Thursday, June 12, 2025

वनामकृविद्वारा ‘विकसित कृषी संकल्प अभियानाचा’ कातनेश्वर येथे यशस्वी समारोप: शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन


           

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या “विकसित भारत” संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री. शिवराजसिंह चौहान यांचे दूरदृष्टी नेतृत्वात देशभरात दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान” राबविण्यात आले. या अभियानाचा उद्देश आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शाश्वत शेतीला चालना देणे आणि अन्नसुरक्षेला बळकटी देणे हा होता.

मराठवाडा विभागासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील १२ कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजनाद्वारे शास्त्रज्ञांचे चमू तयार करून त्यांच्याद्वारे शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात आले.

आज दिनांक १२ जून रोजी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मौजे कातनेश्वर येथे या अभियानाचा  समारोप शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व परभणी येथील कृषी विज्ञान केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या वेळी प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी.एस. नेहरकर, कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, उपसंचालक डॉ. गजेंद्र जगताप, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबडकर, कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. प्रशांत भोसले व तालुका कृषी अधिकारी श्री. अमोल भालेराव यांची उपस्थिती होती.

डॉ. भगवान आसेवार यांनी कोरडवाहू शेतीसाठी रुंद सरी वरंबा पद्धती, जलसंधारण तंत्र, आणि शाश्वत शेतीचे महत्त्व पटवून दिले. पूर्णा तालुक्यातील प्रमुख नगदी पिकांमध्ये हळद, कापूस आणि सोयाबीन यांचे आधुनिक वाण, उत्पादनवाढीसाठी लागणारी तंत्रे आणि त्यावरील रोग-किड नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित कापूस वाणांची माहिती दिली तसेच गळफांदी व्यवस्थापन, खत वापर, किटकनाशक फवारणी याचे सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. गजानन गडदे यांनी हळद पिकात येणाऱ्या रोगांविषयी माहिती देत, बीज प्रक्रिया, मृदा परीक्षण व संतुलित खत व्यवस्थापन यावर भर दिला. डॉ. अनंत लाड आणि डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी हुमणी अळी, बुरशीजन्य रोग व्यवस्थापन व जैविक पर्यायांबाबत (बायोमिक्स, ट्रायकोडरमा) शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत भोसले यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कृषी योजनांची माहिती देत मृदा तपासणीनुसार पीक निवडीचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी परिसरातील उद्योजिका संध्या सुदर्शन चापके यांच्या बिजोत्पादन प्रकल्प व हळद प्रक्रिया गृह उद्योगास शास्त्रज्ञांनी भेट देऊन उत्पादन टिकवणूक, आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग यावर प्रभावी मार्गदर्शन केले.

या अभियानामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात योग्य पीक निवड, खत व्यवस्थापन, रोग-किड नियंत्रण व शेतीप्रक्रिया उद्योग याबाबत मार्गदर्शन मिळाल्याने त्यांचे उत्पादन व आर्थिक उत्पन्न निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास १५० हून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.