Tuesday, October 28, 2025

“कृषितरंग – २०२५” : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात युवक प्रतिभांचा उत्सव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथे आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव निवड चाचणी “कृषितरंग – २०२५या उपक्रमाचे भव्य आयोजन दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कृषि महाविद्यालय सभागृहात करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून, कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती  नतिशा माथूर (भा.प्र.से.), जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी (भा.पो.से.), तसेच माजी सनदी अधिकारी व प्रसिद्ध सिनेअभिनेता माननीय श्री. अनिल मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांची मान्यवर उपस्थिती लाभणार आहे.

कृषितरंगया युवक महोत्सवाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे हा असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक, कलात्मक आणि सर्जनशील कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.

या कार्यक्रमात संगीत, नृत्य, नाटक, वाद्य वादन, एकांकिका, चित्रकला, वक्तृत्व, वादविवाद, काव्यपठण आदी विविध सांस्कृतिक आणि कलात्मक स्पर्धांमध्ये या विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उत्साहाने सहभाग घेणार आहेत. या स्पर्धांमधून निवड झालेल्या विजेत्या स्पर्धकांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दिनांक ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित “इंद्रधनुष्य – २०२५-२६” या २१ व्या महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवक महोत्सवात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, शैक्षणिक प्रभारी डॉ. रणजित चव्हाण, आणि सांस्कृतिक कार्यक्रम सचिव डॉ. नरेंद्र कांबळे यांनी नियोजन आणि अंमलबजावणीचे कार्य प्रभावीपणे पार पाडले आहे.

कृषितरंग – २०२५या महोत्सवातून विद्यापीठातील युवा प्रतिभांना नवसंजीवनी मिळून, त्यांच्या कलात्मकता, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास आयोजक मंडळाने व्यक्त केला आहे.






“वॉक फॉर युनिटी” उपक्रमाचे आयोजन — सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वनामकृवि व परभणी पोलिस दल यांचे संयुक्त आयोजन

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि परभणी पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा उपक्रमास दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता विद्यापीठाच्या शेतकरी भवन येथून प्रारंभ झाला. या प्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शुभेच्छा देत या उपक्रमाचे स्वागत केले. परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री रवींद्रसिंह परदेशी यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेला सुरुवात केली.

या वेळी कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुरज गुंजाळ तसेच विद्यापीठाचे आणि पोलीस दलाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

आपल्या मनोगतात पोलीस अधीक्षक श्री रवींद्रसिंह परदेशी म्हणाले की, आपला भारत देश सुदृढ आणि फिट राहावा, तसेच कृषि आणि पोलीस दलातही फिटनेस टिकवून समाजसेवेचे कार्य अधिक परिणामकारकपणे पार पाडावे, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे.

या उपक्रमात पोलीस विभागाचे अधिकारी, प्राध्यापक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्व सहभागीनी राष्ट्रीय एकात्मता, बंधुत्व आणि देशभक्तीचा संदेश देत विद्यापीठाच्या परिसरातून पदभ्रमण केले.

या कार्यक्रमाचा उद्देश देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा होता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला चालना देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय व परभणी पोलिस विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.






Monday, October 27, 2025

राष्ट्रीय कृषि विद्यार्थी संमेलनात देशभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग — माननीय केंद्रीय कृषि मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

 वनामकृविच्या विद्यार्थ्यांचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली सहभाग


नवी दिल्ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) व भारतीय कृषि संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय कृषि विद्यार्थी संमेलन” (National Agricultural Students' Sammelan) चे आयोजन दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम सी. सुब्रमण्यम सभागृह, एनएएससी संकुल, नवी दिल्ली येथे हायब्रीड मोड मध्ये पार पडला.

या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारचे केंद्रीय कृषि व किसान कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री माननीय नामदार श्री शिवराज सिंह चौहान आणि विशेष अतिथी म्हणून भारत सरकारचे कृषि व किसान कल्याण राज्य मंत्री माननीय नामदार  श्री. भागीरथ चौधरी, भारतीय कृषि संशोधन परिषदेचे (ICAR) महासंचालक तथा कृषि संशोधन आणि शिक्षण विभागाचे (DARE) सचिव माननीय डॉ. मांगी लाल जाट आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात माननीय ना. श्री शिवराज सिंह चौहान, माननीय ना. श्री भागीरथ चौधरी तसेच माननीय डॉ. मांगी लाल जाट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या प्रसंगी देशभरातील कृषि विद्यापीठांमधील विद्यार्थी, संशोधक, वैज्ञानिक आणि कृषि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित होते

यावेळी माननीय ना. श्री शिवराज सिंह चौहान यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे स्वागत करत देशभरातील हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी देशभरातील कृषि विद्यापीठांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचे कौतुक केले. तसेच, शेती क्षेत्रात अजूनही अनेक आव्हाने असल्याचे नमूद करत शेती ही अन्नसुरक्षा आणि आर्थिक विकासाचा पाया असल्यामुळे तिचे महत्त्व अधोरेखित केले. या संदर्भात विद्यार्थ्यांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे सांगून, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध उपाय सुचविले. त्यांनी प्रत्येक विद्यापीठाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची गरज व्यक्त केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सुलभता निर्माण होईल. तसेच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी कौशल्यविकासावर भर देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागाचे नियोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ सचिन मोरे यांनी केले.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा आचार्य पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी श्री. राहुल अशोक ठोंबरे यांना माननीय महोदयांशी ऑनलाईन संवाद साधण्याची संधी मिळाली. ठोंबरे यांनी विद्यापीठाच्या यशोगाथेची माहिती देत विद्यापीठातील पदभरती करण्याची विनंती केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी योगा पार्क, खेळाचे मैदान, वसतिगृहाच्या सुविधा अशा आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच एस.आर.एफ. (SRF) व जे.आर.एफ. (JRF) या संशोधन फेलोशिपच्या जागा वाढवाव्यात, अशीही त्यांनी विनंती केली. तसेच नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झालेल्या चार विद्यार्थ्यांसह विद्यापीठाचे विद्यार्थी श्री. राहुल अशोक ठोंबरे यांनी अशा एकूण पाच विद्यार्थ्यांच्या वतीने माननीय महोदयांशी संवाद साधत विविध विद्यार्थी हिताच्या मागण्या मांडल्या.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंच्या मीटिंग हॉलमध्ये तसेच विद्यापीठाच्या लातूर, बदनापूर, आणि अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयामध्ये सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विविध विभागाचे प्रमुख तसेच आचार्य व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे जवळपास २४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


Friday, October 17, 2025

वनामकृविच्या नव्याने विकसित रब्बी ज्वारी वाण ‘परभणी सुपरदगडी (SPV 2735)’चे वितरण — उत्पादनक्षमतेकडे विद्यापीठाचा अभिनव टप्पा

 ‘प्रयोगशाळेतून शेतापर्यंत’ ध्येयाची ठोस अंमलबजावणी .... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ज्वारी संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेल्या नव्या रब्बी ज्वारी वाण ‘परभणी सुपरदगडी (SPV 2735)’ या वाणाचे २३० अद्यरेखा प्रात्यक्षिक संच (FLD) दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाडा विभागातील १२ कृषी विज्ञान केंद्रांना (KVKs) शेतकऱ्यांमध्ये वितरणासाठी देण्यात आले.

हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. लक्ष्मण जावळे, तसेच प्रगतशील शेतकरी व विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेचे सदस्य श्री. जनार्दन आवरगंड आणि श्री. भीमराव डोंणगापुरे यांची उपस्थिती लाभली.

या प्रसंगी माननीय कुलगुरूंनी आपल्या मनोगतात म्हटले की, परभणी सुपरदगडी या नवीन वाणामध्ये उच्च उत्पादनक्षमता, गुणवत्तापूर्ण धान्यनिर्मिती व रब्बी हंगामातील अनुकूलता या तीनही गुणांचा समन्वय साधला आहे. या वाणाचा प्रसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे करून त्यांचे उत्पन्न वाढविणे, हा विद्यापीठाचा प्रमुख उद्देश आहे. संशोधनातून तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्याचे हे पाऊल म्हणजे विद्यापीठाच्या ‘प्रयोगशाळेतून शेतापर्यंत’ या ध्येयाची ठोस अंमलबजावणी आहे.

सदर प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील २३० शेतकऱ्यांपर्यंत या वाणाचे बीज संच कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहेत. यामुळे रब्बी हंगामात उत्पादनात वाढ, दुष्काळसहिष्णुता, तसेच शेतकऱ्यांचा विश्वासार्ह उत्पन्नाचा पाया अधिक भक्कम होईल. ज्वारी संशोधन केंद्र, परभणीचे हे पुढाकार शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने एक नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक पाऊल ठरले आहे.








Wednesday, October 15, 2025

वाई (ता. कळमनुरी) येथे शेतकरी बांधवांशी आत्मीय संवाद साधत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे उत्स्फूर्त स्वागत

वनामकृविद्वारा आदिवासी शेतकऱ्यांना हरभरा बियाणे, बुरशीनाशक व बायोमिक्स वाटप


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत कृषि संशोधन केंद्र, बदनापूर (जि. जालना) यांच्या अखिल भारतीय संबंधित संशोधन प्रकल्प (रब्बी पिके–हरभरा) तर्फे आदिवासी उपयोजना अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वाई गावातील अनुसूचित जमातीतील १०० शेतकऱ्यांना हरभरा बियाणे, बुरशीनाशक, जिवाणू आणि बायोमिक्स यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनापरभणी चना-१६’, ‘फुले विक्रम’, ‘आकाश’ आणि ‘बीडीएनजी -७९८या हरभरा जातींची उच्च प्रतीची बियाणे देण्यात आली. तसेच हळद पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी बायोमिक्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त आनंदात आणि अतिशय आपुलकीने स्वागत केले. माननीय कुलगुरूंनीही समाजातील ज्येष्ठ तसेच तरुण बांधवांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या, गरजा आणि आकांक्षा जाणून घेतल्या. विद्यापीठ तुमच्याच विकासासाठी कार्यरत आहे, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी स्वतःला समाजाचा एक घटक मानून आत्मीयतेने हितगुज साधले. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे कार्य केवळ संशोधनापुरते मर्यादित नसून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत वाणांची पोच शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, विशेषतः आदिवासी बांधवांपर्यंत होणे, हा आमचा ध्येयधोरणाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सक्रिय सहभागाने लाभ घ्यावा, आपल्या गावात आधुनिक शेती तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करून उत्पादनक्षमता वाढवावी आणि लाभदायी तसेच टिकाऊ शेती प्रणालीचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि सहकार्य यांच्या बळावर प्रत्येक गाव ‘स्मार्ट गाव’ बनविण्याचे स्वप्न आपण सर्वांनी एकत्रितपणे साकार करावे, असे आवाहन करत माननीय कुलगुरूंनी शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान स्वीकारून आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे प्रेरणादायी आवाहन केले.

यावेळी गावातील सरपंच सौ. मीरा विलास मस्के, सहयोगी अधिष्ठाता तथा प्रभारी अधिकारी डॉ. डी. के. पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. टी. जाधव, कृषि विद्यापीठाचे डॉ. गजानन गडदे, तालुका कृषि अधिकारी के. एम. जाधव, संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. पी. एल. सोनटक्के, डॉ. एन. आर. पतंगे, आणि डॉ. व्ही. एन. गीते उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांसाठी “हरभरा व तुर पिकांवरील व्यवस्थापन” या विषयावर प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. यात शास्त्रज्ञांनी बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, तसेच कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे वाई गावातील शेतकऱ्यांमध्ये रब्बी हंगामातील हरभरा लागवडीबाबत नवीन तंत्रज्ञानाची जाणीव निर्माण झाली असून, उत्पादनक्षमता वाढीसाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे.






अतिवृष्टीग्रस्त धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्याला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची भेट – शेतकऱ्यांना दिला धीर, रब्बी हंगामासाठी शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन

 

धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

या वेळी माननीय कुलगुरू यांनी सांगितले की, कृषि विद्यापीठ आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. याबरोबरच त्यांच्यासोबत आलेल्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या चमूने रब्बी हंगामासाठी तसेच खरडून गेलेल्या जमिनींच्या पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा (Draft) तातडीने तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणी दौर्‍यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. अस्सलकर, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन सूर्यवंशी, विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे, तसेच तालुका कृषि अधिकारी श्री. सरडे उपस्थित होते. खोंदला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भेटीत सहभागी झाले.

यावेळी ग्रामस्थांनी प्रशासन आणि विद्यापीठाकडून अपेक्षा व्यक्त करत विविध मागण्या मांडून करत आपल्या व्यथा नमूद केल्या.

पाहणी केल्यानंतर माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना पुढील उपाययोजना सुचवल्या —

तूर पिकासाठी:

सततच्या पावसामुळे वांझ व मर रोग वाढण्याची शक्यता; त्यासाठी डायमिथोएट (रोगर) 20 मिली + मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब (रिडोमिल गोल्ड) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी घ्यावी. तसेच ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स चार लिटर 250 लिटर पाण्यात मिसळून अळवणी द्यावी.

हरभरा पिकासाठी:

पेरणीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी. बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. शेवटच्या कोळपणीपूर्वी चार किलो ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्स एक एकर क्षेत्रासाठी वापरावे.

मोसंबी व फळपिकांसाठी:

अतिवृष्टीमुळे फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 30 ग्रॅम किंवा रिडोमिल गोल्ड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. तसेच ट्रायकोडर्मा/बायोमिक्स चार किलो प्रति 250 लिटर पाण्यात मिसळून आळवणी द्यावी.

सर्व पिकांसाठी:

पिवळेपणा कमी करण्यासाठी 19:19:19 खत 100 ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्य (ग्रेड-2) 100 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी तसेच 25% खताची अतिरिक्त मात्रा जमिनीतून द्यावी.

माती खरडून गेलेल्या जमिनींसाठी:

सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत किंवा ग्रीन मॅन्युरिंग करावे. कठीण जमिनीवर उन्हाळ्यात तलावातील गाळ टाकून 15–20 सें.मी. सुपीक थर निर्माण करावा.

या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या समस्या आणि शास्त्रज्ञांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे, पूरग्रस्त भागातील शेती पुनरुज्जीवनासाठी माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ व कृषि विभाग मिळून समन्वयाने कार्य करणार असल्याची माहिती विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी दिली.




माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून श्री तुळजाभवानी मातेला विद्यापीठ आणि शेतकरी कल्याणासाठी प्रार्थना

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी तुळजापूर (जिल्हा धाराशीव) येथील श्री तुळजाभवानी मातेला विद्यापीठ तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या शांती, समृद्धी आणि संपन्नतेसाठी भावपूर्ण पूजाअर्चा केली.

या प्रसंगी माननीय कुलगुरूंनी देवीचे दर्शन घेत शेतकरी देवो भव:” या भावनेचा उच्चार करत, कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत आणि समर्पित प्रयत्न करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. माननीय कुलगुरूंनी तुळजाभवानी मातेकडे विद्यापीठ, संशोधक, विद्यार्थी आणि सर्व शेतकरी बांधवांच्या आरोग्य, प्रगती व कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली. या पूजाअर्चेद्वारे त्यांनी शेतकरी सक्षमीकरण, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि नवीन कल्पनांच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या विकासाचा संदेश दिला.

या प्रसंगी विद्यापीठातील शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड, विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी तसेच पडोळी येथील रेशीम क्षेत्रातील प्रगतशील शेतकरी श्री बालाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या पूजनावेळी शेतकरी हा आपल्या राष्ट्राचा कणा आहे. त्याच्या प्रगतीतूनच ग्रामीण भारत समृद्ध होईल, असे मत माननीय कुलगुरू यांनी व्यक्त केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी ज्ञान, विज्ञान आणि श्रद्धा या तिन्हींचा संगम साधण्याचे उपस्थितांना आवाहन केले. श्री. तुळजाभवानी मातेकडे विद्यापीठ आणि राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी माननीय कुलगुरू आणि उपस्थित मान्यवरांनी प्रार्थना करण्यात आली.



Sunday, October 12, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) म्हणून देशातील अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र म्हणून डीजीसीएची मान्यता

देशातील कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी भारत सरकारच्या विविध पाच समित्यांमध्ये अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मोलाचे योगदान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषि क्षेत्रात आणखी एक महत्वपूर्ण यश मिळविले आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून विद्यापीठाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून, आता विद्यापीठ ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) म्हणून देशातील अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत होणार आहे. या मान्यतेमुळे विद्यापीठात आता शेतकरी, विद्यार्थी, कृषि अभियंते व संशोधकांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षणासह ड्रोन पायलटचे अधिकृत लायसन्स प्राप्त करण्याची सुविधा होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील नागरी विमान वाहतूक संचालनालय मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठांमध्ये वनामकृवि हे एक महत्वपूर्ण विद्यापीठ ठरले आहे, ज्यामुळे मराठवाडा विभागात कृषि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी झेप घेतली गेली आहे.

भारतीय कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या विविध पाच समित्यांमध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून कार्य करत कृषि क्षेत्रासाठी ड्रोन वापराच्या मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedures - SOPs) तयार करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. कृषि क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी तीन टप्प्यांमध्ये या समित्या कार्यरत आहेत. पहिल्या टप्प्यात, कीटकनाशक फवारणीसाठी ड्रोन संचालनाच्या मानक मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष डॉ. के. अलागुसुंदरम असून, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यांनी संयोजक म्हणून कार्य केले. दुसऱ्या टप्प्यात, माती व पिकांच्या पोषणासाठी ड्रोनद्वारे फवारणी आणि कीटकनाशक फवारणीसाठी मानक तयार करण्यात माननीय कुलगुरुंनी प्रमुख भूमिका बजावली. तिसऱ्या टप्प्यात, पिकानुसार विशिष्ट मानक तयार करणे, तसेच विविध पोषणघटक व जमिनीशी संबंधित घटकांचे ड्रोनद्वारे वितरण यासाठी माननीय कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली समित्या कार्यरत आहेत. याशिवाय कृषि क्षेत्रातील अन्य उपक्रमांसाठी (कीटकनाशक आणि द्रव खत फवारणी व्यतिरिक्त) ड्रोनच्या वापराचा अभ्यास करण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला आहे. या कार्यातून भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाच्या वतीने ड्रोनच्या वापरासाठी मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या असून, त्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने होत असून, यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात, अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक शेती पद्धती अवलंबता येत आहेत.

कृषी क्षेत्रातील ड्रोन वापर मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. विद्यापीठात सध्या ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) याबरोबरच ड्रोन पायलटसाठी सहा महिन्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आणि ड्रोन कस्टम हायरिंग सेंटर या उपक्रमांवर महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. ड्रोन अभ्यासक्रमांतर्गत आतापर्यंत दोन बॅचमधून एकूण २८ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. या प्रशिक्षणामध्ये दहावी उत्तीर्ण ते अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणानंतर ड्रोन क्षेत्रात स्वयंरोजगार निर्माण केला किंवा भारतातील अग्रगण्य कंपन्या तसेच शासकीय संस्थांमध्ये रोजगार मिळवला आहे. तसेच मराठवाड्यातील विविध गावांमध्ये शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली.

विद्यापीठाच्या ड्रोन तंत्रज्ञानाशी कार्य माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात आणि  शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, नाहेप प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

कृषि क्षेत्रात ड्रोनची क्रांती

शेतीमध्ये कीडनाशकांची फवारणी, खत व्यवस्थापन, पीक सर्वेक्षण, नकाशांकन (mapping), उत्पादन अंदाज, आपत्ती व्यवस्थापन, पिकांचे आरोग्य निरीक्षण या सर्व कार्यांसाठी ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, मजुरी आणि खर्च कमी होऊन कार्यक्षमता वाढते. DGCA मान्यताप्राप्त अशा प्रशिक्षणामुळे शेतकरी आणि तरुण विद्यार्थ्यांना कृषि-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्याची नवी दिशा उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाच्या अधिकृत RPTO केंद्रात प्रवेश सुरू असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी.

प्रशिक्षणाची रचना व वैशिष्ट्ये

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (RPTO) येथे. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) येथे DGCA ने ठरविलेल्या मानकांनुसार सहा दिवसांचे अधिकृत प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणात पहिल्या १ ते २ दिवसात सैद्धांतिक (वर्ग) प्रशिक्षण, तिसऱ्या दिवसी सिम्युलेटर प्रशिक्षण तर पुढील ४ ते ६ दिवसी प्रत्यक्ष ड्रोन उड्डाण व हाताळणी असे प्रशिक्षणाचे टप्पे असतील.

प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सिम्युलेटर लॅब, प्रशिक्षित तज्ञ शिक्षक, सुरक्षित उड्डाण क्षेत्र, आणि कृषि फवारणीसाठी सुसज्ज ड्रोन उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) अधिकृत परवाना प्राप्त होईल.

दूरस्थ पायलट परवाना’ (Remote Pilot Licence) म्हणजे काय?

ज्या प्रमाणे मोटार वाहन चालविण्यासाठी वाहन परवाना आवश्यक असतो, तसेच ड्रोन चालविण्यासाठी ‘दूरस्थ पायलट परवाना’ आवश्यक असतो. हा परवाना फक्त DGCA मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था (RPTO) मधून अधिकृत प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच मिळतो.

प्रवेशासाठी पात्रता उमेदवाराचे वय १८ ते ६५ वर्षे, शैक्षणिक पात्रता किमान १०वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक तसेच त्याच्याकडे भारतीय ओळख पत्र असणे आवश्यक आहे. 

शेतीपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत नवे करिअर मार्ग

ड्रोन प्रशिक्षणाद्वारे कृषि, सर्वेक्षण व मॅपिंग, आपत्ती व्यवस्थापन, छायाचित्रण, सुरक्षा व पर्यावरण संरक्षण अशा विविध क्षेत्रांत रोजगार व उद्योजकतेच्या भरपूर संधी निर्माण होणार आहेत. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना, कृषि पदवीधरांना आणि शेतकऱ्यांना स्वावलंबन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरेल.

प्रशिक्षणासाठी रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचे प्रमुख तथा सहायक प्राध्यापक डॉ. विशाल इंगळे यांचाशी संपर्क साधावा. प्रशिक्षण केंद्राचा पत्ता - कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी – 431402, ईमेल: vnmkv.rpto@gmail.com, मोबाईल क्रमांक ९९००९३१२१४ /९०९६९६७१४२.