Tuesday, July 4, 2023

पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री सौ स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने परभणीकर झाले मंत्रमुग्ध

वनामकृवि व परभणी एस्‍ट्रॉनॉमीकल सोसायटी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित मुलाखतीत मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटी परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ३ जुलै रोजी मेळघाटवरील मोहर पद्मश्री मा डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री मा डॉ. स्मिताताई रवींद्र कोल्हे यांची मुलाखत कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून परभणीच्या जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल ह्या होत्या तसेच समाजसेविका डॉ. समप्रियाताई राहूल पाटील, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माइल यांची उपस्थिती होती. डॉ. रामेश्वर नाईक व डॉ. रणजित चव्हाण यांनी उभयतांनी मुलाखत घेतली.

सातपुड्याच्या पर्वतरांगेत बैरागड ह्या ठिकाणी डॉक्टर दापत्यांनी कसा आपला संसाराचा बगीचा फुलवला व तेथील गरजू लोकांना वैद्यकीय सेवा दिली, गडचिरोली कसे कुपोषण मुक्त केले हे अगदी हसत खेळत मुलाखतीच्‍या माध्‍यमातुन सांगितले. कामाबद्दल आपली एकनिष्ठता व त्या कामात झोकून देण्याची प्रवृत्ती कशी असली पाहिजे ते करत असताना आपण किती कणखर व ठाम राहिले पाहिजे हे डॉ. रवींद्र कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना व समोरील श्रोत्यांना सांगितले. डॉ. कोल्हे यांनी शेतीविषयक पण भरपूर ज्ञान दिले. शेतीला कमी समजणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा मुलगा आज कसा करोडोचे उत्पन्न घेऊन शेतीमध्ये करिअर करत आहे हे पण त्यांनी पटवून दिले. कोल्हे दाम्पत्याने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेन सर्वस्व झोकुन देऊन कसं काम केलं,परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींना समाजातील स्वार्थ लोलुपता, भ्रष्टाचार आणि अन्य काही कारणांमुळे आपलं काम करत असताना किती संकटे आली आणि त्यामध्ये त्यांच्या चांगल्या कामाची ज्या लोकांना जाणीव होती त्यांनी कशी साथ दिली, ह्याचे किस्से त्यांनी सांगितले. सामाजिक क्षेत्रात वावरताना अगदी टोकाचे कडेलोटाचे अनुभव त्यांच्याही वाट्याला आले.

डॉ. स्मिता रवींद्र कोल्हे यांनी मुलींना दिसण्यापेक्षाही विचारात मॉडर्नपणा व निर्भीडपणा असावा व संसार करत असताना जोडीदाराला कशी साथ द्यावी व आपल्या मुलांचे संगोपन करत असताना आपण किती कष्ट केले व मुलांना घडवले हे त्यांनी त्यांच्या जीवनपटातून पटवून दिले. कितीही संकट व अनुकूल परिस्थिती आली तरी आपण आपल्या विचारांशी व ध्येयाशी कधीही तडजोड करू नये,असे त्या सांगत होत्या. राष्ट्राविषयी व समाजाविषयी आपले काही देणे लागते, त्याचे भान ठेवून प्रत्येकाने जर काम केले तर हे राष्ट्र पुढे जाईल. समस्या आपणच तयार करतो, गरजा छोट्या असतील तर समस्या पण छोट्या होतील. जीवन सरळ व आनंदीमय होईल. तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही करा जगण्यासाठी मिरीट कामी येत नाहीत तर जीवन जगण्यासाठी व्यवहारिक ज्ञान व समय सुचकता असणे आवश्यक आहे.

डॉ रविंद्र कोल्‍हे आणि डॉ स्मिताताई कोल्‍हे दोघेही मिळून त्यांना ज्या क्षणी जे योग्य वाटलं तसं ते जगत गेले. आयुष्यात जे जसं अंगावर आलं तसं ते झेलत राहिले.वाटेतले खाच खळगे ओलांडत राहिले .छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी आपल आयुष्य त्यांनी पणाला लावलं,पण प्राणपणाने लढताना प्रामाणिकपणे जगणं सोडलं नाही. हीच खरी आयुष्यभराची शिदोरी त्यांनी परभणीकरांना दिली.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, गुरू हा समाजास दिशा देण्‍याचे  कार्य करतो, ज्‍यावेळी आपण गुरू होता, त्‍यावेळी आपणावर मोठी जबाबदारी असते. गुरूनी उदात्‍त दृष्‍टीकोन ठेवला पाहिजे. 

परभणीकर पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिताताई रवींद्र कोल्हे यांच्या मुलाखतीने मंत्रमुग्ध झाले. सदर मुलाखत व कार्यक्रम यशस्वीतेसाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सदस्य आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे अधिकार यांनी परिश्रम घेतले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात होत असलेल्या सायन्स पार्कच्या प्रांगणात पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, पद्मश्री डॉ. स्मिताताई कोल्हे, कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि, जिल्हाधिकारी मा. श्रीमती आचल गोयल आणि परभणी एस्ट्रॉनॉमीकल सोसायटी परभणी अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, उपाध्यक्ष पी आर पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये पद्मश्री वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.