Wednesday, December 6, 2017

तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रात जा‍गतिक मृदा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि‍ विज्ञान केंद्रात दिनांक 5 डिसेबर रोजी जागतिक मृदा दिनानिमित्‍त रब्बी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे उद्घाटन आमदार मा श्री. मधुकररावजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याला प्रमुख पाहूणे म्हणून उस्मानाबाद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. सुभाष चोले, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. के. बी. मालगुंडे, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक श्री. विनायक कोठारी, तुळजापूर तालुका कृषि अधिकारी श्री. संजय जाधव, जिल्हा मृदा सर्वेक्षण व चाचणी प्रयोगशाळेचे प्रमुख श्री. गुंडेचा, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साळुंके, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. सचिन सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे यांनी मातीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढविणे गरजेचे असुन चांगल्या मृद आरोग्याकरिता सेंद्रीय कर्ब वाढविण्या करिताच्या उपाय योजना राबविणे आवश्यक असल्‍याचे सांगितले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष चोले म्हणाले की, कृषि विभागाकडून अल्प दरात शेतक-यांना मातीचा नमुना तपासून मृदा कार्ड दिले जाते, सदरील कार्डमधील शिफारशीप्रमाणे शेतक-यांनी खताची मात्रा वापरावी जेणेकरून जमिनीत जास्तीचा रासायनिक खताचा वापर टाळून मातीचे आरोग्य अबाधित ठेवता येईल. आत्म्याचे प्रकल्प संचालक श्री.मालगुंडे शेतक-यांना मार्गदर्शना दरम्यान म्हणाले की, आत्मा प्रकल्प मागील 10 वर्षापासून देशभर कार्यरत असून आत्माच्या योजनांचा लाभार्थी होण्यासाठी गट स्थापन करणे आवश्यक असून आत्मा फक्त शेतकरी गटांनाच विविध योजनांचा लाभ देऊ शकते. नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्री.विनायक कोठारी, मृदा शास्त्रज्ञ डॉ महेश वाघमारे,  कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा.सचिन सुर्यवंशी कृषिविद्या शास्त्रज्ञ प्रा. अपेक्षा कसबे आदींनी मार्गदर्शन केले मेळाव्यात उपस्थित शेतक-यांना कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. सचिन सुर्यवंशी यांनी जागतिक मृदा दिन प्रतिज्ञा दिली. शेतक-यांना मान्यवरांच्या हस्ते मृदा आरोग्‍य पत्रिका, कौशल्य विकास प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच विविध घडीपुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्री. रमेश पेठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ भगवान आरबाड, प्रा. वर्षा मरवाळीकर, प्रा. गणेश मंडलिक, प्रा. विजय जाधव, श्री.जगदेव हिवराळे आदीं कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास परिसरातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.