पुणे येथे भारतातील पहिले 'पुणे ॲग्री
हॅकेथॉन' आयोजित करण्यात आले होते. या हॅकेथॉनचे आयोजन कृषी
महाविद्यालय, सिंचननगर, पुणे येथे १ ते
३ जून २०२५ दरम्यान करण्यात आले होते. या हॅकेथॉनच्या
आयोजनामध्ये महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि कृषी महाविद्यालय पुणे यांचा सक्रिय सहभाग
होता. या कार्यक्रमात १४० हून अधिक नव्या कृषी तंत्रज्ञान संकल्पनांना वाव
देण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करण्यात आले होते. या हॅकेथॉनमध्ये ५५० हून अधिक
स्टार्टअप्स आणि कंपन्यांनी सहभाग घेतला होता, त्यातील १५०
कंपन्यांची निवड करण्यात आली होती.
हॅकेथॉनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट शेती, मातीचे आरोग्य, कृषी
यांत्रिकीकरण, हवामान अंदाज, जल
व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांतील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्पर्धा
घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांपासून ते स्टार्टअप्सपर्यंत
सर्वांनी सहभाग घेतला होता.
केंद्रीय कृषि मंत्री मा. ना. श्री. शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री
मा ना श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आज दिनांक ३ जून रोजी पुणे येथे ‘पुणे
ॲग्री हॅकेथॉन’च्या पारितोषिकांसाठी संस्था निवडणाऱ्या सुपर ज्युरी, ज्युरी आणि
इनक्युबेशन पार्टनर्स यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला. यावेळी उपमुख्यमंत्री मा.
ना. श्री. अजित पवार, मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांत
पाटील, कृषि मंत्री मा. ना. श्री. माणिकराव कोकाटे, मंत्री मा. ना. श्री. भरत गोगावले, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना सुपर ज्युरी म्हणून सन्मानित
करण्यात आले. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. शरद
गडाख, माजी कुलगुरू डॉ. आर. बी. देशमुख, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, नॅचरल शुगरचे अध्यक्ष श्री बी. बी. ठोंबरे आणि सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे यांचाही सुपर ज्युरी म्हणून सन्मान झाला.
या हॅकेथॉनमध्ये एकूण १६ बक्षिसे देण्यात आली, ज्यात पहिले बक्षिस रु २५ लाखांचे आणि दुसरे बक्षिस रु १५ लाखांचे होते.
या बक्षिसांच्या माध्यमातून विजेत्या संकल्पनांना कृषी क्षेत्रात प्रत्यक्ष
अंमलबजावणी करण्याची संधी मिळणार आहे.
या हॅकेथॉनच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवकल्पना, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यात आले आहे, ज्यामुळे भारतीय शेतीला अधिक स्मार्ट आणि टिकाऊ बनवण्याचा मार्ग मोकळा
होईल. भारतातील पहिल्या अॅग्री हॅकेथॉनचे आज दिनांक ३ जून रोजी पुण्यात यशस्वी समारोप
झाला.