Thursday, September 16, 2021

शेतकरी बांधवानी आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची कास धरावी..... मा आमदार डॉ राहुल पाटील

वनामकृविच्‍या वतीने आयोजित मौजे पिंगळी येथील शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन 

परभणी कृषि विद्यापीठाने संशोधनाच्‍या आधारे विविध पिकांचे वाण निर्माण केले असुन पिकांवरील कीड व रोग व्‍यवस्‍थापनातही अनेक तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेतकरी बांधवानी आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची कास धरावी, त्‍याशिवाय तरणोपाय नाही, असे प्रतिपादन परभणीचे माननीय आमदार तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा डॉ राहुल पाटील यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय आणि रेशीम संशोधन केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत दिनांक १६ सप्‍टेंबर रोजी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍या मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास पंचायत समिती सभापती श्री भानुदासराव डुबे, श्री रविंद्र पतंगे देशमुख, किटकशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ संजीव बंटेवाड, कृषी विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे, तालुका कृषि अधिकारी श्री प्रभाकर बनसावडे, रेशीम संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ चंद्रकांत लटपटे, सरपंच सौ सविताताई डिगांबर गरूड, तंटामुक्‍ती समिती अध्‍यक्ष श्री अजित गरूड, श्री काशीनाथ गरूड, रावे कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत लाड, जिल्‍हा परिषद सदस्‍य श्री संभाजी लोखंडे, श्री नारायण गरूड, श्री संजय गरूड, तलाठी श्री भारत नखाते, कृषी मंडळ अधिकारी विजय संघई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा आमदार डॉ राहुल पाटील पुढे म्‍हणाले की, आज कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहेत, समाजात मुलींना समान दर्जा प्राप्‍त होत आहे, मुलीमध्‍ये आत्‍मविश्‍वास वाढत आहे, ही चांगली बाब आहे. आमदार आपल्‍या दारी कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन शासनाच्‍या विविध योजना सर्वसामान्‍य पर्यंत पोहचविण्‍यात येत आहेत.   

याप्रसंगी श्री रविंद्र पतंगे देशमुख म्‍हणाले की, ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमातुनच चांगले कृषि पदवीधर घडतात, शेतीतील विविध तंत्रज्ञानाची प्रत्‍यक्ष माहिती कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना होते.

मा आमदार डॉ राहुल पाटील यांच्‍या हस्‍ते गुलाबी बोंडअळीच्‍या प्रभावी व्‍यवस्‍थापनासाठी कामगंध सापळयांचे कापुस उत्‍पादक शेतक-यांना वाटप करण्‍यात आले. मेळाव्‍यात तुर व हरभरावरील किड व्‍यवस्‍थापनावर डॉ संजीव बंटेवाड यांनी मार्गदर्शन केले, रबी पिकांची लागवड यावर डॉ गजानन गडदे, रेशीम किटक संगोपन यावर डॉ चंद्रकांत लटपटे, कापसावरील गुलाबी बोंडअळी यावर डॉ अनंत लाड, ई पीक पाहणी अॅप बाबत श्री प्रभाकर बनसावडे आदींनी मार्गदर्शन केले.

मेळाव्‍याचे आयोजन प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, रावे समन्‍वयक डॉ व्‍ही बी कांबळे, सहसमन्‍वयक डॉ आर पी कदम यांच्‍या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ अनंत लाड, कृषिकन्‍या सायली गायकवाड, ऋतुजा सामाले, गायत्री वाघ, वर्षा रेंगे, ज्‍योती ठाकरे आदींनी केले. कार्यक्रमास कृषि अधिकारी श्रीमती स्‍वाती घोडके, कृषि सहाय्यक श्री खिल्‍लारे, श्रीमती वंदना बेदरे, नामदेव गरूड, काशिनाथ बापु, लक्ष्‍मणराव गरूड, बालासाहेब गरूड, विजयराव गरूड, रामुआबा गरूड आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.