Tuesday, May 26, 2026

एल-निनोच्या संकटावर मात करण्यासाठी कृषि व संलग्न विभागांनी समन्वयातून काम करण्याची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


‘क्रीडा’ संस्थेचे माननीय संचालक डॉ. व्ही. के. सिंग 

यंदाच्या खरीप हंगामात ‘एल-निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेता शेती क्षेत्रात हवामान अनुरूप नियोजन व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी नांदेड येथे “शेतीच्या आकस्मिक नियोजनासाठी जनजागृती बैठक” दिनांक २५ मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था (क्रीडा - CRIDA) यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘क्रीडा’ संस्थेचे माननीय संचालक डॉ. व्ही. के. सिंग उपस्थित होते.

बैठकीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, ‘क्रीडा’चे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख, कृषि विभाग, पशुसंवर्धन, जलसंधारण, रेशीम विभाग, जिल्हा परिषद यांसह विविध संलग्न विभागांचे वरिष्ठ अधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. राजेश कदम, श्री. दत्तकुमार कळसाईत, डॉ. जी. रवींद्र चारी, डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद, डॉ. एस. के. बल, डॉ. मनोरंजन कुमार, डॉ. आनंद गोरे, डॉ. अरविंद पंडागळे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. देविकांत देशमुख, डॉ. कृष्णा अंभोरे, डॉ. प्रवीण कुमार घुले, डॉ. वसंत सूर्यवंशी, श्री. भानुदास पेंडकर,, डॉ पपीता गौरखेडे, डॉ. बस्वराज भेदे आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांची सेवा करणे, त्यांना उपयुक्त तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि संकटकाळात त्यांना पाठबळ देणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. त्यांनी अतिवृष्टी, अल्पवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर निर्माण होत असलेल्या नव्या आव्हानांकडे लक्ष वेधले. हवामान बदल हे संकट नसून त्यामध्येही संधी शोधण्याची आवश्यकता असल्याचे सांगत अतिरिक्त पाण्याचा संचय करून त्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता विद्यापीठाने सुचविलेल्या आकस्मिक आराखड्यानुसार शेतीचे नियोजन करावे. अनेकदा आधुनिक यंत्रसामग्रीची कमतरता असतानाही शेतकरी कष्टपूर्वक शेतीचे व्यवस्थापन करतात. त्यांच्या अनुभवातून आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे. ‘शेतकरी ते शेतकरी’ तंत्रज्ञान प्रसार ही अत्यंत प्रभावी पद्धत असून त्यातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होऊ शकतो.

यावेळी त्यांनी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या माननीय श्री. दादा लाड यांच्या कापूस उत्पादन तंत्रज्ञानाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही शेतकऱ्यांसाठी योगदान देण्याची गरज व्यक्त करत टीका व मूल्यमापन ही सुधारणेची प्रक्रिया असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना त्यांनी प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांच्या समस्यांवर आधारित व्यापक बैठका आणि एकात्मिक सभांचे आयोजन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. अशा कार्यक्रमांचे आयोजन केवळ नांदेडपुरते मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाड्यात व्हावे, असे ते म्हणाले. एल-निनोसारख्या परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी कृषी व संलग्न विभागांनी परस्पर समन्वयातून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माननीय कुलगुरूंनी खरीप हंगामात विद्यापीठाचे सर्व शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतील, अशी ग्वाही देत विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील, असे सांगितले.

‘क्रीडा’ संस्थेचे माननीय संचालक डॉ. व्ही. के. सिंग यांनी नांदेड जिल्ह्यात सरासरी ९९० मिमी पाऊस पडत असून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी कोरडवाहू शेती तंत्रज्ञान, शेततळे आणि जलसंधारण उपायांचा अवलंब आवश्यक असल्याचे सांगितले. तालुकानिहाय जमीन प्रकार आणि पावसातील बदल लक्षात घेऊन पिके व पीकपद्धती निवडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व जीवाणू खतांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले.

प्रारंभी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम यांनी स्वागत करून मराठवाडा हा प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचा प्रदेश असल्याने विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यापीठाच्या “माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” या उपक्रमाची माहिती दिली.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दत्तकुमार कळसाईत यांनी कृषी विभागाच्या आकस्मिक नियोजनाची माहिती देताना प्रत्येक तालुक्यात हवामान आधारित पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.

यावेळी कृषि हवामान तज्ज्ञांनी यंदाच्या पावसाबाबत अंदाज व्यक्त केला. ‘क्रीडा’चे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. के. बल यांनी २०२६ मध्ये प्रशांत महासागरात मध्यम तीव्रतेची एल-निनो स्थिती राहण्याची शक्यता असल्याने हंगामाच्या मध्यात पावसात खंड पडू शकतो, असे सांगितले. विद्यापीठाचे मुख्य हवामानशास्त्रज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांनी जूनमध्ये सरासरी इतके किंवा त्यापेक्षा कमी, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद आणि डॉ. आनंद गोरे यांनी हवामानानुसार चार टप्प्यांचे पीक नियोजन सुचविले. पाऊस वेळेवर झाल्यास सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिके घ्यावीत. पाऊस उशिरा आल्यास बाजरी, सूर्यफूल, तूर यांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. सोयाबीन + तूर, कापूस + उडीद, बाजरी + तूर या आंतरपीक पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच पेरणीपूर्वी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, मृद व जलसंधारण, रुंद वरंबा-सरी पद्धत, कमी कालावधीचे वाण आणि सेंद्रिय खतांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

तसेच डॉ. वसंत सूर्यवंशी, कृषी विद्यावेता यांनी एल-निनोच्या संकटावर मात करण्यासाठी घरचे बियाणे, बीज उगवण क्षमता तपासणी आणि बीज प्रक्रिया, बीबीफ चा वापर अशी  त्रिसूत्री सांगितली. विविध तालुक्यातून आलेले शेतकरी श्री. रत्नाकर  ढगे, श्री. अडकीने , श्री, भगवान इंगोले, श्रीमती सुषमा देव  अशा अनेक प्रगतशील शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एम. आर. मोरे यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील २५० हून अधिक प्रगतिशील शेतकरी, कृषी व संलग्न विभागांचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ तसेच विविध संशोधन केंद्रांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. सुरेश खटींग, श्री. व्ही.जे. रिठ्ठे, श्री. अमर राऊत व अभास कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी येथील तसेच कापूस संशोधन केंद्र, केळी संशोधन केंद्र, येथील  सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी  परिश्रम घेतले.