Friday, June 1, 2018

कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व अधिकारी कर्मचा-यांना जास्‍त क्षमतेने कार्य करावे लागेल.... नवनियुक्‍त कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण

वनामकृविच्‍या वतीने नवनियुक्‍त कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांचा स्‍वागत तर माजी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा निरोप समारंभ संपन्‍न


मराठवाडयातील शेतक-यांच्‍या गरजेच्‍या दृष्‍टीने कृषी संशोधनाच्‍या आधारे विद्यापीठाने अनेक चांगले कृषि तंत्रज्ञान विकसित केले आहे, हे तंत्रज्ञान विद्यापीठाची कृषी विस्‍तार यंत्रणा व कृषी विभाग यांच्‍या सहकार्याने प्रभावीपणे शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी प्रयत्‍न करावे लागतील, विद्यापीठातील अनेक पदे रिक्‍त असल्‍यामुळे मनुष्‍यबळाची मोठी कमतरता आहे. त्‍यामुळे विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, संशोधन व कृषी विस्‍तार कार्यावर मर्यादा येत आहेत. परंतु शेतक-यांना व विद्यार्थ्‍याना विद्यापीठाकडुन अनेक अपेक्षा आहेत, यासाठी विद्यापीठातील उपलब्‍ध शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचा-यांना प्रभावीपणे जास्‍त क्षमतेने कार्य करावे लागेल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नुतन कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांनी केले.
विद्यापीठाचे अठरावे कुलगुरू म्‍हणुन दिनांक 1 जुन रोजी मा. डॉ अशोक ढवण यांनी पदाभार स्‍वीकारला, विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित सत्‍कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांना देखिल निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हाधिकारी मा. श्री पी शिवशंकर हे होते तर व्‍यासपीठावर आमदार मा. डॉ राहुल पाटील, जिल्‍हा पोलिस अधिक्षक डॉ दिलीप झळके, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, शेतीनिष्‍ठ शेतकरी मा. श्री गंगाधरराव पवार आदींसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानात काही कृषी तंत्रज्ञान कालबाहय झाले असुन बदलत्‍या हवामानस अनुकूल तंत्रज्ञान निर्मितीसाठी भर दयावा लागेल. मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या कार्यकाळात विद्यापीठाच्‍या कोरडवाहु संशोधनास एक चांगली दिशा प्राप्‍त झाली असुन तेच कार्य पुढे नेणार आहे. कृषी शिक्षणात विद्यार्थ्‍याच्‍या कौशल्‍य विकासावर भर देऊन त्‍यांना कृषी उद्योजकतेचे धडे दयावी लागतील, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
माजी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदाच्‍या चार वर्षाच्‍या कार्यकाळात विद्यापीठातील कर्मचारी, मराठवाडयातील शेतकरी, तसेच लोकप्रतिनिधी यांनी मोठे सहकार्य केले. यामुळेच विद्यापीठातील प्रकल्‍पग्रस्‍त शेतक-यांचा प्रश्‍न मार्गी लावता आला. प्रशासनात निर्णय घेतांना प्रत्‍येकांचा सहभाग घेण्‍याचा प्रयत्‍न केला, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
आमदार मा डॉ राहुल पाटील यांनी आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मा. डॉ बी व्‍यं‍कटेश्‍वरलु यांनी विद्यापीठाच्‍या संशोधन व कृषि विस्‍तार कार्यास मोठी दिशा देण्‍याचे काम केले असुन त्यांनी भ्रष्‍टाचार मुक्‍त प्रशासन दिल्‍याची भावना व्‍यक्‍त केली.
अध्‍यक्षीय भाषणात जिल्‍हाधिकारी मा श्री पी शिवशंकर यांनी जिल्‍हा प्रशासनास शेतक-यांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या नेतृत्‍वाखाली विद्यापीठाचे मोलाचे योगदान लाभले असे सांगून त्‍यांच्‍या कार्यकाळात मराठवाडयातील शेतक-यांमध्‍ये आशेचा किरण निर्माण करण्‍यासाठी राबविण्‍यात आलेला उमेद कार्यक्रम निश्चितच उल्‍लेखनिय ठरला, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.   
कार्यक्रमात मा. डॉ अशोक ढवण व मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमात डॉ पी आर शिवपुजे, डॉ विलास पाटील, डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ डि एन गोखले, श्री रमेशराव गोळेगांवकर, महेश देशमुख, प्रा. विशाला पटणम, विजय सांवत आदींनी मनोगत व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार डॉ सय्यद ईस्‍माइल यांनी मानले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख, अॅड अशोक सोनी आदीसह प्रतिष्ठित नागरीक, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.