Monday, December 12, 2022

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कपाशीची फरदड घेण्याचा मोह टाळा

वनामकृविच्‍या तज्ञांचा सल्‍ला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी क्रॉपसॅप प्रकल्पा अंतर्गत मागील दोन आठवडया पासून परभणी जिल्हयातील परभणी, सेलु, मानवत, पाथरी, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, कंधार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औंढा, ड मधील अंबाजोगाई, परळी, केज, जालना जिल्ह्यातील परतुर, मंठा, अंबड, घनसावंगी, जाफ्राबाद, बदनापुर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण त्यादी तालुक्या प्रक्षेत्र भेटी दिल्या असता, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ४ ते ५ टक्के च्या दरम्यान दिसून आला असून पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.

यावर्षी चांगला पाउस झाल्या मुळे मराठवाडयातील बऱ्याच भागात विहिरी, कुपनलिका व कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे, त्याबरोबरच कापसाला चांगला उठाव असल्याने शेतकरी कपाशीचे पीक काढण्या ऐवजी पाणी व खताच्या मात्रा देउन कपाशीचा पुर्णबहार (फदड) घेण्यावर शेतक-यांचा कल दिसुन येत आहे. फरदड कापूस म्हणजे कापसाच्या वेचण्या झाल्यानंतर एखाद पाणी (सिंचन) देऊन पुन्हा कापूस पीक घेतले जाते. फरदड पिकामध्ये जोमदार उत्पादन मिळण्यासाठी पाणी, खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. या पध्दतीमुळे कापूस पीक शेतामध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतरही राहते. कपाशी वेचणीनंतर रब्बी पश्चात हंगामामध्ये नवीन पीक घेण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते. त्यामुळे मशागत, पेरणी आणि बियाणे अशा बाबींवरील खर्च वाढतो. हा खर्च टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये लागवड झालेल्या कापूस पिकापासूनच फरदड कापसाचे वाढीव उत्पादन घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. या कारणामुळे फरदड पीक घेण्याची पध्दत शेतकऱ्यांना फायदयाची वाटते. मात्र, या पध्दतीमुळे शेतीमध्ये दीर्घकाळ पीक राहिल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेता तिचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणे गरजेचे आहे. म्हणून कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये. असे आवाहन किटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पी.एस. नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे यांनी केले आहे.

पुढील हंगामातील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 

कपाशीची फरदड घेउ नये. वेळेवर कपाशीची वेचनी करुन डिसेंबर नंतर शेतामध्ये कपाशीचे पिक ठेवू नये. हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळया, मेंढया चरण्यासाठी सोडाव्यात. हंगाम संपल्यावर ताबडतोब प-हाटीचा बंदोबस्त करावा. शेतात किंवा शेताजवळ प-हाटी रचुन ठेवू नये. कारन पऱ्हाटीत गुलाबी बोंडअळीच्या सुप्त अवस्था असतात. रोटोवेटर ऐवजी चुरा करणारे यंत्र श्रेडरच्या सहाय्याने प-हाटीचा बारीक चुरा करुन कंपोष्ट खतासाठी उपयोग करावा. जिनींग मिल व साठविलेल्या ठिकाणी कामगंध सापळयाचा वापर करावा.