Sunday, November 27, 2022

नवसारी कृषि विद्यापीठात आयोजित भारतीय कृषि विद्यापीठ संघाच्‍या नववी प्रादेशिक बैठकीत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांचे मार्गदर्शन

भारतीय कृषी विद्यापीठ संघाच्या (IAUA) कुलगुरूंची नववी प्रादेशिक बैठक नवसारी कृषी विद्यापीठात दिनांक २५ नोव्‍हेबर ते २७ नोव्‍हेबर दरम्‍यान संपन्‍न झाली नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: कृषी विद्यापीठांमध्ये अल्प मुदतीच्या आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे महत्त्व आणि व्यवहार्यता' या विषयावर भर देण्‍यात आला. उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन देशाचे माननीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री कैलास चौधरी हे आभासी माध्‍यमातुन उपस्थिती होते तर नवसारी कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ झेड पी पटेल हे अध्‍यक्षस्‍थानी होते. बैठकीस देशातील ३० कृषि विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी बैठकीस उपस्थित राहुन कृषि विद्यापीठामध्‍ये अल्‍प मुदतीच्‍या व प्रमाणपत्र अभ्‍यासक्रमांचे महत्‍व यावर मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, ग्रामीण युवकांच्या कौशल्य विकासाकरिता कृषी विद्यापीठाने अल्‍प मुदतीच्‍या व प्रमाणपत्र अभ्‍यासक्रमांवर भर देण्‍याची गरज असुन ड्रोन पायलट, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, अंळबी शेती, सेंद्रीय शेती, दुग्ध व्‍यवसाय, कुक्‍कटपालन, कृषि प्रक्रिया उद्योग आदी अनेक कृषि संलग्‍न व्‍यवसायावर आधारित कौशल्‍य विकास अभ्‍यासक्रम अत्‍यंत उपयुक्‍त ठर‍तील असे ते म्‍हणाले. कृषि राज्‍यमंत्री मा श्री. कैलास चौधरी म्‍हणाले की, जागतिक स्तरावर कृषी शिक्षणासाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये भारताचा वाटा फक्त १ टक्के आहे आणि २७ टक्के विद्यार्थ्यांनी भारतातील सर्व शाखांमध्ये उच्च शिक्षणासाठी नोंदणी केली आहे. २०३३ पर्यंत ही टक्केवारी अनुक्रमे ९ टक्के आणि ५० टक्के पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ झेड पी पटेल म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाचे ज्ञान शक्ती केंद्रात रूपांतर करण्याच्‍या गरज असुन कृषी शिक्षण जास्‍तीत जास्‍त लोकांपर्यंत पोहविण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे ते म्‍हणाले.