Wednesday, December 14, 2022

ध्येय प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्नांची जोड हवी ........ प्राचार्य डॉ. उदय खोडके

वनामकृवितील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात नुतन प्रवेशित विद्यार्थीचा अभिमुखता कार्यक्रम संपन्‍न

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी) व एम. टेक. (कृषी अभियांत्रिकी) या अभ्यासक्रमात नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी स्वागत व अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते तर व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. स्मिता सोळंकी, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. हरीश आवारी, डॉ. संदिपान पायाल, डॉ. सुभाष विखे आदीं उपस्थिती होती.

सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत असून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी यांत्रिकीकरण, स्वयंचलित औजारे, कृषी प्रक्रिया, सौर उर्जा चलित उपकरणे व पद्धती, ड्रोन तंत्रज्ञान, रोबोटिक, जीआयएस, रिमोट सेन्सिंग, संरक्षित शेती, पोली हाउस व हरित गृहे, संगणक तंत्रज्ञानाचा वापर, मशीन लर्निंग यांचा वापर व अवलंब करणे अनिवार्य झालेले आहे. विकसित देशात या क्षेत्रात खूप प्रगती होत असून भारतात सुद्धा कृषी विकासास चालना देण्यासाठी कृषी अभियांत्रिकी हि विद्याशाखा मोलाचे योगदान देऊ शकते. कृषि यांत्रिकीकरणाव्‍दारे  कृषी क्षेत्रातील मजूर टंचाई व  हवामान बदल, यासारख्या प्रश्नावर मात करणे सुलभ होईल असेही ते पुढे म्हणाले.  

कार्यक्रमात नवीन विद्यार्थांनी आपली ओळख करून दिली व जीवनातील त्यांचे ध्येय काय याबाबत माहिती दिली. पालकांनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक यांनी त्यांच्या विभागातील शैक्षणिक सुविधांचा व प्रयोगशाळा यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. राष्ट्रीय सेवा योजना, वसतीगृह नियमावली, प्रशिक्षण कार्यक्रम, क्रीडा तसेच सांस्कृतिक उपक्रम, आणि नोकरीच्या संधी याविषयी विविध कक्षाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विभागाचे प्रभारी अधिकारी प्रा. विवेकानंद भोसले यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी दत्तात्रय पवार आणि आकांक्षा डहाळे यांनी केले, तर आभार विश्वजीत तिकटे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पंडित मुंडे, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ.विशाल इंगळे, प्रा मधुकर मोरे, प्रा दत्तात्रय पाटील, डॉ. शाम गरुड, श्री मंगेश राऊत, दीपक राऊत, एस. के शिवणकर, सुधा सालगुडे, राजकुमार ढगे, श्री.बेडवल, श्री. मनोहर, श्री. शिराळे आदीसह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते.