Tuesday, September 1, 2026

पाथरी येथे आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवांतर्गत लिटरेरी व प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात; कृषी महाविद्यालय, परभणीला घवघवीत यश

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि कृषी महाविद्यालय, पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव २०२६-२७ अंतर्गत लिटरेरी व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी कृषी महाविद्यालय, पाथरी येथे करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विद्यापीठांतर्गत एकूण १३ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, साहित्यिक व सर्जनशील गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील ज्ञान, वक्तृत्व, तर्कशक्ती आणि सामान्यज्ञान विकसित व्हावे, या उद्देशाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या गुणवत्तेचे दर्शन घडविले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी तसेच इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, रायपूरचे माजी कुलगुरू तथा अखिल भारतीय कुलगुरू संघाचे माजी अध्यक्ष माननीय डॉ. वेदप्रकाश पाटील होते. स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आणि अहमदनगर येथील सुप्रसिद्ध कवी श्री. राजेसाहेब कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी २५ स्पर्धक, इंग्रजी वादविवाद स्पर्धेसाठी ९ संघ, हिंदी वादविवाद स्पर्धेसाठी ३ संघ, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी ११ संघांनी सहभाग नोंदविला.

या स्पर्धांमध्ये कृषी महाविद्यालय, परभणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत इंग्रजी वादविवाद, हिंदी वादविवाद आणि प्रश्नमंजुषा या तिन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच इंग्रजी भाषण स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला.

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

१. प्रश्नमंजुषा – प्रथम क्रमांक : श्रीराम हुलावले, चैतन्य शिंदे व आलोक लाटे.
२. हिंदी वादविवाद – प्रथम क्रमांक : लवकुश मीना व ममता मेहत्रे.
३. इंग्रजी वादविवाद – प्रथम क्रमांक : राज ठाकरे व मेखना मनोज.
४. इंग्रजी भाषण – चौथा क्रमांक : निसर्ग बकाल.

अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम नेहरकर आणि युवक महोत्सव प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. मिर्झा बेग आणि श्री. अमोल सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत तसेच त्यांना सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे लिटरेरी स्पर्धा प्रभारी डॉ. संतोष फुलारी, सांस्कृतिक प्रभारी डॉ. संदीप बडगुजर, क्रीडा प्रभारी डॉ. धीरज पाथ्रीकर, सांस्कृतिक प्रभारी (मुले) श्री. अमोल सोनकांबळे आणि सांस्कृतिक प्रभारी (मुली) डॉ. अनुराधा लाड यांचे मोलाचे योगदान आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी महाविद्यालय, पाथरीचे प्राचार्य डॉ. आर. एस. मुळे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. जैसवाल, डीजेपीएस कॅम्पसचे रजिस्ट्रार डॉ. रमेश इंगोले, व्यवस्थापक श्री. रमेश पाटील, क्रीडा अधिकारी श्री. एस. डी. वाघमारे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील ‘AGGNITE 6.0’ स्पर्धेत वनामकृविच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत डीएफएसआरडीए (DFSRDA) सेंटर ऑफ एक्सलन्स येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषि वनस्पतीशास्त्र विभागातील एम.एस्सी. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी श्री. सुभाष कुमार आणि कु. वैष्णवी राजाराम नाकतोडे यांनी राष्ट्रीय स्तरावरील ‘AGGNITE 6.0’ या उद्योजकता स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.

ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा भाकृअपनॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (ICAR-NAARM), हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे आयोजन a-IDEA, ICAR-NAARM यांच्या वतीने करण्यात आले होते.

या स्पर्धेत वनामकृवि संघामध्ये अनिश शहाणे, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी आणि विशाल कालबाडे, पीएच.डी. कृषी अभियांत्रिकी यांचाही सहभाग होता. या संघाला प्रा. डॉ. गोपाल शिंदे आणि डॉ. हिराकांत कालपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

देशभरातून या स्पर्धेसाठी तब्बल ३४५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर तीन टप्प्यांत कठोर निवड प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेतून देशातील केवळ १० उत्कृष्ट संघांची अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेल्या संघांसाठी दि. २५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ICAR-NAARM, हैदराबाद येथे एक आठवड्याचा उद्योजकता विकास बूटकॅम्प आयोजित करण्यात आला होता.

या बूटकॅम्पदरम्यान संघांच्या कल्पना, तंत्रज्ञान, व्यवसाय क्षमता, नवोन्मेष, व्यवहार्यता आणि सादरीकरणाचे विविध टप्प्यांवर मूल्यमापन करण्यात आले. बूटकॅम्पनंतर झालेल्या चौथ्या व अंतिम मूल्यमापन फेरीत सुभाष कुमार आणि वैष्णवी नाकतोडे यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत देशातील अव्वल तीन संघांमध्ये स्थान मिळविले आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.

दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी ICAR-NAARMच्या ५१व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विजेत्या संघांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास पद्मभूषण डॉ. आर. एस. परोडा तसेच डॉ. एम. एल. जाट, महासंचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) यांची प्रमुख उपस्थिती होती. सुभाष कुमार आणि वैष्णवी नाकतोडे यांनी त्यांचे मार्गदर्शक डॉ. गोपाल शिंदे यांच्यासमवेत हा पुरस्कार स्वीकारला.

या उल्लेखनीय यशामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या शैक्षणिक, संशोधनात्मक तसेच उद्योजकता क्षेत्रातील योगदानाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठातील अधिकारी, कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच पालकांनी सुभाष कुमार, वैष्णवी नाकतोडे आणि त्यांचे मार्गदर्शक डॉ. जी. यू. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

वनामकृविच्या कृषि वनस्पतीशास्त्र विभागात डॉ. प्रताप देशमुख यांचे हवामान बदल आणि कडधान्यांवर मार्गदर्शन

 वनस्पती शरीरक्रियाशास्त्रातील आधुनिक संशोधनाचा कृषि विकासासाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने हवामानातील बदल आणि कडधान्ये” या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले. कृषि अर्थशास्त्र विभागाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेले हे व्याख्यान ऑनलाइन माध्यमातून विद्यापीठांतर्गत इतर महाविद्यालये व संशोधन केंद्रांसाठीही उपलब्ध करून देण्यात आले.

या विशेष व्याख्यानासाठी भारतीय कृषि अनुसंधान संस्था (आयएआरआय), नवी दिल्ली येथील वनस्पती शरीरक्रियाशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख तथा प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. प्रताप देशमुख यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व संशोधकांना मार्गदर्शन केले. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कृषि संशोधनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत व हवामान-अनुकूल कृषि पद्धती विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विभागप्रमुख प्रा. पी. एस. नेहरकर, डॉ. सचिन मोरे, माजी विभागप्रमुख डॉ. खंडागळे, डॉ. कुलकर्णी आणि डॉ. गित्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रताप देशमुख यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कडधान्य पिकांपुढील विविध आव्हाने तसेच वनस्पती शरीरक्रियाशास्त्राचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. आधुनिक शेतीमध्ये वनस्पतींची वाढ, विकास, उत्पादनक्षमता आणि विविध प्रतिकूल परिस्थितींमध्ये तग धरण्याची क्षमता वाढविण्यामध्ये वनस्पती शरीरक्रियाशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित करून आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषि संशोधनामध्ये प्रभावी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावपूर्ण परिस्थितीत कडधान्य पिकांची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक संशोधन, योग्य वाणांची निवड आणि वनस्पती शरीरक्रियाशास्त्रावर आधारित अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. प्रताप देशमुख यांनी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रासह अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील विविध उपक्रमांना भेट दिली. त्यांनी बायोमिक्स युनिट, सुदूर संवेदन प्रयोगशाळा, मृदाशास्त्र विभाग, महाराष्ट्र यांत्रिकीकरण केंद्र तसेच मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील बियाणे उत्पादन युनिटची पाहणी केली. तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमालाही त्यांनी भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन कृषि वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीना वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जयकुमार देशमुख, डॉ. गजानन नाईक, डॉ. पवन ठोंबरे तसेच कृषि वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या विशेष अतिथी व्याख्यानामुळे विद्यार्थी व संशोधकांना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कडधान्य पिकांचे व्यवस्थापन, वनस्पती शरीरक्रियाशास्त्रातील आधुनिक संकल्पना तसेच कृषि संशोधनातील विविध संधींबाबत मौल्यवान मार्गदर्शन मिळाले.










उद्योगसज्ज जैवउत्पादनासाठी जैवतंत्रज्ञानाच्या विस्ताराला गती देण्याची गरज

मोहाली येथे ‘बायोई³’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन; माननीय केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची प्रमुख उपस्थिती

परिषदेत वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे कृषि जैव-निर्मिती क्षेत्रातील नवकल्पनांवर सादरीकरण






देशातील जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या उद्देशानेबायोई³ (Biotechnology for Economy, Environment and Employment) : Enabling Scales for Industry-Ready Biomanufacturing’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पंजाबमधील मोहाली येथील बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिल–नॅशनल अॅग्री-फूड अँड बायोमॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूट (BRIC-NABI) येथे करण्यात आले.

या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार माननीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते. यावेळी जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव तथा बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिलचे महासंचालक प्रा. राजेश एस. गोखले, BRIC-NABI चे कार्यकारी संचालक प्रा. अश्विनी पारीक, वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह विविध क्षेत्रांतील वैज्ञानिक, संशोधक, उद्योग प्रतिनिधी आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

याप्रसंगी माननीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्तेग्रीन फोर्ज – शेपिंग द क्रॉप्स ऑफ टुमॉरो’ या अत्याधुनिक संशोधन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमध्ये प्रकाशाची तीव्रता व गुणवत्ता, आर्द्रता आणि तापमान नियंत्रित करून विविध पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करता येणार आहेत. त्यामुळे आधुनिक तसेच जनुकीय सुधारित पिकांच्या विविध हवामान परिस्थितींतील कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यास संशोधकांना मदत होणार आहे. यावेळी माननीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक संशोधन आणि जैवउत्पादन क्षेत्राच्या एकत्रीकरणातून कृषि व संलग्न विज्ञान क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला. संशोधन संस्थांमधील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी चंदीगड–मोहाली विज्ञान व नवोपक्रम समूह विकसित करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली.

परिषदेतीलजैवउत्पादनाला प्रगत दिशा देणे’ (Advancing Biomanufacturing) या वैज्ञानिक पूर्ण अधिवेशनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनीजैव-निर्मितीविषयक नवकल्पनांवर (Agri-innovations in Biomanufacturing)’ या विषयावर सादरीकरण केले.

आपल्या सादरीकरणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्याबायोमिक्स’ या अभिनव जैव-उत्पादनाची माहिती दिली. बायोमिक्समध्ये १४ उपयुक्त सूक्ष्मजीवांचा समावेश असून, वनस्पती आरोग्य व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, पोषकद्रव्यांची उपलब्धता तसेच पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनवाढीसाठी त्याचा उपयोग होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

बायोमिक्सच्या वापरामुळे हळद पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याबरोबरच विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होत असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यापीठाच्या बायोमिक्स उत्पादन व विक्री उपक्रमामुळे गेल्या पाच वर्षांत सुमारे १९.९१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, १.८ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला लाभ झाला आहे. तसेच दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कृषि अवशेषांच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी उपयुक्त असलेल्यापुसा डिकंपोझर’ तंत्रज्ञानाचीही माहिती देण्यात आली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषि अवशेषांचे जलद विघटन होऊन पुढील पिकाच्या लागवडीसाठी जमीन लवकर उपलब्ध होण्यास मदत होते, असे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्पष्ट केले.

परिषदेत उद्योगसज्ज जैवउत्पादनासाठी आवश्यक प्रमाणवृद्धी, शाश्वत विकास, कृषि व अन्नसुरक्षा, आरोग्य, कार्बन कॅप्चर व उपयोग, जैवाधारित उत्पादने आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. वैज्ञानिक संशोधनाचे प्रत्यक्ष उत्पादने, तंत्रज्ञान आणि उद्योगाभिमुख उपाययोजनांमध्ये रूपांतर करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील जैव-निर्मिती क्षेत्राची क्षमता वाढविणे, संशोधन संस्था, उद्योग आणि स्टार्टअप्स यांच्यात समन्वय मजबूत करणे तसेच जैवाधारित आणि शाश्वत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला. या राष्ट्रीय परिषदेमुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि क्षेत्रातील जैवतंत्रज्ञानाधारित संशोधन आणि जैव-निर्मितीविषयक नवकल्पनांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.


















For english