Friday, June 18, 2021

शेती व ग्रामीण क्षेत्राच्‍या शाश्‍वत विकासाकरिता समर्पित भावनेने कार्य करणा-यां लोकांची फळी उभारावी लागेल ..... मा डॉ अविनाश पौळ

वनामकृविच्‍या हरित विद्यापीठ उपक्रमाची सिने अभिनेते मा श्री आमिर खान संस्‍थापित पाणी फाउंडेनशकडुन दखल


शाश्‍वत पाण्‍याशिवाय ग्रामीण व कृषि विकास शक्‍य नाही. विविध योजनेवर केवळ पैसा खर्च करून फायदा होणार नाही, गाव पातळीवर पाणलोट क्षेत्र विकास, जलसंवर्धन व जलसंधारण, पाण्‍याचा काटेकोर वापर, वृक्षलागवड आदींकरिता ज्ञान देणारी चळवळ उभारावी लागेल. शेती क्षेत्राच्‍या विकासाकरिता समर्पित भावनेने कार्य करणा-यां लोकांची फळी उभारावी लागेल तरच शेतीत शाश्‍वत प्रगती शक्‍य होईल, असे प्रतिपादन पाणी फाऊंडेशनचे मुख्‍य मार्गदर्शन मा डॉ अविनाश पौळ यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली गेल्‍या तीन वर्षापासुन राबविण्‍यात येत असलेल्‍या हरित विद्यापीठ, सुंदर विद्यापीठउपक्रम पाहणीकरिता दिनांक १८ जुन रोजी मा डॉ अविनाश पौळ यांनी विद्यापीठास सदिच्छा भेटी दिली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, कुलसचिव डॉ धीरज कदम, वृक्षलागवड अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विभाग प्रमुख डॉ जे ई जहागिरदार, डॉ भगवान आसेवार, डॉ संचिव बंडेवाड, डॉ दिगांबर पेरके, डॉ व्‍ही बी कांबळे, डॉ एम जी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा डॉ अविनाश पौळ पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ राबवित असलेला हरित विद्यापीठ उपक्रम निश्चितच कौतुकास्‍पद असुन पाणी फाऊंडेशनचे संस्‍थापक सिनेअभिनेते मा श्री आमिर खान यांची हरित विद्यापीठ उपक्रमास भेटी करिता आपण प्रयत्‍न करू. परभणी कृषि विद्यापीठासोबत सामजंस्‍य करार करून शेती व ग्रामीण विकास करिता पाणी फाऊंडेशन संस्‍थेची काम करण्‍याची इच्‍छा त्‍यांनी व्यक्‍त केली. यावेळी त्‍यांनी पाणी फाऊंडेशन संस्‍थेची चडणघडण कशी झाली यांची माहिती दिली.

याप्रसंगी विविध संशोधन केंद्रे व महाविद्यालयास डॉ अविनाश पौळ यांनी भेटी देऊन माहिती घेतली. हरित विद्यापीठ उपक्रमाची डॉ हिराकांत काळपांडे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ मीना वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ पी एस नेहारकर, डॉ पी आर झंवर, डॉ जयकुमार देशमुख, डॉ एस व्‍ही कल्‍याणकर, डॉ मिलिंद सोनकांबळे, डॉ अनंत लाड, आदींनी सहकार्य केले.

पाणी फाऊंडेशन ही राज्यातील पाणी टंचाईवर दीर्घकालीन उपाययोजना करून राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सिनेअभिनेत मा श्री आमिर खान यांनी २०१६ साली स्थापन केलेली नानफा तत्त्वावर काम करणारी संस्था असुन शेती विकासाकरिता राज्‍यात कार्य करित आहे. कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवा पर्यंत पोहचविण्‍याकरिता व विविध तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षीत करण्‍याकरिता लवकरच पाणी फाऊंडेशन व विद्यापीठ यांच्‍या सामजंस्‍य करार करण्‍यात येणार आहे. हरित विद्यापीठ, सुंदर विद्यापीठउपक्रमाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठ परिसर पन्‍नास हजार पेक्षा जास्‍त वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करण्‍यात आले असुन मराठवाडयातील विद्यापीठ अंतर्गत विविध संशोधन केंद्रे, महाविद्यालये आदी परिसरातही मोठया प्रमाणात ही मोहिम राबविण्‍यात येत आहे, त्‍याचे दृष्‍यपरिणाम दिसत आहेत. विद्यापीठ परिसर मोठया प्रमाणात हरित झाला असुन विद्यापीठ पशुपक्षी यांचे वास्‍तव्‍यात वाढ झाली आहे, यामुळे पर्यावरण रक्षण व जैवविविधता राखण्‍यास मदत होत आहे.