Sunday, January 15, 2023

बदलत्या हवामानात शाश्वत उत्पादनाकरिता एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अवलंब करा ...... संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांच्‍या पथकांनी दैठणा परिसरातील शेतकरी बांधवाच्‍या शिवार भेट देऊन केले मार्गदर्शन

हवामान बदल, जमिनीचे ढासळलेले आरोग्य, कीड व रोगांचा प्रश्न अशा अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे आहेत. बदलत्‍या हवामान तसेच जमीननुसार पीक व वाणांची निवड, एकात्मिक अन्नद्रव्य, कीड – रोग व्यवस्थापन  एकूणच एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संधोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने दिनांक १३ जानेवारी रोजी दैठणा (ता. जि. परभणी) परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. यांवेळी कृषी अभियंता डॉ. मदन पेंडके, कृषिविद्यावेत्ता डॉ. आनंद गोरे, श्री ऋषिकेश औंढेकर, श्री भागवत वाघ आदीसह परिसरातील शेतकरी बंधु-भगिनी यांनी सहभाग घेतला.

डॉ. दत्तप्रसाद वासकर पुढे म्हणाले की, आज हवामान बदल आणि बाजारभावातील चढउतार लक्षात घेवून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबतच चांगला बाजारभाव देणारे पीक फेरपालटीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या इतर अपारंपारिक पिकांचा विशेष करून दुर्लक्षित तेलबिया पिकांचा जसे जवस, तीळ, कारळ या पीकांचा लागवड केल्यास हवामान बदल तसेच बाजारभावाची जोखीम यावर मात करता येईल. बाजारपेठ व्यवस्थापन करत असताना परभणी सोबतच अकोला, नागपूर तसेच लातूर बाजारपेठेकडे शेतकरी बंधू-भगिनींनी माहिती घेऊन शेतमाल विक्री करण्‍याचा सल्‍ला देऊन त्यांनी वाणातील भेसळ ओळखणे, शुद्ध व दर्जेदार बियाण्याचा वापर, लागवडीची  रुंद वरंबा सरी पद्धत, एकात्मिक मुख्य अन्नद्रव्यां सोबतच सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर, कीड व रोगांचे व्यवस्थापन, काढणी व काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा माहिती दिली.

शिवारफेरी दरम्यान श्री भरतराव कच्छवे यांच्या भुईमूग शेतीस, श्री सितारामजी कच्छवे यांच्या मिरची लागवड, श्रीमती लक्ष्मीबाई कच्छवे यांच्या जरबेरा फुल शेतीस, श्री मुरलीधरराव इंगळे यांच्या सेंद्रिय शेतीस, आणि श्री अनंतराव कचवे यांच्या पेरूबागेस विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या पथकांनी भेट देऊन विविध विषयावर मार्गदर्शन केले. शिवारभेरी दरम्‍यान परिसरातील श्री. मुरलीधरराव इंगळे, श्री. दत्ता कच्छवे,  श्री. भागवत कुलकर्णी, श्री. सुनिल कुलकर्णी, श्री. दिलीप कच्छवे, श्री.  अर्जुन कच्छवे , श्री. बालासाहेब गोरवे, श्री. गणेश कच्छवे, श्री. हनुमान गायकवाड, श्री. कारभारी गायकवाड, श्री. चंद्रकांत कच्छवे, श्री. अनंतराव कच्छवे आदीसह शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. शिवार फेरी चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी श्री मुरलीधरराव इंगळे, श्री दत्ता कच्छवे, श्री भागवत वाघ यांनी परिश्रम घेतले.