Sunday, September 3, 2023

वनामकृविचा नाशिक येथील मे. इनव्हेंटीव्ह सोल्यूशन सोबत सामंजस्य करार

वनामकृवि विकसित कृषि अवजारे जास्तीत जास्‍त शेतकरी बांधवांपर्यंत पोहचली पाहिजेत ....... कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्या वतीने लहान व मध्यम भुधारक शेतकरी बांधवाकरिता उपयुक्त अशी अनेक कृषी अवजारे विकसित करण्यात आली आहेत. शेतकरी बांधवामध्ये या अवजारांची मोठी मागणी होत आहे, या बाबींचा विचार करुन परभणी कृषी विद्यापीठांने आणि नाशिक येथील मे. इनव्हेंटीव्ह सोल्यूशन नाशिक यांच्‍यात दिनांक २ सप्‍टेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठ विकसित २३ कृषि अवजारे निर्मितीचे अधिकार मे. इनव्हेंटीव्ह सोल्यूशन नाशिक यांना देण्यात आले आहेत. सामंजस्य कराराचा कार्यक्रम कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. व्ही. एम. भोसले, योजनेच्या प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी, विभाग प्रमुख डॉ. राहुल रामटेके, इंजि. अजय वाघमारे, कृषी उद्योजक मे. इनव्हेंटीव्ह सोल्यूशन नाशिकचे श्री. प्रशांत पवार व श्री. पवन राजेंद्र खर्डे, प्राचार्य डॉ जया  बंगाळे,  प्राचार्य  डॉ राजेश क्षीरसागर, विभाग प्रमुख डॉ डिगांबर पेरके आदींची उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरु मा. इन्द्र मणि म्हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाने मनुष्य, बैलचलित व ट्रक्टरचलित कृषी अवजारे संशोधित केलेली आहेत, ही अवजारे जास्तीत जास्त शेतकरी बांधवाना उपलब्ध होण्याकरिता या अवजारांची दर्जेदार निर्मिती करुन किफायतशीर दरात उपलब्ध करण्याची गरज लक्षात घेता, सदर सामंजस्य करार महत्वाचा आहे. केवळ कृषी अवजारे संशोधीत करुन उपयोगाचे नसुन ते जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहचवुन त्यांना शेतीमध्ये जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे.