Tuesday, July 4, 2023

समाजात महिलांचा सन्‍मान झाला पाहिजे ...... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या नाहेप प्रकल्‍प अंतर्गत आयोजित स्‍त्री-पुरूष समानता व आव्‍हाने यावरील कार्यशाळेचे उदघाटन

विविध क्षेत्रात महिला आपल्‍या कर्तव्‍याचा ठसा उमठवत असुन शेतकामात आजही महिलांचा मोठा वाटा आहे. आज कृषि शिक्षणात पन्‍नास टक्के पेक्षा जास्‍त मुलींचे प्रमाण असुन हे प्रमाण वाढतांना दिसत आहे. आजही समाजातील पुरूष प्रधान मानसिकता कमी झाली नसुन स्‍त्री शक्‍ती, बुध्‍दी आणि कर्तव्‍याचा समाजाने सन्‍मान केला पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) च्‍या वतीने स्‍त्री-पुरूष समानता आणि आव्हाने” याविषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे दिनांक ४ ते ६ जुलै दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर मुख्‍य व्‍यक्‍त्‍या भारतीय कृषि संशोधन संस्थेच्‍या सुक्ष्‍मजीवशास्‍त्र विभागाच्‍या माजी विभाग प्रमुख डॉ. के. अन्नपुर्णा, विशेष अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, प्राचार्य डॉ. भगवान आसेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मुख्‍य व्‍यक्‍त्‍या डॉ के अन्‍नपुर्णा म्‍हणाल्‍या की, आजही देशाची अर्थव्‍यवस्‍था शेतीवर अवलंबुन असुन शेतीतील कामे मोठया प्रमाणावर महिलाचा करतात, परंतु त्‍याप्रमाणे त्‍यांना पुरूषाप्रमाणे समान दर्जा दिला जात नाही. समाजातील स्‍त्री व पुरूष हे नाण्‍याच्‍या दोन बाजु असुन महिला सक्षमीकरणाकरिता सर्वांनी कार्य करण्‍याची गरज आहे.

शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले म्हणाले की, स्‍त्री पुरूष समानता ही मुलभुत हक्‍क असुन स्‍त्रीयांना विकासाच्‍या समान संधी मिळाल्‍या पाहिजेत.    

यावेळी डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली तर प्रास्ताविकात आयोजक डॉ. भगवान आसेवार यांनी प्रशिक्षणांचा उद्देश व माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयोजन सचिव डॉ. विना भालेराव यांनी केले. सदर प्रशिक्षणासाठी ६६ पदव्युत्तर व आचार्य पदवी विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी नोंदवीला आहे. प्रशिक्षणाचा उद्देश शैक्षणिक क्षेत्रात स्‍त्री पुरूष असमानत या विषयाची जागरुकते करून  शैक्षणिक संस्थामधील शैक्षणिक वातावरण हे लिंगभेदरहित तसेच मानविय मुल्यांचे जतन करणे हे होय. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाहेपच्या अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.