Wednesday, February 23, 2022

शाश्वत सेंद्रीय शेतीसाठी एकात्मिक पध्दतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे ..... मृदाशास्त्रज्ञ डॉ. अमृत लाल मीना

वनामकृविच्‍या वतीने आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक २२ फेबुवारी रोजी “शाश्वत सेंद्रीय शेतीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन’’ या विषयावरील व्याख्यानाने आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी दिर्घकालीन खत प्रयोग योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. रामप्रसाद खंदारे हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून मोदीपुरम (उत्तर प्रदेश) येथील भाकृअप-भारतीय संशोधन संस्था एकात्मिक शेती पध्दतीचे मृदाशास्त्रज्ञ डॉ. अमृत लाल मीना, मौजे व्हान्नूर  (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील प्रगतशील शेतकरी श्री. तानाजी निकम, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. मिनाक्षी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा.डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

प्रमुख वक्ते मृदाशास्त्रज्ञ डॉ. अमृत लाल मीना म्हणाले की, सेंद्रीय शेती भारतात प्राचीन काळापासुन केली जाते. हरित क्रांतीमुळे देश अन्नधान्य उत्पादना बाबत स्वयंपुर्ण झाला परंतु हरित क्रांती घडवुन आणन्यासाठी अधिक उत्पादन देणा­या व कीटकनाशके यांच्या गहू व भात पिकाच्या वाणांचा वापर झाला. अधिक उत्पादन देणा­या वाणांसाठी सिंचन, बेसुमार खते व किटकनाशके आदींचा अवाजवी वापरामुळे जमिनीतील पाणी प्रदुषीत झाले आहे. सेंद्रीय शेती पर्यावरणपुरक असुन जमीन, प्राणी व वनस्पती यासाठीचा शाश्वत मार्ग आहे. यात जमिनीचे आरोग्य दिर्घकालासाठी अबाधित राहते. सेंद्रीय शेतीत जमिनीमधील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण वाढुन जमिनीतील जीवजंतूची संख्या वाढते, त्यामुळे जमिनीमध्ये वनस्पती वाढीसाठी आवश्यक असलेले विविध पोषणद्रव्य सहजपणे उपलब्ध होतात, पुढे ही साखळी निरंतर चालत राहते. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये कोणत्याही एका स्त्रोतावर अवलंबुन न राहता उपलब्धतेनुसार विविध स्त्रोतांचा एकात्मिक पध्दतीने वापर करणे गरजेचे असल्‍याचे सांगुन सेंद्रीय शेतीत वापरण्यात येणारे विविध जैविक खताबद्दल व त्यांच्या गुणधर्माबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. रामप्रसाद खंदारे म्‍हणाले की, शेतामध्ये पीक काढणीनंतर उरलेला पालापाचोळा न जाळता तो जमिनीमध्ये गाडावा ज्यामुळे तो कुजल्यानंतर त्याचे सेंद्रीय खतामध्ये रुपांतर होईल. जर हा पालापाचोळा जाळुन नष्ट केला तर सेंद्रीय पदार्थाबरोबरच जमिनीतील सुक्ष्म जीवजंतुची हानी होईल. जैविक खत तयार करतांना पालापाचोळा व सेंद्रीय पदार्थाचे विघटन करण्यासाठी लागणारे विघटक जिवाणू कृषि विद्यापीठ तसेच बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा जेणेकरुन चांगल्या दर्जाच्या शेणखत किंवा कंपोस्ट खताची निर्मिती करता येईल.

प्रगतशील शेतकरी श्री. तानाजी निकम यांनी त्यांचे अनुभव सांगताना म्हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये जिवामृत, गौकृपाआमृत व नत्राचे विविध प्रकार आम्ही स्वत: शेतावर तयार केले आहेत. सेंद्रीय निविष्ठांचा वापर करुन ऊसाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. सेंद्रीय शेतीत कर्बाचे प्रमाण वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रीय निविष्ठांचा वापर करुन व जैविक कीड व रोग नियंत्रण केल्यास सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढु शकेल. शासनाने गट शेतीची योजना राबवल्यामुळे सेंद्रीय शेती करण्यासाठी शेतकरी पुढे सरसावत आहेत. शेतक­यांनी अन्नधान्य पिकांसोबतच फळे व भाजीपाला नियोजनबध्द सेंद्रीय पध्दतीने घ्यावा जेणे करुन ग्राहकास सर्व प्रकारचे सेंद्रीय अन्न स्थानिक बाजारपेठेमध्ये मिळेल व शेतक­यांना आर्थिक नफा मिळेल.

प्रशिक्षण कार्यक्रमाचा दोन हजार पेक्षा अधिक शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ सहभागी झाले होतेकार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ. पपीता गौरखेडे यांनी मानले तसेच डॉ. सुदाम शिराळे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, अभिजीत कदम, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.