Sunday, October 12, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) म्हणून देशातील अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र म्हणून डीजीसीएची मान्यता

देशातील कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी भारत सरकारच्या विविध पाच समित्यांमध्ये अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मोलाचे योगदान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि क्षेत्रात आणखी एक महत्वपूर्ण यश मिळविले आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून विद्यापीठाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून, आता विद्यापीठ ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) म्हणून देशातील अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत होणार आहे. या मान्यतेमुळे विद्यापीठात आता शेतकरी, विद्यार्थी, कृषि अभियंते व संशोधकांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षणासह ड्रोन पायलटचे अधिकृत लायसन्स प्राप्त करण्याची सुविधा होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरी विमान वाहतूक संचालनालय मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठांमध्ये वनामकृवि हे एक महत्वपूर्ण विद्यापीठ ठरले आहे, ज्यामुळे मराठवाडा विभागात कृषि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली गेली आहे.

भारतीय कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या विविध पाच समित्यांमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून कार्य करत कृषि क्षेत्रासाठी ड्रोन वापराच्या मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedures - SOPs) तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. कृषि क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी तीन टप्प्यांमध्ये या समित्या कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात, कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन संचालनाच्या मानक मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ. के. अलागुसुंदरम असून, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यांनी संयोजक म्हणून कार्य केले. दुसऱ्या टप्प्यात, माती व पिकांच्या पोषणासाठी ड्रोनद्वारे फवारणी आणि कीटकनाशक फवारणीसाठी मानक तयार करण्यात माननीय कुलगुरुंनी प्रमुख भूमिका बजावली. तिसऱ्या टप्प्यात, पिकानुसार विशिष्ट मानक तयार करणे, तसेच विविध पोषणघटक व जमिनीशी संबंधित घटकांचे ड्रोनद्वारे वितरण यासाठी माननीय कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली समित्या कार्यरत आहेत. याशिवाय कृषि क्षेत्रातील अन्य उपक्रमांसाठी (कीटकनाशक आणि द्रव खत फवारणी व्यतिरिक्त) ड्रोनच्या वापराचा अभ्यास करण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला आहे. या कार्यातून भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाच्या वतीने ड्रोनच्या वापरासाठी मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या असून, त्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने होत असून, यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात, अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक शेती पद्धती अवलंबता येत आहेत.

कृषी क्षेत्रातील ड्रोन वापर मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. विद्यापीठात सध्या ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) याबरोबरच ड्रोन पायलटसाठी सहा महिन्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ड्रोन कस्टम हायरिंग सेंटर या उपक्रमांवर महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. ड्रोन अभ्यासक्रमांतर्गत आतापर्यंत दोन बॅचमधून एकूण २८ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. या प्रशिक्षणामध्ये दहावी उत्तीर्ण ते अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणानंतर ड्रोन क्षेत्रात स्वयंरोजगार निर्माण केला किंवा भारतातील अग्रगण्य कंपन्या तसेच शासकीय संस्थांमध्ये रोजगार मिळवला आहे. तसेच मराठवाड्यातील विविध गावांमध्ये शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली.

विद्यापीठाच्या ड्रोन तंत्रज्ञानाशी कार्य माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात आणि  शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, नाहेप प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

कृषि क्षेत्रात ड्रोनची क्रांती

शेतीमध्ये कीडनाशकांची फवारणी, खत व्यवस्थापन, पीक सर्वेक्षण, नकाशांकन (mapping), उत्पादन अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, पिकांचे आरोग्य निरीक्षण या सर्व कार्यांसाठी ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, मजुरी आणि खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढते. DGCA मान्यताप्राप्त अशा प्रशिक्षणामुळे शेतकरी आणि तरुण विद्यार्थ्यांना कृषि-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्याची नवी दिशा उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाच्या अधिकृत RPTO केंद्रात प्रवेश सुरू असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी.

प्रशिक्षणाची रचना व वैशिष्ट्ये

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) येथे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) येथे DGCA ने ठरविलेल्या मानकांनुसार सहा दिवसांचे अधिकृत प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणात पहिल्या १ ते २ दिवसात सैद्धांतिक (वर्ग) प्रशिक्षण, तिसऱ्या दिवसी सिम्युलेटर प्रशिक्षण तर पुढील ४ ते ६ दिवसी प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण व हाताळणी असे प्रशिक्षणाचे टप्पे असतील.

प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सिम्युलेटर लॅब, प्रशिक्षित तज्ञ शिक्षक, सुरक्षित उड्डाण क्षेत्र, आणि कृषि फवारणीसाठी सुसज्ज ड्रोन उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) अधिकृत परवाना प्राप्त होईल.

दूरस्थ पायलट परवाना’ (Remote Pilot Licence) म्हणजे काय?

ज्या प्रमाणे मोटार वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना आवश्यक असतो, तसेच ड्रोन चालविण्यासाठी ‘दूरस्थ पायलट परवाना’ आवश्यक असतो. हा परवाना फक्त DGCA मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था (RPTO) मधून अधिकृत प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच मिळतो.

प्रवेशासाठी पात्रता उमेदवाराचे वय १८ ते ६५ वर्षे, शैक्षणिक पात्रता किमान १०वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक तसेच त्याच्याकडे भारतीय ओळख पत्र असणे आवश्यक आहे. 

शेतीपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत नवे करिअर मार्ग

ड्रोन प्रशिक्षणाद्वारे कृषि, सर्वेक्षण व मॅपिंग, आपत्ती व्यवस्थापन, छायाचित्रण, सुरक्षा व पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रांत रोजगार व उद्योजकतेच्या भरपूर संधी निर्माण होणार आहेत. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना, कृषि पदवीधरांना आणि शेतकऱ्यांना स्वावलंबन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरेल.

प्रशिक्षणासाठी रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचे प्रमुख तथा सहायक प्राध्यापक डॉ. विशाल इंगळे यांचाशी संपर्क साधावा. प्रशिक्षण केंद्राचा पत्ता - कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी – 431402, ईमेल: vnmkv.rpto@gmail.com, मोबाईल क्रमांक ९९००९३१२१४ /९०९६९६७१४२.




Saturday, October 11, 2025

रब्बी हंगामाचे नियोजन विषयक “शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाइन कृषि संवाद” संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा निरंतर उपक्रम 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या यांच्या प्रेरणेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) यांच्या समन्वयातून शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाइन कृषि संवाद” या उपक्रमाचा ६७ वा भाग रब्बी हंगामाची पूर्वतयारी, नियोजन व पिकांची निवड” या विषयावर आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी या संवाद मालिकेचे शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, सध्या जमिनीत मुबलक ओलावा उपलब्ध आहे. या नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून येणाऱ्या रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, करडई, जवस आदी पिकांची नियोजनबद्ध लागवड करावी. यामुळे खरीपातील नुकसानीची भरपाई होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. रब्बी हंगामात शास्त्रीय पद्धतीने पिकांचे नियोजन करून उत्पादनवाढ साध्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.

मुख्य विस्तार अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी हवामान स्थितीचा सविस्तर आढावा घेत, त्यानुसार पीक नियोजन, सिंचन व्यवस्थापन आणि हवामान आधारित सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख (उद्यानविद्या तज्ञ) यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील पिक व पाणी परिस्थितीचा सखोल आढावा घेत, रब्बी हंगामातील प्रमुख पिके जसे गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई तसेच कांदा, लसण, बटाटा यांसारख्या भाजीपाला पिकांचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी जिरे, बडीशेप, ओवा, चिया यांसारख्या पर्यायी पिकांच्या लागवडीसाठी जमिनीची योग्य पूर्वतयारी, वाण निवड, पेरणी कालावधी व बाजारपेठेतील संधी याबाबतही उपयुक्त माहिती दिली.

प्रा. माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ) यांनी शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीतून प्रसारित होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स हे सेंद्रिय जैवउपचार एकरी ३ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून वापरण्याचे आवाहन केले. तसेच मर रोगाचा प्रतिकारक्षम असलेल्या विद्यापीठाच्या संशोधित वाणांची निवड करण्याचे सुचवले.

डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ) यांनी रब्बी हंगामातील पशुधनाचे आरोग्य, पोषण व देखभाल यावर मार्गदर्शन केले, तर सौ. अल्का पवळे (गृह विज्ञान तज्ञ) यांनी ग्रामीण कुटुंबांमधील संतुलित पोषण, महिलांचे आरोग्य आणि आहार नियोजन यावर उपयुक्त माहिती दिली.

कार्यक्रमात डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. डी. आर. कांबळे, डॉ. हनुमान गरुड तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबेजोगाई आणि तुळजापूर येथील कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ यांनीही आपले विचार मांडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अमिता क्षत्रिय (कृषि विस्तार तज्ञ, कृ.वि.के. पोखर्णी) यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

या संवाद सत्रात एकूण ७३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. राकेश वाडीले (कृ.वि.के. पोखर्णी) यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. या शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद मालिकेच्या माध्यमातून विद्यापीठ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार करून त्यांना आत्मनिर्भर व वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करीत आहे.


कृषिच्या विद्यार्थी प्रवेशात लक्षणीय वाढ — वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत

 शासकीय कृषि महाविद्यालयातील केवळ १२ जागा रिक्त तर अन्न तंत्रज्ञान आणि उद्यानविद्या अभ्यासक्रमांच्या सर्व जागा पूर्णपणे भरल्या

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी हे शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असून, गेल्या तीन शैक्षणिक वर्षांत विद्यापीठातील विद्यार्थी प्रवेशामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विद्यापीठाचे शासकीय व संलग्न महाविद्यालयांतील प्रवेश आकडेवारीनुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात एकूण ३४८२ विद्यार्थी प्रवेशित झाले. त्यानंतर २०२४-२५ मध्ये ही संख्या वाढून ३८७२ वर पोहोचली, तर सर्वात अलीकडील २०२५-२६ शैक्षणिक वर्षात ४०४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

कृषि आणि संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शासकीय महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे कोटे वेगवेगळे असतात. त्यानुसार विद्यापीठाच्या शासकीय कृषि महाविद्यालयातील महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या कोट्यातील केवळ १२ जागा रिक्त असून अन्न तंत्रज्ञान आणि उद्यानविद्या या अभ्यासक्रमांच्या सर्व जागा पूर्णपणे भरल्या आहेत. इतर संलग्न शाखांतील ८४ जागा रिक्त असून या जागा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या कोट्यातून भरल्या जावू शकतात. तसेच खाजगी कृषि आणि संलग्न अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये एकूण ११५७ जागा रिक्त आहेत.

विशेष म्हणजे कृषि अभियांत्रिकी शाखेतील गेल्या वर्षी केवळ ५० जागा भरल्या, त्या या वर्षी ६८ भरल्या असून, अन्न तंत्रज्ञान या शाखेमधील यापूर्वी रिक्त राहत असलेल्या जागादेखील यावर्षी पूर्णतः भरल्या आहेत. ही आकडेवारी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यावर विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास दर्शविते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषिक्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय पातळीवर आपली भक्कम छाप उमटवली आहे. गेल्या दोन वर्षांत संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्यामध्ये साधलेल्या प्रगतीमुळे विद्यापीठाने अनेक मानांकने आणि क्रमवारी पटकावले आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीने विद्यापीठास प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकन प्रदान केले असून, विद्यापीठाने ३.२१/४ गुणांसह उच्चांकी स्थान मिळवले आहे. तसेच, भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली (IIRF) २०२५ मध्ये विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर ३३वा क्रमांक मिळवत एक मानाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय, कृषि विषयक अग्रगण्य संकेतस्थळअ‍ॅग्रीटेल डॉट कॉम’ ने जाहीर केलेल्या देशातील उच्च शिक्षणासाठी सर्वोत्तम दहा कृषि विद्यापीठांमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा समावेश केला आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, जैवतंत्रज्ञान आणि उद्यमशीलतेवर विद्यापीठाचा विशेष भर असल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल सतत वाढत आहे. हे आमच्यासाठी अभिमानास्पद यश आहे. या वाढत्या प्रवेशसंख्येमुळे मराठवाड्यातील कृषि शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वनामकृविच्या मृद विज्ञान विभागात भारतीय मृद विज्ञान संस्थेच्या वतीने उत्कृष्ट प्रबंध सादरीकरण स्पर्धा संपन्न

 मृद विज्ञान विभागाच्या विद्यार्थी संशोधन क्षमतेला वाव देणारी प्रबंध स्पर्धा - विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या मृद विज्ञान विभागात नवी दिल्ली येथील भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या वनामकृवि शाखेच्या वतीनेदिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी उत्कृष्ट प्रबंध सादरीकरण स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय मृद विज्ञान संस्था, परभणी शाखेचे अध्यक्ष व विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आशित मंडल (भोपाळ), डॉ. आर. डी. चौधरी (भावनगर, गुजरात), आणि डॉ. व्ही. एस. पाटील (राहुरी कृषि विद्यापीठ) उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. हरिहर कौसडीकर यांनी करताना या स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, सादरीकरण कौशल्य वृद्धिंगत करणे आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी त्यांनी परभणी शाखेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली.शेवटी त्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धा या विद्यार्थ्यांना संशोधनाच्या नव्या वाटा दाखवतात आणि नवीन शास्त्रज्ञ घडविण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरतात, असे प्रतिपादन केले.

या स्पर्धेचे तज्ज्ञ परीक्षक म्हणून डॉ. आशित मंडल, डॉ. आर. डी. चौधरी आणि डॉ. व्ही. एस. पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे उच्च कौतुक करत त्यांना संशोधनातील सखोलता, भाषिक स्पष्टता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन राखण्याचे मार्गदर्शन दिले.

स्पर्धेत आचार्य पदवीच्या एका विद्यार्थिनीने आणि पदव्युत्तर पदवीच्या चार विद्यार्थ्यांनी आपापले प्रबंध सादर केले. सादरीकरणादरम्यान विद्यार्थ्यांनी मृद विज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन, प्रयोगात्मक निष्कर्ष आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा शिफारसी मांडल्या. या स्पर्धेचा निकाल मृद विज्ञानाच्या राष्ट्रीय परिसंवादामध्ये, जो लवकरच कोईम्बतूर, तामिळनाडू येथे आयोजित होणार आहे, त्या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे.

सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या वनामकृवि शाखेचे सचिव तथा मृदा शास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे यांनी करून दिला, तर आभार डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी मानले.

या प्रसंगी विभागातील प्राध्यापक डॉ. अनिल धमक, डॉ. सुरेश वायकर, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. महेश देशमुख, डॉ. संतोष चिकसे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्वाती झाडे, डॉ. शिलेवंत तसेच आचार्य व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विभागातील सर्व प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि कर्मचारी यांच्यासह श्री. इंगोले, श्री. जोंधळे आणि श्री. साजिद यांनी परिश्रम घेतले.





माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना’, ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन’ आणि ‘कडधान्य विकास कार्यक्रम’चा शुभारंभ

 — वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात थेट वेबकास्टिंगद्वारे कार्यक्रमाचे आयोजन


माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते, दिल्लीतील पुसा येथे कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना’, ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन’ आणि कडधान्य विकास कार्यक्रम’ या महत्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश कृषि विकासाला गती देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे माननीय पंतप्रधानांचे भाषण थेट वेबकास्टिंगद्वारे विद्यापीठाच्या सिम्पोझियम हॉलमध्ये प्रक्षेपित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

थेट वेबकास्टिंग कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रगतशील शेतकरी कृषिभूषण श्री कांतराव देशमुख, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी सांगितले की, विद्यापीठ हे संशोधन, शिक्षण आणि विस्तार या तिन्ही क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. विद्यापीठाचे संशोधन व विस्तार कार्य प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. या विद्यापीठाद्वारे उत्पादित बियाण्यांवर शेतकऱ्यांचा विश्वास असून, त्यांची मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते. बियाणे उत्पादनात आणखी वाढ व्हावी आणि ते शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाचा कृषि विभाग, बियाणे महामंडळ तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सहकार्य घ्यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच, बियाण्यांसोबतच नैसर्गिक शेतीसाठी उपयुक्त उत्पादनेही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली असून, त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे संघभावनेने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकरी हे स्वतः उत्कृष्ट संशोधक आहेत; त्यांच्या अनुभव आणि सहकार्याचा उपयोग कृषि विकासासाठी करावा, असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

प्रगतशील शेतकरी कृषि भूषण श्री कांतराव देशमुख यांनी सांगितले की, सध्या शेतकरी सर्वच बाबतीत प्रचंड अडचणीत आहे. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की शेतीवरील अनावश्यक खर्च कमी करावा, कारण झालेली बचत हेही उत्पन्नच मानले जाते. यासाठी रासायनिक खतांवरील आणि औषधांवरील खर्च कमी करणे आवश्यक आहे, कारण या क्षेत्रात भेसळीमुळे अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होते. त्यामुळे सेंद्रिय घटकांचा वापर वाढवावा, शेणखत, गांडूळ खत घरच्या घरी तयार करावे आणि जैविक खतांचा वापर वाढवावा. या दिशेने विद्यापीठाने मोठे कार्य केले आहे. शेतकऱ्यांनी या उपक्रमांचा आणि शासनाच्या विविध योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या कार्यक्रमात माननीय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचा शुभारंभ होत आहे. या योजनांमध्ये विशेषतः मराठवाड्यासाठी कडधान्य विकास मिशन आणि नैसर्गिक शेती मिशन या योजनांना विशेष महत्त्व आहे. मराठवाडा कृषि विद्यापीठाने कडधान्य क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या बीडीएन -७११ आणि गोदावरी, बीडीएन -७१६ या वाणांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, पूर्वी विकसित केलेले बीडीएन - २ सारखे वाण आजही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत आणि विपुल उत्पादन देत आहेत. गोदावरी या वाणाने तर काही शेतकऱ्यांच्या शेतात प्रति एकरी १९ क्विंटलपर्यंत उत्पादन दिले आहे, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. तसेच विद्यापीठाने सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे राष्ट्रीय पातळीवर सुरू झालेल्या या योजनांमध्ये विद्यापीठाच्या संशोधनाचे योगदान अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे डॉ. अहिरे यांनी नमूद केले.

कार्यक्रमात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीस पूरक तंत्रज्ञान या विषयावर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे यांनी मार्गदर्शन केले. कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, जमिनीची मशागत आणि वाण निवडीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीतील अनुभवी प्रगतशील शेतकरी श्री. सोमेश्वर गिराम यांनी आपल्या सेंद्रिय शेतीतील अनुभवांची मांडणी करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी मानले

हा कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यापीठ आणि कृषि विभागाचे ६८ वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी तसेच परभणी जिल्ह्यातील २४२ शेतकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. एकूण ३१० जणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live streaming) भारत सरकारच्या  https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात आले. 





Thursday, October 9, 2025

वनामकृविच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रमांतर्गत शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद

 विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह २८ शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर


मराठवाड्यातील अनेक भागात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या पीकस्थितीत शेतकऱ्यांनी अवलंबावयाच्या व्यवस्थापन उपाययोजना तसेच येणाऱ्या रब्बी हंगामाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारामाझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आला. हा उपक्रम विद्यापीठाच्या वतीने दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमितपणे पार पडतो.

या उपक्रमात विद्यापीठातील १३ चमूमधील २८ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्रभेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळावे आयोजित करून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. जवळपास ५०० शेतकऱ्यांना पिकांच्या सद्य व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञांनी कीडनियंत्रण, सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांचे संरक्षण, मृदा आरोग्य संवर्धन, सुधारित वाणांचा वापर तसेच पीक उत्पादन वाढीसाठी लागवड तंत्रज्ञान या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

या उपक्रमांतर्गत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संचालक, विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांनी आर्वी (ता. परभणी) येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित आणि समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन मार्गदर्शन करत असल्याने शेतीत नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

शास्त्रज्ञांनी नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य उपाययोजना सुचवल्या. जमिनीचा पोत सुधारणा, सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकांच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. फळबाग आणि भाजीपाला पिकांसाठी तात्काळ निचरा व्यवस्थापन, रोगप्रतिबंधक फवारणी तसेच मृदसंवर्धनाच्या उपायांची माहिती दिली. कीड व रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही शेतकऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले.
रब्बी हंगामासाठी योग्य नियोजन, पीक निवड, आंतरपीक पद्धती, तसेच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आवश्यक उपाय यावर भर देण्यात आला. याशिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रियेचीही माहिती देण्यात आली.

या उपक्रमात परभणी येथील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, लातूर येथील कृषि महाविद्यालय, परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र (छत्रपती संभाजीनगर), नांदेड येथील केळी संशोधन केंद्र, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी) तसेच कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, खामगाव, बदनापूर, परभणी) आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. वीणा भालेराव, डॉ. मधुकर मोरे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. विजय भामरे, डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी, डॉ. शंकर पुरी, डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. एस. डी. सोमवंशी, डॉ. एस. आर. धांडगे, डॉ. दीप्ती पाटगावकर, डॉ. आशिष बागडे, डॉ. संजूला भवर, प्रा. किशोर जगताप, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, श्री. मधुकर मांडगे, सवाईसिंह निथरवाल, डॉ उषा सातपुते  श्री. एस. आर. रोडे आणि अभियंता कैलास जोंधळे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला व मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे शेतीतील संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविण्याचे कार्य अधिक गतीमान झाले असून, आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठीमाझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ हा उपक्रम एक प्रभावी दुवा ठरत आहे, असे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
















ज्ञान आणि कर्म यांचा संगम साधला, तरच आपण खऱ्या अर्थाने भारताचा सक्षम नागरिक ठरू — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वनामकृविच्या लातूर येथील कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ कार्यक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील कृषि महाविद्यालय आणि विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोपात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि यांनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ हे सदैव शेतकरी आणि विद्यार्थी यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे विद्यापीठ आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून, सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत आणि वारंवार होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी कृषि क्षेत्रातील विद्यार्थी तसेच सर्व समाजघटकांनी शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून, त्यांच्या समस्या समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थी जीवन ही आयुष्यातील घडणारी सर्वात महत्त्वाची पायरी आहे. या काळात जर कठोर परिश्रम, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक विचार यांचा अंगीकार केला, तर यश अटळ आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, फक्त वैयक्तिक प्रगतीकडे न पाहता सामाजिक बांधिलकी जपत, ग्रामीण व शेती समुदायाच्या उन्नतीसाठी कार्य करावे. माननीय कुलगुरूंनी हेही स्पष्ट केले की, नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना स्वावलंबी, कौशल्यसंपन्न आणि संशोधनाभिमुख बनविण्यासाठी मार्गदर्शक आहे. या संधींचा योग्य उपयोग करून विद्यार्थी केवळ करिअर घडवतील असे नाही, तर देशाला सक्षम, आत्मनिर्भर आणि प्रगत बनविण्यातही मोलाची भूमिका बजावतील. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत सांगितले की, ज्ञान आणि कर्म यांचा संगम साधला, तरच आपण खऱ्या अर्थाने भारताचा सक्षम नागरिक ठरू.

प्रमुख अतिथी डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासपद्धतीतील बदल समजून घेणे आवश्यक आहे. विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तीनही क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले असून, त्याच्या आधारे आयसीएआरच्या मूल्यांकनात विद्यापीठासअ’ दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधांचा योग्य वापर करून प्रात्यक्षिक ज्ञान वाढविण्याचे आणि बदलत्या हवामानामुळे कृषि क्षेत्रात उद्भवणाऱ्या नव्या समस्यांवर उपाय शोधून शेतकरीहित जोपासण्याचे आवाहन केले. तसेच रॅगिंगसारख्या अपप्रवृत्तींपासून दूर राहण्याचेही आवाहन केले.

प्रास्ताविकात कृषि महाविद्यालय, लातूरचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले की, महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. पालकांनी वेळोवेळी आपल्या मुलांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी महाविद्यालयाशी संपर्कात राहावे. व्याख्यानगृह, प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्यायामशाळा, खेळाची मैदाने, वसतिगृहे आणि संपूर्ण परिसरातील सौहार्दपूर्ण वातावरण जपण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, , असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमास श्रीमती जयश्री मिश्रा, डॉ. अच्युत भरोसे, डॉ. संतोष कांबळे, डॉ. मोहन धुप्पे, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. ज्योती देशमुख, डॉ. महेंद्र दुधारे, तसेच देशी गोवंशपालक शेतकरी श्री. बच्चेसाहेब देशमुख आणि सेंद्रीय शेतीचे अग्रणी श्री. शरद जरे उपस्थित होते. यावेळी नवप्रवेशित विद्यार्थी, पालक व शेतकऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या प्रसंगी कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना विद्यापीठनिर्मित ‘परभणी सुपरमोती’ या ज्वारीच्या बियाण्यांचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची महाराष्ट्र कृषि तंत्रज्ञ संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कुलगुरू व संचालक शिक्षण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाविद्यालय व एडीएम अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात वृक्षारोपण उपक्रम तसेच महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन नवीन प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पांचे प्रमुख डॉ. विजय भामरे आणि डॉ. ज्योती देशमुख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर दुपारच्या सत्रात महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख — शिक्षण, जिमखाना, परीक्षा व शिष्यवृत्ती, वसतिगृह, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण आणि समुपदेशन विभागयांनी विद्यार्थ्यांना संबंधित विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या कार्याची आणि उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

सूत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे आणि डॉ. रमेश ढवळे यांनी केले, तर आभार डॉ. अच्युत भरोसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषि महाविद्यालय आणि विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.