Friday, September 4, 2026

वनामकृविच्या बदनापूर कृषी महाविद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांची पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड; पहिल्याच फेरीत ३० टक्के विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय एमसीएईआर पीजी-सीईटी (MCAER PG-CET) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयातील एकूण ११२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३४ विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीत कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. पहिल्या फेरीतील निवडीचे प्रमाण सुमारे ३० टक्के इतके राहिले आहे.

निवड झालेल्या ३४ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थ्यांना अनुवंशशास्त्र व वनस्पती पैदास (Genetics and Plant Breeding – GPB) या कृषी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या व उच्च मागणी असलेल्या विषयात महाराष्ट्रातील विविध कृषी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळाला आहे.

महाविद्यालयाचा हा निकाल अत्यंत कौतुकास्पद मानला जात असून, या उल्लेखनीय यशामुळे शासकीय कृषी महाविद्यालय, बदनापूरचे नाव कृषी शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा उंचावले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक तथा शासकीय कृषी महाविद्यालय, बदनापूरचे माजी अधिष्ठाता डॉ. राकेश अहिरे तसेच संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांची जिद्द आणि प्राध्यापकांचे दर्जेदार मार्गदर्शन यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाले आहे. हा निकाल महाविद्यालयाच्या गौरवात भर घालणारा असून, भविष्यात हे विद्यार्थी कृषी शास्त्रज्ञ म्हणून देशाच्या कृषी विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.