Tuesday, July 8, 2025

"पीजीएस-इंडिया" सेंद्रिय प्रमाणीकरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

 देश-विदेशात नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची वाढती चर्चा... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद (ऑनलाईन) मालिकेत सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या " पीजीएस-इंडिया सेंद्रिय प्रमाणन " (PGS-INDIA Organic Certification) या योजनेविषयी माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते तर गाझियाबाद येथील राष्ट्रीय जैविक व नैसर्गिक शेती केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. वाचस्पति पांडेय यांनी या संदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख आयोजक संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे, डॉ. कैलास गाढे, डॉ. पपिता गौरखेडे यांची उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, की नैसर्गिक तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास अधिक मूल्य मिळवून देण्यासाठी प्रमाणीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. सध्या देश-विदेशात नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची चर्चा वाढत आहे. समाजात शाकाहारी आहाराला प्राधान्य दिलं जात आहे. अशा परिस्थितीत नैसर्गिक उत्पादनांमधून मिळणारे पोषक घटक अधिक लाभदायक ठरत आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्यरत आहे. या शेतकऱ्यांना नैसर्गिक व सेंद्रिय शेतीत प्राविण्य मिळावे तसेच त्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मार्गदर्शन व्हावे, यासाठी विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील नैसर्गिक व सेंद्रिय शेती प्रमाणीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेसाठी तांत्रिक मार्गदर्शनार्थ डॉ. वाचस्पति पांडे यांना आमंत्रित करण्यात आले.

माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, मराठवाड्यातील शेतकरी अभ्यासू व उत्साही आहेत. ते अनेक राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांना भेट देतात आणि स्वतःसोबत विद्यापीठाचं नावही उज्वल करतात. विद्यापीठ शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करत आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य विद्यापीठाला लाभत आहे. “प्रश्नोत्तर सत्र हा कार्यक्रमाचा गाभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक प्रश्न विचारून आपलं समाधान करून घ्यावं,” असं आवाहन त्यांनी केलं.

डॉ. वाचस्पति पांडे यांनी नैसर्गिक व सेंद्रिय पदार्थांचे आहारातील आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, कोणतीही वस्तू खरेदी करताना प्रमाणीकरण गरजेचे असते. नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादने खरेदी करताना सुद्धा प्रमाणीकरणाची आवश्यकता आहे. यासाठी ‘पीजीएस  इंडिया’ सेंद्रिय प्रमाणीकरण प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. या प्रक्रियेसाठी आवश्यक संकेतस्थळे, लागणारी कागदपत्रे व प्रक्रिया यांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. त्यांनी ‘पीजीएस  इंडिया’ सेंद्रिय प्रमाणीकरण म्हणजे काय? ते कसे करावे? फायदे कोणते? प्रक्रिया कशी आहेप्रमाणीकरणाची गरज व महत्त्व, प्रमाणीकरणाचे प्रकार व पद्धती, या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च, आवश्यक कागदपत्रे आणि जबाबदाऱ्या, नैसर्गिक शेती करताना घ्यावयाची काळजी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यासोबतच, शेतकऱ्यांकडे किमान एक पशुधन असणे आवश्यक असून गाईला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सुचविले.

त्यांनी जैविक प्रमाणनबददल सांगितले की, जैविक मानकांची पूर्तता होत आहे का, याबाबत निरीक्षण आणि मूल्यांकन केले जाते, प्रमाणपत्र, अटी व निर्बंध जारी करण्याचा निर्णय घेतला जातो, उत्पादन किंवा प्रक्रियेची काही मानके पाळली जात आहेत याची लेखी पुरावा दिला जातो, लेबलिंग नियम व कायदेशीर अटींची पूर्तता केली जात आहे का, याची खात्री केली जाते.

कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यावाचस्पती यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार डॉ कैलास गाढे  यांनी मानले

महत्वाच्या संकेतस्थळांवर अधिक माहिती उपलब्ध

शेतकरी, जैविक उत्पादक आणि ग्राहक यांच्यासाठी पुढील संकेतस्थळांवर अधिक माहिती उपलब्ध आहे:

🔗 https://pgsindia-ncof.gov.in/home.aspx
🔗 https://www.jaivikkheti.in/shop
🔗 https://ncof.dacnet.nic.in


ऊसावरील रसशोषक पांढरी माशी किडींचे व्यवस्थापन, वनामकृवि शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

मागील काही वर्षात ऊसाची दुय्यम कीड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांढरीमाशी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात ऊसावर दिसून येत आहे. विशेषतः खोडवा ऊसावर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो, या किडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस उत्पन्नात मोठी घट झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच ह्या किडीला ओळखून पुढील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. जेणेकरून किडीमुळे होणारे नुकसान वेळीच टाळता येईल. असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील शास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे यांनी दिला आहे.

किडीच्या उद्रेकाची संभाव्य कारणे : शेतामध्ये पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत व पिकाला पाण्याचा ताण पडल्यास अशा दोन्ही परिस्थितीत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो. रासायनिक खताचा असमतोल वापर विशेषतः नत्रयुक्त खताचा कमी, अधिक आणि अवेळी वापर हा किडीसाठी पोषक वातावरण तयार करतो. प्रदीर्घ काळ हवेतील जास्त आर्द्रता, ढगाळ वातावरण व उष्ण हवामान अशा प्रकारच्या अनुकूल परिस्थितीत प्रजनन क्षमता वाढते आणि जीवनक्रम कमी कालावधीचा होतो. यामुळे किडींच्या संख्येत वाढ होण्यास मदत होते. पावसाळ्यात जास्त प्रमाणात पावसाची उघडीप किंवा खंड पडणे. लांब व रुंद पानाच्या जाती जास्त प्रमाणात बळी पडतात. खोडव्याचे व्यवस्थापन योग्य न करणे. 

अनुकूल हवामान : ही कीड उष्ण आणि दमट परिस्थितीत जास्त प्रमाणात वाढते. विशेषतः,25-30° सेल्सिअस तापमान आणि मध्यम ते उच्च आर्द्रता त्यांच्या वाढीस अनुकूल असते. काही प्रयोगांती असे दिसुन आले आहे की, पाऊस जास्त झाल्यास पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी होते.  

नुकसानीचा प्रकार व प्रादुर्भावाची लक्षणे : या किडीची पिल्ले व प्रौढ दोन्ही पानातील रस शोषण करतात परंतु बाल्यावस्था पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते, या अवस्थेत कीड पानाच्या मागील बाजूने स्थिर राहून पानातील रस शोषण करते, त्यामुळे पान निस्तेज होतात, पिवळी व गुलाबी पडतात आणि कालांतराने वाळू लागतात बर्‍याचदा किड तिच्या शरीरातून करीत असलेल्या चिकट गोड स्त्रावामुळे कॅप्नोडियम बुरशीची पानावर वाढ होऊन पाने काळी पडू लागतात व अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. प्रादुर्भाव जास्त असल्यास एकाच पानावर 5000 पर्यंत कोष आढळून येतात. पानाची मागची बाजू कोषामुळे पूर्णपणे काळी पडते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात 86% व साखरेच्या उताऱ्यात 3 ते 4 युनिट पर्यंत घट होऊ शकते.

पर्यायी खाद्य वनस्पती : विविध तृणधान्ये आणि गवतवर्गिय तणे

किडीचे एकात्मिक व्यवस्थापन : सदरिल किडीच्‍या व्यवस्थापनाकरिता लखनऊ येथील केंद्रीय ऊस संशोधन संस्था लखनऊ आणि पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी पुढील उपाय योजनाचा सल्‍ला दिला आहे.

ऊसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी, त्यामुळे कीडनाशकांची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होईल. मार्च ते मे महिन्यात लागवड केलेल्या ऊसावर पांढरी माशी जुलै-ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आढळते, म्हणून उसाची लागवड किंवा तोड उशिरा करू नये. पांढऱ्या माशी ने प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये. खोडवा ऊसात खतांची मात्रा न दिल्यास ही कीड वाढते. त्यामुळे खोडवा ऊसाची काळजी घ्यावी. ऊसाच्या शेंड्या जवळील दुसऱ्या व तिसऱ्या पानांवर ही कीड जास्त अंडी घात घालते अशी 2 ते 3 पाने तोडून अंडी व कोषासह जमिनीत पुरून अथवा जाळून नष्ट करावीत. पांढऱ्या माशी ने प्रादुर्भावग्रस्त ऊस तुटल्यानंतर त्यामधील पाचट तसेच न ठेवता लवकरात लवकर नष्ट करावे म्हणजे अंडी, बाल्यावस्था व कोष मरतात. पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. सदरील सापळे वाऱ्याच्या दिशेने लावल्यास पांढऱ्या माशीचे प्रोढ आकर्षित होऊन चिकटतात त्यामुळे शेतातील पांढऱ्या माशीची संख्या कमी होण्यास मदत होते. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 3 मिली किंवा ॲसीफेट 75 % 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. इमिडाक्लोपीड 17.8% कीटकनाशकासोबत 2 टक्के युरिया (200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून फवारणी केल्यास किडींच्या कोषामध्ये कीटकनाशकाचा प्रवेश चांगल्या प्रकारे होतो व त्यामुळे किडीचे अधिक चांगले व्यवस्थापन होते. कीटकनाशकाच्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवस ऊस किंवा उसाचे वाढे जनावरांना घालू नये.

वरील किटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पावर पंपासाठी किटकनाशकाचे प्रमाण तीन पट करावे. आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी.

पिकांमध्ये फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी: फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी. वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये. लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये. फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.

अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा दुरध्‍वनी क्रमांक 02452 229000 किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन- 8329432097 यावर संपर्क करावा.

सौजन्‍य  : संदेश क्रमांक: 01/2025 ( 07 जुलै 2025)

डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, परभणी


Saturday, July 5, 2025

अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा. हेमंत देशपांडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयातील विभागप्रमुख तथा कॉमन इन्क्यूबेटर सेंटरचे प्रमुख प्रा. हेमंत देशपांडे हे ३४ वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार दिनांक ३० जून रोजी विद्यापीठ सेवेतून निवृत्त झाले आहेत. या निमीत्ताने महाविद्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग घेत, प्रा. देशपांडे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी प्रा. देशपांडे यांच्या नेतृत्वगुणांचे आणि अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विकासात दिलेल्या मोलाच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्यासह  डॉ. पांडुरंग सत्वधर, डॉ. ए. आर. सावते, डॉ. विजया पवार, श्री शिवाजी महाविद्यालयातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. मंजिरी भाटे - देशपांडे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाप्रमुख पाहुणे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते प्रा. देशपांडे यांना महाविद्यालयाच्या वतीने ‘सन्मानपत्र’ प्रदान करण्यात आले. तसेच डॉ. आसेवार यांनीही प्रा. देशपांडे यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधन व नवोन्मेषाची प्रेरणा निर्माण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी प्रा. देशपांडे यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या सेवेत त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व विस्तार कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

आपल्या निरोपपर भाषणात प्रा. देशपांडे भावुक होत सहकारी, विद्यार्थी आणि प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानले. “संस्था ही व्यक्तीपेक्षा मोठी असते. मला खूप काही मिळालं, पण मीही मनापासून देण्याचा प्रयत्न केला,” असे त्यांनी नम्रपणे नमूद केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रीती ठाकूर यांनी केले.  संपूर्ण अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला.

या सन्मान समारंभास सर्व प्राध्यापक, शैक्षणिक व अशैक्षणिक कर्मचारी, पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tuesday, July 1, 2025

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना वनामकृवित अभिवादन; कृषिदिन उत्साहात साजरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी ‘कृषिदिन’ म्हणून साजरी करण्यात आली.

या प्रसंगी विद्यापीठातील स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मारकास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या हस्ते पुष्पपूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात हरितक्रांतीला चालना देऊन महाराष्ट्रातील शेती व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. सिंचन, खते, बियाणे यांचा प्रसार करून कृषि उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणली. त्यांनी १९७२ साली महाराष्ट्रात विभागनिहाय चार कृषि विद्यापीठांची स्थापना करून कृषि शिक्षणास मोठी चालना दिली.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्व. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले असून त्यांनी राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी अनेक दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले. शेतकरी कल्याणकारी योजना, सहकारी संस्थांचा विकास तसेच कृषि आधारित उद्योगांना चालना दिली. त्यांनी ज्वार या पिकाच्या संशोधनात विशेष लक्ष दिले.

या कार्यक्रमास प्राचार्या डॉ. जया बंगाळे, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ राहुल रामटेके, प्राचार्य डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील रावे उपक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना, कृषि महाविद्यालय परभणी यांच्या वतीने शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.





सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

 कृषिदिनाचे औचित्य साधून केले वृक्षारोपण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी ‘कृषिदिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी महाविद्यालयाच्या सभागृहात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याचे स्मरण करताना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विद्यार्थीनी श्रावणी जाधव हिने वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जांभूळ, करंज आणि कडूनिंब यांसारख्या उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी विभाग प्रमुख डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात कृषि दिना निमित्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या परभणी येथील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दिनांक १ जुलै रोजी स्व. वसंतराव नाईक जयंती निमित्ताने कृषि दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

या प्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके यांनी कृषि दिनाचे व वृक्षलागवडीचे महत्व या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजच्या पर्यावरण संकटाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड ही केवळ एक औपचारिकता न राहता ती प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जबाबदारीने पार पाडण्याची आवश्यकता आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे, नचरे या संत तुकारामांच्या ओळी आजही आपल्या दैनंदिन जीवनात प्रकर्षाने लागू करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमास विभाग प्रमुख प्रा.विवेकानंद भोसले, डॉ. हरीश आवारी, डॉ. रघुनाथ जायभाये,  डॉ. गोपाल शिंदे, डॉ. पंडित मुंडे, डॉ. सुमंत जाधव, डॉ. संदीप पायाळ, डॉ. मधुकर मोरे, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रमोदीनी मोरे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ.विशाल इंगळे, इंजी. लक्ष्मीकांत राऊतमारे, इंजी. शिवणकर, डॉ. गजानन वसू, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. ओंकार गुप्ता, डॉ. अनिकेत वईकर, डॉ. शैलजा देशवेन्ना तसेच कर्मचारी, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी समर्थ असुटकर, वरद बिनोरकर, करण खोमने, मधुरा बुचाले, कुनाल गडाख, सतेज मेटकर, किंजल मोरे तसेच मंचक डोबे, राजाराम वाघ, प्रमोद राठोड इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.







उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून टाकळगव्हाण येथे वृक्षारोपण

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या  'ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम' अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मौजे टाकळगव्हाण (ता. जि. परभणी) येथे हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. १ जुलै रोजी वृक्षारोपण व कृषी विषयक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी टाकळगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात जांभुळ, सीताफळ, आंबा, कडुलिंब, चिकू, वड इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. यासोबतच गाव परिसरात कृषिकन्यांनी वृक्षदिंडी काढून पर्यावरण जागृतीचा संदेश दिला.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्रभारी अधिकारी मा. डॉ. व्ही. एस. खंदारे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. एम. कलालबंडी, विशेषतज्ञ डॉ. एस. व्ही. चिकसे, कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. एस. देशमुख व डॉ. ए. व्ही. सातपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला टाकळगव्हाणचे सरपंच श्री मंचकराव वाघ,  जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा उमरीकर तसेच शिक्षक वृंद यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषिकन्या प्राची, वैष्णवी, सरस्वती, किरण, रेखा, मोहिनी, मेहजबीन, रंजिता, शिल्पी, मयुरी तसेच कृषिदूत साईराज, राजरत्न, रितेश, अंकित, लाधेन्द्र, शुभम, अजिंक्य, मनोहर, राजेश, प्रथमेश, अर्जुन यांनी परिश्रम घेतले. या माध्यमातून शेतकरी बांधवांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणातील शैक्षणिक अपरिचित गोष्टींची माहिती देण्यात आली.





कृषि दिनानिमित्त वनामकृविच्या मृद विज्ञान विभागात वृक्षारोपणाचा उपक्रम

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर 'कृषि दिन' साजरा करण्यात येतो. या निमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान विभागाच्या प्रक्षेत्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात नारळ, जांभूळ, चिकू आदी फळझाडांची लागवड विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांच्या शुभहस्ते करण्यात आली. हा उपक्रम मृद विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.

कार्यक्रमात हवामान शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख श्री. एम. जी. जाधव, कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, मृद विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. सुरेश वाईकर, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. शिलेवांत तसेच विभागातील पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणे, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि पुढील काळातही असे उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.


वनामकृविच्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत कृषि दिन साजरा

 

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी वि‌द्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महावि‌द्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दि. १ जुलै रोजी कृषिदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य व प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रमुख समन्वयिका डॉ. जया बंगाळे यांनी ब्रिज सेक्शनच्या सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. "झाडे लावू झाडे जगवू, परिसर आपला सुंदर ठेवू असे घोषवाक्य म्हणत झाडांचे महत्त्व पटवून दिले

यावेळी विभागातील डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव तसेच शिक्षिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Monday, June 30, 2025

सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल हे नियत वयोमानानुसार दिनांक ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक ३० जून रोजी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाइन उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू माननीय डॉ. अशोक ढवण उपस्थित होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, उप कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, डॉ. राहुल रामटेके, डॉ.वासुदेव नारखेडे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींसह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभागी होत डॉ. सय्यद इस्माईल यांच्या दीर्घ आणि गुणवत्तापूर्ण सेवेची प्रशंसा केली. त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठवाड्यातील सर्वात जुन्या कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्यपदासाठी डॉ. इस्माईल यांची निवड ही अत्यंत योग्य ठरली. सध्याच्या कमी मनुष्यबळाच्या परिस्थितीतही विद्यापीठाचा गाडा सक्षमपणे चालवला जात आहे, हे सर्व प्राध्यापकांच्या योगदानामुळे शक्य झाले आहे. त्यांनी प्राध्यापकांनी नैतिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहन केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी डॉ. इस्माईल यांच्या द्रवरूप जिवाणू संवर्धक संशोधनातील महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, अधिष्ठाता पदावर असतानाही डॉ. इस्माईल यांनी विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू ठेवले. त्यांनी महाविद्यालयातील तसेच विविध विभागांची 'भारतीय कृषी अनुसंधान परिषदे'कडून मान्यता मिळविण्यात मोलाची भूमिका बजावली. ते शांत, संयमी व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी डॉ. इस्माईल यांच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्यातील योगदानाचे विशेष कौतुक केले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. सय्यद इस्माईल यांनी आपल्या सेवेतील सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण आणि विस्तार कार्यात मराठवाड्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो. गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी शिकवण्याला प्राधान्य द्यावे. शिक्षकाने आदर्श जीवन जगले पाहिजे. विद्यार्थ्यांनी हार न मानता ज्ञान संपादन करावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत यांनी केले. हा कार्यक्रम कृषि महाविद्यालय, परभणी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी डॉ. सय्यद इस्माईल यांचे नातेवाईक, मित्र परिवार, शैक्षणिक, प्रशासकीय आणि संशोधन क्षेत्रातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.