Saturday, July 16, 2022

सतत आणि अति पाऊसाच्‍या परिस्थितीत खरीप पिकांची घ्यावयाची काळजी

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा खरीप पिकांचे व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला

मराठवाडयात मागील पाच ते सहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे, सुर्यदर्शन सुद्धा झाले नाही. त्यामुळे खरीपातील पिके जसे की सोयाबीन, कापूस आणि तुर यांची वाढ खुंटली असुन पाने पिवळे पडत आहेत. अशा परीस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच अशा परिस्थितीमध्ये  सोयाबीन, कापुस आणि तुर पिकांमध्‍ये पुढील प्रमाणे उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ गजानन गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ दिगंबर पटाईत आणि श्री मधुकर मांडगे यांनी दिला आहे.

सोयाबीन मध्‍ये करावयाचे व्‍यवस्‍थापन

सध्या सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे, मुख्‍यत: चुनखडीयुक्त जमिनीत किंवा पांढरीच्या जमिनीत लागवड केलेल्या ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पिकाला सुर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली आहे आणि जमिनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थीतीमध्ये सर्व प्रथम शेतामधून पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावे. वापसा परिस्थिती आल्यावर कोळपणी करावी, यामुळे पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते तसेच काही प्रमाणात तण व्यवस्थापन ही होते. या व्यतिरीक्त सुक्ष्मअन्नद्रव्य ग्रेड-२ ची ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी करावी. पहिल्या फवारणीने जर सोयाबीनची पाने हिरवी नाही झाली तर परत आठ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

पावसामुळे वाणी किंवा पैसा या किडीचा नैसर्गिकरीत्या बंदोबस्त होतो परंतु शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी अशा शंखी गोगलगायी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायीच्या नियंत्रणाकरीता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगाय नाशक २ किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये, बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरवून द्यावे. पाणी साचलेल्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी विद्यापीठ निर्मीत उपयुक्त सुक्ष्मजीवयुक्त बायोमिक्स औषधाची ४ किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.

सोयाबीन मध्ये खोडमाशी व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोफेनोफॉस ५० टक्के २० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के अधिक थायमिथोक्झाम १२.६ टक्के ५० मिली प्रति एकर फवारावे.

कापूस पिकात करावयाचे व्‍यवस्‍थापन

कापूस पिकामध्ये पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतात प्रत्येक एक ओळ सोडून लहान चर काढावेत. आकस्मिक मर किंवा मूळकूज दिसू लागल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम अधिक युरीया २०० ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेवून हे द्रावण झाडांच्या मुळांजवळ प्रति झाड १०० मिली द्यावे.

तसेच पीक ३० ते ४० दिवसाचे झाले असल्यास दोन टक्के युरीयाची फवारणी करावी यासाठी २०० ग्रॅम युरीया प्रति १० लिटर पाणी असे प्रमाण वापरावे. पिकाची वाढ पुर्ववत होऊन पात्या लागण होण्यासाठी पिक ४० ते ४५ दिवसाचे झाल्यावर नत्राचा पहिला हप्ता द्यावा. त्यासाठी कोरडवाहू कपाशीकरीता ३१ किलो तर बागायती कपाशीकरीता ५१ किलो निमकोटेड यूरीया प्रति एकरी द्यावा. खत पाण्याचा निचरा झाल्यावरच द्यावे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात लागवड केलेला कापूस सध्या पाते अवस्थेत असल्यास आणि अशा परिस्थितीत जर पातेगळ होत असेल तर याच्या नियंत्रणाकरीता एनएए या संजीवकाची ४० मिली प्रति १८० लिटर पाणी या प्रमाणे प्रति एकरी किंवा २.५ मि.ली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी यामुळे पातेगळ थांबण्यास मदत होते.

कपाशीवर रसशोषण करणा-या किडी विशेषत: मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा व्हर्टीसिलीअम लिकॅनी ४० ग्रॅम किंवा अॅसीटामाप्रीड २० टक्के ६० ग्रॅम किंवा डायमिथोएट ३० टक्के २६० मिली प्रती एकर फवारावे.

तुर पिकात करावयाचे व्‍यवस्‍थापन

तुर हे पीक अति पाऊसास संवेदनशील आहे. म्हणूनच तुरीच्या शेतातील साचून राहीलेले पाणी ताबडतोब शेताबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे.

तुर पिकात फायटोप्थेरा मर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मर ग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी तसेच चारी बाजूनी एक मिटर अंतरावर कार्बेडेंझीम २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. तसेच जिथे कुठे मर रोगाची सुरूवात होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम अधिक युरीया २०० ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेवून झाडांच्या मुळांना प्रति झाड १०० मिली द्यावे.

ज्या ठिकाणी हुमणी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मेटारायझीयम ४ किलो प्रति एकर या प्रमाणे जमिनीतून द्यावे.

 

सौजन्‍य

डॉ.गजानन गडदे (विस्तार कृषि विद्यावेत्ता),

डॉ.दिगंबर पटाईत (किटकशास्‍त्रज्ञ) आणि श्री.मधुकर मांडगे (वरिष्ठ संशोधन सहाय्यक)

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी