Tuesday, September 24, 2013

शेतक-यांनी माती परिक्षण करूनच खतांचा संतुलीत वापर करावा.....डॉ. व्हि. डी. पाटील



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय कोरडवाहु संशोधन केंद्र यांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकंन्‍यानी मौजे बाभुळगांव येथे रबी शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन दिनांक 23.09.2013 रोजी करण्‍यात आले होते. कार्यक्रमास अध्‍यक्ष म्‍हणुन गांवचे सरपंच सौ. कुंताताई विठ्ठलराव पारधे तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील व मुख्‍य शास्‍त्रज्ञ श्री सु. भा. चौलवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्‍तावना डॉ.आर.पी.कदम यांनी केली.
अधिक उत्‍पादनासाठी माती परिक्षण अत्‍यंत आवश्‍यक असुन एक वेळेस माती परिक्षण केल्‍यास तीन वर्ष त्‍याच्‍या आधारे खताचे नियोजन करता येते. सर्व शेतक-यांनी माती परिक्षण करूनच खतांचा संतुलीत वापर करण्‍याचा सल्‍ला कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ. व्हि. डी. पाटील यांनी आपल्‍या भाषणात दिला. डॉ. मेघा सुर्यवंशी यांनी करडई पिक लागवड तंत्रज्ञान व त्‍याची उपयुक्‍तता याबद्दल मार्गदर्शन केले; प्रा. सौ. एस. यु. पवार यांनी तण व्‍यवस्‍थापनांतर्गत विविध तणनाशके व त्‍याचा वापर ह्याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. डि. आर. कदम यांनी एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन तर डॉ. ए. पी. सुर्यवंशी यांनी ए‍कात्मिक रोग व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन केले. मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. चौलवार ह्यांनी कोरडवाहु पिकाबद्दल शेतक-यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रश्‍नोत्‍तराच्‍या माध्‍यमातून शेतक-यांच्‍या शंकाचे समाधान करण्‍यात आले यावेळी गांवातील 100 ते 150 शेतकरी उपस्थित होते. मेळावा यशस्‍वी करण्‍यासाठी कृषिकन्‍या स्‍वाती आमले, शितल देशमुख, अनिता देशमुख, वैशाली देशमुख, सत्‍यभामा घाटुळ, अश्विनी गाडेकर, अल्‍का ढवळे, श्रुती जोगु, ज्‍योत्‍स्‍ना कुमारी, प्रियंका चव्‍हाण, प्रियंका कदम, सुरेखा कडेकर, शुभांगी कळंबे, वैशाली काळे, प्रियंका खटींग, ज्‍योती खुपसे, मधुरा कुलकर्णी, अश्विनी कुबडे, सरोजना पटेवाड, प्रितीमाला या सर्व कृषिकन्‍यांनी परिश्रम घेतले.