देश-विदेशात नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची वाढती चर्चा... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद (ऑनलाईन) मालिकेत सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या " पीजीएस-इंडिया सेंद्रिय प्रमाणन " (PGS-INDIA Organic Certification) या योजनेविषयी माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते तर गाझियाबाद येथील राष्ट्रीय जैविक व नैसर्गिक शेती केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. वाचस्पति पांडेय यांनी या संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख आयोजक संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, डॉ. कैलास गाढे, डॉ. पपिता गौरखेडे यांची उपस्थिती होती.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, की नैसर्गिक तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास
अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी प्रमाणीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. सध्या
देश-विदेशात नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची चर्चा वाढत आहे. समाजात शाकाहारी आहाराला
प्राधान्य दिलं जात आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक उत्पादनांमधून मिळणारे पोषक घटक
अधिक लाभदायक ठरत आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यापीठ ‘शेतकरी
देवो भव:’ या भावनेतून कार्यरत आहे. या शेतकऱ्यांना नैसर्गिक व सेंद्रिय शेतीत
प्राविण्य मिळावे तसेच त्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मार्गदर्शन व्हावे,
यासाठी विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील नैसर्गिक व
सेंद्रिय शेती प्रमाणीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेसाठी
तांत्रिक मार्गदर्शनार्थ डॉ. वाचस्पति पांडे यांना आमंत्रित करण्यात आले.
माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, मराठवाड्यातील शेतकरी अभ्यासू व उत्साही आहेत. ते अनेक राष्ट्रीय
स्तरावरील कार्यक्रमांना भेट देतात आणि स्वतःसोबत विद्यापीठाचं नावही उज्वल करतात.
विद्यापीठ शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करत आहे. अशा प्रकारच्या
कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य विद्यापीठाला लाभत
आहे. “प्रश्नोत्तर सत्र हा कार्यक्रमाचा गाभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक
प्रश्न विचारून आपलं समाधान करून घ्यावं,” असं आवाहन त्यांनी
केलं.
डॉ. वाचस्पति पांडे यांनी नैसर्गिक व सेंद्रिय पदार्थांचे आहारातील आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, कोणतीही वस्तू खरेदी करताना प्रमाणीकरण गरजेचे असते. नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादने खरेदी करताना सुद्धा प्रमाणीकरणाची आवश्यकता आहे. यासाठी ‘पीजीएस इंडिया’ सेंद्रिय प्रमाणीकरण प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. या प्रक्रियेसाठी आवश्यक संकेतस्थळे, लागणारी कागदपत्रे व प्रक्रिया यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. त्यांनी ‘पीजीएस इंडिया’ सेंद्रिय प्रमाणीकरण म्हणजे काय? ते कसे करावे? फायदे कोणते? प्रक्रिया कशी आहे? प्रमाणीकरणाची गरज व महत्त्व, प्रमाणीकरणाचे प्रकार व पद्धती, या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च, आवश्यक कागदपत्रे आणि जबाबदाऱ्या, नैसर्गिक शेती करताना घ्यावयाची काळजी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबतच, शेतकऱ्यांकडे किमान एक पशुधन असणे आवश्यक असून गाईला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सुचविले.
त्यांनी जैविक प्रमाणनबददल सांगितले की, जैविक मानकांची पूर्तता होत आहे का, याबाबत निरीक्षण
आणि मूल्यांकन केले जाते, प्रमाणपत्र, अटी
व निर्बंध जारी करण्याचा निर्णय घेतला जातो, उत्पादन किंवा
प्रक्रियेची काही मानके पाळली जात आहेत याची लेखी पुरावा दिला जातो, लेबलिंग नियम व कायदेशीर अटींची पूर्तता केली जात आहे का, याची खात्री केली जाते.
कार्यक्रमात शेतकऱ्यांनी
विचारलेल्या प्रश्नांना विद्यावाचस्पती यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार डॉ
कैलास गाढे यांनी मानले
महत्वाच्या
संकेतस्थळांवर अधिक माहिती उपलब्ध
शेतकरी, जैविक उत्पादक आणि
ग्राहक यांच्यासाठी पुढील संकेतस्थळांवर अधिक माहिती उपलब्ध आहे:
🔗 https://pgsindia-ncof.gov.in/home.aspx
🔗 https://www.jaivikkheti.in/shop
🔗 https://ncof.dacnet.nic.in