Sunday, November 9, 2025

सिरसाळा येथे झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे योगदान उल्लेखनीय ठरले.

संवाद मेळावे म्हणजे संशोधन आणि शेतशिवार यांना जोडणारा दृढ दुवा — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


सिरसाळा (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथील ग्लोबल विकास ट्रस्ट (GVT) तर्फे आयोजित “शेतकरी संवाद मेळावा” हा कार्यक्रम दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारचे केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री माननीय नामदार श्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री. मयंक गांधी, बारामती येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी, अटारी (पुणे) येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली सय्यद, तसेच GVT चे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

मेळाव्याच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विविध तंत्रज्ञान दालने उभारून आपल्या संशोधनपर तंत्रज्ञान प्रगतीचे प्रभावी प्रदर्शन केले. विद्यापीठाच्या विविध विभागांनी विकसित केलेली अभिनव शेती तंत्रे, सुधारित वाण, जलसंवर्धन तंत्रज्ञान, आणि यंत्रीकरणाची साधने यांचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले.

अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प – पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना या अंतर्गत विकसित केलेल्या बैलचलित कृषी अवजारांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके शेतकऱ्यांनी उत्साहाने पाहिली. या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक शेती पद्धतीत कार्यक्षमतेची भर पडून शेतकऱ्यांचा मजुरीवरील खर्च कमी होईल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या नवोन्मेषी उपक्रमांची माहिती देत सांगितले की, विद्यापीठाचे ध्येय हे आधुनिक शेती संशोधन शेतकऱ्यांच्या दारी पोहोचवणे आहे, आणि अशा संवाद मेळाव्यातील कृषि प्रदर्शनातून संशोधन व प्रत्यक्ष शेतशिवार यांच्यातील दुवा अधिक दृढ होत आहे.

या कृषि प्रदर्शनातील विद्यापीठाच्या दालनास ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री. मयंक गांधी, बारामती येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी, अटारी (पुणे) येथील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली सय्यद, तसेच GVT चे पदाधिकारी आणि हजारो शेतकऱ्यांनी भेट देत मोठा प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. यामध्ये सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ संजीव बंटेवाड, डॉ दिनेश चव्हाण, डॉ. विश्वनाथ खंदारे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, विद्यापीठ उपअभियंता डॉ. डी. डी. टेकाळे, कृषी विभागाचे संचालक, उपसंचालक, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, प्रभारी अधिकारी डॉ चंद्रकांत लटपटे, शास्त्रज्ञ डॉ. गजानन गडदे, डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. हनुमान गरुड यांचा प्रमुख सहभाग होता.