Friday, September 4, 2020

वनामकृविच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्यांना मुंबई आयआयटीच्‍या माध्‍यामातुन डिजिटल शेतीवर संशोधनाची संधी ..... कुलगुरु मा डॉ अशोक ढवण

स्मार्ट कृषिसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग यावरील राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षणाचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) व मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्‍था यांच्या संयुक्‍त विद्यमाने “स्मार्ट कृषिसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग” यावर दिनांक १० ते २८ ऑगस्ट दरम्‍यान तीन आठवड्याच्या राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्‍यात आले होते, प्रशिक्षण वर्गाचा समारोप दिनांक २८ ऑगस्ट रोजी झाला. कार्यक्रमास अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. सतीश अग्निहोत्री, प्रा. अमित अरोरा, प्रा. कवी आर्या, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्रा डॉ. आर. पी. कदम, मुख्य अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे, सहमुख्य अन्वेषक प्रा. संजय पवार (नाहेप) आदींची प्रमुख सहभाग होता.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या सहकार्याने संशोधनाची संधी विद्यापीठातील पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना प्राप्‍त झाली असुन स्मार्ट शेतीसाठी उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करावा. सध्याच्या विषाणूंचा प्रादुर्भवाच्या परिस्थितीत डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातुन विद्यापीठातील विद्यार्थ्यां व  प्राध्यापकांना डिजिटल व्यासपीठावरून अधिकाधिक मार्गदर्शन करून सक्षम करावे., असे मत व्‍यक्‍त केले.

प्रमुख पाहुणे डॉ. सतीश अग्निहोत्री यांनी स्मार्ट कृषिसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग यावर मार्गदर्शन केले. डॉ. धर्मराज गोखले यांनी मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्राध्यापकांनी सहभागी विद्यार्थ्‍यी व प्राध्यापकांशी डिजिटल तंत्रज्ञानाबाबत खूप प्रभावी प्रशिक्षण दिल्‍याचे मत आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केले.

प्रास्‍ताविक प्रशिक्षणाचे आयोजक प्रा.अमित अरोरा यांनी केले. सुत्रसंचालन प्रा.संजय पवार यांनी केले तर आभार डॉ. आर. पी. कदम आभार यांनी मानले. प्रशिक्षणात कृषीचे विद्यार्थी, प्राध्यापक व शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ अविनाश काकडे, इंजि खेमचंद कापगाते, इंजि रविकुमार, डॉ हेमंत रोकडे, डॉ रश्मी बंगाळे, जगदीश माने आदींनी सहाय्य केले.

प्रशिक्षणात प्रा. अमित अरोरा यांनी शेतीतील स्वंयचलीत यंत्रणा, ग्रींनहाऊस, फार्म अवजारे, अन्नप्रक्रिया स्‍वयंचलित, डेटा विश्लेषण आदींवर मार्गदर्शन केले तर प्रा. कवि आर्या यांनी ई-यंत्राद्वारे आणि कृषीयंत्राचा स्मार्ट डिजिटल शेती, प्रा. मरियम शुजाई यांनी शेती अचूक आणि सुलभ करण्यासाठी सेन्सर्सचे महत्त्व, प्रा दिव्या सिंह यांनी इलेक्टॉन्सीक्सच्या मूलभूत तत्व, डॉ. इप्सिता दास यांनी अचुक शेती यांत्रिकीकरण, प्रा. असिम तिवारी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन शिक्षण, प्रा. विशाल देशपांडे यांनी स्वयंचलित गुळ प्रक्रिया तंत्रज्ञान, प्रा. अनिकेत देव यांनी पीक नियोजन व्यवस्थापन, मयुर निलावार यांनी स्मार्ट स्टोरेज स्ट्रकचर, प्रा. पेन्नर चिन्नास्वामी यांनी सॉफ्टवेअरच्‍या माध्यमातून शेतकरी शेतीच्या झाडांशी संबंधित विविध अंतर्दृष्टी आणि पाण्याचे व्यवस्थापन, प्रा कौशिकभाई भट यांनी मशीन लर्निग डेटा बायोलॉजी, प्रा शिमुल रेडडी यांनी स्थानिक विश्लेषणाच्या अनुषंगाणे रिमोट सेंन्सिगसाठी साधनांचा वापर तसेच प्रा अमण लोणारे यांनी जीआएस मधिल रिमोट सेन्सिंगची मुलभुत माहिती आदीवर मार्गदर्शन केले.