Monday, October 14, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ

 विद्यापीठाच्या वीज देयकांत सुमारे ५० ते ६० टक्के बचत होईल.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परिसरात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीचा शुभारंभ कुलगुरू मा. डॉ. इंद्र मणि यांच्या हस्ते १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत तसेच इतर महाविद्यालयाच्या इमारतींच्या छतावर ५०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे.

या प्रसंगी बोलताना कुलगुरू मा. डॉ. इंद्र मणि यांनी सांगितले की, हा प्रकल्प विद्यापीठासाठी पथदर्शी ठरणार असून, सौर उर्जेचे महत्त्व अधोरेखित करेल. या प्रकल्पामुळे विद्यापीठाच्या वीज खर्चात ५० ते ६० टक्के बचत होणार असून, त्यामुळे विद्यापीठाची आर्थिक बचत होईल, असे ते म्हणाले.

सोलर प्रकल्पासाठी ठाणे येथील मे. इऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ही कंपनी राजस्थान सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंट्स लि. च्या माध्यमातून काम करते. सुरुवातीला ५०० किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार असला, तरी भविष्यात ६४० किलोवॅट पर्यंत सौर ऊर्जा क्षमता वाढविण्याचे प्रस्तावित आहे. विद्यापीठ आणि कंपनी यांच्यात पुढील पंचवीस वर्षांसाठी दर युनिट रु. ४.९९ प्रमाणे वीज खरेदी करार करण्यात आला आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची असेल. याशिवाय, कंपनी विद्यापीठाला कार्बन क्रेडिट मिळवून देण्यासाठीही मदत करणार आहे.

शुभारंभ प्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, अपारंपारिक ऊर्जा विभाग प्रमुख डॉ. राहूल रामटेके, उप अभियंता दयानंद टेकाळे, कनिष्ठ विद्युत अभियंता अनिल जोधळे, इऊर्जा कंपनीचे प्रतिनिधी एस.एन. पांडे आणि संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Sunday, October 13, 2024

मुख्यमंत्री माननीय ना. श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते वनामकृविच्या नांदेड येथील शासकीय कृषि महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या नांदेड येथील शासकीय कृषि  महाविद्यालयाचा इमारतीचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते दिनांक १३ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले. यावेळी  खासदार माननीय श्री अशोक चव्हाण, माननीय श्री हेमंत पाटील, माननीय आमदार श्री बालाजी कल्याणकर यांची सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि नोडल अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठा अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ पासून नव्यानेच सुरू झालेले हे शासकीय कृषि महाविद्यालय आहे. यामध्ये ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून या वर्षापासून पूर्ण जागेवरती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन महाविद्यालय सुरू झालेले आहे.

या महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कौशल्यवृद्धी करून रोजगाराभिमुख आणि दर्जेदार शिक्षण द्यावे. याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांना महाविद्यालयाद्वारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच महाविद्यालयाची नवीन वास्तू कृषी तंत्रज्ञान माहितीचे माहेर घर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी मान्यवरांचे स्वागत करून भूमिपूजन समारंभास आल्याबद्दल आभार मानले तसेच महाविद्यालय विदयार्थी आणि शेतकरी केंद्रित कार्यावर भर देत असल्याचे नमूद केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉक्टर राजेश कदम यांनी महाविद्यालयाच्या कार्याची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ गजेंद्र लोंढे, उपविद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार उपविद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, शाखा अभियंता इजि ढगे, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. सुजाता धूतराज, डॉ. विजय चिंचाने, डॉ. पवन ढोके, डॉ. संजय देवकुळे, उज्वला सुरेवाड, प्रकाश सिंगरवाड, संतोष राठोड, जी पी इढोले, वर्षा ताटेकुंडलवार, शाखा लेखाधिकारी श्री खरतडे आदीसह नवीन प्रवेशित सर्व विद्यार्थी, अधिकारी आणि परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.









Saturday, October 12, 2024

वनामकृवित “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” अंतर्गत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन

 प्रशिक्षणातून उमेदवारांच्या कार्यकुशलतेत वाढ होईल... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील युवकांसाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर विविध कार्यक्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगारक्षमता (Employability) वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमांतर्गत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुख्यालयात रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे. यानिमित्त दिनांक ११ ऑक्टोबर रोजी, विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी आपल्या दालनात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. 

यावेळी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, यशस्वी होण्यासाठी सातत्य, कर्तव्यनिष्ठा आणि मेहनत महत्त्वाची आहे. त्यांनी उमेदवारांना शिस्त आणि वेळेचे महत्त्व अधोरेखित करून कार्यक्षेत्रात नाविन्याचा अंगीकार करण्याचे तसेच नीती, मूल्ये आणि चारित्र्य जोपासण्याचे आवाहन केले. या प्रशिक्षणातून उमेदवारांच्या कार्यकुशलतेत वाढ होईल आणि भविष्यात रोजगाराच्या संधींमध्ये लाभ होईल. विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष कार्याचा अनुभव मिळणार असून, त्यांची रोजगार क्षमता वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा माननीय कुलगुरूंनी व्यक्त केली.

या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, यांनी प्रशिक्षणार्थींना काळजीपूर्वक प्रशिक्षण घेण्याचे  आवाहन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी  शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, उपविद्यापीठ अभियंता डॉ. डी. डी. टेकाळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात योजनेचे नोडल अधिकारी तथा सहाय्यक कुलसचिव श्री. पी. एम. पाटील यांनी "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने मुख्यालयासाठी एकूण ४६ पदे अधिसूचित केली होती. या पदांमध्ये कृषी सहाय्यक, वीजतंत्री आणि कनिष्ठ लिपिक या पदांचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या ३६ उमेदवारांना विद्यापीठाने प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. योजनेच्या माध्यमातून उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रुपये ६०००, ८००० आणि १०००० विद्यावेतन सहा महिन्यांच्या कालावधीत शासनाकडून दिले जाणार आहे. तसेच ही योजना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील इतर कार्यालात कार्यान्वयित असल्याचे त्यांनी नमूद केले. 




रेशीम व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापनावरील ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद

 शेती व्यवसायामध्ये उत्पन्नाचे पर्याय आवश्यक ….कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


हवामान बदलाच्या काळात शेती व्यवसायात पर्यायी उत्पन्नाचे स्रोत आवश्यक आहेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आयोजित ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाच्या पंधराव्या भागात बोलत होते. या भागाचा विषय "रेशीम व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन" हा होता.

माननीय कुलगुरूंनी आपल्या मार्गदर्शनात असे स्पष्ट केले की रेशीम व दुग्ध व्यवसाय (सिल्क आणि मिल्क) हे शेतीसाठी पर्यायी उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. त्यांनी सांगितले की, शेती व्यवसाय उभारण्यासाठी जमीन, बियाणे, खते, पाणी, यांत्रिकीकरण, ज्ञान आणि पैसा या सात बाबी महत्त्वाच्या आहेत. शेती व्यवसायास उभारण्यासाठी शासन विविध प्रकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असून, सिल्क आणि मिल्क प्रकल्प त्याचाच एक भाग आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीततेसाठी ग्रामपातळीवर रेशीम उद्योग स्थापन करून दुग्ध व्यवसायस चालना देण्यासाठी विद्यापीठ ज्ञानदानासह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने कार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यानुभवातून हा कार्यक्रम राबवण्यासाठीही कार्य करण्यात येईल तसेच रेशीम व दुग्ध व्यवसाय या संयुक्त उद्योगास प्रात्यक्षिकाद्वारे सिद्ध करण्यात येईल. याद्वारे विद्यापीठाचे नवीनतम विस्तार कार्य साधण्यात येईल. शेतकरी देवो भवो या भूमिकेतून विद्यापीठाद्वारे दर मंगवारी आणि शुक्रवारी ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामधील लोकांचा उत्साही सहभागच या कार्यक्रमाचे महत्त्व विशद करतो.या कार्यक्रमाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेती व्यवसायात शाश्वतता निर्माण करण्यासाठी सिल्क आणि मिल्क प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगासह पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय उभारावा. याबरोबरच शेती व्यवसायात खर्च कमी करून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी विविध उपाययोजना सुचवून त्यास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी असे नमूद केले.

सुरुवातीस हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा अंदाज सांगितला. तदनंतर सिल्क आणि मिल्क या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना किफायतशीर जोडधंदा उभारता येईल असे नमूद करून रेशीम उभारणीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाबद्दल मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेले विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी यावेळी पशुधनासाठी प्रति पाणी एक उत्तम पर्यायी गोष्टी खाद्य असल्याचे स्पष्ट केले.  तर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी दुग्ध व्यवसाय उभारणीसाठी करावयाच्या उपायोजना सुचविल्या तसेच सिल्क आणि मिल्क प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योगास जोड म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचे आवाहन केले.

यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्री सुनील हटेकर यांनी सिल्क आणि मिल्क प्रकल्पांतर्गत बँकेद्वारे अर्थसहाय्य केले जाते असे नमूद करून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी विशद केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले. कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील रेशीम रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री सदाशिव गीते यांनी रेशीम उद्योगाबाबत त्यांची यशोगाथाही सांगितली. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठातील शास्त्रज्ञानी समाधानकारक उत्तरे दिली. सूत्रसंचालन आणि आभार कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी केले.



वनामकृवितील करडई संशोधन प्रकल्पाद्वारे कृषी निविष्ठांचे वाटप

 आहारात व आरोग्यास करडईचे तेल महत्वाचे.... कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या करडई पिकाच्या आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमा अंतर्गत कृषी निविष्ठा वाटप कार्यक्रम कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे पार पडला.

या कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील जांब, मानोली आणि सोन्ना येथील शेतकऱ्यांना करडई पिकाच्या उत्पादकतेसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना या निविष्ठांचे वाटप मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. एच. व्ही. काळपांडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी करडई या महत्त्वाच्या तेलबीया पिकाचे आहारातील व आरोग्यास असणारे फायदे तसेच यातील मूल्यवर्धनाच्या संधींविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. करडई पिकामध्ये संशोधनाद्वारे अधिक उत्पादनक्षम तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करडई संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. आर. आर. धुतमल यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष शिंदे यांनी केले. या प्रसंगी मानोली, जांब आणि सोन्ना येथील शेतकरी बांधव तसेच संशोधन केंद्राचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, October 11, 2024

ज्वार संशोधन केंद्राद्वारे आद्यरेषीय पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमात ज्वारीच्या सुधारित बियाण्यांचे वाटप

 ज्वारीपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करून उद्योजकता अंगीकारावी.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि  


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील अखिल भारतीय समन्वयित ज्वार संशोधन केंद्र, येथे आद्यरेषीय पिक प्रात्यक्षिक योजनेंतर्गत ज्वारीच्या सुधारित वाणांचे बियाणे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि  यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते.

या कार्यक्रमात डिग्रस जहागीर, गव्हाणे पिंपरी (ता. सेलू, जि. परभणी) येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि  यांनी ज्वारीचे पारंपारिक महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे विशद केले. त्यांनी शेतकऱ्यांना ज्वारीपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करून उद्योजकतेचा अंगीकार करण्याचे यावेळी आवाहन केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी आपल्या मार्गदर्शनात ज्वारीच्या बिजोत्पादनाच्या महत्त्वावर आणि ज्वारीचे क्षेत्र विस्तारावर भर देण्याची आवश्यकता स्पष्ट केली. शेतकरी प्रतिनिधी म्हणून श्री. सुनील पौळ (एफपीओ अध्यक्ष) यांनी ज्वारीचे मूल्यवर्धन करण्याची ग्वाही दिली आणि विद्यापीठाने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना ज्वारीचे सुधारित बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना ज्वार लागवडीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती प्रितम भुतडा यांनी माहिती दिली, तर कीड व्यवस्थापनावर डॉ. मिलिंद सोनकांबळे, रोग व्यवस्थापनावर डॉ. के. डी. नवगीरे, आणि आद्यरेषीय पिक योजना विषयी डॉ. जी. एम. कोटे यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्वार संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एल. एन. जावळे यांनी केले, सूत्रसंचालन श्रीमती प्रितम भुतडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जी. एम. कोटे यांनी मानले.


Thursday, October 10, 2024

माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत या उपक्रमांतर्गत २८ शास्त्रज्ञांचे विविध ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे ...कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या निर्देशानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यलयाद्वारे माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत हा अभिनव उपक्रम दिनांक ९ ऑक्टोबर रोजी संपूर्ण मराठवाड्यात राबविण्यात आला. यामध्ये प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांच्या एकूण ११ चमूमधिल २८ शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास ६०० शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण केले.  

विस्तार शिक्षण संचालनालयातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र व महिला विकास महामंडळ यांच्यातर्फे गंगाखेड येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना माननीय कुलगुरू म्हणाले की, महिलांचा शेतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षाही अधिकच वाटा आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. जर त्या स्वतः स्वस्थ राहिल्या तर त्यांचे घर स्वस्थ राहील, त्यांचे गाव स्वस्थ राहील, त्यांचे राज्य स्वस्थ राहील आणि पर्यायाने आपला देश स्वस्थ राहील त्यामुळे महिलांनी स्वतःकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे आहार, आरोग्य नेहमीच चांगले राहील याबद्दल महिलांनी काळजी घेतली पाहिजे. शासन सदैव महिलांच्या विकासासाठी काम करते कारण जर महिलाची उन्नती झाली तर देशाची उन्नती ही होते. महिलांना विद्यापीठाच्या संपर्कात राहण्याचे व विद्यापीठाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संचालक विस्तार शिक्षण डॉ. भगवान आसेवार, हे बोलताना म्हणाले की विद्यापीठामध्ये सामुदायिक विज्ञान महाविद्यालय म्हणजेच पूर्वीचे गृह विज्ञान महाविद्यालय हे महिलांसाठी विविध उपक्रम राबविते यामध्ये शेतीमध्ये महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाची, अवजारांची व साहित्यांची निर्मिती केली जाते, त्याचाही महिलांनी लाभ घ्यावा. महिलांच्या गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत विद्यापीठ विविध प्रक्रिया उद्योगाबद्दल प्रशिक्षणही देण्यास तयार आहे. याचाही लाभ घ्यावा असे नमूद केले.

विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे यांनी येणाऱ्या रबी हंगामात गहू लागवड करताना उत्पादन वाढीसाठी लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबीमध्ये बियाण्याच्या निवडीपासून खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी यावेळी पीक संरक्षण करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी याविषयी उपस्थित महिलांना माहिती दिली. शेतकऱ्यांनी समस्येची सोडवणूक करण्यासाठी विद्यापीठाच्या व्हाट्सअप हेल्पलाइन वापर करावा असेही आवाहन करण्यात आले. महिला विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक श्री. बालासाहेब झिंजाडे यांनी महिला विकास महामंडळाच्या विविध योजनांची यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाला आत्माचे श्री. प्रकाश सोळंके, जनकल्याणीच्या अध्यक्षा सौ. सुरेखा पवार, शाखा व्यवस्थापक श्री. रमन, आत्माचे श्री.डी.एल.सोनटक्के, व्यवस्थापक श्रीमती भावना कुलकर्णी व श्रीमती जयश्री टेहरे तसेच श्रीमती सुनिता भिसे, श्रीमती शीला साळवे व श्रीमती दिपाली पटणे या मान्यवराची उपस्थिती होती.

तसेच या उपक्रमांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चमू प्रमुख डॉ शंकर पुरी, प्रा. ज्योती मुंडे, प्रा. प्रियांका स्वामी आणि प्रा. मानसी बाभूळगावकर यांनी मौजे एरंडेश्वर (ता. पूर्णा) येथे जिल्हा परिषद प्रशालेत स्कूल कनेक्ट उपक्रम राबवून किशोर वयीन मुला मुलीनी घ्यावयाची काळजी व संतुलित आहार यावर माहिती दिली तसेच शेतकरी महिलाना शेतीकामातील श्रम बचतीचे साधने, निरोगी जीवनासाठी संतुलित आहार, मानसिक स्वास्थ आणि शेतीव्यवसायात सामाजिक माध्यमाचा योग्य वापर याविषयी मार्गदर्शन केले. विद्यापीठातील शास्त्रज्ञानी श्री.मोहन टोले यांच्या कापूस पिकास व श्री. उमाकांत कोल्हे यांच्या आंबा फळबागेस तसेच इतर ठिकाणी भेट दिली.














]