Saturday, August 22, 2020

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात अवयवदान जनजागृती ऑनलाईन वेबिनार

मरावे परि अवयवरुपी उरावे – मा. कुलगुरू डॉ. अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि ि‍वद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने मार्फत “अवयवदान जनजागृती” सप्ताह निमित्त अवयवदान या विषयावर जनजागृतीसाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २० ऑगस्ट रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिध्द बालरोगतज्ञ आणि या विषयावरील कार्य करणारे डॉ. संदीप कार्ले यांनी मार्गदर्शन केले. सदरील वेबिनारचे मुख्य आयोजक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके हे होते.

मार्गदर्शनात डॉ. संदीप कार्ले म्हणाले कि, देहदानाची ही संकल्पना आपल्या समाजात अजूनही म्हणावी तशी रुजलेली नाही त्यामुळे कधी धर्माचा विरोध म्‍हणून तर कधी  आप्तस्वकीयांच्या देहाची चिरफाड करू द्यायला मन धजावत नाही किंवा देह्दानाबाबात्च्या गैरसमजामुळे देहदानाला विरोध करतात. समाजात अनेक गरजवंत व्यक्ती आहेत कि ज्यांना अवयवदानामुळे जीवनाची नवसंजीवनी मिळेल. त्यामुळे त्वचा, डोळे, हृदय, फुफ्फुस, यकृत, किडनी आदी मानवी अवयवांचे मरणोत्तर दान करून अनेक व्यक्तींना नवीन जीवन मिळू शकते. डॉ. संदीप कार्ले यांनी अवयवदानाची शास्त्रीय दृष्टीकोनातून विस्तृत अशी माहिती सर्व उपस्थितांना दिली. मृत्यूनंतर २ ते ३ तासात त्वचादान करणे चांगले असते. डॉक्टर दात्याच्या घरी येऊन अर्ध्या तासाची शस्त्रक्रिया करतात तेव्हा रक्ताचा थेंबहि येत नाही, तसेच दात्याचा देहही विद्रूप होत नाही. त्वचादानामुळे अॅसिडने अथवा आगीत होरपळून जखमी झालेल्या अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येतात. प्रक्रिया केलेली त्वचा टिकवून ठेवता येते. त्वचादानानंतर लगेच नेत्रदान करणे चांगले असते. नेत्रदानानंतर कृत्रिम नेत्र बसवतात, त्यामुळे देह विद्रूप होत नाही. नेत्रदानातून मिळालेल्या कॉरनियाच्या उपयोगाने दोन वा अधिक अंध व्यक्तींनादृष्टी मिळू शकते. मोतीबिंदू ऑपरेशन झालेली, चष्मा वापरणारी, रक्तदाब/मधुमेह पिडीत व्यक्तीही निधानंतर नेत्रदान करू शकतात. नेत्रादानानंतर कोर्निया प्रयोगशाळेत तपासून प्रक्रिया करून त्याचे ४८ तासात प्रत्यारोपण केले जाते.

अध्यक्षीय भाषणात मा. कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, अवयवदानाने समाजातील जाती धर्मातील विषमता दूर होऊन बंधुत्वाची भावना वाढीस लागण्यास मदत होईल. मृत्यूनंतर हि आपला देह मानवी कल्याणाकरिता उपयोगी पडावा, ही प्रेरणा केवळ देहदान व अवयव दानातून निर्माण होते. तसेच आपला वेळआयुष्य इतरांच्या भल्यासाठी खर्च करणारी, गरजूंच्या मदतीला धावणारी अनेक देवमाणसे आपल्या समाजात आहेत. गरजू व्यक्तींची मदत करून इतरांच्या कामी येण्याचा संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला असतो. देहदान व अवयवदानाच्या मार्गाने अशा व्यक्तींना त्यांच्या मनाचे मोठेपण मरणोत्तर सुद्धा जपता येऊ शकते. अश्या प्रकारे देहदानाचे महत्त्व समजावून सांगताना त्यांनी “मरावे परि अवयव रुपी उरावे” असा संदेश दिला.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी अवयव दानाविषयीची वास्तविकता सर्व समाज घटकांना विशेषता तरुण पिढीला माहिती होऊन जनजागृती व्हावी, याबाबतचे गैरसमज दूर व्हावे व सर्व घटकांचे मदतीने या चळवळीला बळ प्राप्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले तर आभार प्रा. संजय पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रा. विवेकानंद भोसले, नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाल शिंदे, प्रा. विणा भालेराव,  रश्मी बंगाळे, रवी कल्लोजी यांनी सहकार्य केले. 

कार्यक्रमात डॉ. राहुल रामटेके, प्रा.भास्कर भुइभार, डॉ. स्मिता खोडके, डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. हरीश आवारी, डॉ. सुभाष विखे, प्रा. भालचंद्र सावंत, प्रा. पंडित मुंढे, डॉ. सुमंत जाधव, प्रा. मधुकर मोरे, प्रा.प्रमोदिनी मोरे, प्रा.दत्ता पाटील, प्रा. विशाल इंगळे, प्रा. श्याम गरुड, लक्ष्मीकांत राऊतमारे आदीसह. विद्यार्थी, प्राध्यापक, प्रतिष्ठित व्यक्ती, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.