Sunday, December 18, 2022

दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२३ दरम्‍यान सिल्‍लोड (औरंगाबाद) येथे राज्‍यस्‍तरीय सिल्‍लोड कृषी महोत्‍सव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाच्‍या पुढाकाराने दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी, २०२३ या कालावधीत राज्‍याचे कृषि मंत्री मा ना अब्‍दुल सत्‍तार यांच्‍या संकल्‍पनेतुन सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषि महोत्सव - २०२३ पार पडणार आहे. पाच दिवस चालणा-या महोत्‍सवात राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन नवीन वाणांची निर्मिती याबाबत माहिती, कृषि प्रात्‍यक्षिके पाहण्‍यास मिळणार असुन शेतकऱ्यांशी थेट संवाद, विविध चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके आणि विविध योजनांची शेतकऱ्यांना थेट माहिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी) या चार विद्यापीठांनी केलेली संशोधने, कृषी विभागाची प्रात्यक्षिके, परिसंवाद, तंत्रज्ञान, राज्यातील शेतक-यांच्या यशोगाथा, असे एकत्रित सादरीकरण करणारा हा पहिलाच राज्यस्तरीय कृषी महोत्सव असुन यात राज्यभरातील विविध प्रयोग ज्यामध्ये उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापीठांकडून सादर केली जाणार आहेत. राज्यभरातील जवळपास १० लाख शेतकरी या महोत्सव आणि प्रदर्शनास भेट देतील, असा विश्वास कृषि मंत्री मा ना अब्‍दुल सत्‍तार यांनी व्यक्त केला आहे.

आगामी वर्ष हे आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२३ हे वर्ष भरड धान्यांचं म्हणून साजरे होणार असुन यात महाराष्ट्राची भुमिका, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे कार्यक्रम यावरही महोत्सवातील चर्चासत्रांमधून विचारमंथन होणार आहे. महोत्सवात कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या प्रक्रिया उद्योग, त्यासंबंधी होणारं संशोधन, नवीन वाणांचं संशोधन, बदलेले वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेलं संशोधन याचेही सादरीकरण महोत्सवात करण्यात येणार आहे.

महोत्सवात कृषि विभाग, कृषि विद्यापीठे यांच्यासह शासनाचे विविध विभाग याबरोबरच कृषि तंत्रज्ञानात सहभाग असणारे विविध खासगी कंपन्‍या यांची दालने असणार आहेत. कृषी विभागाच्या दालनामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पोकरा, स्मार्ट, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फळप्रक्रिया यांचा समावेश राहणार असुन बाजारपेठांचं नवीन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान याची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती दालने, कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने, शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालन, राज्यभरातील विविध शेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादने आदींसह महोत्सवात एकूण सहाशे दालने असणार आहेत. तसेच सायंकाळी शेतकऱ्यांसाठी आणि महोत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर‍ि अधिकाधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवास भेट देऊन येथील चर्चासत्रे, प्रदर्शन, प्रात्यक्षिके याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभाग (महाराष्‍ट्र राज्‍य) आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृृृषि विद्यापीठ यांच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.