Saturday, August 17, 2013

शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा ……… डॉ. आर.पी. कदम


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणीच्‍या तण व्‍यवस्‍थापन केंद्राद्वारे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचा उपक्रम म्‍हणुन पिंगळी ता. परभणी येथे खरीप मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. शेतकरी मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच श्रीमती उज्‍वलाताई खाकरे तर विशेष अतिथी म्‍हणून उपसरपंच श्री  अंगद अंबादासराव गरुड हे उपस्थित होते. या मेळाव्‍यात विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
      ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचा उपक्रम प्रभारी डॉ. आर. पी. कदम ह्यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतक-यांनी अवलंब करावा आणि कृषि विद्यापीठास वेळोवेळी शेतक-यांनी भेटी द्याव्‍यात असे आवाहन केले. शेतकरी मेळाव्‍यात डॉ. अ.पी. सुर्यवंशी यांनी एकात्मिक पिक रोग नियंत्रण ह्या विषयावर शेतक-यांना विस्‍तृत माहिती दिली. तसेच डॉ. डी. आर. कदम यांनी कापूस व सोयाबीन वरील किड व्‍यवस्‍थापनावर सविस्‍तर मार्गदर्शन केले. डॉ.यु.एन.आळसे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करुन एकरी 100 टन ऊस उत्‍पादन करण्‍याचा शेतक-यांना मंत्र दिला. डॉ. अ. एस. जाधव यांनी एकात्मिक तण नियंत्रण या विषयांवर शेतक-यांना मार्गदर्शन करून विविध पिकांसाठी वापरण्‍यात येणा-या तणनाशकांची काळजी व त्‍याचा वापर कसा करावा या बाबतीत माहिती दिली. या प्रसंगी प्रत्‍यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करण्‍यात आले. मेळाव्‍याचे सूत्रसंचलन श्री विकास हाके यांनी तर प्रा. एस. एल. बडगुजर यांनी उपस्थितांच आभार मानले. मेळाव्‍यास मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. तण नियंत्रण योजना केंद्राचे कृषिदुत श्री निलेश क्षिरसागर, राहुज मुवेक, सुनिल जावळे, सचिन नावकर, शाम शिंदे, शिवप्रसाद चव्‍हाण, महेश जुगनाके, प्रकाश खटींग, गजानन दासरवाड, शिवराज भांगे, भालचंद्र म्‍हस्‍के, विलास झाटे, दिनेश जगताप, प्रसाद धनवे, ओम देशमुख या विद्यार्थ्‍यांनी मेळावा यशस्‍वीतेसाठी परिश्रम घेतले.

Friday, August 16, 2013

‘विद्यापीठ आपल्‍या दारी : तंत्रज्ञान शेतावरी’ विशेष विस्‍तार कार्यक्रमास प्रारंभ



      वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्‍यासाठी मा. कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या संकल्‍पनेतून व विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या परिश्रमातून विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी हा विशेष विस्‍तार शिक्षण कार्यक्रम संपूर्ण मराठवाडयात 2011 पासून यशस्‍वीपणे राबविण्‍यात आला. मागील दोन वर्षीचे यश लक्षात घेऊन याही वर्षी हा कार्यक्रम मा. संचालक, विस्‍तार शिक्षण डॉ. अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मराठवाडा विभागात विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्राच्‍या माध्‍यमातून व सर्व महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्‍या सहकार्याने राबविण्‍यात येणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी मा. श्री.सोपानरावजी अवचार हे प्रमूख पाहूणे होते तर शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ.विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.अशोक ढवण, कुलसचिव श्री. का. वी. पागीरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, कृषि अभियांत्रीकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ उदय खोडके  उपविभागीय कृषि अधिकारी श्री. पी. एच. मालेगावकर यांची प्रमूख उपस्थिती होती.
      याप्रसंगी उद घाटनपर भाषणात मा. कुलगुरु डॉ. किशनरावजी गोरे म्‍हणाले की, विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांना उपयोगात आले तरच त्‍याला मूल्‍य आहे, मागील दोन वर्ष या कार्यक्रमास शेतक-यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्यास गती प्राप्‍त झाली. विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ शिक्षण व संशोधनाची जवाबदारी सांभाळून या विस्‍तार कार्यक्रमात मोलाचा सहभाग देत आहेत. यावर्षी या कार्यक्रमात गृहविज्ञान महाविद्यालय व अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयातील शास्‍त्रज्ञांचा समावेश करण्‍यात आला आहे. यामूळे शेतकरी महिलावर्गांना मार्गदर्शन होणार आहे. तसेच प्रकिया उद्योगावर अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयातील शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सध्‍या शेतक-यांना किड व रोगाचे व्‍यवस्‍थापण, मृद व जलसंधारण तंत्रज्ञान व येणा-या रबी हंगामाचे नियोजन याबाबत शास्‍त्रज्ञांचे मार्गदर्शन उपयुक्‍त ठरणार आहे.
      याप्रसंगी प्रमूख पाहूणे श्री. सोपानराव अवचार म्‍हणाले की, शेतक-यांना शेतीत अनेक संकटांना सामोरे जावे लागते तसेच हि संकटे अचानक येतात, त्‍या प्रसंगी विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांचे शेतावरील प्रत्‍यक्ष भेट व सल्‍ला मोलाचा ठरतो. हा कार्यक्रम वर्षभर राबविणे आवश्‍यक आहे.
      विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी हा शेतक-यांच्‍या गरजेवर आधारित काटेकोर विस्‍तार कार्यक्रम असून या कार्यक्रमाची नोंद राजभवनाने सुदधा घेतली आहे. हा कार्यक्रम व्‍यापक व कायमस्‍वरुपी राबविण्‍याचा मानस विद्यापीठाचा आहे.
      उद घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. उदय वाईकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. अनिल गोरे यांनी केले. या प्रसंगी विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ व अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍येन उपस्थित होते. कार्यक्रम यशसवीतेसाठी डॉ.डि.डी.पटाईत, डॉ.बि.के.आरबाड, श्री.एस.बी.जाधव, श्री. आर.एल.औंढेकर, डॉ.महेश वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
      विद्यापीठ आपल्‍या दारी: तंत्रज्ञान शेतावरी या कार्यक्रमामध्‍ये छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रश्‍न–उत्‍तरे अशा स्‍वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार असून हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण, एकात्मिक शेती पध्‍दती, मृद व जलसंधारण इ. विषयांवर तसेच रबी हंगामाचे नियोजन यावर शेतक-यांची शास्‍त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. मागणी आधारित काटेकोर विस्‍तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्‍वरुप राहणार आहे.शेतक-यांचे तातडीचे प्रश्‍न आणि शेतक-यांचे समाधान प्रत्‍यक्ष विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञाकडुन होणार आहे. यामुळे शेतक-यांमध्‍ये उमेद निर्मिती होणार आहे. सदरील कार्यक्रम परभणी व हिंगोली जिल्‍हयांसाठी 16 ऑगस्‍ट 2013 ते 03 सप्‍टेंबर 2013 कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र तथा परभणी येथील विभागीय कृषि विस्‍तार शिक्षण केंद्राच्‍या मार्फत राबविला जाणार आहे. या दोन जिल्‍हयांसाठी शास्‍त्रज्ञांचे एकूण तीन चमू तयार करण्‍यात आले असुन साधारणता 110-115 गावांत राबविण्‍यात येणार आहे.

Thursday, August 15, 2013

हिंगोली जिल्हातील गोळेगांव ता. औंढे नागनाथ येथील घटक कृषि महाविद्यालयात मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गोळेगांव ता. औंढे नागनाथ जि. हिंगोली येथील  घटक कृषि महाविद्यालयात 67 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागिरे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ विलास पाटील, सहयोगी संचालक डॉ डि बी देवसरकर, नियत्रंक श्री ना ज सोनकांबळे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ ना ध पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा विशाला पटणम, अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे डॉ पा नि सत्‍वधर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ शि बा रोहीदास, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, औंढे नागनाथ येथील प्रतिष्टीत नागरिक व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
याप्रसंगी मा कुलगुरू डॉ किशनराव गोरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रात सर्वाच्‍या सहकार्याने उल्‍लेखनिय कार्य केले आहे. राष्ट्रिय पातळीवर विद्यापीठाच्‍या कार्यामुळे नावजले जात आहे. आपण सर्वांच्‍या सहकार्याने विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रिय पातळीवर नेण्‍यासाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांना उच्‍च कृषि शिक्षणाची संधी उपलब्‍ध म्‍हणुन गोळेगांव ये‍थील कृषि महाविद्यालय गेल्‍या शैक्षणिक वर्षात सुरू करण्‍यात आले आहे. महाराष्‍ट्र शासनाने नुकतेच या महाविद्यालयसाठी 28 शिक्षकवर्गीय व 37 शिक्षकेत्‍तर असे एकुण 65 पदांना मान्‍यता दिली आहे. महाविद्यालयाच्‍या पायाभुत विकासासाठी पुढील पाच वर्षासाठी 38 कोटी रूपये अनुदान मंजुर केले आहे. शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा व पावित्र्य कायम ठेवण्‍याची जबाबदारी विद्यार्थी, प्राध्‍यापक व विद्यापीठावर आहे, सर्व प्राध्‍यापकवृंदानी आव्‍हाणाना सामोरे जाण्‍यासाठी आपल्‍या विषयातील अद्यावत ज्ञान प्राप्‍त करावे व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधन करावे असा सल्‍लाही त्‍यांनी दिला. 

विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रिय पातळीवर नेण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत....... मा. कुलगूरू डॉ किशनराव गोरे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 67 वा स्‍वातंत्रय दिन साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी कृषि महाविद्यालयाच्‍या मुख्य मैदानावर विद्यापीठाचे मा. कुलगूरू डॉ किशनरावजी गोरे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ विश्‍वास शिंदे, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, कुलसचिव श्री का वि पागिरे, सहयोगी संचालक डॉ डि बी देवसरकर, नियत्रंक श्री ना ज सोनकांबळे, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ ना ध पवार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्या प्रा विशाला पटणम, अन्‍नतंत्र महाविद्यालयाचे डॉ पा नि सत्‍वधर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ शि बा रोहीदास, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ बी एम ठोंबरे, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
या प्रसंगी मा कुलगुरू डॉ किशनरावजी गोरे आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, विद्यापीठाने कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रात सर्वाच्‍या सहकार्याने उल्‍लेखनिय कार्य केले आहे. राष्ट्रिय पातळीवर विद्यापीठाच्‍या कार्यामुळे नावजले जात आहे. आपण सर्वांच्‍या सहकार्याने विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रिय पातळीवर नेण्‍यासाठी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. यावर्षी वरूणराजाच्‍या कृपादृष्‍टीने चांगला पाउस झाला असुन पावसाचा पडणारा प्रत्‍येक थेंबा महत्‍व लक्षात घेता भविष्‍यात मुलस्‍थानी जलसंवर्धनासाठी सुयोग्‍य नियोजन करावे लागणार आहे. सध्‍या विद्यापीठात 40 टक्‍के मनुष्‍यबळाची कमतरता असतांना ही कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार क्षेत्रात नावीन्‍यपुर्ण उपक्रम राबवीण्‍यात येत आहे. यावर्षी देखिल परभणी व बदनापुर येथील कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यानी यशाची परंपरा कायम ठेउन कनिष्ठ संशोधन शिष्‍यवृत्‍ती परिक्षा राष्‍ट्रीय पातळीवर कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन व वनस्‍पतीशास्‍त्र या विषयात प्रथक क्रमांक पटकावला आहे. कृषि शास्‍त्रज्ञांच्‍या अथक परिश्रमामुळे विद्यापीठाचे कार्य गतीमान झाले आहे. सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात बदनापुर येथे पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमास सुरूवात होणार असुन यामुळे विद्यापीठाच्‍या संशोधनाला बळकटी मिळणार आहे.

विद्यापीठाच्‍या संशोधन संचालकपदी डॉ दत्‍तप्रसाद वासकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्‍या संशोधन संचालकपदी डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. दिनांक 13 ऑगस्‍ट 2013 रोजी त्‍यांनी या पदाचा कार्यभार स्‍वीकारला. यानिमित्‍त संशोधन संचालनालयातर्फे स्‍वागताचा कार्यक्रम घेण्‍यात आला. डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी शिक्षण व संशोधनात विविध पदावरील 25 वर्षाचा अनुभव असुन डा‍ळिंब, अंजीर, सिताफळ इत्‍यादी फळपिकात त्‍यांनी विशेष संशोधन केले आहे. यापूर्वी त्‍यांनी पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद येथे शिक्षण संचालक या पदावर कार्य केले आहे. सत्‍काराला उत्‍तर देतांना ते म्‍हणाले की, या विभागातील शेतकरी तूर, कापूस व सोयाबीन पिकावरच अवलंबुन न राहता डाळिंब, अंजीर व सिताफळ यासारख्‍या कोरडवाहू फळपिकांची लागवड करुन आपली आर्थिक उन्‍नती केली पाहिजे. कृषि संशोधनाची गती वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संशोधन उपसंचालक डॉ. आनंद कारले यांनी केले. या प्रसंगी विद्यापीठातील विविध संशोधन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. या  नियुक्‍तीबद्दल विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ किशनरावजी गोरे यांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Wednesday, August 14, 2013

जलालपुर येथे वृक्षारोपन


वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जलालपुर येथे जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामस्‍थ यांच्‍या सौजन्‍याने वृक्षारोपन कार्यक्रम घेण्‍यात आला. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जलालपुर येथील प्रगतशील शेतकरी डॉ. बाळासाहेब जटाळ आणि कृषि हवामानशास्त्र विभागाचे शास्‍त्रज्ञ तथा कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. एम. खोब्रागडे, श्री. औंढेकर हे उपस्थित होते.
ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे विविध कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार यांच्‍या सूचनेनुसार आणि ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे समन्‍वयक तथा विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. एम. ठोंबरे व प्रभारी अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्‍या मार्गदर्शनाने घेण्‍यात आला.

श्री गंगाधर टेकाळे, श्री ज्ञानोबा कोके, श्री पट्टेवार, श्री मुख्‍तार शेख, श्री शेटगार व ग्रामस्‍थ मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी ज्‍वार संशोधन केंद्राचे कृषिदुतांनी परिश्रम घेतले. 

कृषि हवामानशास्त्र विभागास डॉ. बापुजी राव यांची भेट


दिनांक १४ ऑगस्‍ट २०१३ रोजी केंद्रीय कोरडवाहु संशोधन संस्‍था, हैद्राबाद येथील अखील भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पाचे प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ. बापुजी राव यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि हवामानशास्‍त्र विभागास भेट दिली. या प्रसंगी विभागाच्‍या प्रक्षेत्रावर अखील भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्‍पातील सोयाबीन व कापुस पीक प्रयोगाची पाहाणी केली. या प्रसंगी कृषि हवामानशास्‍त्र विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ.बी.व्‍ही.आसेवार, कृषि हवामानशास्‍त्रज्ञ प्रा.एम.जी.जाधव यांनी प्रयोगाबददल माहिती डॉ. बापुजी राव यांना दिली. डॉ. राव यांनी विभागातंर्गत चालु असलेल्‍या इतर संशोधन योजना व पदयुत्‍तर विद्यार्थ्‍याच्‍या प्रयोगाचा आढावा घेउन शास्‍त्रज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषि हवामानशास्‍त्र विभागाचे प्रा. पी. आर. जायभाये, प्रा. ए. एम. खोब्रागडे, प्रक्षेत्र अधीक्षक श्री. जी. एन. गोटे व श्री. ए. आर. शेख उपस्‍थीत होते.