Wednesday, December 18, 2019

वनामकृवितील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजना देशात सर्वोत्‍कृष्‍ट

गौरव कार्याचा : ग्रामीण कृषि मौसम सेवा योजने अंतर्गत पन्‍नास लाखपेक्षा जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहचविला जातो हवामान आधारित कृषि सल्‍ला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कृषि हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍प अंतर्गत असलेल्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेस २०१८ सालचा देशातील सर्वोत्‍कृष्‍ट केंद्र म्‍हणुन ग्‍वालियर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषि विद्यापीठात आयोजित ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेच्‍या १३ व्‍या वार्षिक आढावा राष्‍ट्रीय बैठकीत सन्‍माननित करण्‍यात आले. स‍दरिल सन्‍मान नवी दिल्‍ली येथील भारतीय हवामान विभागाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक मा डॉ एम मोहापात्रा यांच्‍या हस्‍ते ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ कैलास डाखोरे व श्री प्रमोद शिंदे यांनी स्‍वीकारला. कार्यक्रमास ग्‍वालियर येथील कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा प्रा एस के राव, जबलुपर येथील अटारीचे संचालक डॉ अनुपम मिश्रा, भारतीय कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ के के सिंग, भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक उपसंचालक (कृषि विस्‍तार) डॉ रणधीर सिंग, ग्‍वालीयार कृषी महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ जे पी दिक्षीत, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ एस एन उपाध्‍याय, कार्यक्रम आयोजक डॉ यु पी एस भथुरीया आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत वनामकृवि शास्‍त्रज्ञ लिखित ‘हवामान आधारित शेती व्‍यवस्‍थापन’ पुस्तिकाचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 

सदरिल वनामकृवितील योजना विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असुन योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ कैलास डाखोरे आहेत. तसेच यात संशोधन सहयोगी श्री प्रमोद शिंदे, डॉ यु एन आळसे, प्रा डी डी पटाईत, डॉ ए टी दौंडे, डॉ सी बी लटपटे, डॉ विनोद शिंदे, डॉ राहुल बगेले, प्रा ए टी शिंदे, श्री पांडुरंग कानडे आदी शास्‍त्रज्ञांचे पथक कार्यरत आहे. 

भारतीय कृषि मंत्रालय व पृथ्‍वी विज्ञान मंत्रालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय हवामानशास्‍त्र विभागाच्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजने अंतर्गत देशात १३० कृषि हवामान केंद्र कार्यरत असुन परभणी विद्यापीठातील केंद्र २००७ साली सुरू झाले. या केंद्राच्‍या वतीने पिकांची पेरणीपुर्व ते पीक काढणीपर्यंत प्रत्‍येक अवस्‍थेतील शेतातील कामाचे हवामान आधारीत नियोजन कसे करावे यांचे सल्‍ला व मार्गदर्शन देण्‍यात येते. या केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील जिल्‍हापातळीपर्यंत शेतकरी बांधवाना आठवडयातुन दोन वेळा मंगळवार व शुक्रवार कृषि हवामान सल्‍ला दिला जातो, यात पुढील पाच दिवसांकरिता पाऊस, तापमान, आर्द्रता, वा-याचा वेग, दिशा व ढगांची स्थिती या हवामान घटकांचा समावेश असतो, या आधारे कृषि सल्‍ला दिला जातो. स‍दरिल सल्‍ला जिल्‍हयानिहाय आकाशवाणी, दुरदर्शन, वर्तमानपत्रे, प्रसार माध्‍यमे, कृषि विज्ञान केंद्रे, किसान पोर्टल एसएमएस, मोबाईल अॅप्‍स, व्‍हॉटसअॅप ग्रुप, संकेतस्‍थळ, ब्‍लॉग आदींच्‍या माध्‍यमातुन पन्‍नास लाख पेक्षा जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहचविला जातो. या वेळोवेळी प्रसारित केलेल्‍या हवामानातील बदलातील सावधानतेच्‍या इशारामुळे अनेक शेतक-यांना आपले होणारे शेतीतील नुकसान प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष टाळणे शक्‍य होत आहे. या कार्याचा गौरव म्‍हणुन देशातील सर्वोत्‍कृष्‍ट केंद्र म्‍हणुन वनामकृविच्‍या ग्रामीण मौसम सेवा केंद्रास सन्‍माननित करण्‍यात आले.