रमांक 02452 229000 किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन- 8329432097 यावर संपर्क करावा.

सौजन्‍य  : संदेश क्रमांक: 01/2025 ( 07 जुलै 2025)

डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, परभणी


Saturday, July 5, 2025

अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा. हेमंत देशपांडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातील विभागप्रमुख तथा कॉमन इन्क्यूबेटर सेंटरचे प्रमुख प्रा. हेमंत देशपांडे हे ३४ वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार दिनांक ३० जून रोजी विद्यापीठ सेवेतून निवृत्त झाले आहेत. या निमीत्ताने महाविद्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेत, प्रा. देशपांडे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रा. देशपांडे यांच्या नेतृत्वगुणांचे आणि अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विकासात दिलेल्या मोलाच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्यासह  डॉ. पांडुरंग सत्वधर, डॉ. ए. आर. सावते, डॉ. विजया पवार, श्री शिवाजी महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. मंजिरी भाटे - देशपांडे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाप्रमुख पाहुणे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते प्रा. देशपांडे यांना महाविद्यालयाच्या वतीने ‘सन्मानपत्र’ प्रदान करण्यात आले. तसेच डॉ. आसेवार यांनीही प्रा. देशपांडे यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व नवोन्मेषाची प्रेरणा निर्माण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी प्रा. देशपांडे यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या सेवेत त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व विस्तार कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

आपल्या निरोपपर भाषणात प्रा. देशपांडे भावुक होत सहकारी, विद्यार्थी आणि प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानले. “संस्था ही व्यक्तीपेक्षा मोठी असते. मला खूप काही मिळालं, पण मीही मनापासून देण्याचा प्रयत्न केला,” असे त्यांनी नम्रपणे नमूद केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रीती ठाकूर यांनी केले.  संपूर्ण अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.

या सन्मान समारंभास सर्व प्राध्यापक, शैक्षणिक व अशैक्षणिक कर्मचारी, पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tuesday, July 1, 2025

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना वनामकृवित अभिवादन; कृषिदिन उत्साहात साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी ‘कृषिदिन’ म्हणून साजरी करण्यात आली.

या प्रसंगी विद्यापीठातील स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मारकास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या हस्ते पुष्पपूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात हरितक्रांतीला चालना देऊन महाराष्ट्रातील शेती व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. सिंचन, खते, बियाणे यांचा प्रसार करून कृषि उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणली. त्यांनी १९७२ साली महाराष्ट्रात विभागनिहाय चार कृषि विद्यापीठांची स्थापना करून कृषि शिक्षणास मोठी चालना दिली.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्व. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले असून त्यांनी राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी अनेक दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले. शेतकरी कल्याणकारी योजना, सहकारी संस्थांचा विकास तसेच कृषि आधारित उद्योगांना चालना दिली. त्यांनी ज्वार या पिकाच्या संशोधनात विशेष लक्ष दिले.

या कार्यक्रमास प्राचार्या डॉ. जया बंगाळे, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ राहुल रामटेके, प्राचार्य डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील रावे उपक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना, कृषि महाविद्यालय परभणी यांच्या वतीने शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.