Sunday, January 23, 2022

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी उत्पादन क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

२८ व्या भारतीय अन्नशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ परिषदेच्‍या समारोपीय कार्यक्रमात प्रतिपादन

जालना : सन १९४८ पूर्वी भारताची लोकसंख्या कमी असून सुद्धा आपल्याला अन्‍नधान्‍य व इतर अन्न पदार्थाची आयात करावी लागत होती. आज लोकसंख्या एकशे तीस कोटी पेक्षा जास्‍त असून सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक स्तरावर कृषी उत्पादन क्षेत्रात देश स्वयंपूर्ण बनला, एवढेच नव्‍हे तर विविध देशांना आपण अन्नाची निर्यात करीत आहोत, यात अन्न प्रक्रिया उद्योगाचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग असल्‍याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांनी केले.  

अखिल भारतीय अन्न शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ संघटनेच्‍या (एएफएसटीआय) वतीने ७५ व्या आजादी का अमृत महोत्सव न‍िमित्‍त दिनांक २० ते २२ जानेवारी दरम्‍यान इट-सेफ या विषयावर २८ व्या भारतीय अन्नशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ राष्ट्रीय परिषदेचे ऑनलाईन आयोजन करण्‍यात आले होते, परिषदेच्‍या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जालना येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. डॉ. उदय अन्नापुरे, एएफएसटीआयचे अध्यक्ष डॉ. अलोक श्रीवास्तव, मानद सचिव डॉ. विकाससिंग चव्हाण, एएफएसटीआय, मुंबई चाप्टरच्‍या अध्यक्षा डॉ. सुभाप्रदा निस्ताला, मैसुर येथील विद्यार्थी समितीचे अध्‍यक्ष डॉ. आर पी सिंग, सीएफटीआरआयचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजेंद्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, भारताचे विद्यमान पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून स्टार्टअप व स्टॅन्ड अप इंडियाची सुरुवात झालेली असून यात सर्व भागीदारांना, जसे शेतकरी, उद्योजक यांना प्रोत्साहित केले आहे. साधारणता वीस ते तीस टक्के काढणीपश्‍चात तंत्रज्ञानात द्वारे होणारे नुकसान आपल्याला कमी करता येऊ शकते. सदरिल परिषदे प्रमाणाने फोरम वेळोवेळी आयोजित करण्याबाबत त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

भाषणात संचालक प्रा. डॉ. उदय अन्नापुरे यांनी सदरिल परिषदेतील मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना, कारखानदारांना, विद्यार्थ्यांना आदीसह नवीन अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी निश्चितच लाभ होईल अशी आशा व्‍यक्‍त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रितिका जोशी यांनी केले तर आभार औरंगाबाद चाप्टरचे अध्यक्ष व परिषदेचे आयोजन सचिव प्रा. डॉ. भगवान साखळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ. भगवान कापसे, प्रवीण फिरके, निमंत्रक उदय नाईक, संजय कुलकर्णी, प्रा. डॉ. पराग नेमाडे, डॉ योगेश गात, प्रा डॉ सुरेश कागणे, श्री गिरीश वाहिले, श्री नागेश आलसटवार, गणेश बार्बीले आदींनी कार्य केले. सदरील तीन दिवसीय परिषदेत देशातील ७० पेक्षा अधिक तज्ञांनी अन्नतंत्रज्ञान अन्नप्रक्रिया, अन्न सुरक्षितता व गुणवत्ता, अन्न अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी मालावरील प्रक्रिया, दूध प्रक्रिया, न्युट्रासीटीकल्स, अन्नसुरक्षा इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रात होत असलेल्या संशोधनपर शोध निबंधांचे विविध तज्ञाकडून सादरीकरण करण्यात आले. परिषदेत ३३ तांत्रिक सत्रात २०० पोस्टर आणि २०० ओरल प्रेझेंटेशनाच्‍या माध्‍यमातुन विविध तत्रांनी सादरीकरण केले. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या उत्पादनाचे प्रदर्शन आभासी पद्धतीने भरविण्यात आले होते. परिषदेत विविध विषयांच्या अनुषंगाने संशोधक विद्यार्थ्यांचे सादरीकरणाच्या स्पर्धा आयोजित करून, उत्कृष्ट शोधनिबंधाचे सादरीकरण करणाऱ्या संशोधकाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. परिषदेच्या आयोजनाकरिता रिसेला, अरोमॅक्स क्रिएशन, चितळे डेअरी, प्रवीण मसाले, तायोकागागु (जपान) इत्यादी उद्योजकांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. परिषदेमध्ये एक हजार पेक्षा अधिक अन्न शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, उद्योजक, विद्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला.