Wednesday, October 16, 2024

देशाच्‍या राजपत्रात वनामकृविच्‍या पाच पिक वाणांचा समावेश

वाणांचा प्रचार  प्रसार होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईलकुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

केंद्रीय बियाणे अधिनियम१९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिकांच्‍या वाणाचा समावेश भारताच्‍या राजपत्रात करण्‍यात आला. याबाबत दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाने अधिसुचना प्रसिध्‍द केली असुन राजपत्राचा नोंदणीकृत क्रमांक एसओ ४३८८ (हा आहे. सदर पाच वाणात विद्यापीठ विकसित हरभऱ्याचा परभणी चना – १६ (बीडीएनजी २०१८-१६), सोयाबीनचा एमएयुएस-७३१, देशी कपासीचा पीए ८३३, अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ आणि तीळाचा टीएलटी-१० या वाणांचा समावेश आहे. देशाच्‍या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या पाच पिक वाणांचा समावेश केल्‍यामुळे या वाणांचा प्रचार  प्रसार मोठया प्रमाणावर होण्‍यास मदत होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नत्ती साधता येईल असे विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले, त्‍यांनी हे वाण विकसित करण्‍यास योगदान देणारे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ खिजर बेग, डॉ. व्ही. एन. चिंचाने, डॉ डि. के. पाटीलडॉ एस. पी. मेहत्रे, डॉ.व्ही. के. गीते, डॉ.मोहन धुप्पे आदीसह सर्व संबंधित शास्‍त्रज्ञांचे अभिनंदन केले.  

या वाणातील हरभरा, अमेरिकन कापूस आणि तीळाच्या वाणास महाराष्‍ट्र राज्‍याकरिता लागवडीकरिता प्रसारण करण्‍याची मान्‍यता देण्‍यात आली आहे, तर सोयाबीनच्या वाणास महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्रासाठी लागवडीकरिता मान्‍यता मिळाली आणि देशी कपासीचा वाणास दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, आणि तामिळनाडू  या  राज्‍याकरिता लागवडीस मान्‍यता प्राप्‍त झाली. देशाच्‍या राजपत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या पाच पिक वाणांचा समावेशामुळे सदरील वाणांचे  बीजोत्पादन हे मुख्‍य बीजोत्पादन साखळीमध्ये घेता येणार असल्‍याची माहिती संशोधन संचालक तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ खिजर बेग यांनी दिली. 

पाच वाणाची थोडक्‍यात माहिती

हरभऱ्याचा परभणी चना – १६ (बीडीएनजी २०१८-१६) वाण :  हा वाण विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्राने विकसित केलेला असुन हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाणापासून सरासरी पेक्षा अधिक उत्पादन देणारा वाण असून ११० ते ११५ दिवसात परिपक्व होतो. मर रोगास प्रतिबंधक असून दाणे टपोरे आहेत. १००  दाण्याचे वजन २९  ग्रॅम भरते या वाणावर किडींचा प्रादुर्भाव तुल्यबळ वाणापेक्षा कमी होतो

सोयाबीनचा एमएयुएस-७३१ वाण: सोयाबीनचा हा वाण लवकर येणारा असून परिपक्वतेसाठी ९४ ते ९८ दिवस लागतात. या वाणाची पाने निमपसरी, गोलाकार व मोठी असतात, शेंगाचे प्रमाण अधिक व गुछ्या मध्ये शेंगा लागतात. तीन दाण्याच्या शेंगाचे अधिक प्रमाण. शेंगा फुटण्यास साठी पंधरा दिवस सहनशीलता आहे. कोरडवाहूसाठी अधिक उत्पादन देणारा, कीड व रोगास प्रतिकरक. १०० ग्राम दाण्याचे वजन १३ ते १५  ग्राम भरते. उत्पादकता २८ ते ३२ क्विंटल प्रती  हेक्टरी एवढी आहे. तेलाचे प्रमाण २०.५ टक्के  तर प्रथिनांचे प्रमाण ४०.५ टक्के आहे.

देशी कपासीचा पीए ८३३ वाण : हा वाण विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पामार्फत विकसित करण्यात आला. या वाणाची उत्पादकता १५ ते १६ क्विंटल प्रति हेक्टर असून रुईचा उतारा ३५ ते ३६  टक्के आहे. धाग्याची लांबी २८ ते २९  मिलिमीटर आहे. १५० ते १६० दिवस कालावधी लागत असून या वाणाची विशेष गुणधर्म म्हणजे सरळ धाग्याची लांबी व मजबुती, रस शोषक किडी, कडा करपा व दहिया रोगास सहनशील तसेच पाण्याच्या ताणास देखील सहनशील आहे.

अमेरिकन कपासीचा एनएच ६७७ वाण: हा अमेरिकन कापसाचा वाण असून या वाणाची उत्पादकता १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टर असून रुईचा उतार ३७ ते ३८ टक्के आहे. धाग्याची लांबी २५ ते २६ मिलिमीटर असून वाणाचा कालावधी १५५ ते १६० दिवसाचा आहे. पाण्याच्या तानास व रस शोषक किडीस सहनशील असून सधन पद्धतीने लागवडीस योग्य आहे.

तीळाचा टीएलटी-१० वाण : तिळाचा टीएलटी १० हा वाण विद्यापीठाच्या लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आला. या वाणामध्ये तेलाचे उत्पादन सरस असून खरीप, रबी व उन्हाळी हंगामामध्ये लागवडीस योग्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागवडीकरिता शिफारस करण्यात आलेली आहे. कालावधी ९० ते ९५ दिवसाची आहे. उत्पादन हेक्टरी ६ ते ७ क्विंटल येते. १००० बियाचे वजन ३.५ ते ४.० ग्राम भरते, तेलाचे प्रमाण ४५ ते ४७  टक्के आहे.  सर्कोस्पोरा पानावरील ठिपके, अल्टरनेरिया व भुरी रोगास प्रतिबंधक याबरोबरच तुडतुडे, पाने गुंडाळणारी व बोंडे पोखरणारी आळी या किडीस सहनशील आहे.

हरभरा वाण -  परभणी चना - १६ (बीडीएनजी २०१८-१६) 

सोयाबीन वाण - एमएयुएस-७३१


देशी कापूस वाण - पीए ८३३ 


अमेरिकन कापूस वाण - एनएच ६७७


तीळ वाण - टीएलटी-१० 


शेतकरी व शेतकरी कुटुंबाचा समग्र विकास हेच विद्यापीठाचे उद्दिष्ट... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रीय नैसर्गिक शेती प्रशिक्षण संवाद मालिकेचा १५ वा भाग करडई जवस लागवडीची पंचसुत्री या विषयावर दिनांक १५ ऑक्टोबर रोजी कुलगुरू मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख आयोजक संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, तांत्रिक मार्गदर्शक डॉ. वसंत सुर्यवंशी, सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे आदीची उपस्थिती होती.

या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकरी बंधु-भगिनी यांना केवळ शेतीचे तंत्रज्ञान नव्हे तर त्यांच्या मुलांना शिक्षण शिक्षणाच्या संधी तसेच शिक्षणानंतरच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यावरही मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यादृष्टीने शेती, शेतीपुरक व्यवसाय अशा विषयातील ज्ञान तंत्रज्ञान उपलब्ध करून देवून शेतकरी शेतकरी कुटुंबाचा समग्र विकास साधने हेच विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. रबी पिकांची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन कार्यक्षम पाणी व्यवस्थापन यावर भर द्यावा याबाबतचे तंत्रज्ञान शेतक­यांना उपलबध करून देण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

तांत्रिक मार्गदर्शक डॉ. वसंत सुर्यवंशी यांनी करडई जवस लागवडीची पंचसुत्री यावर माहिती देताना करडई जवस पिकांमध्ये बीजप्रक्रीया, वेळेवर पेरणी, संतुलीत अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन बाजारपेठ व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. तसेच ते म्हणाले की, करडई पिकात पेरणीस उशीर झाल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो यामुळे वेळेवर पेरणी करणे आवश्यक आहे. करडई मध्ये परभणी- १२, पीबिएनएस- १५४, पीबिएनएस- ८६, पीबिएनएस- ४० तर जवस पिकाचे एलएसएल-९३, एलएन- १४२ हे वाण लागवडीसाठी वापरावेत.

शेतकरी बंधु-भगिणी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. आनंद गोरे, डॉ. पपीता गौरखेडे यांनी सविस्तर माहिती देऊन त्यांचे समाधान केले. प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचालन आभार श्रीमती आम्रपाली गुंजकर यांनी केले. तसेच या कार्यक्रमास विद्यापीठातील प्राचार्य, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि विशेष म्हणजे शेतकरी बंधु-भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण झूम मिटींग, युट्यूब चॅनल, फेसबुक या सामाजिक माध्यामाद्वारे करण्यात आले.