Thursday, October 12, 2023

पेठ बाभळगाव ता.पाथरी येथे जागतिक कापूस दिन साजरा

वनामकृवितील कापूस संशोधन योजनाचा उपक्रम 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत (आयआरएम) मौजे पेठ बाभळगाव (ता.पाथरी जि.परभणी) येथे जागतिक कापूस दिवस दिनांक ७ ऑक्‍टोबर रोजी साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या तसेच मराठवाड्याच्या शेतीच्या अर्थकारणात कापसाला खूप महत्त्व असुन भारताप्रमाणेच जगातील अनेक देशात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे दरवर्षी ०७ ऑक्टोबर हा दिवस जागतिक कापूस दिन म्हणून साजरा केला जातो.

कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि आणि संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्प परभणी जिल्ह्यातील मौजे पेठ बाभळगाव, लोणी व टाकळगव्हाण (ता.पाथरी) आणि खानापूर व पिंगळी (ता. परभणी) या गावांमध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. 

प्रकल्पाअंतर्गत प्रत्‍येक गाव १२ शेतकरी याप्रमाणे एकूण ६० शेतकऱ्यांच्या शेतावर गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना जैविक कीटकनाशके, ट्रायकोकार्डस, कामगंध सापळे आणि रासायनिक कीटकनाशके यासारख्या निविष्ठा वाटप करण्यात येत आहेत. दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी या प्रकल्पांतर्गत मौजे पेठ बाभळगाव येथे प्रकल्पातील शेतकऱ्यांकरीता जागतिक कापूस दिनाचे औचित्य साधून  गटचर्चा आणि प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कापूस संशोधन योजनाचे प्रभारी अधिकारी तथा कापूस कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक जाधव यांनी शेतकऱ्यांना कापूस लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी केवळ कापसाचे झाड मोठे करण्यापेक्षा कापसाच्या झाडाला जास्तीत जास्त पाते, फुले व बोंडे लागून ते कसे टिकतील याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे नियोजन करावे. त्याकरिता त्यांनी घनपद्धतीने लागवड, शेंडा खुडणे, पातेगळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्सची फवारणी तसेच गळ फांद्या काढून योग्य खत व्यवस्थापनाद्वारे उत्पादनात कशी वाढ करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. तसेच याच पद्धतीने विद्यापीठात घेण्यात आलेल्या कापसाच्या  विविध प्रयोगांना शेतकऱ्यांनी भेट देऊन त्याविषयी माहिती घ्यावी असेही त्यांनी आवाहन केले. प्रकल्प समन्वयक तथा सहाय्यक किटकशास्त्रज्ञ डॉ.दिगंबर पटाईत यांनी उपस्थितांना प्रकल्पाचे महत्त्व तसेच कपाशीमध्ये कीड व्यवस्थापन करताना कीटकनाशकांचा होणारा अवाजवी वापर कमी करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कीड व्यवस्थापन करावे जेणेकरून आपल्या फवारणीच्या संख्येत कमी येऊन पर्यायाने पैशांची बचत होईल तसेच मानवी व आपल्या पर्यावरणाचे आरोग्याचाही समतोल राहील तसेच किडींचा योग्य बंदोबस्त हि होईल याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमास पेठ बाभळगाव गावातील श्री. रूखमानंद लव्हाळे, श्री.सुदामती रणेर, श्री.संतोष ठोंबरे, श्री.लक्ष्मण गिरी व श्री.स्वराज गिराम, टाकळगव्हाण या गावातून श्री.परमेश्वर तायनाक, श्री. रोहिदास फुन्ने, श्री.दिपक महिपाल, श्री.माऊली फुन्ने, व श्री.राजेभाऊ तायनाक तर लोणी गावातील श्री.रमेश फुके, श्री.मुंजाभाऊ धर्मे व श्री.कैलाश चामनूर श्री.अजय फुके व श्री.दत्ता गिराम यांच्यासह तीनही गावातून एकूण ५० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थितीत होती. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री.रूखमानंद लव्हाळे यांच्या कापूस प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.बाबासाहेब रणेर व श्री.रमेश लव्हाळे यांनी परीश्रम घेतले.