Saturday, June 10, 2023

वनामकृविच्‍या लातूर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्रास ‘उत्कृष्ट’ केंद्राचा पुरस्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्रास अखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्प (सूर्यफुल) या योजनेत सन २०१७ ते २०२१ या कालावधीमध्ये सूर्यफुल पिकांवर केलेल्या उत्कृष्ट संशोधन कार्याबदल मंडौर, जोधपूर (राजस्थान) येथील कृषि विद्यापीठ पार पडलेल्या वार्षिक समूह बैठकीमध्ये उत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यांत आला. सदर पुरस्कार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उप-महासंचालक डॉ. टी.आर. शर्मा, सहाय्यक महा-संचालक डॉ. संजीव गुप्ता, कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा.डॉ. बा.आर. चौधरी यांचे हस्ते प्रदान करण्यांत आला. सदरील गळीतधान्यें संशोधन केंद्राव्दारे आजपर्यंत सूर्यफुलाचे ४ संकरीत वाण व २ सुधारीत वाण विकसित केले असुन ४५ पेक्षा अधिक तंत्रज्ञान शिफारशी शेतक-यांसाठी प्रसारित करण्यांत आलेल्या आहेत. या वाणांची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल इत्‍यादी राज्यात लागवड करण्यांत येते. 

केंद्रास मिळालेल्‍या पुरस्‍काराबाबत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, तेलबिया उत्‍पादनात देश व राज्‍य आत्‍मनिर्भर बनविण्‍याकरिता राज्‍यातील गळीतधान्‍य पिकांखालील क्षेत्रावाढी करिता प्रयत्‍न करावा लागेल, याकरिता संशोधन केंद्राने विकसित केलेले विविध गळीतधान्‍येचे वाण उपयुक्‍त ठरणार असल्‍याचे सांगुन संशोधन केंद्रातील शास्‍त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

संशोधन कार्यासाठी शास्त्रज्ञांना कुलगुरु डॉ. इन्‍द्र मणि, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे संचालक डॉ. आर.के. माथुर व प्रमुख (पीक सुधारणा) डॉ. एम. सुजाता यांचे मौलीक मार्गदर्शन लाभले.  पुरस्कार मिळाल्याबदल केंद्राचे माजी गळीतधान्यें विशेषज्ञ डॉ. महारुद्र घोडके, गळीतधान्यें विशेषज्ञ डॉ. मोहन धुप्पे, कनिष्ठ पैदासकार डॉ. शिवशंकर पोले, कृषि विद्यावेत्ता प्रा. अशोक घोटमुकळे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, प्रा. संतोष वाघमारे, किटकशास्त्रज्ञ प्रा. कल्याण दहिफळे, सहाय्यक पैदासकार डॉ. ज्ञानेश्‍वर देशपांडे आदीसह केंद्रातील शास्‍त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यांत येत आहे.