Tuesday, November 18, 2025

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या रावे उपक्रमाला इंदेवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

 महिला सक्षमीकरणासाठी महाविद्यालयाचे तंत्रज्ञान उपयुक्त – सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉ. राहुल रामटेके

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मौजे  इंदेवाडी (ता. जि. परभणी) येथे भव्य शेतकरी मेळावा व तंत्रज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. राहुल रामटेके यांनी भूषविले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदेवाडीचे सरपंच श्री. अशोक कच्छवे उपस्थित होते. व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉ. राहुल रामटेके यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले की, महाविद्यालयाने विकसित केलेले अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञान गावातील महिलांनी अवलंबल्यास त्या ‘चूल आणि मूल’ पलीकडे जाऊन स्वावलंबी बनू शकतील. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या स्वयंरोजगार उभारू शकतील आणि आपल्या कुटुंबाचा मजबूत आधार बनू शकतील. महिला हा कुटुंबाचा कणा असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच कुटुंबाची जडणघडण घडत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना हसत–खेळत कौशल्यविकासाचे आणि ज्ञानाचे धडे दिले. या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य, आकाश कंदील आदी साहित्य तयार करण्याची कला आत्मसात केली. या कार्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी महाराष्ट्र शासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विकसित केलेल्या ‘महाविस्तार ॲप’ चे महत्त्व अधोरेखित करीत त्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यापीठातील विविध तंत्रज्ञान व उत्पादने शेतकऱ्यांसाठी कशी उपयुक्त ठरू शकतात, याचेही त्यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. नीता गायकवाड यांनी महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प अंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या विविध श्रम बचत उपकरणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून सविस्तर माहिती दिली. या साधनांचा वापर केल्यास महिलांच्या दैनंदिन शेतीकामातील कष्ट कमी होऊन कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता वाढण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. वीणा भालेराव यांनी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमांची माहिती देताना विद्यार्थ्यांनी या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास मिळणाऱ्या कौशल्यविकास, उद्योजकता, रोजगारसंधी आणि संशोधनाच्या संधींचे महत्व विशद केले. आधुनिक युगातील घरव्यवस्थापन, पोषण, वस्त्रनिर्मिती, बालविकास आणि विस्तार शिक्षण या क्षेत्रांमध्ये या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थी आत्मनिर्भर बनतात, असे त्यांनी सांगितले.

डॉ. शंकर पुरी यांनी मागील दोन महिन्यांपासून या उपक्रमाला मिळालेल्या ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाचे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, अंगणवाडी केंद्रे, शैक्षणिक संस्था व विविध शासकीय कार्यालयांकडून मिळालेल्या मोलाच्या सहकार्याचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी गावात राबविलेल्या सर्वेक्षण, जनजागृती, आरोग्य व पोषण प्रचार उपक्रमांना मिळालेला प्रतिसाद अत्यंत उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रगतशील शेतकरी व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश कच्छवे आणि श्री. बालाजी बिरादार यांनी प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांनी मागील दोन महिन्यांत गावात पोहोचविलेल्या विविध तंत्रज्ञानाची तसेच त्यांनी केलेल्या परिश्रमांची मनापासून प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आधुनिक पद्धतींचे ज्ञान थेट घर आणि शेतात उतरले आहे. उत्पादन खर्च कमी होणे, मेहनत व वेळ वाचणे, तसेच घरकामासह पिकांची गुणवत्ता सुधारण्यास या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ होत आहे.

रावे उपक्रमास इंदेवाडी येथील सरपंच श्री. अशोक कच्छवे, ग्रामसेवक श्री. हनुमान कच्छवे, प्रगतशील शेतकरी श्री. शिवाजीराव कच्छवे, श्री. संजय सिसोदिया श्री. माधवराव कच्छवे, श्री.बन्सीधर लाड, ग्रामस्त,  जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रल्हाद जाधव, शिक्षक श्री. रामेश्वर वाघ, श्री. बाबर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आदींचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम समन्वयक (रावे) तथा विभाग प्रमुख डॉ शंकर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या सर्व ग्रामकन्या व ग्रामदूत (रावे विद्यार्थी) यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने मेळावा अधिक प्रभावी झाला.























Saturday, November 15, 2025

वनामकृविद्वारा आयोजित अंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट संचालित राजीव गांधी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित अंतरमहाविद्यालयीन खो-खो (मुली) स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.
महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी १०.०० वाजता या स्पर्धेचे भव्य उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्‍घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपल्या उद्‍बोधनात त्यांनी क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून शिस्त, चिकाटी, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करणारी जीवनशैली असल्याचे अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही समान प्राविण्य मिळवून आरोग्यदायी शरीरातच आरोग्यदायी मन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी, असे आवाहन करत त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना उत्तुंग यशाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यापीठ प्रशासन क्रीडा पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाच्या संधी अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मा. श्रीमती लक्ष्मीताई अशोकराव देशमुख या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, तसेच विद्यापीठाचे क्रीडा शिक्षक प्रा. संघर्ष शृंगारे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतातून खो-खो खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी खो-खो हा केवळ खेळ नसून चपळता, तत्परता, संघभावना आणि शारीरिक-मानसिक सहनशक्ती विकसित करणारा भारतीय पारंपरिक वारसा असल्याचे सांगितले. खो-खो सारख्या स्थानिक खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते, तसेच टीमवर्क आणि निर्णयक्षमता वाढीस लागते, असे ते म्हणाले.

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनीही विद्यापीठातील क्रीडा क्षेत्रात विद्यार्थिनींचा वाढता सहभाग ही अत्यंत अभिमानास्पद आणि सकारात्मक घडामोड असल्याचे सांगितले. महिला विद्यार्थिनी पारंपरिक मर्यादांपलीकडे जाऊन क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करीत आहेत. त्यांना मिळणारे प्रोत्साहन आणि सुविधा यामुळे भविष्यात अनेक उत्कृष्ट खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेचे यशस्वी आयोजन राजीव गांधी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. अभिजित कंडेरे यांनी संपूर्ण समन्वयाचे उत्कृष्ट नियोजन करून स्पर्धेला गतिमान स्वरूप दिले.

स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतील महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कौशल्यपूर्ण चढाओढ, झपाट्याचे धावणे, चपळता आणि संघभावना यांचे सुंदर प्रदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार, संघभावना, शिस्तबद्धता आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधिक दृढ झाले. तसेच विद्यापीठीय पातळीवर मुलींच्या खेळांना दिले जाणारे प्रोत्साहन आणि सुविधा यांचेही सर्वत्र कौतुक झाले.

क्रीडा विभागाच्या या उपक्रमाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महिला विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा नवा आदर्श निर्माण केला असून भविष्यातही अशा स्पर्धांमुळे प्रतिभावान खेळाडू घडण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे.












कृषि क्षेत्रातील सूक्ष्म प्रक्रिया उद्योगातील संधी : वनामकृविच्या कृषी संवादाचा ७२ वा भाग उत्साहात


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून, तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी (नांदेड-२) यांच्या समन्वयातून “शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद” या उपक्रमाचा ७२ वा भाग कृषि क्षेत्रातील सूक्ष्म प्रक्रिया उद्योगातील संधी” या विषयावर दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात सगरोळी येथील कृषि विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार यांनी कृषि क्षेत्रातील सूक्ष्म प्रक्रिया उद्योगातील संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी भरडधान्यांसह विविध पिकांच्या मूल्यवर्धनासाठी लघु व सूक्ष्म उद्योग उभारणीचे महत्त्व स्पष्ट केले. ग्रामीण भागातील युवक व शेतकरी यांच्यासाठी रोजगारनिर्मिती, उत्पादनवाढ, बाजारपेठेतील वाढती मागणी आणि पोषणमूल्य वाढविण्यासाठी सूक्ष्म प्रक्रिया उद्योग कसे प्रभावी ठरतात, याबद्दल त्यांनी ठोस उदाहरणांसह माहिती दिली.

आभासी माध्यमाद्वारे ४० हून अधिक शेतकरी, महिला व उद्योजक यांनी सहभाग घेतला. संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रात शेतकऱ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले व तज्ञ मार्गदर्शकांनी समाधानकारक उत्तरे दिली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास तसेच प्रक्रिया उद्योगातील नव्या संधी समजून घेण्यास मदत झाली.

या संवाद उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कृषि क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, उत्पादनवाढीसोबतच मूल्यवर्धन व प्रक्रिया उद्योगातील संधी यांची माहिती मिळाली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रविण चव्हाण, शास्त्रज्ञ (कृषि विस्तार) यांनी केले. त्यांनीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. तसेच त्यांनी शेतकरी-शास्त्रज्ञ संवादाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सहभागी शेतकरी बांधवांचे स्वागत केले व पुढील उपक्रमातही सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाचे अधिकारी तसेच कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथील सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले.


बालदिन उत्साहात साजरा : वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत दिनांक १४ नोव्हेंबर २०२५  रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिनाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या समन्वयिका डॉ. वीणा भालेराव यांनी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याविषयी तसेच त्यांच्या अतुलनीय कार्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रउभारणी आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांना ‘भारताचे शांतीदूत’ म्हणूनही संबोधले जाते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे सादर केली. तसेच विविध सेक्शनमधील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य प्रस्तुती दिली. यावेळी महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापक तथा अखिल भारतीय समन्वित प्रकल्प (कृषिरत महिला) च्या केंद्र समन्वयिका डॉ. नीता गायकवाड  यांनीही विद्यार्थ्यांसमवेत नृत्य सादर करून सर्वांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बालदिनानिमित्त शाळेद्वारे सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कु. श्रुती औंढेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षिका, मदतनीस तसेच सर्व सेक्शनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Friday, November 14, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामध्ये शोकसभा : दिवंगत प्राध्यापकांच्या योगदानाचे स्मरण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा पाया घडविण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या विद्यापीठातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित शैक्षणिक मान्यवरांच्या निधनाने विद्यापीठ परिवार शोकाकुल झाला आहे.

माजी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता स्वर्गीय डॉ. मारुती व्यंकटराव ढोबळे, कृषि अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख स्वर्गीय डॉ. तुकाराम गंगाराम सातपुते, कृषि विस्तार शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख स्वर्गीय डॉ. केशव रामराव नादरे, सेवानिवृत्त प्राध्यापक तथा प्राध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय डॉ. कामाजी माणिकराव डाखोरे आणि कृषि वनस्पतीशास्त्र विभागातील सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक स्वर्गीय डॉ. रघुनाथ हरिश्चंद्र भोसले यांच्या नुकत्याच झालेल्या देहावसानामुळे विद्यापीठात शोककळा पसरली आहे. या सर्व मान्यवर शास्त्रज्ञांनी आपले संपूर्ण आयुष्य विद्यापीठाची जडणघडण, संशोधनवृद्धी, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे आणि विद्यार्थीघडणीसाठी अर्पण केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा दिली. दिवंगत शास्त्रज्ञांचे कर्तृत्व विद्यापीठाच्या इतिहासात आजही उज्ज्वल अक्षरांनी नोंदलेले आहे.

या दिवंगत मान्यवरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठ परिवारातर्फे श्रद्धांजली आणि शोकसभा दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

शोकसभेत दिवंगत शास्त्रज्ञांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यापीठ पुढील काळात अधिक दृढपणे प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Wednesday, November 12, 2025

वनामकृविचा मराठवाड्यात "माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत" उपक्रम यशस्वी

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये “माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. हा उपक्रम मागील दोन वर्षांपासून नियमितपणे सुरू असून, दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रे, महाविद्यालये आणि विस्तार केंद्रांतील शास्त्रज्ञांचे समूह आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांसोबत एक दिवस घालवतात. या दिवशी प्रक्षेत्रभेटी, चर्चासत्रे, शेतकरी मेळावे आणि मार्गदर्शन कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
यावेळी विद्यापीठाच्या ११ चमूतील ४२ शास्त्रज्ञांसह कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रक्षेत्रभेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळावे आयोजित करून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या उपक्रमाद्वारे सुमारे ४०० शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यामध्ये विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयांतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी येथील शास्त्रज्ञांनी या उपक्रमाअंतर्गत मौजे पिंपळगाव कुटे, ता. वसमत, जि. हिंगोली येथे रब्बीपूर्व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला.

या कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी या वर्षीच्या सततच्या पावसामुळे हरभरा पिकावर रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी ट्रायकोडर्मा किंवा बायोमिक्सचा वापर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विस्तार विषयक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले, तर उपस्थित शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. तसेच विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी हरभरा व गहू लागवड तंत्रज्ञानासह ऊसाच्या सुपरकेन तंत्राविषयी सविस्तर माहिती दिली. कृषि विभागाचे उप कृषि अधिकारी श्री. गजानन वरुडकर यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गावाचे सरपंच श्री. राजकुमार कुटे, चांदोबा कदम, अनंतराव कुटे (पोलीस पाटील), कृषि विभागाचे श्री. राजेश शेळके व श्री. प्रल्हाद चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

मराठवाड्यातील इतर ठिकाणी सहभागी शेतकऱ्यांना शास्त्रज्ञानी कापसाच्या वेचणी, कापसाच्या विविध वाणांची गुणवत्ता, तसेच रब्बी हंगामातील पीक नियोजन आणि व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना फळबाग, ऊस पिकाचे व्यवस्थापन, बीजप्रक्रिया, पेरणी व खत व्यवस्थापन, पशुधनाची काळजी, बाजार व्यवस्थापन याबाबतही माहिती दिली.

या उपक्रमात परभणी येथील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प व सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, लातूर येथील कृषि महाविद्यालय, तसेच  राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र (छत्रपती संभाजीनगर), नांदेड येथील केळी संशोधन केंद्र, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी) याबरोबरच कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, खामगाव, बदनापूर) आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे,  डॉ सुर्यकांत पवार, डॉ. आनंद गोरे, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. मदन पेंडके, डॉ पपिता गौरखेडे, डॉ. दिप्ती पाटगावकर, डॉ. हनुमान गरुड, डॉ. एस. डी. सोमवंशी, डॉ.अनिता जिंतूरकर, डॉ.बस्वराज पिसुरे, श्री.किशोर शेरे, डॉ. तुकेश सुरपाम, डॉ. नरेंद्र जोशी, कृषि विभागातील श्री. सुभाष साळवे व इतर अधिकारी, याच्यासह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. धांडगे, डॉ. संदीप देशमुख, डॉ. सतीश बेंद्रे, श्री व्यंकट ठके, श्री प्रमोद कळसकर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला व मार्गदर्शन केले.