Thursday, September 3, 2026

मराठवाड्यातील हवामान बदल व जल-कार्बन प्रवाहांच्या अभ्यासाला मिळणार नवी दिशा

 वनामकृवि, परभणी येथे इस्रो पुरस्कृत अत्याधुनिक ‘एडी-कोव्हेरिएन्स स्टेशन’चे उद्घाटन

 हवामान जोखीम व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक सुविधा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वित कृषि हवामानशास्त्र संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुरस्कृत अत्याधुनिक एडी-कोव्हेरिएन्स स्टेशन’ (Eddy-Covariance Station) उभारण्यात आले आहे. या स्टेशनचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते आज, दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले.

यावेळी अहमदाबाद येथील एसएसी-इस्रोचे ग्रुप डायरेक्टर डॉ. बिमल के. भट्टाचार्य, शास्त्रज्ञ-एसजी डॉ. राहुल निगम, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, कृषि हवामानशास्त्रज्ञ विभाग प्रमुख डॉ. के. टी. जाधव, प्रकल्प समन्वयक तथा कृषि हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध संशोधन प्रकल्पांतील शास्त्रज्ञ तसेच कृषि हवामानशास्त्र विभागातील पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि हवामानशास्त्राचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. हवामानातील वाढती अनिश्चितता, तापमानातील चढ-उतार, पर्जन्यमानातील बदल आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे कृषि क्षेत्रासमोर निर्माण होणाऱ्या समस्यांचे शास्त्रोक्त आकलन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या हवामान बदलाच्या परिस्थितीत हवामान जोखीम व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक उपकरणांवर आधारित अचूक निरीक्षणे अत्यंत आवश्यक आहेत. एसएसी-इस्रो यांच्या माध्यमातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास अशी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे, असे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. बिमल के. भट्टाचार्य यांनी सांगितले की, भारतातील निम-शुष्क प्रदेशांमध्ये पाणी (HO) आणि कार्बन डायऑक्साइड (CO) यांच्या प्रवाहांचे मापन, विश्लेषण व प्रारुपण (मॉडेलिंग) करण्याच्या दृष्टीने हे संशोधन केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासारख्या अवर्षणप्रवण प्रदेशातील वातावरण, जमीन आणि पिके यांच्यातील परस्परसंवाद समजून घेण्यासाठी या अत्याधुनिक प्रणालीचा मोठा उपयोग होणार आहे. एडी-कोव्हेरिएन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमीन-पृष्ठभाग आणि वातावरण यांच्यामधील ऊर्जा, जलवाष्प आणि कार्बन डायऑक्साइडच्या देवाणघेवाणीचे उच्च कालिक वारंवारतेने मापन करणे शक्य होते. त्यामुळे केवळ पिकांचे स्वतंत्र निरीक्षण न करता संपूर्ण पीक-जमीन-वातावरण परिसंस्थेचा एकात्मिक अभ्यास करता येणार आहे.

डॉ. राहुल निगम यांनी एडी-कोव्हेरिएन्स प्रणालीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, मराठवाड्यातील बदलते हवामान, निम-शुष्क प्रदेशाची वैशिष्ट्ये आणि कृषि क्षेत्राची हवामानविषयक असुरक्षितता लक्षात घेऊन या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. या प्रणालीतून प्राप्त होणारा सूक्ष्म हवामानविषयक व परिसंस्थात्मक डेटा राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

कृषि हवामानशास्त्रातील सूक्ष्म हवामान मापन, जलवापर, ऊर्जा संतुलन आणि कार्बन प्रवाह यांसारख्या बाबींचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी डॉ. कैलास डाखोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संशोधन कार्याला या सुविधेमुळे महत्त्वपूर्ण बळ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, एडी-कोव्हेरिएन्स स्टेशन हे आधुनिक सूक्ष्म हवामानशास्त्रीय उपकरण असून, जमीन-पृष्ठभाग आणि वातावरण यांच्यातील विविध घटकांच्या देवाणघेवाणीचे सातत्यपूर्ण मापन करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. या प्रणालीतून उपलब्ध होणाऱ्या प्रत्यक्ष जमिनीवरील निरीक्षणांच्या आधारे बाष्पीभवन-वाष्पोत्सर्जन (Evapotranspiration), जलवापर, कार्बन संतुलन, पीक उत्पादकता आणि ऊर्जा संतुलन यांचा सखोल अभ्यास करता येणार आहे.

डॉ. कैलास डाखोरे यांनी प्रास्ताविकात एडी-कोव्हेरिएन्स तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. या प्रणालीद्वारे जमीन-पृष्ठभाग आणि वातावरण यांच्यातील ऊर्जा, जलवाष्प आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या देवाणघेवाणीचे सातत्यपूर्ण व अचूक मापन करता येते. पिकांच्या बाष्पोत्सर्जनाचा अचूक अंदाज, पिकांचा जलवापर व जलवापर कार्यक्षमता तसेच कार्बन शोषण आणि उत्सर्जन यांचा अभ्यास करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या प्रणालीमधून उपलब्ध होणाऱ्या प्रत्यक्ष जमिनीवरील निरीक्षणांचा उपयोग बाष्पीभवन-वाष्पोत्सर्जन, जलवापर, कार्बन संतुलन, पीक उत्पादकता आणि ऊर्जा संतुलन यांच्या अभ्यासासाठी करता येणार आहे. या संशोधनाच्या आधारे भविष्यात सूक्ष्म सिंचन, जलसंधारण, दुष्काळ व्यवस्थापन, हवामान-लवचिक पीक व्यवस्थापन तसेच अचूक कृषि हवामान सल्ला विकसित करण्यास मदत होणार आहे. तसेच, उपग्रहाद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीची प्रत्यक्ष जमिनीवरील निरीक्षणांशी तुलना करून उपग्रहाधारित हवामान व कृषिविषयक माहितीचे प्रमाणीकरण (व्हॅलिडेशन) करण्यासाठीही हे स्टेशन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या स्टेशनमधून प्राप्त होणारी दीर्घकालीन निरीक्षणे हवामान बदलाचा शेतीवरील परिणाम समजून घेणे, हवामान-लवचिक पीक व्यवस्थापन विकसित करणे, जलस्रोतांचा कार्यक्षम वापर करणे आणि अचूक कृषि नियोजनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या अत्याधुनिक सुविधेमुळे मराठवाड्यातील कृषि हवामानशास्त्रीय संशोधनाला राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.