जैविक नियंत्रणाच्या तंत्रज्ञानावर विशेष भर द्यावा.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
‘शेतकरी देवो भव:’ याभावानेतून कृषि संशोधन आणि प्रशिक्षणाच्या दिशेने महत्वपूर्ण
पाऊल टाकत, केंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू फाउंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ऑगस्ट रोजी "सोयाबीन पिकातील एकात्मिक
कीड व्यवस्थापन" या विषयावर विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन
आयोजित केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि होते. आपल्या भाषणात त्यांनी नमूद केले की, सध्याचा काळ सोयाबीन पिकांवरील कीड नियंत्रणासाठी
अत्यंत महत्त्वाचा असून, या काळात प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी
होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी कीड व्यवस्थापनासाठी शाश्वत उपायांचा अवलंब करावा
आणि जैविक नियंत्रणाच्या तंत्रज्ञानावर विशेष भर द्यावा, असे
सुचविले. कार्यक्रमास संचालक संशोधन डॉ.
खिजर बेग हे प्रमुख पाहुणे होते.
मुख्य वक्ते म्हणून केंद्रीय शेती प्रशिक्षण केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ डॉ.
राजेंद्र जाधव यांनी सोयाबीन पिकावरील प्रमुख किडींचे जीवनचक्र, नुकसानाचे स्वरूप,
प्रतिबंधात्मक उपाय, तसेच एकात्मिक कीड
व्यवस्थापन तंत्रांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ
शास्त्रज्ञ तथा प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी करून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त
टिप्स दिल्या.
कार्यक्रमाचे समन्वयक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. रणजीत चव्हाण चौहान सुत्रसंचालन व समारोप केले.
कार्यक्रमात ७० हून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी
होवून प्रश्न विचारले त्यास डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. आनंद गोरे यांनी यांनी सविस्तर
माहिती देऊन त्यांचे समाधान केले. हा कार्यक्रम झूम प्लॅटफॉर्मवर तसेच शेकरूच्या
यूट्यूब व फेसबुक चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.