Monday, June 16, 2025

वनामकृविला भारतीय कृषि अनुसंधान परिषदे कडून ‘ए ग्रेड’ मानांकन; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा सत्कार सोहळा

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांना भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीमार्फत प्रतिष्ठेचे ए ग्रेड’ मानांकन प्राप्त झाले आहे.

भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या दिनांक १६ मे २०२५ रोजी पार पडलेल्या ४०व्या बैठकीत विद्यापीठास १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली आहे. या मूल्यांकनात विद्यापीठाने ३.२१ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून, हे संपूर्ण विद्यापीठासाठी अत्यंत गौरवाचे आणि अभिमानास्पद क्षण आहेत.

या यशाच्या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाच्या परभणी येथील कास्ट्राइब कर्मचारी महासंघ शाखेच्यावतीने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सदर सत्कार समारंभ दिनांक १६ जून २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील कुलगुरू कार्यालयात पार पडला.

या प्रसंगी महासंघाचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यापीठाचे शिक्षण संचालक व महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. भगवान आसेवार तसेच महासंघाचे इतर सदस्य उपस्थित होते.

विद्यापीठाचे हे यश माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे शक्य झाले, असे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले. या मानांकनामुळे विद्यापीठात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाबद्दल महासंघाचे अध्यक्ष डॉ. गजेंद्र लोंढे यांच्यासह सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरीने सहकार्याची भावना व्यक्त केली.

हा सत्कार सोहळा केवळ एक औपचारिकता नसून, विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुणवत्तेची पावती आहे, असेही महासंघाच्यावतीने नमूद करण्यात आले आहे.


Sunday, June 15, 2025

वनामकृवित पिकनिहाय संशोधक कार्यरत उद्योजक बैठक संपन्न

 जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगवाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज - पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर

 विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा लाभ कृषि उद्योजकांनी घ्यावा - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


परभणी जिल्ह्यातील कृषि क्षेत्रात उत्पादनवाढीबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अन्न प्रक्रिया उद्योगवाढीवर विशेष भर देण्यात येणार असून, यासाठी शासन, प्रशासन आणि उद्योजकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याणपाणी पुरवठा व स्वच्छताउर्जामहिला व बालकल्याणसार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक १४ जून रोजी आयोजित ‘पिकनिहाय संशोधक कार्यरत उद्योजक बैठकी’त त्या बोलत होत्या. या बैठकीस विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, जिल्हाधिकारी माननीय श्री. रघुनाथ गावडे, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, अन्न तंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर, उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव, आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. संजय मारिवाला आणि उद्योजक श्री. रावसाहेब घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, परभणी जिल्हा अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अनुकूल असून येथे दूध, रेशीम, फळे, मिरची, झेंडू, टोमॅटो आदी कच्चा माल विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे अमूल, मदर डेअरी, रामदेवबाबा आदी नामवंत कंपन्यांशी संपर्क साधून दुधावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिल्क टू मिल्क’ या संकल्पनेतून तुतीपासून रेशीम धागा आणि दुधापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून मूल्यवर्धनाची साखळी निर्माण करणार आहोत. शेतकऱ्यांनी केवळ प्राथमिक उत्पादनावर थांबू नये तर प्रक्रिया उद्योगात उतरावे, यासाठी जनजागृती करण्यात येणार असून, सोबतच त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या. फळप्रक्रिया, टोमॅटो सॉस, चटणी, मिरची कांडप, झेंडू प्रक्रिया उद्योग यासारख्या गृहउद्योगांना चालना देण्यासाठी गुंतवणूकदारांना परभणीत आमंत्रित करण्यात येईल. स्थानिक उद्योजक व शेतकऱ्यांना योग्य मार्केटिंगसह उत्पादनवाढीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'अन्न प्रक्रिया उद्योगासाठी परभणी जिल्हा सक्षम असून, येथे जागा, मनुष्यबळ, कच्चा माल, उद्योजक आणि गुंतवणूक यांचा समतोल आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या उद्योग शाखांसाठी परभणीला प्राधान्य द्यावे, यासाठी लवकरच विशेष बैठक घेण्यात येईल,' असे माननीय पालकमंत्र्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्थानिक उद्योजकांना कृषि उत्पादनात मूल्यवर्धन, फूड प्रोसेसिंग आणि मार्केटिंगमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. स्थानिक तरुणांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. परभणीसारख्या भागात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणीच्या संधी उपलब्ध असून येथे मोठ्या उद्योगनिर्मितीचे ध्येय ठेवूनच कार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम आणि शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत, हे बदलत्या आणि प्रयोगशील कृषि उद्योगस्नेही परभणीचे प्रतीक असल्याचे माननीय कुलगुरूंनी स्पष्ट केले. परभणी कृषि विद्यापीठाने अनेक उत्कृष्ट कृषि प्रक्रिया तंत्रज्ञानाचा विकास केला असून, या तंत्रज्ञानाचा लाभ कृषि उद्योजकांनी घ्यावा, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

कच्च्या मालावर आधारित प्रक्रिया युनिट्सची उभारणी, मार्केटिंग, प्रशिक्षण व संशोधनावर भर देण्यात येईल, असे माननीय जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांनी सांगितले.

श्री. संजय मारिवाला यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात गुणवत्ता व प्रमाणवाढीवर भर देण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

बैठकीचे सूत्रसंचालन उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव यांनी केले तर आभार सहाय्यक कुलसचिव श्री राम खोबे यांनी मानले. या बैठकीस जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कृषि संशोधक व उद्योजक – आशिष श्रीवास्तव, संदीप माळी, किरण वाघ पाटील, सुहास गोडगे, डॉ. उमेश कांबळे, जश मिराणी, उपेंद्र शाह, प्रसाद जोशी, तसेच पीएनपीचे संचालक नवनाथ बारहाते उपस्थित होते.





Saturday, June 14, 2025

वनामकृविच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत ‘बियाणे वाटप कार्यक्रम व शेतकरी मेळावा’ उत्साहात पार

कमी पाण्यात अधिक उत्पादनासाठी सूक्ष्म सिंचनावर भर : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर येथील भारतीय जल व्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत (SC Sub Plan) “बियाणे वाटप कार्यक्रम व शेतकरी मेळावा” दिनांक १३ जून रोजी मौजे भोसा, ता. मानवत, जि. परभणी येथे यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी मंचावर डॉ. हरीश आवारी (मुख्य शास्त्रज्ञ), श्री ऋषिकेश औंढेकर आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कृषि विद्यापीठात विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन यांसारख्या पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे व स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा. त्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. कमी पाण्यात अधिक उत्पादन हे शाश्वत शेतीचे सूत्र असल्याचेही ते म्हणाले.

प्रास्ताविक करताना डॉ. हरीश आवारी यांनी सांगितले की, विद्यापीठाने विकसित केलेले विविध पिकांचे वाण आणि लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यांनी तुषार सिंचन व ठिबक सिंचनाच्या वापरावर भर देत उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी ही तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी माननीय कुलगुरू यांच्या शुभहस्ते अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत भोसा व लोहरा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन व तूर वाणांची बियाणे वाटप करण्यात आली. तसेच विद्यापीठाची कृषि दैनंदिनी व दिनदर्शिकेचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. हरीश आवारी व श्री ऋषिकेश औंढेकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर पिकांच्या आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन केले. या उपक्रमामार्फत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन व पाणी बचत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामुळे अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी आधुनिक उपायांची प्रभावी माहिती मिळाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रगतशील शेतकरी ॲड. राहुल झोडपे यांनी केले. या कार्यक्रमाला भोसा परिसरातील अनेक शेतकरी बांधव आणि महिलांची उपस्थिती लाभली आणि त्यांनी या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विलास जाधव, कार्तिक गिराम, सुरेश शिंदे आणि प्रगतशील शेतकरी श्री बाबाराव जाधव यांचे विशेष योगदान लाभले.




Thursday, June 12, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात वनामकृविला ‘ईट राईट कॅम्पस’चा ५-स्टार सन्मान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी या मराठवाड्यातील अग्रगण्य संस्थेला ‘ईट राईट कॅम्पस’ (Eat Right Campus) उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) कडून ५-स्टार रेटिंगसह सन्मानित करण्यात आले आहे. या सन्मानामुळे विद्यापीठाच्या शाश्वत, सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न व्यवस्थापनातील प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे.

ईट राईट कॅम्पस’ हा FSSAI चा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यस्थळे आणि रुग्णालये या ठिकाणी सुरक्षित, पौष्टिक आणि पर्यावरणपूरक खाद्य पद्धतींचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तो राबवण्यात येतो.

या उपक्रमाची मुख्य उद्दिष्टे म्हणजे कॅम्पस परिसरात स्वच्छ, दर्जेदार व सुरक्षित अन्न पुरवठ्याची हमी, संतुलित आणि पोषक आहाराची सवय वृद्धिंगत करणे तसेच पर्यावरणपूरक खाद्य व्यवस्थापन व प्रक्रिया अंगीकारणे अशी आहेत.

या प्रमाणन प्रक्रियेत अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या (FSSAI) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन, अन्न सुरक्षा प्रशिक्षण, सुविधांचे मूल्यांकन आणि अंतिम मूल्यमापनानंतर मानांकन दिले जाते. परभणी कृषि विद्यापीठाने या सर्व निकषांची अत्युच्च पातळीवर पूर्तता करून ५-स्टार रेटिंग  मिळवले आहे.

सदर सन्मान प्रमाणपत्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडे प्राधिकरणाने दिनांक १२ जून रोजी सुपूर्द केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या यशस्वी उपक्रमासाठी अन्न व औषध प्रशासन, परभणी यांचे महत्त्वाचे योगदान लाभले असून सहायक आयुक्त (अन्न) श्री. अनंतकुमार चौधरी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अनिकेत भिसे, श्री. अरुण तम्मलवाड आणि सौ. राजश्री सावंत यांनी प्रमाणन प्रक्रियेत मार्गदर्शन करून विशेष भूमिका बजावली.

या उल्लेखनीय यशामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत झाली असून, इतर शैक्षणिक संस्थांसाठीही हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

वनामकृविद्वारा ‘विकसित कृषी संकल्प अभियानाचा’ कातनेश्वर येथे यशस्वी समारोप: शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन


           

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या “विकसित भारत” संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री. शिवराजसिंह चौहान यांचे दूरदृष्टी नेतृत्वात देशभरात दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान” राबविण्यात आले. या अभियानाचा उद्देश आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शाश्वत शेतीला चालना देणे आणि अन्नसुरक्षेला बळकटी देणे हा होता.

मराठवाडा विभागासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील १२ कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजनाद्वारे शास्त्रज्ञांचे चमू तयार करून त्यांच्याद्वारे शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात आले.

आज दिनांक १२ जून रोजी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मौजे कातनेश्वर येथे या अभियानाचा  समारोप शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व परभणी येथील कृषी विज्ञान केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या वेळी प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी.एस. नेहरकर, कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, उपसंचालक डॉ. गजेंद्र जगताप, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबडकर, कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. प्रशांत भोसले व तालुका कृषी अधिकारी श्री. अमोल भालेराव यांची उपस्थिती होती.

डॉ. भगवान आसेवार यांनी कोरडवाहू शेतीसाठी रुंद सरी वरंबा पद्धती, जलसंधारण तंत्र, आणि शाश्वत शेतीचे महत्त्व पटवून दिले. पूर्णा तालुक्यातील प्रमुख नगदी पिकांमध्ये हळद, कापूस आणि सोयाबीन यांचे आधुनिक वाण, उत्पादनवाढीसाठी लागणारी तंत्रे आणि त्यावरील रोग-किड नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित कापूस वाणांची माहिती दिली तसेच गळफांदी व्यवस्थापन, खत वापर, किटकनाशक फवारणी याचे सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. गजानन गडदे यांनी हळद पिकात येणाऱ्या रोगांविषयी माहिती देत, बीज प्रक्रिया, मृदा परीक्षण व संतुलित खत व्यवस्थापन यावर भर दिला. डॉ. अनंत लाड आणि डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी हुमणी अळी, बुरशीजन्य रोग व्यवस्थापन व जैविक पर्यायांबाबत (बायोमिक्स, ट्रायकोडरमा) शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत भोसले यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांची माहिती देत मृदा तपासणीनुसार पीक निवडीचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी परिसरातील उद्योजिका संध्या सुदर्शन चापके यांच्या बिजोत्पादन प्रकल्प व हळद प्रक्रिया गृह उद्योगास शास्त्रज्ञांनी भेट देऊन उत्पादन टिकवणूक, आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग यावर प्रभावी मार्गदर्शन केले.

या अभियानामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात योग्य पीक निवड, खत व्यवस्थापन, रोग-किड नियंत्रण व शेतीप्रक्रिया उद्योग याबाबत मार्गदर्शन मिळाल्याने त्यांचे उत्पादन व आर्थिक उत्पन्न निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास १५० हून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.






वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची एमजीएम विद्यापीठास सदिच्छा भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १२ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री. अंकुशराव कदम यांनी त्यांचे हार्दिक स्वागत करून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीमार्फत प्राप्त ‘ए ग्रेड’ मानांकन आणि ३.२१ गुणांसह उच्च श्रेणीची अधिस्वीकृती मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनीही माननीय कुलपती श्री. अंकुशराव कदम यांना येत्या रविवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीप्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर आणि विद्यापीठाचे इतर मान्यवर उपस्थित होते.

भेटीदरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि एमजीएम विद्यापीठ यांच्यात पूर्वी झालेल्या सामंजस्य करारानुसार, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात परस्पर सहकार्य, अद्ययावत ज्ञानाची देवाण-घेवाण, तसेच संयुक्त प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. विशेषतः, दोन्ही विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना कौशल्यविकास, तांत्रिक प्रगती, नाविन्याची ओढ निर्माण करणे, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार व व्यवसायाच्या संधी मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. याशिवाय, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा प्रभावी अवलंब करत, संयुक्त शैक्षणिक आणि संशोधन प्रकल्प हाती घेण्याच्या दृष्टीने दोन्ही विद्यापीठांमध्ये सहमती व्यक्त करण्यात आली.



Wednesday, June 11, 2025

वनामकृविच्या 'माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत' उपक्रमात ९७२ शेतकऱ्यांशी थेट संवाद

उपक्रमात विद्यापीठाचा ‘ए ग्रेड’  अधिस्वीकृती सन्मान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकरी आणि विद्यार्थ्यांना समर्पित केला.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या वतीने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली "माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत" हा अभिनव उपक्रम आणि विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत विविध विस्तार कार्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये दिनांक ११ जून रोजी यशस्वीरित्या राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील १६ शास्त्रज्ञांच्या चमूमधील ४८ शास्त्रज्ञांनी १९ गावांमध्ये ९७२ हून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, आणि शेतकरी मेळावे घेतले. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत त्यांना विविध पिकांच्या तंत्रज्ञानासह हवामान बदलाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्याच्या मौजे आव्हाई येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी गावचे उपसरपंच श्री.गिरी, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत भोसले तसेच कृषी शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. गजानन गडदे, डॉ. चंद्रशेखर आंबडकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआरराष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकनासह अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली असूनया मूल्यांकनात विद्यापीठास उच्चांकी  ‘३.२१’ गुण प्राप्त झाले आहे असे सांगून हा सन्मान शेतकरी आणि विद्यार्थ्यांना समर्पित केला. याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना शाश्वत शेतीचे उपाय सांगत प्रेरणा दिली आणि विद्यापीठ सदैव त्यांच्या सेवेत तत्पर असल्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी मा. कुलगुरू यांचे याबद्दल अभिनंदन व्यक्त केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून दररोज ६ गावांमध्ये शास्त्रज्ञांची टीम जाऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत आहे. हे अभियान केवळ नव्या तंत्रज्ञानाचा प्रचार न करता, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी झपाट्याने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना शेतीचा उत्पादन वाढविण्यासोबत उत्पादन खर्च कमी करण्यावरही भर द्यावा असे आवर्जून सांगितले त्यांनी विद्यापीठात उपलब्ध असलेल्या विविध निविष्ठांचा आपल्या शेतीमध्ये वापर करण्याचे आवाहन केले.

यावेळी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठा तर्फे शेतकऱ्यांसाठी दर मंगळवार व दर शुक्रवारी घेण्यात येणाऱ्या शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाची माहिती देऊन शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या अडचणी सोडविण्याचे आवाहन केले.

दरम्यान कार्यक्रमात शेतकऱ्यांनी आव्हाई गावात हळद, सोयाबीन आणि कापूस ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. परंतु विशेषतः हळद पिकात बुरशीजन्य रोग, कंदकुज व करपा यांसारख्या समस्यांमुळे उत्पादनात घट जाणवत असल्याचे नमूद केले. या पार्श्वभूमीवर डॉ. गजानन गडदे आणि डॉ. आंबडकर यांनी बियाणे प्रक्रिया, माती परीक्षण आणि जैविक उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन केले. विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स व ट्रायकोडर्मा यांसारख्या जैविक घटकांचा वापर रासायनिक खतांच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. प्रशांत भोसले यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देत त्याचा लाभ कसा घ्यावा यावर भर दिला. शेतकरी श्री जळबाजी बुचाले यांनी अनुभव सांगताना नमूद केले की, पिके घेण्याआधी माती तपासणी व शिफारसीनुसारच खते वापरणे फायदेशीर ठरत आहे. महा विस्तार AI अ‍ॅपच्या वापरामुळे शेतातच अचूक सल्ला मिळत आहे, त्यामुळे खर्चही कमी होतो. या चर्चासत्रात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या शेतीविषयक समस्या मांडल्या.

या उपक्रमांतर्गत दुसऱ्या कार्यक्रमात मौजे. नांदगाव (ता. जि. परभणी) येथे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सेंद्रीय शेती संशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे,  डॉ. बी. एस. कलालबंडी, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. आनंद दौंडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रगतशील शेतकरी श्री. अच्युतराव जवंजाळ यांच्या शेतावर भेट देऊन, केळी, ऊस, खजूर पिकांची पाहणी केली. यामध्ये केळी पिकात अती वाऱ्यामुळे झालेले नुकसान कमी करण्याचे उपाय, केळीची अतिरिक्त वाढणारी पील काढण्याचे अवजार, खरीप पिकांचे नियोजन, विविध वाण, खरीप पिकासाठी बीज प्रक्रिया, ऊस पिकात पाचट कुजवणे, खोडवा पिकासाठी आधुनिक यंत्र  इत्यादी विषयावर चर्चा संपन्न झाली.

याबरोबरच विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ वासुदेव  नारखडे, शास्त्रज्ञ डॉ सूर्यकांत पवार, डॉ संजय पाटील, डॉ. मोहन धुप्पे, डॉ शिवाजी शिंदे,  डॉ. वसंत प्र. सूर्यवंशी, प्रा अरुण गुट्टे, डॉ. गणेश गायकवाड डॉ. बसवराज भेदे डॉ. पवन ढोके, , डॉ व्यकट जगताप व डॉ अनिलकुमार कांबळे, डॉ हनुमान गरुड प्रा किशोर जगताप डॉ डी एम फिरके डॉ तारकनाथ, डॉ.  पी एस देशमुख, डॉ. सोमवंशी डॉ. गीते, डॉ.  तडावी, डॉ. आर. एस. राऊत यांनी विविध ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रक्षेत्रास भेटी दिल्या.













Tuesday, June 10, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ‘ए ग्रेड’ मानांकन; आयसीएआर द्वारा पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती

 विद्यापीठाच्या मानांकनामागे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तसेच अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांना भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकन प्राप्त झाले. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने दिनांक १६ मे २०२५ रोजी झालेल्या ४०व्या बैठकीत विद्यापीठास १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली असून, या मूल्यांकनात विद्यापीठास उच्चांकी  ‘३.२१’ गुण प्राप्त झाले आहेत.


ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील सातत्य व विस्तार सेवांतील कार्यक्षमतेची अधिकृत पावती आहे. अधिस्वीकृती समितीने २५ ते २९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान परभणी मुख्यालयासह लातूर, बदनापूर, अंबाजोगाई, धाराशिव, गोळेगाव (जि. हिंगोली), व चाकूर (जि. लातूर) येथील महाविद्यालयांना भेटी देत सखोल मूल्यांकन केले.


यावेळी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली सर्व महविद्यालयांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभागाच्या प्रमुखांनी, प्राध्यापकांनी आपले कार्य सादर केले. या कामगिरीचा सखोल आढावा त्यावेळी समितीने घेतला होता. त्यावेळी विद्यापीठात शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्यात सातत्यपूर्ण प्रगती, शेतकरी हिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, तसेच भौतिक सुविधांचा प्रभावी वापर आदी बाबींचे समितीने विशेष कौतुक केले होते.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी मार्गदर्शनामुळे हे मानांकन प्राप्त होऊ शकले. यानिमित्ताने कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, हे यश संपूर्ण विद्यापीठ समुदायाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. राष्ट्रीय पातळीवर कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रात विद्यापीठाचा प्रभाव अधिकाधिक वाढेल. या मानांकनामुळे विद्यापीठ विद्यार्थी केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी केंद्रित विस्तारकार्य आणि कर्मचारी केंद्रित प्रशासन राबविण्यास अधिक कटिबद्ध राहील.

या अधिस्वीकृतीमुळे विद्यापीठाची शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक उंचावली असून, मराठवाड्यातील कृषी शिक्षणाला नवसंजीवनी लाभली आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल  तथा विद्यापीठाचे  माननीय कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णनजी, महाराष्ट्र शासनाचे, कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. अॅड. माणिकरावजी कोकाटे, कृषि राज्यमंत्री  मा.ना. अॅड. आशिष जयस्वाल, कृषि परीषदेचे उपाध्यक्ष मा. ना. मा. श्री तुषार पवार, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील,  विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. रमेशराव कराड, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. अभिमन्यू पवार आणि विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य मा. श्री विठ्ठल सकपाळ, मा. श्री. सुरज जगताप, मा. श्री. प्रविण देशमुख, मा. श्री. दिलीप देशमुख, मा.डॉ. आदिती सारडा, मा. श्री. भागवत देवसरकर, मा. डॉ. कौशिक बॅनर्जी, मा. डॉ. व्ही. एम. मायंदे, कृषि परिषदेचे सदस्य मा. श्री विवेक दामले,  मा. श्री विनायक काशीद, मा. श्री जनार्दन कातकडे, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे)पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), कृषि आयुक्त मा. श्री. सुरज मांढरे (भाप्रसे)कृषि परिषदेचे सर्व संचालक आणि विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य,  यांनी दिलेल्या अनमोल सहकार्याबद्दल माननीय कुलगुरूंनी आभार मानले.

तसेच त्यांनी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच सर्व अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सर्व शिक्षक, शास्त्रज्ञ, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचेसह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी यांनी दिलेल्या महत्त्वाचे योगदानाचे कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले असून ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याची पावती असल्याचे ते म्हणाले.

या मानंकानामुळे राष्ट्रीय स्तरावरील निकषांवर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या कृषी, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन इत्यादी शाखांतील पदवी, पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमांनी उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध केली आहे.

विद्यापीठात या गौरवामुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक विश्वासार्हतेला बळकटी देणारी असून, विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण कृषि शिक्षणाच्या नव्या संधी खुल्या करणारी ठरणार आहे.


विद्यापीठाच्या मानांकन उंचाविण्यास प्रभावी ठरलेल्या विशेष बाबी

मागील दोन वर्षांमध्ये माननीय कुलगुरू  प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यात राबविण्यात आलेले विशेष उपक्रम विद्यापीठाच्या मानांकन उंचाविण्यास निर्णायक ठरले आहेत. विद्यार्थ्यांकरिता सुविधा निर्मिती व वसतिगृहांची दुरुस्ती, विद्यापीठ परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण, तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र यांत्रिकीकरण केंद्र’, कौशल्य विकास उपक्रम, कॉमन इन्क्युबेशन सेंटर (सामायिक उद्योजकता संवर्धन केंद्र) ची स्थापना या गोष्टींचा समावेश आहे. तसेच गेल्‍या दोन वर्षात २५०० एकर पडीत जमिन विकसित करून मोठया प्रमाणात दर्जेदार पैैैैैैैदासकर बीजोत्‍पादन करण्‍यात आले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सहाव्या अधिष्ठाता समितीचा पदवी अभ्यासक्रम तसेच पदव्युत्तर स्तरावरील बीएसएमए अभ्यासक्रम यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासोबतच बाह्यस्त्रोत निधीच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेले संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर करण्यात आलेले सामंजस्य करार, 'शेतकरी देवो भव:' या भावनेतून शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासोबत’ उपक्रम, नियमितपणे राबविण्यात येणारा ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम, संशोधनाद्वारे विकसित करण्यात आलेले विविध नवीन वाण, अवजारे व तंत्रज्ञान आणि यांचे प्रभावी विस्तार कार्य -  या सर्व बाबी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कामगिरीला गती देणाऱ्या ठरल्या असून, मानांकन उंचाविण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणाविषयी पालकांनी सजग असणे आवश्यक : डॉ. जया बंगाळे

 प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत प्रथम पालक कार्यशाळेचे आयोजन


बालकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यात शाळेबरोबरच त्यांच्या पालकांची भूमिका देखील अतिशय महत्त्वाची असल्याने त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सजग असणे आवश्यक असल्याचे मत डॉ.  जया बंगाळे यांनी व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागांअतर्गत असणाऱ्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक  शाळेतर्फे पालकांसाठी आयोजित प्रथम कार्यशाळेत या महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठता व प्राचार्य डॉ.जया बंगाळे यांनी  अनेक महत्त्वाच्या पैलूंवर स्लाईड शोद्वारे  मार्गदर्शन केले. बालकांच्या विकासासाठी  त्यांचे गर्भावस्थेपासून ते आठ वर्षापर्यंतचे वय महत्त्वाचे असल्याने या वयातच पालकांनी त्यांच्या आरोग्य व शिक्षण याविषयी विशेष काळजी घेणे  नितांत आवश्यक असल्याचे त्यांनी विशद केले. तसेच नवीन पूर्व प्राथमिक शैक्षणिक धोरणातील बदल नमूद करत असतांना पायाभूत स्तरावरील अभ्यासक्रमाविषयी त्यांनी पालकांना जागरुक केले. बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण हे आनंददायी वातावरणात मिळणे आवश्यक असून या अभ्यासक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाबरोबरच खेळ, गाणे, गोष्टी हस्तकला, सृजनात्मक कार्य तथा मूल्य-शिक्षणावर अधिक भर दिला गेला असल्याचे त्यांनी नमूद केले. बालकांना मूल्य शिक्षण देत असतांना त्यांना समानानुभूती, आदर, जबाबदारीची जाणीव, स्वच्छता, समानता, सेवाभाव, नैतिकता, सार्वजनिक मालमत्तेचा आदर, राष्ट्रभक्ती यासारखी मूल्ये शाळेप्रमाणेच पालकांनी देखील त्यांच्या पाल्यामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्नशील असावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. तदनंतर नव्याने प्रवेशीत विद्यार्थी शाळेमध्ये सहजरित्या समायोजित होण्याच्या हेतूने पालकांनी त्यांच्या पाल्याची करावयाची तयारी याविषयी डॉ. वीणा भालेराव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.  याबरोबरच प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रम, विविध उपक्रम, या शाळेची वैशिष्टये तथा शालेय उपक्रमात पालकांच्या सहभागाचे महत्व याविषयी त्यांनी माहिती दिली. सदरील कार्यशाळेचे सूत्रसंचलन शिक्षिका श्रुती औंढेकर यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी शाळेतील सर्व शिक्षिका आणि शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेसाठी पालक बहुसंख्येने उपस्थित होते.