Friday, March 9, 2018

देशसेवा करण्‍याची संधी असा दृष्टिकोन ठेवुन स्‍पर्धा परिक्षेची तयारी करा....माजी आयएएस अधिकारी मा. श्री. अविनाश धर्माधिकारी

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व स्‍पर्धा मंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन
प्रशासकीय क्षेत्रात करिअर निवडतांना पैसा, सुरक्षितता, सन्‍मान, अधिकार व देशसेवेची संधी या पंचशिलांचा विचार करतांना देशसेवेची संधी असा दृष्टिकोन ठेवुन स्‍पर्धा परिक्षेची तयारी करा. स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना सर्वांचे भले करण्‍याचा उद्देश असणे आवश्‍यक असुन प्रशाकीय सेवेत स्‍वच्‍छ व कार्यक्षम अधिकारी होण्‍याचे स्‍वप्‍न उराशी बाळगले पाहिजे, असे प्रतिपादन  माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी तथा पुणे येथील चाणक्‍य मंडळाचे संचालक मा. श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाचा रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष व वनामकृवि विद्यार्थ्‍यी स्‍पर्धामंच यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 9 मार्च रोजी आधुनिक भारताचा इतिहास याविषयावर आयोजित व्‍याख्‍यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, कक्षाचे अध्‍यक्ष डॉ पी आर झंवर, स्‍पर्धामंचाचे अध्‍यक्ष कैलास भाकड आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात मा. श्री अविनाश धर्माधिकारी पुढे म्‍हणाले की, कोणतेही काम हाती घेतल्‍यास  कामावर आपली श्रध्‍दा असली पाहिजे. सातत्‍य, चिकाटी व शिस्‍त पाहिजे. भारत जगात निश्चितच महासत्‍ता होणार असुन जगाला शांततेचा संदेश देणार देश होणार आहे. भारताच्‍या आधुनिक इतिहासाची वर्तमानाशी जोड लावा. इतिहासापासुन प्रेरणा घेऊन आधुनिक भारत घडविणारे व्‍यक्‍ती बना. इंग्रजांनी आपल्‍या देशावर दिडशे वर्ष राज्‍य केले, आज आपण स्‍वतंत्र झालो परंतु आपल्‍या मनावर इंग्रजांचे राज्‍य आजही कायम आहे, असे मत व्‍यक्‍त करून त्‍यांनी भारतीय इतिहासाबाबत सविस्‍तर माहिती दिली.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगाले अध्‍यक्षीय भाषणात म्हणाले की विद्यार्थ्‍यींनी निर्धारासह कष्‍ट व सातत्‍याची जोड दिल्‍यास कोणत्‍याही क्षेत्रात यश संपादन करू शकतात.
प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण यांनी तर आभार डॉ पी आर झंवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कैलास भाकड, चंद्रकांत दाडगे, शशीकांत गळमे, विशाल पाटील आदींसह स्‍पर्धामंचाच्‍या सदस्‍यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.