माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
यांच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट
संचालित राजीव गांधी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५ नोव्हेंबर
२०२५ रोजी आयोजित अंतरमहाविद्यालयीन खो-खो (मुली) स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद
मिळाला.
महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी १०.०० वाजता या स्पर्धेचे भव्य उद्घाटन
करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रेरणादायी
मार्गदर्शन केले. आपल्या उद्बोधनात त्यांनी क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून शिस्त, चिकाटी, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण
विकसित करणारी जीवनशैली असल्याचे अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत
क्रीडाक्षेत्रातही समान प्राविण्य मिळवून ‘आरोग्यदायी
शरीरातच आरोग्यदायी मन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी, असे
आवाहन करत त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंना उत्तुंग यशाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच
विद्यापीठ प्रशासन क्रीडा पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाच्या संधी अधिक सक्षम
करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन ज्योती चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा
मा. श्रीमती लक्ष्मीताई अशोकराव देशमुख या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश
कदम, तसेच विद्यापीठाचे क्रीडा शिक्षक प्रा. संघर्ष शृंगारे,
कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतातून खो-खो
खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी खो-खो हा केवळ खेळ नसून चपळता, तत्परता, संघभावना आणि
शारीरिक-मानसिक सहनशक्ती विकसित करणारा भारतीय पारंपरिक वारसा असल्याचे सांगितले. खो-खो
सारख्या स्थानिक खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते,
तसेच टीमवर्क आणि निर्णयक्षमता वाढीस लागते, असे
ते म्हणाले.
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनीही
विद्यापीठातील क्रीडा क्षेत्रात विद्यार्थिनींचा वाढता सहभाग ही अत्यंत अभिमानास्पद
आणि सकारात्मक घडामोड असल्याचे सांगितले. महिला विद्यार्थिनी पारंपरिक
मर्यादांपलीकडे जाऊन क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करीत आहेत. त्यांना मिळणारे
प्रोत्साहन आणि सुविधा यामुळे भविष्यात अनेक उत्कृष्ट खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन राजीव गांधी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी.
पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. अभिजित कंडेरे
यांनी संपूर्ण समन्वयाचे उत्कृष्ट नियोजन करून स्पर्धेला गतिमान स्वरूप दिले.
स्पर्धेमध्ये विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतील महिला खेळाडूंनी
उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कौशल्यपूर्ण चढाओढ, झपाट्याचे
धावणे, चपळता आणि संघभावना यांचे सुंदर प्रदर्शन केले. या
उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार, संघभावना,
शिस्तबद्धता आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधिक दृढ झाले. तसेच
विद्यापीठीय पातळीवर मुलींच्या खेळांना दिले जाणारे प्रोत्साहन आणि सुविधा यांचेही
सर्वत्र कौतुक झाले.
क्रीडा विभागाच्या या उपक्रमाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महिला विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा नवा आदर्श निर्माण केला असून भविष्यातही अशा स्पर्धांमुळे प्रतिभावान खेळाडू घडण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे.










