Tuesday, June 6, 2023

प्रत्येक दिवस असू द्या तंबाखू विरोधी दिवस …….. प्राचार्य डॉ. उदय खोडके

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात तंबाखू विरोधी दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक ३१ मे रोजी “तंबाखू निषेध दिन” साजरा करण्‍यात आला. कान नाक घसा तज्ञ डॉ. तेजस तांबुळे मुख्‍य व्‍याख्‍याते म्‍हणुन उपस्थित होते तर अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते.

मार्गदर्शनात डॉ. तेजस तांबुळे म्‍हणाले की, सद्याच्या काळात मोठ्या संख्येने लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करत आहेत. सिगारेट, गुटखा, विडी, तंबाखू अशा अनेक प्रकारात हे विष आपल्या शरीरात विरघळत आहेत. यामुळे कळतं किंवा नकळत लोक स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देत आहेत. तंबाखूपासून होणार्‍या हानीबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा अत्यंत व्यसनाधीन पदार्थ असतो. निकोटीनमुळे हृदय, फुफ्फुस आणि पोट तसेच तुमच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. व्यक्तीचे शरीर शारीरिक आणि भावनिक पातळीवर निकोटीनचे आहारी जाते. व्यक्तीला गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते.  तंबाखूच्या धुरा मध्ये ७००० केमिकल्स असतात ज्यापैकी ५० केमिकल्समुळे कर्करोग होऊ शकतो. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कातील इतर व्‍यक्‍तीवरही याचा परिणाम होतो.

अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. उदय खोडके म्‍हणाले कि, जागतिक तंबाखू निषेध दिनाच्या माध्यमातून लोकांना तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांबाबत जागरूक केले पाहिजे. हा सार्वजनिक आरोग्यावर तंबाखूच्या वापराच्या परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वैयक्तिक तंबाखू अवलंबित्व कमी करण्यासाठी समर्पित कार्यक्रम आहे. तंबाखूमुळे होणारी हानी पाहता सर्व देशांची सरकारे तंबाखूजन्य पदार्थांवर कडक नियम लागू करत आहेत. जागतिक तंबाखू निषेध दिन २०२३ ची थीम "आम्हाला अन्न हवे, तंबाखू नव्हे" अशी आहे. आरोग्य जोपासने अत्यंत गरजेचे असल्‍याचे सांगुन प्रत्येक दिवस तंबाखू विरोधी दिवस असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी चित्रप्रदर्शनीही लावण्‍यात आली होती. कार्यक्रमात साक्षी क्षीरसागर, पलक इंदुरकर, ऋषी सातोनकर, अंशिका राऊत, समर्थ असुतकर , अजय मुंढे, दीपक लाटे, विश्वास चोथवे, दीपक झगरे, साहिल मोटे, उदय पाटील, साक्षी दवणे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायत्री वाणी तर आभार जानव्ही चव्हाण हीने मानले. कार्यक्रम यशस्वितेकरिता डॉ.राहुल रामटेके, डॉ.विवेकानंद भोसले, प्रा.भास्कर भुइभार, डॉ.पंडित मुंढे, डॉ.सुमंत जाधव, डॉ.सुभाष विखे, डॉ.मधुकर मोरे, प्रा.दत्तात्रय पाटील, डॉ.शाम गरुड, डॉ.विशाल इंगळे, डॉ. प्रमोदिनी मोरे व रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र शिंदे यांनी प्रयत्न केले.