Friday, September 18, 2020

कृषी विकासात कृषी अभियंत्यांचे मोठे योगदान ....... कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण

वनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा

सध्याच्या परिस्थितीत कृषी क्षेत्रात कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची अत्यंत गरज असून कृषी अभियंत्यांनी कृषी यांत्रिकीकरण, पाणीव्यवस्थापन, मृद व जल संधारण, कृषी प्रक्रिया व मूल्य वर्धन, अपारंपरिक उर्जा स्त्रोत या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. या सुधारित तंत्रज्ञानाचा गरजेनुसार कृषीक्षेत्रात अवलंब होत असुन कृषीक्षेत्रात कृषी अभियंत्यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय परभणीच्या वतीने दिनांक 16 सप्‍टेबर रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जन्मदिन अभियंता दिन साजरा करण्यात आला, यानिमित्त आयोजित कृषी अभियंत्यांसाठी रोजगाराच्या संधी व आव्‍हाने या विषयावरील आयोजित ऑंनलाइन सत्राच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव श्री रणजीत पाटील, आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, माजी विद्यार्थी नेटाफिम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री रणधीर चौहान, पुणे येथील जॉन डीयरचे प्रोडक्ट विक्री व्यवस्थापक शिवानी कौल, मंत्रालय मुंबई येथील अवर सचिव श्रीकांत आंडगे, लातूरचे उद्योजक श्री माणिक जाधव, पुणे येथील कृषी अभियांत्रिकी सल्लागार सुप्रिया कुलकर्णी, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. राहुल रामटेके आदींची उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, सर विश्वेश्वरया यांनी अभियंता या व्यवसायास गौरव प्राप्त करून दिला असुन कृषि यांत्रिकीकरणात अनेक आव्‍हाने आहेत, येणार काळातही कृषी अभियंत्यांची कृषी क्षेत्रात प्रमुख भुमिका राहणार आहे. कोरोनाच्या काळातही कृषी क्षेत्रात होत सकारात्मक प्रगती उल्लेख करून शेतकर्यांनी केलेल्या मेहनतीसाठी त्यांचे कौतुक केले.

कुलसचिव श्री रणजीत पाटील यांनी भाषणांत विद्यार्थ्यानी आपल्या क्षमता ओळखून योग्य कार्य क्षेत्राची निवड करावी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यानी आपल्यातील क्षमतांचा पुरेपूर वापर करावा असे आवाहन केले.

कार्यक्रमात कृषी व क्षेत्रातील संधी व आवाहने, कृषी यांत्रिकीकरण, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, यशस्वी उद्योजक होण्याची गुरुकिल्ली आणि कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील सेवा व सल्ला संधी या विषयावर प्रमुख वक्ते श्री रणधीर चौहान, शिवानी कौल, श्रीकांत आंडगे, माणिक जाधव आणि सुप्रिया कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करून कृषी अभियंता विद्यार्थांना करिअर करिता पुढील काळात मदत करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित विद्यार्थ्यानी विचारलेल्या शंकांचे व प्रश्नांचे समाधान केले. प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी महान भारतीय अभियंता सर विश्वेश्वरया यांच्या प्रेरणादायी व्यक्तित्व व नैतिक मुल्ले यावर प्रकाश टाकला. डॉ. राहुल रामटेके यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रविंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यातील विभाग प्रमुख प्रा. भास्कर भूईभार, डॉ. स्मिता खोडके, डॉ. स्मिता सोलंकी, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. हरीश आवारी, डॉ. सुभाष विखे आदीसह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक आणि आजी माजी विद्यार्थी मोठया संख्‍येने सहभागी झालेले होते.