Sunday, January 8, 2023

वनामकृविच्‍या कृषि अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांना ‘उत्कृष्‍ठ शास्त्रज्ञ’ पुरस्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय, बदनापूर कृषि विज्ञान केंद्र, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ जालना आणि नाबार्ड जालना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य दिनांक ३ जानेवारी रोजी बदनापूर कृषि विज्ञान केंद्रात महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि होते तर अन्नमाता सेंद्रिय शेती संशोधन व प्रसारक श्रीमती ममताबाई भांगरे या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ जया बंगाळे, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी उमेश कहाते, जिल्हा उपमहाव्यवस्थापक श्री तेजल क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्यात विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण, संशोधन आणि विस्ताराच्या माघ्यमातुन भरीव असे योगदानाबाबत कृषि अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांचे उत्कृष्‍ठ शास्त्रज्ञ म्हणून सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन कुलगुरूंच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी भाषणात माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की,  डॉ स्मिता सोलंकी यांनी अनेक बैलचलित व ट्रॅक्‍टर चलित अनेक अवजारे व यंत्रे विकसित केली असुन ही सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍यात नेहमीच तत्‍पर असल्‍याचे सांगुन त्‍यांना त्‍यांनी यंत्रमाता ही उपाधी देऊन सन्मान केला.

डॉ. स्मिता सोलंकी यांनी आजपर्यंत संशोधनाच्‍या माध्‍यमातुन ४० हुन जास्त बैलचलित, मनुष्‍यचलित तसेच टॅक्टर चलित अवजारांवर संशोधन करून ते शेतक-यांमध्ये प्रचलित केले व त्यांच्या त्या कार्यामुळे लहान तसेच मध्यम शेतकरी, आदिवासी यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला. त्यांनी रूंद वरंबा सरी यंत्र, बैलचलित सौर फवारणी यंत्र, विविध प्रकारचे कोळपणी यंत्र, गोशाळे मध्ये लागणारे यांत्रिकीकरण त्यासाठी भरीव असे योगदान दिलेले आहे. नवी दिल्‍ली येथील भारतीय कृशि अनुसंधान परिषदेचा विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत संशोधन प्रकल्प पशुक्तीचा योग्य वापर योजने मार्फत गो विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार, नागपूर येथे वनामकृवि विकसीत सुधारीत बैलचलित अवजारे तसेच बैलचलित रोटरी मोडवर शेवई मशिन, पिठाची गिरणी, पापड मशिन, मिर्ची कांडप इत्यादी अवजारांचे तंत्रज्ञान स्त्रोत्र केंद्र विकसीत केले आहे तसेच महाराष्‍ट्रात प्रथमच वनामकृवि विकसीत बैलचलित अवजारांचे भाडे तत्वावर केंद्र (कस्टम हायरिंग सेंटर) श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा, राणीसावरगांव येथे स्थापित करण्यामध्ये त्यांचे योगदान आहे. त्याचा फायदा राणी सावरगांव परिसरातील लघु व मध्यम शेतक-यांना होत आहे. ट्रॅक्टर चलित सुधारीत बीबीएफ यंत्र (फोर इन वन) चे प्रात्यक्षिके परभणी जिल्हयातील ७०० ते ८०० एकर क्षेत्रावर देऊन सदरील यंत्राद्वारे सोयाबीन, हरभरा पिकातील निविष्‍ठांची बचत, कमी श्रम व अधिक उत्पादनद्वारे शेतक-यांमध्‍ये आत्मनिर्भरता व आत्मविश्वास निर्माण केला. त्‍यांचे विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.