जिल्ह्यात
अन्न प्रक्रिया उद्योगवाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज - पालकमंत्री मेघना
साकोरे- बोर्डीकर
विद्यापीठाच्या
तंत्रज्ञानाचा लाभ कृषि उद्योजकांनी घ्यावा - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि
परभणी जिल्ह्यातील कृषि क्षेत्रात उत्पादनवाढीबरोबरच
शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अन्न प्रक्रिया उद्योगवाढीवर विशेष भर
देण्यात येणार असून, यासाठी शासन, प्रशासन आणि उद्योजकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे
प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला
व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर
यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक १४ जून रोजी आयोजित ‘पिकनिहाय संशोधक कार्यरत उद्योजक
बैठकी’त त्या बोलत होत्या. या बैठकीस विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, जिल्हाधिकारी माननीय श्री.
रघुनाथ गावडे, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,
अन्न तंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. बी. क्षीरसागर,
उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव, आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष
श्री. संजय मारिवाला आणि उद्योजक श्री. रावसाहेब घुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर
म्हणाल्या की, परभणी जिल्हा अन्न प्रक्रिया उद्योगासाठी
अनुकूल असून येथे दूध, रेशीम, फळे,
मिरची, झेंडू, टोमॅटो
आदी कच्चा माल विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे अमूल, मदर
डेअरी, रामदेवबाबा आदी नामवंत कंपन्यांशी संपर्क साधून
दुधावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘सिल्क टू मिल्क’ या संकल्पनेतून तुतीपासून रेशीम धागा आणि दुधापासून
दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून मूल्यवर्धनाची साखळी निर्माण करणार आहोत.
शेतकऱ्यांनी केवळ प्राथमिक उत्पादनावर थांबू नये तर प्रक्रिया उद्योगात उतरावे,
यासाठी जनजागृती करण्यात येणार असून, सोबतच
त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या. फळप्रक्रिया,
टोमॅटो सॉस, चटणी, मिरची
कांडप, झेंडू प्रक्रिया उद्योग यासारख्या गृहउद्योगांना
चालना देण्यासाठी गुंतवणूकदारांना परभणीत आमंत्रित करण्यात येईल. स्थानिक उद्योजक
व शेतकऱ्यांना योग्य मार्केटिंगसह उत्पादनवाढीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार
असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'अन्न प्रक्रिया
उद्योगासाठी परभणी जिल्हा सक्षम असून, येथे जागा, मनुष्यबळ, कच्चा माल, उद्योजक
आणि गुंतवणूक यांचा समतोल आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या उद्योग शाखांसाठी
परभणीला प्राधान्य द्यावे, यासाठी लवकरच विशेष बैठक घेण्यात
येईल,' असे माननीय पालकमंत्र्यांनी सांगितले.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्थानिक
उद्योजकांना कृषि उत्पादनात मूल्यवर्धन, फूड प्रोसेसिंग
आणि मार्केटिंगमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. स्थानिक
तरुणांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद
केले. परभणीसारख्या भागात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारणीच्या संधी उपलब्ध असून
येथे मोठ्या उद्योगनिर्मितीचे ध्येय ठेवूनच कार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी
सांगितले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम आणि
शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत, हे बदलत्या आणि
प्रयोगशील कृषि उद्योगस्नेही परभणीचे प्रतीक असल्याचे माननीय कुलगुरूंनी स्पष्ट
केले. परभणी कृषि विद्यापीठाने अनेक उत्कृष्ट कृषि प्रक्रिया तंत्रज्ञानाचा विकास
केला असून, या तंत्रज्ञानाचा लाभ कृषि उद्योजकांनी घ्यावा,
असेही त्यांनी शेवटी सांगितले.
कच्च्या मालावर आधारित प्रक्रिया युनिट्सची उभारणी, मार्केटिंग, प्रशिक्षण व संशोधनावर भर देण्यात येईल,
असे माननीय जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
श्री. संजय मारिवाला यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून
उत्पादनात गुणवत्ता व प्रमाणवाढीवर भर देण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
बैठकीचे सूत्रसंचालन उपकुलसचिव डॉ. गजानन भालेराव यांनी केले तर
आभार सहाय्यक कुलसचिव श्री राम खोबे यांनी मानले. या बैठकीस जिल्ह्यातील विविध
क्षेत्रातील कृषि संशोधक व उद्योजक – आशिष श्रीवास्तव, संदीप माळी, किरण वाघ पाटील, सुहास
गोडगे, डॉ. उमेश कांबळे, जश मिराणी,
उपेंद्र शाह, प्रसाद जोशी, तसेच पीएनपीचे संचालक नवनाथ बारहाते उपस्थित होते.