Wednesday, November 12, 2025

केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार श्री भगीरथ चौधरी यांच्या हस्ते माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना ‘प्रा. गजेन्द्रसिंह आयएसएई शिक्षण सुवर्णपदक’ हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान

शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल भोपाळ येथे आयोजित ‘कृषी अभियांत्रिकी नवाचार ५.०’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत केले सन्मानित

भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थान (सीआयएई) यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त “कृषिसाठी अभियांत्रिकी नवाचार ५.०” या विषयावर आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना कृषि अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व उत्कृष्ट योगदानाबद्दल “प्रा. गजेन्द्रसिंह आय.एस.ए.ई. शिक्षण सुवर्णपदक” (Prof. Gajendra Singh ISAE Education Gold Medal) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हा सन्मान परिषदेच्या समारोप समारंभात दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार श्री भगीरथ चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थान (सीआयएई) चे माननीय संचालक डॉ. सी. आर. मेहता, आय.एस.ए.ई. संघाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. झा, तसेच परिषदेचे संयोजक डॉ. के. एन. अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

या परिषदेत देश-विदेशातील सुमारे ६०० वैज्ञानिक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व धोरणनिर्माते सहभागी झाले होते. आयआयटी, एनआयटी, कृषि विद्यापीठे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना जागृत करणे तसेच शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचे निष्कर्ष पोहोचविण्याचे कार्य प्रगत पद्धतीने केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार या तिन्ही क्षेत्रांत अनेक नवे उपक्रम राबविले असून विद्यार्थ्यांसाठी उद्योगसहभागी शिक्षणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना अमेरिका, दक्षिण आशिया, उत्तर अमेरिका, आफ्रिका, जपान आणि युरोपमधील विविध संस्थांमध्ये विद्यापीठीन व्याख्याते म्हणून कार्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीकडून ‘ए ग्रेड’ हे प्रतिष्ठेचे मानांकन मिळाले असून ते उच्चांकी ३.२१ गुणांसह प्राप्त झाले आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी २५ जुलै २०२२ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान संस्था (IARI), नवी दिल्ली येथून कृषि अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर व आचार्य पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी अल्पावधीतच शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करून विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीला गती दिली आहे.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यात भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा ‘भारतरत्न सी. सुब्रमण्यम उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’, ए.एस.ए.बी.ई. (ASABE) चा ‘प्रेसिडेन्शियल सायटेशन पुरस्कार’, जलसंपदा मंत्रालयाचा ‘भूजल संवर्धन पुरस्कार’, भारतीय कृषि अनुसंधान संस्था (IARI) चा ‘सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार’, तसेच आय.ए.ए.बी.ई. (IAABE) व आय.एस.ए.ई. (ISAE) फेलोशिप, ‘भारतीय अभियंता संस्था’चा ‘विख्यात अभियंता पुरस्कार – २०२४’ आणि ‘वर्षातील कुलगुरू – उत्कृष्ट नेतृत्वासाठी पुरस्कार – २०२५’ यांचा समावेश आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तारकार्य, विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, नवोन्मेष केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन या दृष्टीकोनातून कार्यरत आहे. त्यांच्या कार्यामुळे केवळ मराठवाड्याचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर व्यापक दखल घेण्यात आली आहे.

या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, हा पुरस्कार माझा वैयक्तिक नसून संपूर्ण विद्यापीठ परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचा सन्मान आहे. आधुनिक कृषि शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या प्रगतीस हातभार लावणे हेच माझे ध्येय आहे. 

या यशाबद्दल विद्यापीठाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापकविद्यार्थी व कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असूनत्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ देशातील अग्रगण्य कृषि विद्यापीठ म्हणून अधिक प्रगती करेलअसा विश्वास व्यक्त केला आहे.