Monday, December 8, 2025

११ डिसेंबर रोजी वनामकृविचा २७वा दीक्षांत समारंभ

दीक्षांत समारंभात २९६८ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार  ....... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची पत्रकार परिषदेत माहिती


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारंभ दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला असुन त्‍यानिमित्‍त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले की, विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी १.०० वाजता आयोजित करण्यात आला असुन दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री आचार्य देवव्रत हे भूषविणार आहेत.

माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. नाश्री. दत्तात्रय भरणे हे दीक्षांत समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दीक्षांत समारंभास भारतीय कृषि संशोधन परिषदेचे (ICAR) माजी महासंचालक तथा कृषि संशोधन आणि शिक्षण विभागाचे (DARE) माजी सचिव माननीय डॉ. मंगला राय हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहुन दीक्षांत अभिभाषण करणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री (परभणी जिल्हा) मा. ना. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर तसेच वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल, पंदेकृविचे माननीय कुलगुरू डॉ शरद गडाख, मफुकृविचे माननीय कुलगुरू डॉ. विलास खर्चे, बासाकोकृविचे माननीय कुलगुरू डॉ संजय भावे, माफ्सूचे कुलगुरू माननीय डॉ नितीन पाटील, यांच्यासह वनामकृविचे माजी कुलगुरू, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. समारंभात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे स्वागतपर भाषण करतील.

यावेळी राज्यसभा सदस्य मा. खा. श्रीमती फौजिया खान, लोकसभा सदस्य मा. खा.  श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. विक्रम काळेविधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. बालाजी कल्याणकरविधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्रीमती श्रीजया चव्हाण, कृषि परीषदेचे उपाध्याक्ष मा. श्री. तुषार पवार, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य  मा. डॉ. व्ही. एम. मायंदेमहाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी, कृषि परिषदेच्या महासंचालक माननीय श्रीमती वर्षा लड्डा-उंटवाल (भाप्रसे), कृषि परिषदेचे सदस्य श्री जनार्धन कातकडे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

दीक्षांत समारंभात सन २०२४- २५  या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखेतील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी पूर्ण करणाऱ्या एकुण २९६८ स्नातकांना पदवी अनुग्रहीत करण्यात येणार आहे. यात आचार्य पदवीचे  ४४ पात्र स्नातकपदव्युत्तर पदवीचे ३३३ स्नातक व पदवी अभ्यासक्रमाचे  २५९१  स्नातकांचा समावेश आहे. याबरोबरच शेती उद्योगामध्ये उल्लेखनीय कार्य असलेल्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ‘फार्मर फेलो’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार. यामध्ये महिला शेतकऱ्यांचा देखील समावेश असणार आहे.

दीक्षांत समारंभात सन २०२४ – २५  या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने व दात्यांनी निश्चित केलेल्यां सूवर्ण पदकेरौप्य पदके व रोख पारितोषिके पात्र स्नातकांना प्रदान करून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. एकूण ६३ पदके आणि प्रमाणपत्रे वितरण करण्यात येणार आहेत. यामध्ये १४ विद्यापीठ सुवर्ण पदकेदात्यांकडून देण्यात येणारे ११ सुवर्ण पदके१ रौप्य पदक आणि १२ रोख पारितोषिकांचे वितरण करण्‍यात येणार असुन २५ पदव्युत्तर पदवी गुणवत्‍ता प्रमाणपत्रांचा समावेश आहे, अशी माहिती माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांनी दिली.

पदवी अनुग्रहीत करण्यात येणाऱ्या स्नातकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या पदवीधरांची नावे विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसुचनेत सुचिबध्द असतील त्यांनाच दीक्षांत दिंडीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. दीक्षांत समारंभाच्या यादीत नाव असणाऱ्या स्नातकांनीच कार्यक्रमास उपस्थित राहावे. या दीक्षांत समारंभाकारिता पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त विद्यापीठातील इतर विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी तसेच इतर मान्यवरांनी इतर मान्यवरांना हा समारंभ विद्यापीठाच्या युटूब https://www.youtube.com/@vnmkv यावर पहाता येईल.

दीक्षांत समारंभास उपस्थित असलेल्या स्नातकांना समारंभात पदवी प्रमाणपत्रे देण्यात येतील उर्वरीत स्नातकांना त्या दिवशी त्यांच्या संबंधीत महाविद्यालयात व विभागात  पदवी प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात येतील.

दीक्षांत समारंभ वेळेवर सुरू होणार असल्यामुळे सर्व संबंधित स्नातकांनी वेळेच्या एक तास अगोदर विद्वत दिंडीत सहभागी होण्यासाठी कार्यक्रम स्थळी यावे. विद्यार्थ्यांनी व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक वृंद यांनी पांढरा कुर्ता-पायजमा व विद्यार्थिनींनी तसेच महिला अधिकारी, कर्मचारी यांनी क्रीम कलरची साडी व ब्लाउज परिधान करावेत. हा सकारात्मक बदल यापूर्वी राष्टीय पातळीवर अनेक विद्यापीठाने लागू केला असून या  विद्यापीठाने देखील यावर्षी स्वीकारला आहे. विद्यार्थी वस्त्रे दीक्षांत समारंभाच्या एक दिवस अगोदर किंवा समारंभाच्या दिवशी सकाळी नऊच्या आत संबंधितांकडून प्राप्त करावीत.

पत्रकार परिषदेत संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवारसंचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री अनंत कदमउपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, सहाय्यक कुलसचिव श्री. सुरेश हिवराळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ शंकर गणपत पुरी यांनी केले. या पत्रकार परिषदेत विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Friday, December 5, 2025

इक्रीसॅट - वनामकृवि संयुक्त उपक्रमांना गती; तुरी वाण व लागवड तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या इक्रीसॅट (ICRISAT) भेटीनंतरची पुढची दिशा


हैद्राबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्धकोरडवाहू उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (ICRISAT – International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics) चे डॉ. मनीष पांडे यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या शिष्टमंडळाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत येणाऱ्या कृषि संशोधन केंद्र (ARS), बदनापूर येथे दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी अभ्यास व परस्पर संवादात्मक भेट दिली. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अलिकडेच इक्रीसॅट (ICRISAT) हैद्राबाद येथे शैक्षणिक-अभ्यास भेट देवून मराठवाड्यातील शेतासाठी आंतरराष्ट्रीय दर्जेचे संशोधनाचा लाभ होईल असे सांगितले होते. त्यानुसार ही भेट महत्वपूर्ण असून या भेटीतून तुर वाण विकास व लागवड तंत्रज्ञान  सुधारणा कार्यक्रमात वैज्ञानिक देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक मजबूत करणे बाबतचा मुख्य उद्देश साधला जाणार आहे.

कृषि संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी व तुरी संशोधक डॉ. दीपक के. पाटील तसेच बदनापूर येथील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी शिष्टमंडळाचे मनापासून स्वागत केले. भेटीची सुरुवात कजनस (Cajanus) आणि विग्ना (Vigna) या वंशातील जंगली जर्मप्लाझम बागेच्या निरीक्षणाने झाली, जिथे तुरीचे आनुवंशिक विविधीकरण वाढवण्यासाठी जंगली प्रजातीच्या उपयोगावर सखोल चर्चा झाली.

या देवाणघेवाण संवाद सत्रांत प्री-ब्रीडिंग सामग्री आणि गुणविशेषाधारित अंतःसंकरण वाण, CMS आधारित संकर कार्यक्रम व हायब्रिड तुरीची वाण निर्मिती, पारंपरिक संकर व निवड पद्धतीतील प्रगत संकरित जाती, बियाणे उत्पादन कार्यक्रम – न्युक्लियस व ब्रीडर बियाणे प्लॉट्स, कृषितांत्रिक चाचण्या व पीक व्यवस्थापन धोरणे, वांझ रोग (Sterility Mosaic Disease) व मर रोग  (Fusarium Wilt) आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

डॉ. पांडे यांनी कृषि संशोधन केंद्र, बदनापूरमध्ये सुरू असलेल्या संशोधन कार्याची शास्त्रीय व्याप्ती, सुस्थित संशोधन पायाभूत सुविधा आणि शेतकरीहिताच्या नवकल्पनांचे विशेष कौतुक केले. तसेच, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली तुरी सुधारणा संशोधनाला मिळत असलेल्या मजबुतीकरणाची प्रशंसा केली.

या भेटीत डॉ. गिते, डॉ. पगार, डॉ. सोनटक्के, डॉ. पतंगे यांच्यासह तांत्रिक तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. बदनापूर कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. सोमवंशी यांनीही उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या शेतपातळीवरील प्रात्यक्षिके व तंत्रज्ञान प्रसाराबाबत माहिती दिली.

शेवटी इक्रीसॅट आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ (ICRISAT–VNMKV) यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त झाला. आगामी काळात तुर पिकातील उदयोन्मुख संशोधन आव्हाने सोडवण्यासाठी संयुक्तपणे काम करून महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांतील तुर उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा निर्धार या भेटीत व्यक्त करण्यात आला.






मृद विज्ञान, कृषि अभियांत्रिकी व कृषि विद्या शाखेतील विभागांमध्ये समन्वय होऊन संशोधनाची दिशा ठरली पाहिजे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविमध्ये जागतिक मृदा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि महाविद्यालयातील मृद विज्ञान विभाग आणि भारतीय मृदविज्ञान संस्था, नवी दिल्ली (परभणी शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनानिमित्तडॉ. डी. के. पाल स्मृती व्याख्यानाचे” आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाइन भूषविले.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण (वनामकृवी, परभणी); तर व्याख्याते म्हणून माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य (बासाकोकृवि, दापोली, ऑनलाइन) उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जागतिक मृदा दिनाच्या शुभेच्छा देत यावर्षीच्या “निरोगी शहरांसाठी निरोगी माती (Healthy Soils for Healthy Cities)” या घोषवाक्याचे महत्त्व स्पष्ट केले. जमिनीचे आरोग्य हे शहरांच्या आरोग्याशी निगडित असल्याचे सांगून सेंद्रिय पदार्थांचा वापर, निविष्ठांचा काटेकोर वापर व शेतीतील यांत्रिकीकरणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मृद विज्ञान, कृषि अभियांत्रिकी व कृषि विद्या शाखांमधील समन्वयातून संशोधनाच्या दिशा ठरवून नवनवीन शोध शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी बदलत्या हवामानाचा जमिनीच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम या विषयावर सखोल संशोधनपर सादरीकरण केले. जमिनीचे मूलभूत प्राकृतिक गुणधर्म जतन करणे आणि कृषि उत्पन्न वाढीसाठी आवश्यक संशोधनाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी मृद विज्ञानातील संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कसे पोहोचवता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

 शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी ‘माती म्हणजेच जीवाची सुरुवात’ हा संदेश देत सांगितले की शेती, जलसंवर्धन, हवामान आणि भविष्यातील खाद्यसुरक्षिततेसाठी मातीचे आरोग्य व समतोल अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि कृषी क्षेत्रातील सर्व भागधारकांनी माती स्वास्थ्य व्यवस्थापन, माती चाचणी, शेतकरी जागरूकता, संरक्षण शेती, पाणी–माती समन्वय तसेच युवकांच्या सहभागावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. प्रवीण वैद्य यांनी डॉ. डी. के. पाल यांच्या कार्याचा स्मरण करून देत त्यांच्या मृदा संशोधनातील योगदानाचा आढावा घेतला. प्रास्ताविकात डॉ. हरिहर कौसडीकर यांनी भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या परभणी शाखेच्या उपक्रमांची माहिती देऊन नाविन्यपूर्ण पद्धतीने मृदा दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.

कार्यक्रमात माती पूजन करण्यात आले. जैविक खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, शेणखत, लेंडीखत, बायोगॅस स्लरी आणि पाणी अर्पण करून मातृभूमीच्या पोषणाचे प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले.

डॉ. सुरेश वाईकर यांनी प्रमुख व्याख्याते डॉ. तपस भट्टाचार्य यांचा परिचय करून दिला. शेतकरी प्रतिनिधी श्री. सुरेंद्र रोडगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जमिनीच्या आरोग्यावरील माहितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे पत्रक परभणी शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, विद्यापीठ गेट तसेच वर्तमानपत्रांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. हा अभिनव उपक्रम डॉ. कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. राहुल रामटेके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, डॉ. सचिन मोरे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल्लकुमार घंटे, डॉ. मधुकर जाधव, प्राध्यापक, कर्मचारी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुदाम शिराळे यांनी केले. आभासी सादरीकरणाची तांत्रिक व्यवस्था डॉ. संतोष फुलारी, श्री. इंगळे आणि संगणक कक्ष यांच्या टीमने केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्नेहल शिलेवंत, श्री. भानुदास इंगोले, श्री. धीरज कदम, कु. निशिगंधा चव्हाण तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.












Wednesday, December 3, 2025

एआययू सेंट्रल झोन युथ फेस्टिव्हल २०२५ मध्ये वनामकृविची उल्लेखनीय कामगिरी; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा केला गौरव

 

छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएममध्ये दिनांक २५ ते २९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित एआययू सेंट्रल झोन युथ फेस्टिव्हल (UNIFEST) २०२५ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने उत्कृष्ट कलाकौशल्य, प्रभावी सादरीकरण आणि भक्कम स्पर्धात्मक क्षमतेचे प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले. मध्यप्रदेश, छत्तीसगड, मराठवाडा आणि विदर्भ येथील एकूण २३ विद्यापीठांमधील ११०० विद्यार्थ्यांमध्ये चमकदार कामगिरी करत विद्यापीठाने नऊ पारितोषिके पटकावून ऐतिहासिक यश नोंदविले.

या निमित्त विद्यापीठात विद्यार्थी कल्याण कार्यालयाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव समारंभ दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी  शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे आणि फाइन आर्ट्स प्रभारी श्री. अमोल सोनकांबळे, डॉ विशाल इंगळे आदींची उपस्थिती होती.

या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. एआययूच्या स्पर्धेत विद्यापीठाने केलेल्या या चमकदार कामगिरीचे त्यांनी विशेष कौतुक केले. राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पात्र ठरलेल्या वैष्णवी शिंदेचा त्यांनी विशेष सत्कार करून आगामी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थ्यामध्ये सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी लक्षणीय कामगिरी केली. सिद्धी रासवे हिने कार्टूनिंगमध्ये चौथा क्रमांक, तर प्रांजल भंडे आणि अपूर्वा लांडगे यांनी लोकनृत्य स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला. वैष्णवी शिंदे हिने कोलाज स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी पात्रता मिळवली. पोस्टर मेकिंग स्पर्धेत वैष्णवी शिंदे आणि रांगोळी स्पर्धेत वैष्णवी दूरतकर यांनी चौथा क्रमांक मिळवला.

मराठवाडा, भूमी संतोकी भूमी कलावंतोकी भूमी कृषकोंकी” या अभिनव संकल्पनेवर आधारित विद्यापीठाच्या सांस्कृतिक शोभायात्रेस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच सुगम गायनमध्ये अनुजा पारशेट्टीला चौथा क्रमांक, समूह गायन स्पर्धेत पाचवा क्रमांक, तर इंग्रजी वादविवाद स्पर्धेत आराध्या सिंग आणि रईस सिद्दीकी यांनी पाचवा क्रमांक पटकावला.

विद्यापीठाच्या या यशस्वी कामगिरीने विद्यापीठाचा कला, संस्कृती आणि स्पर्धात्मक क्षेत्रातील लौकिक अधिक उज्ज्वल केल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.