Thursday, June 16, 2022

वनामकृवित हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत खरीप पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम अंतर्गत संशोधनात्मक पीक प्रात्यक्षिक योजने करिता मौजे उजळांबा, बाभुळगाव व सोन्ना ही गावे दत्‍तक गावे म्‍हणु निवड करण्‍यात आली असुन दत्‍तक गावातील शेतकरी बांधवा करिता दिनांक ११ जुन रोजी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, सरपंच सरपंच श्री. गणेश दळवे, श्री. ज्ञानोबा पारधे, कृषि अभियंता डॉ. एम. एस. पेंडके, डॉ. पी. एच. गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्‍यात खरीप पिक व्यवस्थापनाबाबत डॉ. वासुदेव नारखेडे यांनी मार्गदर्शन करून विद्यापीठ विकसित विविध पिकाच्‍या वाणाची सविस्‍तर माहिती दिली. कार्यक्रमात सोयाबीनच्‍या एमएयुएस १५८, तुरीच्‍या बीडीएन ७११, मुग बीएम २००३-०२, खरीप ज्वारी पीव्‍हीके १००९ या सुधारीत वाणाची बियाणे शेतकऱ्यांना संशोधन प्रात्यक्षिकासाठी देण्यात आले. हवामान बदलानुरुप परिस्थितीत या पिकांच्या वाणांचा अभ्यास शेतकऱ्यांच्या शेतावर करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. या प्रसंगी “हवामान बदलानुरुप परिस्थितीत कोरडवाहू शेतीचे व्यवस्थापन” ही पुस्तिका शेतकरी बंधुंना वाटप करण्यात आली. तसेच कृषि ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील विद्यार्थींनी सोयाबीन बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासंबंधीचे प्रात्यक्षीक करून दाखविले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती गुंजकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी बालासाहेब घोलप, विनायक रिठे, मोरेश्वर राठोड, दिपक भुमरे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमा मौजे बाभुळगाव, उजळांबा व सोन्ना येथील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.