Saturday, July 15, 2023

राज्‍यात सेंद्रीय शेती विकासाकरिता लोकचळवळीसोबतच शास्त्रीय ज्ञानाचे पाठबळ आवश्‍यक ........... कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

सेंद्रीय शेती ही एक व्यापक संकल्पना असून ती देशात विविध ठिकाणी विविध प्रकारे केल्या जाते. यात अनेक प्रकारच्या निविष्ठा व विविध पद्धती वापरल्या जातात. शेतकऱ्यांच्या पद्धती, स्वदेशी तांत्रिक ज्ञान यामागील शास्त्रीय कारण व त्यांचे प्रमाणीकरण हा सेंद्रीय शेती संशोधन योजनेचा एक भाग असावा. सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी आणि सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शास्त्रज्ञांनी सहकार्य, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन, ज्ञानाची देवाणघेवाण आणि यशोगाथा, समूह दृष्टिकोन समोर ठेवून काम केले पाहिजे. राज्‍यात सेंद्रीय शेती विकासाकरिता लोकचळवळ उभी करता करून शास्‍त्रीय ज्ञानाचे पाठबळ आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रकल्पाच्‍या वतीने महाराष्ट्र राज्यासाठी सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीतील संशोधन प्राधान्य या विषयावर एक दिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन दिनांक १२ जुलै रोजी करण्‍यात आले होते, कार्यशाळेच्या अध्यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, नागपुर येथील प्रादेशिक सेंद्रीय व नैसर्गिक शेती केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. . एस. राजपुत, अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचे प्रकल्प संचालक श्री. संतोष आळसे, यवतमाळ येथील वसंतराव नाईक कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी. पारलावार, प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. सुर्यकांतराव देशमुख, श्री. शिवराम घोडके, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, सेंद्रीय शेती मधील कीड व रोगांची समस्या, बाजारपेठ व्यवस्थापन, प्रमाणीकरण या बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील तज्ञांनी व शेतक-यांनी एकत्र येवून पुढील ५ ते १० वर्षासाठीचा संशोधन व विस्तार कामाचा आराखडा तयार करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, कृषि निविष्ठावरील वाढता खर्च, जमिनीचे खालावलेले आरोग्य, रासायनिक कीटकनाशकांचा प्रमाणापेक्षा अधिक वापर व त्यांचे फळे व भाजीपाला पिकातील अवशेष, हवामान बदल या पार्श्वभूमीवर सेंद्रीय शेती ही शेतकरी उत्पादक आणि ग्राहक यांना दोघांनाही महत्वाची आहे. सेंद्रीय शेतीत निविष्ठा या शेतावरच बनविल्या पाहिजेत आणि शेतीवरील खर्च कमी केला पाहिजे. तर डॉ. एन. डी. पारलावर म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीत एकात्मिक शेती पद्धती आणि पीक अवशेष, जीवाणू खते, पिक फेरपालट यावर भर देण्याची गरज आहे.

कुलगुरू मा. डॉ. इंद्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी कार्यशाळेच्या आयोजना मागील भूमिका विषद केली. सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले व आभार डॉ. प्रितम भुतडा यांनी मानले.

तांत्रिक सत्रात मोदीपुरम (उत्तर प्रदेश) येथील भारतीय एकात्मिक शेती पद्धती अंतर्गत पीक विभाग प्रणाली व संसाधन व्यवस्थापन विभागाचे शास्त्रज्ञ (मृद विज्ञान) डॉ. अमृत लाल मीना यांनी सेंद्रीय व नैसर्गिक शेतीत जमिनीचे आरोग्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. प्रकाश चंद घासल यांनी सेंद्रीय शेतीत संशोधनाचे प्राधान्यक्रम आणि नैसर्गिक शेती राष्ट्रीय दृष्टिकोन यावर मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) डॉ. चंद्र भानू यांनी सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीमध्ये कीड व रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. श्री. संतोष आळसे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची नवीन योजना यावर मार्गदर्शन केले तर सेंद्रीय प्रमाणीकरणावर तज्ञ श्री. बाळासाहेब खेमणार, श्री हर्षल जैन मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सोनुने, डॉ. पाटगांवकर. डॉ. शेळके, डॉ. अरबाड आदीसह प्रगतशील शेतकरी, सेंद्रीय शेती करणारे शेतकरी यांनी आपले अनुभव व समस्या मांडल्या, संशोधनासाठी अनेक सुचना केल्या.

राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. आदिनाथ पसलावर, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. अमोल दहिफळे, डॉ. आनंद गोरे यांनी आपल्या केंद्राचा अहवाल व माहिती सादर केली. कार्यशाळेस प्राचार्य डॉसय्यद इस्माईलउपसंचालक श्री. बुचे, डॉए. एनडीपसलावारप्रकल्प संचालक (आत्मा) श्री. डी. एस. चव्हाण, कृषि आयुक्तालय सेंद्रीय शेतीचे राज्य समन्वयक श्री. सुनील चौधरी, विभाग प्रमुख डॉ. एम. बी. पाटील, डॉ. पी.एस. नेहरकर, डॉ. पी. एच. वैद्य, डॉ. जी. के. लोंढे, श्री. प्रतापराव काळे, श्री. नरेश शिंदे,  विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आदींसह देशातील व राज्‍यातील शास्त्रज्ञ, विविध विभागाचे विभाग प्रमुख, राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख, कृषि विभागाचे अधिकारी, सेंद्रीय प्रमाणीकरण तज्ञ, प्रगतशील शेतकरी कार्यशाळेसाठी उपस्थित होते. कार्यशाळेच्‍या यशस्‍वीतेसाठी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान लाभले.