Friday, October 23, 2015

नविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करावे..........शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

वसमत तालुक्‍यातील मौजे बाभुळगांव येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत शेतकरी मेळावा संपन्‍न
प्रत्येक गावामध्ये कृषि ट्टा स्थापन करुन शेतक-यांनी नविन तंत्रज्ञान आत्मसात करावे व आपल्‍या शेतीत नवनविन प्रयोग करुन उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोळेगांव येथील कृषि महाविद्यालय आणि वसमत येथील प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यामाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातर्गत मौजे बाभुळगाव येथे दि. २० ऑक्‍टोबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी व्‍यासपीठावर प्रमुख पाहुणे कुलसचिव डॉ. दिनकर जाधव, सरपंच श्री. बाबाराव नवघरे, वसमत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. चंद्रकांत नवघरे, प्राचार्य डॉ विलास पाटील, डॉ. उध्दव आळसे, डॉ. एस. डी. जेठुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
  कुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, नवीन तंत्रज्ञान अवलंब करुन शेतक-यांनी आपल्‍या शेतीचे उत्पन्न वाढवावे, जे विकणार आहे तेच शेतकऱ्यांनी पिकवावे, दर्जेदार मालाचे उत्पन्न घेऊन शेतीच्या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात कृषि विद्यावेत्‍ता डॉ. उध्दव आळसे यांनी रब्बी पिकाबददल मार्गदर्शन केले तर डॉ. एस. डी. जेठुरे यांनी फुलशेतीबद्दल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली
   मौजे बाभुळगांव व पिपळा (चौरे) येथे ग्रामीण कृषि कार्यक्रमाअंतर्गत गोळेगांव येथील कृषि हाविद्यालय विद्यार्थी गेल्या सहा महिण्यापासुन विविध शेती विषयक कार्यक्रम राबवित असुन प्रामुख्याने विवि पिकांची लागवड पध्दतीची तांत्रीक माहिती, वृक्षलागवड, किड व रोग व्यवस्थापन, लसीकरण, फळ प्रकीया या गोष्टी विशेष भर देण्‍यात आला. यावर आधारित चलचित्राचे सादरीकरण कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिल उमाटे यांनी केले. मेळाव्याकृषिदुत अजिंक्य भालेराव व सांळुखे हयांनी त्याचे मनोगत व्यक्त केले. मेळाव्‍याचे प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी केले तर  सुत्रसंचालन कृषिदुत प्रदिप घोंगडे यांनी केले. शेतकरी मेळाव्यास मौजे बाभुळगाव, चौरे पिपळा व परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. मेळाव्‍याचे आयोजन प्राचार्य डॉ विलास पाटील व कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रादेशिक ऊस संशेधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिपक लोखंडे, महाविद्यालयाचे प्राध्‍यापक डॉ. आर डी चांगुले, प्रा. जी ए भालेराव, प्रा. व्‍ही एन शिंदे, प्रा. डि के झटे यांच्‍यासह कृषिदुत व कृषिकन्या यांनी परिश्रम घेतले.