Tuesday, June 9, 2020

देशातील प्रत्‍येक नागरिकास कोरोना योध्‍दा म्‍हणुन वावरावे लागेल ......भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर

वनामकृविच्‍या वतीने आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात कृषिचे विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांशी साधला संवाद
कोरोनावर लस निर्मितीसाठी संपुर्ण जग प्रयत्‍न करीत आहे. लस कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही. लॉकडाऊन दरम्‍यान डॉक्‍टर, नर्सेस, पोलिस आदी कोरोनाच्‍या लढाईत योध्‍दा म्‍हणुन पुढे होते. परंतु देशात लॉकडाऊन शिथिल करण्‍यात येत आहे, त्‍यामुळे यापुढे देशातील प्रत्‍येक नागरिकास कोरोना योध्‍दा म्‍हणुन वावरावे लागेल, असे मत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक पद्मश्री मा डॉ रमण गंगाखेडकर यांनी व्‍यक्‍त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) च्‍या वतीने दिनांक 9 ते 13 जुन दरम्‍यान कोरोना विषाणु प्रादुर्भावाचा कृषि शिक्षणावर परिणाम यावरील ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 9 जुन रोजी प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन झाले, या प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना मा डॉ रमण गंगाखेडकर हे बोलत होते. प्रशिक्षण वर्गाच्‍या उदघाटनप्रसंगी नवी मुंबई येथील एमजीएम आरोग्‍य विज्ञान संस्‍थेचे कुलगुरू मा डॉ शंशाक दळवी हे प्रमुख पाहुणे सहभागी  होते तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते. शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ जयश्री झेंड, वैद्यकीय तज्ञ डॉ रामेश्‍वर नाईक, डॉ आनंद देशपांडे, प्रकल्‍प प्रमुख डॉ गोपाल शिंदे, प्रशिक्षण आयोजिका डाॅ विना भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा डॉ गंगाखेडकर पुढे म्‍हणाले की, सध्‍या न्‍युझिलंड हा कोरोनामुक्‍त झाला आहे., ते त्‍यांनी घेतलेल्‍या काळजीने. त्‍यांनी जे केले ते अपणही करू शकतो. तो देश छोटा आहे. आपला देश मोठा आहे. परंतु, हताश होऊन बसलो तर काहीही करू शकणार नाही. त्‍यामुळे आपण आशावादी राहिले पाहिजे. आपला देश विस्‍ताराने आणि लोकसंख्‍येने मोठा आहे. त्‍यामुळे सद्य:स्थितीत प्रत्‍येकाने वॉरियर्स बनलं पाहिजे. प्रत्‍येकाने स्‍वत:सह कुटुंब आणि समाजाची काळजी घेतली पाहिजे, विशेषत: वयोवृध्‍द, लहान मुले, आधीच इतर आजाराने ग्रस्‍त व्‍यक्‍तींची काळजी आपणास घ्‍यावी लागेल. लॉकडाऊन उठवलं म्‍हणजे कोरोना संपला असे नाही. लॉकडाऊन काळात कोरोनासह जीवन जगण्‍याची नवीन शैली निर्माण झाली आहे. ती भविष्‍यात पाळावी लागेल. मास्‍कचा वापर, सुरक्षीत सामाजिक आंतर, योग्‍य वैयक्‍तीक स्‍वच्‍छता आदींचा सवयीचा भाग झाला पाहिजे, असे ते म्‍हणाले.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी अध्‍यक्षीय समारोप म्‍हणाले की, देशातील आरोग्‍य सुरक्षेकरिता अन्‍न सुरक्षा महत्‍वाची आहे. त्‍याकरिता कृषि क्षेत्र, शेतकरी व कृषितील कार्य करणारे विस्‍तार कार्यक्रर्ते, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यी यांनी कोरोना सोबत जीवन जगण्‍याची कला शिकण्‍याची गरज असुन सदरिल प्रशिक्षणाचा त्‍यांना लाभ होईल.    
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्या डॉ जयश्री झेंड, वैद्यकीय चिकित्‍सक डॉ रामेश्‍वर नाईक, पशुविज्ञान महाविद्यालयाचे डॉ आनंद देशपांडे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ गोपाल शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार प्रा संजय पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ मेघा जगताप, डॉ अविनाश काकडे, डॉ रश्‍मी बंगाळे आदींनी परिश्रम घेतले.
सदरिल पाच दिवसीय प्रशिक्षणात कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भाव व कृषि शिक्षणावरील परिणाम यासंबंधित  विविध विषयावर पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्‍पीटलचे डॉ बालासाहेब पवार, आयआयडी मुंबईचे डॉ सतिश अग्नीहोत्री, राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य मिशनचे डॉ लिना बडगुजर, आहारतज्ञ डॉ आशा आर्या, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ किरण सागर, डॉ भारत पुरंदरे, डॉ सुजा कोशी, मनोचिकित्‍सक डॉ राजेंद्र बर्वे आदी मार्गदर्शन करणार आहेत. समारोपीय कार्यक्रमास नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार व जयपुर येथील सीसीएस राष्‍ट्रीय कृषि विपणन संस्‍थेचे संचालक डॉ चंद्रशेखर यांचा प्रमुख सहभाग राहणार आहेत. सदरिल प्रशिक्षण वर्गात देशातील विविध विद्यापीठातील व संस्‍थेचे पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञ सहभागी झाले होते.