खरीप हंगामाचे नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व भारतीय कृषि
अनुसंधान परिषदेच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या "विकसित
कृषि संकल्प अभियान" संपूर्ण देशात राबविले जात आहे. मराठवाडा विभागासाठी वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले
आहे. या अभियानांतर्गत विद्यापीठ, परभणीचे कृषी विज्ञान
केंद्र व विविध संबंधित संस्थांच्या सहकार्याने मौजे साटला, ता.
परभणी येथे दिनांक ७ जून रोजी एकदिवसीय कृषी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री. दत्ता
सुदर्शन काकडे तर उपसरपंच श्री. दामोधर बाजीराव सानप उपस्थित होते. प्रमुख
मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मृदशास्त्रज्ञ डॉ.
सुरेश वाईकर,
डॉ. अनिल धमक तसेच कृषी विज्ञान केंद्र, परभणीचे
शास्त्रज्ञ श्री. सी. आर. देशमुख यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना खरीप
हंगामासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
तांत्रिक सत्रात डॉ. सुरेश वाईकर यांनी माती परिक्षणाचे
महत्त्व विषद करताना माती नमुना कसा घ्यावा, फळबागेसाठी तीन फूट खड्डा घेऊन
नमुना कसा घ्यावा, सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उपाय, तसेच चुनखडीयुक्त जमिनीत लिंबूवर्गीय पिके न घेण्याचे मार्गदर्शन केले.
डॉ. अनिल धमक यांनी नैसर्गिक शेतीतील काडी-कचऱ्यापासून
खतनिर्मितीची प्रक्रिया,
मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपाय, सुक्ष्म
अन्नद्रव्यांचे महत्त्व व 'बायोमिक्स'चा
योग्य वापर याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करताना श्री. सी. आर. देशमुख यांनी
या अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, परभणीमार्फत जिल्ह्यातील ९०
गावांमध्ये शास्त्रज्ञ भेटी देणार असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांपर्यंत
खरीपपूर्व तयारी, आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय
योजना पोहोचविण्याचे नियोजन यावेळी स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व अनुभवांवर आधारित संशोधन व नवकल्पनांचा समावेश करण्याचे उद्दिष्ट या अभियानातून
साधले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. मारोती
चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.