Sunday, April 20, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांची फळ संशोधन केंद्रात आढावा बैठक

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १९ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हिमायत बाग परिसरातील फळ संशोधन केंद्रात आढावा बैठक घेतली. या बैठकीस राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे डॉ. सूर्यकांत पवार, फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र नाईनवाड, कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान माननीय कुलगुरूंनी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील विविध कार्यालयांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी परिसराचे सुशोभीकरण, वृक्ष लागवड व स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना दिल्या. येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान कृषि  विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी पीएम-प्रणाम योजना, नैसर्गिक व सेंद्रिय शेती याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे सूचना त्यांनी कृषि विज्ञान केंद्राला दिली. तसेच, बायोमिक्स व जैविक खते यांचे उत्पादन वाढवून त्याचा पुरवठा शेतकऱ्यांना वेळेत आणि मोठ्या प्रमाणात करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश दिले.

माननीय कुलगुरूंनी हे ही स्पष्टपणे नमूद केले की, विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांचे सहकार्य घेत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संशोधनाची दिशा ठरवावी आणि कोणताही द्वेषभाव न ठेवता कार्यरत राहावे. त्यांनी चालू उपक्रमांची माहिती घेतली व येणाऱ्या खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.


Saturday, April 19, 2025

भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, माननीय ना. श्री. नितीनजी गडकरी 'डॉक्टर ऑफ सायन्स' (मानद डॉक्टरेट) पदवीने वनामकृविद्वारा सन्मानित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या दिनांक २३ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात संपन्न झालेल्या २६ व्या दीक्षांत समारंभात मा राज्यपाल माननीय राज्यपाल तथा माननीय कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णनजी यांनी भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय ना. श्री. नितीनजी गडकरी यांना विद्यापीठाचा डॉक्टर ऑफ सायन्स (मानद डॉक्टरेट) हा सन्मान अनुपस्थितीत प्रदान केला होता.

माननीय ना श्री नितीनजी गडकरी यांना डॉक्टर ऑफ सायन्स (मानद डॉक्टरेट) या मानद पदवीने विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आज (१९ एप्रिल २०२५ रोजी) नागपूर येथे  सन्मानित केले.

पाणी संवर्धन, जैव इंधन विकास, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, कृषि विविधीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये माननीय ना श्री नितीनजी गडकरी यांनी केलेल्या उल्लेखनीय, अद्वितीय व महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने त्यांना हा सन्मान प्रदान केला आहे.







वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ४२ वा ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

 उन्हाळी पिके, फळबागा आणि पशुधानांची काळजी घ्यावी... माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा ४२ वा भाग माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ एप्रिल रोजी संपन्न झाला.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांनी वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उन्हाळी पिके, फळबागा आणि पशुधन यांची काळजीपूर्वक देखभाल करण्याचा सल्ला दिला. त्यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा देत कार्यक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रमुख विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रभावी समन्वयन करत पुढील १८ मे रोजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित खरीप मेळाव्याची माहिती दिली. या मेळाव्यात आधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मधुमक्षिका पालनविषयी माहिती दिली, तर हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी येणाऱ्या मान्सूनच्या हंगामी अंदाजाबाबत माहिती दिली. तसेच आगामी आठवड्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज देत शेतीच्या कामाचे नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन केले.

विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी खरीप हंगामपूर्व तयारीवर सखोल मार्गदर्शन करत जमिनीची मशागत, ट्रायकोडर्मासारख्या उपयुक्त बुरशींचा वापर, बीजप्रक्रिया, पिकांची फेरपालट आणि सुधारित वाणांची निवड यावर भर दिला.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आंबा घन लागवड, हळद लागवड, खरीपपूर्व समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. लक्ष्मणराव जावळे, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. गजानन गडदे, डॉ. अरुण गुट्टे, डॉ. कैलास डाखोरे आणि डॉ. नेहरकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण गुट्टे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले. 

Thursday, April 17, 2025

वनामकृविचा 'टीएलटी-१०' तिळाचा वाण आता देशभरातील शिवारांत

 परभणी विद्यापीठाच्या संशोधनाला केंद्र सरकारची मान्यता


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे. केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या बैठकीत बैठकीत मान्यता मिळाली आहे. या यशाद्वारे केंद्राने सातत्याने उत्कृष्ट कार्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

ही मान्यता मिळाल्यामुळे टीएलटी-१० वाणास खरीप तसेच रब्बी/उन्हाळी हंगामात लागवडीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा (झोन-१), तसेच गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणा भाग या राज्यांतही (झोन-३) खरीप हंगामात लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाणाला ८ ऑक्टोबर २०२४ रोजी अधिसूचित करण्यात आले होते.

या वाणाच्या संशोधन आणि विकासामध्ये विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन असून, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, गळीतधान्य तज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ. मोहन धुप्पे, कनिष्ठ पैदासकार डॉ. शिवशंकर पोले, मुंबई येथील भाभा अनु संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. जय प्रकाश, विद्यापीठ प्रशासन आणि केंद्रातील इतर शास्त्रज्ञांचे योगदान मोलाचे आहे.

माननीय कुलगुरूंनी सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत टीएलटी-१० वाणामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि गुणवत्तापूर्ण तीळ उत्पादनाची संधी मिळणार असून देशातील तीळ उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होवून एक नवा अध्याय सुरू होईल, असे प्रतिपादन केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनीदेखील टीमचे अभिनंदन करत सांगितले की, या नव्या वाणाचा प्रसार प्रभावीपणे करण्याचा विद्यापीठाचा संकल्प असून, या वाणाचे बियाणे लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

 

टीएलटी-१० वाणाचे वैशिष्ट्ये

टीएलटी-१० वाण ९०-९५ दिवसांत परिपक्व होतो आणि ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन देतो. या वाणामध्ये ४५.२% तेलाचे प्रमाण असून, मँक्रोफोमीना, मुळ व खोडकूज, फायलोडी यांसारख्या रोगांवर तसेच पाने गुंडाळणारी व बोंड पोखरणारी अळी यांसारख्या कीटकांवरही सहनशीलता आहे.



माननीय आमदार श्री. सतीश चव्हाण यांची विद्यापीठातील अत्याधुनिक अन्न प्रक्रिया केंद्रास भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयात केंद्र शासनाच्या अर्थसहाय्याने "प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (PMFME)" अंतर्गत एक अत्याधुनिक सामायिक सुविधा अन्न प्रक्रिया केंद्र (Common Incubation Centre – CIC) स्थापन करण्यात आले आहे.

दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी या नव्या केंद्रास विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य व आमदार मा. श्री. सतीश चव्हाण आणि सदस्य मा. श्री. प्रविण देशमुख यांनी भेट देऊन सविस्तर पाहणी केली.

या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, तसेच डॉ. हेमंत देशपांडे व डॉ. सुरेंद्र सदावर्ते उपस्थित होते.

कार्यकारी परिषद सदस्य व आमदार मा. श्री सतीश चव्हाण यांनी केंद्रातील विविध अत्याधुनिक सुविधा पाहून समाधान व्यक्त केले व या केंद्राचा उपयोग व्यावसायिक दृष्टिकोनातून कसा अधिक प्रभावी करता येईल याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी स्थानिक शेतकरी, महिला गट, युवक आणि नवउद्योजक यांना या सुविधेचा लाभ नक्कीच होईल अश्या भावना व्यक्त केल्या.

मा. श्री. प्रविण देशमुख यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, हे केंद्र युवकांचे उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यात नक्कीच मोलाचे योगदान देईल.

प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर यांनी या केंद्राची माहिती देताना सांगितले की, या अंतर्गत आधुनिक गुळनिर्मिती युनिट (गुळ, गुळ पावडर, वड्या, काकवी), बाटलीबंद ऊस रस उत्पादन (जे खोलीच्या तापमानाला ४ महिने टिकते), मसाले प्रक्रिया आणि अन्न तपासणी प्रयोगशाळा अशा विविध सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

हे अन्न प्रक्रिया केंद्र शेतकरी, महिला बचत गट, युवक, शेतकरी उत्पादक कंपन्या व लघु-सूक्ष्म उद्योजकांसाठी प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन व ब्रँड विकासाचे एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे, अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.





वनामकृवितील बायोमिक्स संशोधन केंद्रास माननीय आमदार श्री. सतीश चव्हाण यांची भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बायोमिक्स संशोधन आणि निर्मिती केंद्रास दिनांक १७ एप्रिल  रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थित विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा आमदार मा. श्री. सतीश चव्हाण आणि सदस्य मा. श्री. प्रविण देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे व प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना आमदार मा. श्री. सतीश चव्हाण यांनी शाश्वत शेतीमध्ये बायोमिक्सचे योगदान अतिशय मोलाचे आहे, असे सांगितले. बायोमिक्स हे १४ प्रकारच्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचे जैविक मिश्रण असून, त्याचा उपयोग जमिनीत उपयुक्त अन्नद्रव्ये तयार करणे, कीड व रोग नियंत्रण आणि पिकाचे एकूण उत्पादन तसेच दर्जा वाढविण्यासाठी होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी या जैविक मिश्रणाविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, बायोमिक्सच्या वापरामुळे शेतकऱ्यांना जमिनीजन्य रोग व विविध किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते. यामुळे रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांवरील खर्चात बचत होते. पिकाचे आरोग्य सुधारते आणि उत्पादनवाढीस हातभार लागतो.

बायोमिक्स वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय परभणी आणि विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांवर भुकटी आणि विद्राव्य स्वरूपात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ५७ शिक्षकांना उच्च शैक्षणिक स्तरावर पदोन्नती; विद्यापीठात उत्साहाचे वातावरण

विद्यापीठातील शैक्षणिक उत्कृष्टतेची आणि कार्यक्षमतेची पावती... माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कारकीर्द प्रगती योजना (Career Advancement Scheme) अंतर्गत ५७ शिक्षकांना उच्च शैक्षणिक वेतनश्रेणी / शैक्षणिक स्तरावर पदोन्नती देण्यात आली आहे. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या विद्यार्थी केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी केंद्रित विस्तार कार्य व कर्मचारी केंद्रित प्रशासन या चार स्तंभांवर आधारित त्यांच्या नेतृत्वाखाली आणि कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

विद्यापीठातील शिक्षकांनी अध्यापन, संशोधन व इतर शैक्षणिक उपक्रमांद्वारे ठराविक पात्रता पूर्ण करून ही पदोन्नती मिळवली आहे. या प्रक्रियेसाठी शिक्षकांचे प्रस्ताव मागवून, त्यांचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विविध समित्यांमार्फत सखोल परीक्षण करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र कृषी विद्यापीठे सुधारणा अधिनियम, २०२३ आणि विद्यापीठ अनुदान आयोग नियमावली, २०१० अंतर्गत स्थापन 'पडताळणी व मूल्यमापन समिती'च्या शिफारशींनुसार पदोन्नती देण्यात आली.

या निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगानुसार रु ६००० वरून ७००० – ५, रु ७००० वरून ८००० – २, आणि रु ८००० वरून ९००० – १ शिक्षकांना उच्च शैक्षणिक वेतनश्रेणीमध्ये पदोन्नती देण्यात आली. तसेच सातव्या वेतन आयोगानुसार स्तर १० वरून स्तर ११ – १७, स्तर ११ वरून स्तर १२ – ८, आणि स्तर १२ वरून स्तर १३अ – २४ शिक्षकांना उच्च शैक्षणिक स्तर प्रदान करण्यात आले.

या निर्णयाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व पदोन्नती मिळवलेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, ही यशस्वी पदोन्नती म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ही प्रक्रिया केवळ वैयक्तिक प्रगती नसून विद्यापीठातील शैक्षणिक उत्कृष्टतेची आणि कार्यक्षमतेची पावती आहे.

कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनीही यावेळी सांगितले की, ही पदोन्नती विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण कार्यपद्धतीचे प्रतीक असून, भविष्यातही अशा संधी कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच यामुळे कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने व उत्साहाने कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संपूर्ण प्रक्रियेस यशस्वी करण्यासाठी उप कुलसचिव श्री पुरभा काळे, सहाय्यक कुलसचिव श्री राम खोबे, कक्ष अधिकारी श्री गंगाधर चांदणे, श्री नरेंद्र खरतडे आणि कुलसचिव कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या पदोन्नतीमुळे विद्यापीठात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित शिक्षकांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानत अधिक जबाबदारीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विद्यापीठ प्रशासन व सहकाऱ्यांकडून सर्व पदोन्नती लाभार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Monday, April 14, 2025

वनामकृवित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी

 संविधानामुळे प्रत्येकाला प्रगतीची संधी... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती दिनांक १४ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांच्या प्रतिमांचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते पुष्पांजली, दीपप्रज्वलन आणि धूपार्पणाने करण्यात आली. यावेळी आम्रवन महाविहार (देवगाव फाटा) येथील पूज्य भिक्खू संघरत्न यांना डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी याचना केली आणि भिक्खूजीनी त्रिसरण, पंचशिल वंदना सर्वांना दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. त्यांनी आपल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या कार्याचा वेध घेतला. त्यांनी शिक्षण, शील, प्रज्ञा व करुणेच्या डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणीवर भर दिला. संविधानामुळे मिळालेल्या समानतेच्या अधिकारामुळे प्रत्येकाला प्रगतीची संधी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण हे शक्ती असून त्याचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते घेतल्यानंतर माणूस गुरगुणारच या त्यांच्या संदेशावर ही जोर देवून समाज उन्नतीसाठी प्रत्येकानी शिक्षणावर अधिकाधिक भर द्यावा असे सांगितले. महाराष्ट्र हे पुरोगामी असून मुलींच्या शिक्षणामध्ये विशेष भर देत आहे. बाबासाहेबांचे अतिउच्च शिक्षण, त्यांचा जागतिक प्रवास यातून त्यांनी चांगले आणि महत्त्वपूर्ण विचार संविधानात उतरविले, त्यांनी अतिशय कमी कालावधीत महत्वपूर्ण संशोधन आणि लेखन केले. ते सतत आपले ज्ञान वाढवत असत, त्यांचे व्यक्तिमत्व आणि राहणीमान अतिशय प्रभावी आणि जगावर छाप पाडणारे होते. त्यांनी महिलांना शिक्षणासह सर्व अधिकार आणि सन्मान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. दरवर्षी त्यांची जयंती साजरी करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करून स्मृतीस उजाळा दिला जातो आणि त्यांचे विचार आपल्या मनात प्रभावीपणे ठासले जातात. या  महापुरुषांचा विचार आणि आदर्श यावर सर्वांनी चालावे. याप्रमाणेच विद्यापीठ कार्य करत असून प्रशासन आणि कर्मचारी उच्चांकी कार्य करत आहे. सध्या महाराष्ट्रासह देशात विद्यापीठ आघाडीवर कार्य करत असून भविष्यात असेच कार्य करण्याची यावेळी आपण सर्वांनी प्रतिज्ञा करू, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे माननीय कुलागुरुनी नमूद केले.

या वेळी व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विद्यापीठ उप अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रेम कांबळे आदींची उपस्थिती होती.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या त्रिसूत्रीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संघर्ष करण्याचे आवाहन केले. याबरोबरच विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विद्या, प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री, या पंचतत्त्वांचा अवलंब करून महामानवांचे विचार अंगीकारावेत. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू समजून सांगतते होते म्हणूनच आज आपण आहोत (we are because he was)  असे नमूद केले.

कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वकोश असल्याचे सांगत त्यांचे कार्य सर्वव्यापी आणि सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळाला. शिक्षणाचा मूलभूत हक्क त्यांनी सर्वांना दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे कर्तव्य निभावावे तसेच समाजातील प्रत्येक घटकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवावी हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. याबरोबरच तसेच प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा व वेळेचा काही भाग समाजहितासाठी द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. गजेंद्र लोंढे यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या भूमिकांचे कौतुक केले. या सादरीकरणाने आणि लेझीम पथकाने उपस्थितांची मने जिंकली.

प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे व अंतिम वर्षातील विद्यार्थी अमोल घुफसे यांनी तर आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी केले.

या कार्यक्रमात जयंती उत्सव समितीद्वारे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी ५ वाजता विद्यापीठातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाला. यासाठी डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांनी समन्वय साधून उत्कृष्ट कार्य केले.
















भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज. - डॉ. राहूल रामटेके

 

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान व कौशल्य संपादन करण्यासाठी शिका, विधायक कार्यासाठी संघटीत व्हा तसेच अन्याय, अत्याचारा विरुध्द संघर्ष करा असा विचार आपणास दिला आहे. त्यांचे आर्थिक, सामाजिक, कृषि विधीत क्षेत्रातील योगदान अतिशय मौलाचे होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवून त्यांनी समाज सुधारणेसाठी मौलिक कार्य केले. त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कृषि अभियांत्रीकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके यांनी केले. महाविद्यालयात आयोजित महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे, विभाग प्रमुख डॉ. मदन पेंडके, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. सुमंत जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी केले. त्यांनी जिमखाना विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच राष्ट्रीय सेवा योजने मार्फत उदे्शिका वाचन आणि पदयात्रा काढण्यात आली. यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्सफुर्तपणे सहभाग नोंदविला. या प्रसंगी डॉ. संदीप पायाळ तसेच विद्यार्थी प्रतिनिधी सक्षम पंडीतकर, कु.पार्वती, आभा सिंग, वैष्णवी गोरे यांनी आपले विचार मांडले.

या वेळी डॉ. मधुकर मोरे, डॉ. प्रमोदिनी मोरे, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. गजानन वसु, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. आश्विनी गावंडे,  डॉ. ओंकार गुप्ता आणि प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे उपस्थीत होते.

कार्यक्रम यक्षस्वी करण्यासाठी डॉ. गजानन वसु, श्री. मंचक डोंबे, श्री. प्रमोद राठोड तसेच कु. प्रियंका बोरसे, निकीता जाधव, पार्वती, आभा सिंग, तनुजा वाघ, वैष्णवी  गोरे, सतेज मेटकर, राम शेंडगे, राधेश्याम खंटीग, अजय शिराळे, कुनाल गडाख, यश सहाणे इत्यादी विद्यार्थी प्रतीनीधिनी प्ररिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिवानी डोइजड व वैष्णवी कदम यांनी केले आणि आभार प्रदर्शन किंजल मोरे हिने केले.