भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या योगदानाला राष्ट्रीय सन्मान मिळत असल्याचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आनंद व्यक्त केला
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, कृषि
विभाग, आत्मा, परभणी व कृषि विज्ञान
केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत शेती दिन’
कार्यक्रमाचे दिनांक ७ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम हरित क्रांतीचे
जनक, भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या
जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आला असून, शाश्वत शेतीचा
प्रचार व प्रसार करण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
भूषविले. कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके,
डॉ. प्रविण वैद्य, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख,
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.
प्रशांत भोसले, उप प्रकल्प संचालक, आत्मा श्री अभिजित घोडके,
उपविभागीय कृषि अधिकारी प्रिया नवने, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे
आदींची उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, ते नवी दिल्ली
येथील राष्ट्रीय कृषि शास्त्र केंद्रात, माननीय पंतप्रधान
श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित शाश्वत शेती दिनाच्या
राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमातून त्यांनी वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित शाश्वत शेती दिनात ऑनलाईन सहभाग नोंदवला.
यावेळी बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, माननीय
पंतप्रधानांच्या भाषणात भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ‘युगपुरुष’ म्हणून
गौरवण्यात आले. तसेच, "शोधापासून वितरणापर्यंत आणि
प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत" (discovery to delivery... lab to land) या संकल्पनेचा अवलंब करून गुजरातमध्ये शेती विकास साधल्याचेही त्यांनी
नमूद केले. तसेच माननीय कुलगुरूंनी अधोरेखित केले की, महाराष्ट्र
हे राज्य शेतीसह सर्व आघाड्यांवर अग्रेसर आहे, आणि आजच्या
राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री, माननीय
नामदार श्री. दत्तात्रय भरणे यांचा विशेष सहभाग आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून
भारतरत्न डॉ. एम. एस.स्वामीनाथन यांनी शेतकरी व कृषि क्षेत्रासाठी दिलेल्या
योगदानाला मान्यता आणि सन्मान दिला जात असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या
कल्याणासाठी राष्ट्रीय स्तरावर विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत,
असेही त्यांनी नमूद केले. या निमित्ताने विद्यापीठांमार्फत शेतकऱ्यांचा
सन्मान करण्यात आला असून, सन्मानित सर्व शेतकऱ्यांचे त्यांनी
अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी
शाश्वत शेती दिन साजरा करण्यामागील पार्श्वभूमी सांगितली. हा कार्यक्रम हरित
क्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या हरित क्रांतीतील
योगदानाच्या सन्मानार्थ साजरा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी
त्यांनी भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कार्याची माहिती मांडली.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन
यावर मार्गदर्शन करताना शाश्वत शेतीसाठी नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करावा, जमिनीतील कार्बनचे
प्रमाण वाढवावे, जैवविविधता जपावी तसेच जैविक खतांचा वापर करून
शेती पुढील पिढ्यांसाठी शाश्वत ठेवावी, असे आवाहन केले.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण यांनी शाश्वत शेती दिन
साजरा करताना सांगितले की, हरित क्रांती घडवण्यासाठी शेतकऱ्यांचे कष्ट मोलाचे आहेत. यावेळी त्यांनी
शेतकरी कल्याणासाठी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची
माहिती दिली. शेतीमध्ये शाश्वतता निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीस
प्राधान्य द्यावे, विशेषतः आंबा, संत्रा,
मोसंबी, हळद आणि अद्रक या पिकांवर भर द्यावा,
तसेच प्रक्रिया उद्योगात सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाशी संपर्क
ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. जमिनीच्या आरोग्यावर
होणाऱ्या परिणामांची दखल घेऊन सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे
आवाहन त्यांनी शेवटी केले.
यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रविण वैद्य यांनी मृद संवर्धनातून शाश्वत
शेती, प्रभारी अधिकारी डॉ.आनंद गोरे नैसर्गिक शाश्वत शेतीचा मार्ग, हवामान शास्त्रज्ञ डॉ.कैलास डाखोरे यांनी बदलत्या हवामानाविषयी मार्गदर्शन
केले. तर शाश्वत शेतीबाबत श्री. नरेंद्र शिंदे (सनपुरी ), श्री.
मधुकर घुगे (केहाळ) श्री. बालासाहेब रणेर (बाभळगाव) या शेतकऱ्यांनी आपले अनुभव
मांडले
कार्यक्रमात शाश्वत शेतीतील विशेष योगदानाबद्दल शेतक-याचा सन्मानपत्र देवून
गौरव करण्यात आला. यामध्ये श्री. नरेंद्र शिंदे, श्री. मधुकर घुगे, श्री. बालासाहेब रणेर, श्री. दिलीप अंभोरे, श्री. सोमेश्वर गिराम, श्री. जर्नाधन आवरगंड,
श्री. प्रताप काळे, श्री. पशुपतीनाथ शेवटे,
श्री. भगवान कुगे, श्री. नंदकुमार जोगदंड,
श्री. ज्ञानेश्वर देशमाने, श्रीमती छाया भास्करराव
कदम, श्रीमती अर्चना पंडितराव थोरात, श्रीमती
प्रिती श्रीधर डोंबे, सुप्रिया शाहाजी घुले आदी शेतकऱ्यांचा
समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील शास्त्रज्ञांसह २०० हून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
