Thursday, March 27, 2025

वनामकृविद्वारा मानवत येथे ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधनाला चालना – जर्मन अधिकाऱ्यांची प्रकल्पाला भेट

बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणारे परिणाम संशोधनात अग्रस्थानी असणे आवश्यक माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, जर्मन एजन्सी जीआयझेड आणि सन सीड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील मानवत येथे ॲग्री-फोटोव्होल्टेईक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी २६ मार्च रोजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत जीआयझेड जर्मनीचे अधिकारी श्री. व्हॅलेंटीन कोषक, श्री. मेथ्यीएस रॅमथन, श्री. एड्रियन अर्नेस्ट आणि मिस फ्रेंनझिस्का यांनी भेट दिली. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांचीही उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यावेळी बोलताना अन्नधान्य, ऊर्जा, पाणी व बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणारे परिणाम यांसारख्या बाबी कृषी संशोधनात अग्रस्थानी असणे आवश्यक असल्याचे सांगितले.  

संशोधनाच्या प्रगतीबाबत जर्मन अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत कृषी व ऊर्जा क्षेत्राच्या विकासात ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत व्यक्त केले. याबरोबरच या प्रकल्पात संशोधन करणारे पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी हे भविष्यातील ॲग्रीपीव्ही क्षेत्रातील ब्रँड अँम्बेसेडर असतील, असे गौरवोद्गार जर्मन अधिकाऱ्यांनी काढून प्रकल्पातील सर्व शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांना प्रोत्साहन दिले.

भविष्यात या प्रकल्पातून होणारे संशोधन हे भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील योजनांसाठी उपयोगी ठरेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

या भेटीदरम्यान संशोधन प्रकल्पामार्फत केळी, तुर, जवस, हरभरा, घेवडा, साळ, झुकेनी, कांदा, कोबी, नेपियर आणि उन्हाळी मूग यांसारख्या विविध पिकांवर नव्याने प्रयोग करण्यात आले असल्याची माहिती प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गोदावरी पवार यांनी दिली. यावेळी प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. सुनिता पवार, डॉ. बी. एम. कलालबंडी, जीआयझेड दिल्लीचे इंजिनिअर अभिषेक शास्त्री तसेच विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.




Tuesday, March 25, 2025

कापूस संशोधन योजनेच्या कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन योजना, परभणी आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद - केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन: गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प' अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मंगळवारी, २५ मार्च रोजी कापूस संशोधन योजना, परभणी येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. तर विशेष अतिथी म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी उपस्थिती दर्शवली. व्यासपीठावर कापूस संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोक जाधव, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, गहू व मका योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. उमाटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिंगंबर पटाईत आणि प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कापूस, सोयाबीन व मका या पिकांच्या उत्पादन वाढीबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. गुलाबी बोंडअळीच्या प्रतिकारशक्ती व्यवस्थापनासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी सदैव सहकार्याची भूमिका बजावली असून 'शेतकरी देव भव:' हे ब्रीदवाक्य अधोरेखित करत कापसाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विद्यापीठ विशेष संशोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रगतशील शेतकरी श्री रत्नाकर ढगे यांचा २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनामध्ये बोलाविण्यात येवून त्यांचा सन्मान करण्यात आला, तो त्यांनी केलेल्या परिश्रमाची ही पावती आहे, त्यामुळे असे अनेक शेतकरी आपल्या मराठवाड्यातून निर्माण झाले पाहिजेत अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या 'नांदेड ४४' सारख्या कापूस वाणांच्या यशस्वी प्रयोगांची माहिती दिली. विद्यापीठाने आता सरळ वाणांमध्ये बीटी तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे नवीन वाण तीन वर्षांपर्यंत पुनर्लागवड करण्यायोग्य असून शेतकऱ्यांचा बियाण्यावरील खर्चही कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कापसाच्या उत्पादनात झालेल्या वाढीच्या अनुभव मांडले. मागील वर्षी काही शेतकऱ्यांनी १५ क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतले असून, सर्व शेतकऱ्यांनी या पुढील हंगामात अधिकाधिक उत्पादनाचा निर्धार करावा, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान पाच गावांतील प्रत्येकी १२ अशा एकूण ६० शेतकऱ्यांना विविध निविष्ठांचे वाटप करण्यात आले. यासोबतच कृषी विद्यापीठाच्या 'कृषी दैनंदिनी २०२५' चेदेखील वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी डॉ. अशोक जाधव यांनी केले. डॉ. डी. डी. पटाईत यांनी कपाशीवरील कीड व्यवस्थापन, डॉ. पी. बी. जाधव यांनी घनपद्धतीने कापूस लागवड, तर डॉ. पी. एस. नेहरकर यांनी कीटकनाशकांच्या संतुलित वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्री. रत्नाकर ढगे यांनी राष्ट्रपती भवनातील त्यांच्या सत्काराचा अनुभव सांगत गटशेतीविषयी माहिती दिली. श्री. पंडित थोरात यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना मिळालेल्या वाढीव उत्पन्नाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिंगंबर पटाईत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत जाधव यांनी केले. कापूस संशोधन योजना, परभणी येथील कृषी सहाय्यक व संशोधन सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. परभणी आणि पाथरी तालुक्यातील खानापूर, आर्वी, टाकळगव्हाण, लोणी आणि बाभळगाव येथून ८० हून अधिक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.














Monday, March 24, 2025

वनामकृविच्या बदनापूर कृषि महाविद्यालयात सौरऊर्जा व कृषि प्रकल्पांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या बदनापूर येथील कृषि महाविद्यालयात विविध विकासकामांचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २४ मार्च रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून नवीन प्रकल्पांच्या कार्यक्षम वापराबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये कृषि महाविद्यालय व वस्तीगृह इमारतींवरील सौरऊर्जा प्रकल्पांचा समावेश होता. कृषि महाविद्यालयाच्या इमारतीवरील ३० किलोवॅट क्षमतेच्या तसेच मुलांच्या वस्तीगृहावर ३० किलोवॅट आणि मुलींच्या वस्तीगृहावर २५ किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते पार पडले. यावेळी कुलगुरूंनी शून्य उत्सर्जन संकल्पनेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. त्यांनी या सौरऊर्जा प्रकल्पांच्या कार्यक्षम वापरावर भर देत, शेतातील विहिरी व कूपनलिका वरील मोटारींच्या विजेची गरज सौरऊर्जेद्वारे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही सुचविले.

या सौरऊर्जा प्रकल्पांमुळे कृषि महाविद्यालयाच्या वीज बिलात मोठ्या प्रमाणात बचत होणार असून, नव्या पिढीसमोर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा आदर्श निर्माण केला जात आहे.

कार्यक्रमात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुरू केलेल्या रेशीम शेती व कुक्कुटपालन प्रकल्पांचेही उद्घाटन करण्यात आले. रेशीम शेती प्रकल्पाचे प्रभारी सहायक प्राध्यापक डॉ. अस्मिता सुरडकर व कुक्कुटपालन प्रकल्प प्रभारी सहायक प्राध्यापक डॉ. महेश तनपुरे यांनी आपल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. मान्यवरांनी या उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी अशा लघु प्रकल्पांद्वारे आपले कौशल्य वृद्धिंगत करून भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला तयार करावे, असा संदेश दिला.

कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. दीपक पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत करून विविध प्रकल्पांची माहिती दिली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य उपक्रमांमुळे महाविद्यालयाचा विकास अधिक गतिमान होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.














वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आणि कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट

 "वर्ड चा उत्तम वापर करत वर्ल्ड कवेत घ्या" असा मंत्र माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिला


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २४ मार्च रोजी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प आणि कृषि महाविद्यालय (लिहाखेडी) येथे भेट दिली. या प्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे त्यांच्यासमवेत होते.

विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन सत्रात माननीय कुलगुरूंनी कृषि शिक्षण घेत असलेल्या दुसऱ्या सत्राच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकासावर भर देण्याचा सल्ला दिला. चार वर्षांची पदवी शिक्षणाची कालावधी ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची संधी असते. त्यामुळे कृषि शिक्षणासोबत इतर क्षेत्रातील वाचन देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, मोकळ्या वेळेत गट तयार करून कृषि ज्ञानाची चर्चा करा, संवाद कौशल्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राची सखोल माहिती ठेवा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषेकडे विशेष लक्ष द्यावे, कारण स्मार्ट आणि व्यवस्थित राहणाऱ्या व्यक्तींना समाज सहज स्वीकारतो, असे सांगत त्यांनी आरोग्याची काळजी घेण्याचीही सूचना दिली. मराठीबरोबरच इंग्रजीतही प्रभुत्व मिळविण्यासाठी प्रयत्न करा, कारण उत्तम संवाद कौशल्य हे यशाची गुरुकिल्ली आहे. योग्य शब्दांची निवड करणाऱ्या लोकांनी जग जिंकले आहे, असे सांगून "वर्ड चा उत्तम वापर करत वर्ल्ड कवेत घ्या" असा मंत्रही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या प्रसंगी सहयोगी संचालक संशोधन तथा प्राचार्य डॉ. सूर्यकांत पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. माननीय कुलगुरूंच्या या भेटीमुळे संपूर्ण महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मोठी चालना मिळेल, असा विश्वास प्राचार्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास फळ संशोधन केंद्र हिमायत बागचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित मुंडे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. नितीन पतंगे, डॉ. आशिष बागडे, श्री. संतोष ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेखा कदम यांनी केले.






वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयातील २१ विद्यार्थ्यांची कृषि सल्लागार पदासाठी निवड!

 माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात पुणे येथील तेज अ‍ॅग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीच्या वतीने परिसर मुलाखतीचे आयोजन दिनांक २१ मार्च रोजी  करण्यात आले होते. या कंपनीत मुलाखतीद्वारे कृषि सल्लागार (Agri Advisor) पदासाठी २१ विद्यार्थ्यांची निवड झाली. या भरती प्रक्रियेने नवीन सत्राची दमदार सुरुवात झाली असून, ही यशस्वी निवड प्रक्रिया माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या परिसर मुलाखतीमध्ये ३८  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २१ विद्यार्थी अंतिम निवडीसाठी पात्र ठरले असून, आणखी ४ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच त्यांचे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, संशोधन संचालक डॉ.खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री, प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

या यशामागे संपूर्ण कृषि महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या टीमने घेतलेली परिश्रमपूर्ण मेहनत असून, विशेषतः मुलाखतीच्या दिवशी अथक परिश्रम करणाऱ्या सदस्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले,  तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ही सुवर्णसंधी मिळवली, असे महाविद्यालयाच्या प्लेसमेंटचे अध्यक्ष डॉ रणजित चव्हाण यांनी सांगितले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शितल चिंचाने, पूर्वा शिंदे, निकिता कचावे, प्रणिता बेलखेडे, प्रिती नाईक, मनीषा मकमाले, पायल पाटणकर, अक्षदा केंद्रे, कल्पना दोके, प्रज्ञा घोडके, पूजा पिठले, सुहर्षा वसमतकर, अंबिका मुखारे, रुतुजा नकाते, स्नेहल शिराळे, साक्षी नाईकवडे, आनंद मुंधे, नवल कोंडे,  प्रेम कांबळे, हृषिकेश काळे, प्रथमेश दुबे यांचा सामावेश असून प्रतीक्षा यादीमध्ये जयश्री शिंगणे, कांचन बिरादार, आरती सूर्यवंशी आणि प्रथमेश बुचाले हे विद्यार्थी आहेत.

तेज ग्रुपच्या वतीने निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख,  प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थाद्वारे करण्यात आले.


 



महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक उन्नती आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि

 परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे दिनांक २४ मार्च रोजी आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे हे होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात मा. डॉ. इन्द्र मणि यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत सांगितले की, महिलांचा आर्थिक विकास हा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे महिलांनी अशा प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी करावा. सातत्याने प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच महिलांनी आपल्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रीयेचा सक्रिय भाग होण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी सहयोगी संशोधन संचालक डॉ. सूर्यकांत पवार, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित मुंडे, , कार्यक्रम समन्वयक डॉ. दिप्ती पाटगावकर, प्रशिक्षण समन्वयक व विषय विशेषज्ञ अनिता जिंतूरकर, विषय विशेषज्ञ डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. संजुला भावर, श्री. अशोक निर्वळ आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. दिप्ती पाटगावकर यांनी या प्रकल्पाची आणि आगामी विस्तार कार्यक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमाला अनेक महिलांनी तसेच लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.




Sunday, March 23, 2025

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचा उत्साहपूर्ण प्रारंभ!

 कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचेडॉ. राजेश कदम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष शिबिर २०२४ -२५ चे उद्घाटन मौजे टाकळगव्हाण, ता. जि. परभणी येथे दि. २१ मार्च  रोजी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि प्राचार्य डॉ. राहुल रामटेके होते. यावेळी बोलताना डॉ. राहुल रामटेके यांनी शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा, ठिबक सिंचन आणि संरक्षित शेती यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या तांत्रिक बाबींचे महत्त्व स्पष्ट केले.

या प्रसंगी डॉ. राजेश कदम यांनी कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची अडचण समजून घेऊन, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विवेकानंद भोसले, सरपंच श्री. मंचकराव वाघ, चेअरमन श्री. श्रीरंग वाघ आणि जिल्हा परिषद शाळा टाकळगव्हाणच्या मुख्याध्यापिका सौ. उषा उमरीकर यांची उपस्थिती होती. ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले. त्यांनी शिबिरात होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी शिरसागर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. दर्शन जाधव यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. राजाभाऊ वाघ, सौ. सुधा सालगुडे, विद्यार्थी पथक प्रमुख श्री. अभय देशमुख, समर्थ असुटकर, गणेश वळमपळे, श्री. आयुष उइके, कु. गंगा मठपती, कु. गायत्री पवार, श्री. वैभव वाघ, श्री. वरद बिनोरकर आणि इतर २०२२ बॅचच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.