बीज प्रक्रिया व खरीप नियोजनावर भर देत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ऑनलाइन कार्यक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र
शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभागातील
क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी -
शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा ४९ वा भाग
मा. कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ६ जून रोजी
संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश
अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर
राबविले जात असलेल्या विकसित कृषि संकल्प अभियानांतर्गत खरीप हंगामाच्या
नियोजनासाठी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी सातत्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत
आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून, हवामानाचा अचूक अंदाज मिळणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठ विविध
कार्यक्रमांच्या माध्यमातून हवामान सल्लाही देत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात
घेऊन विषयनिहाय कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. यासोबतच, महाराष्ट्र शासनाने विकसित केलेले ‘महाविस्तार’ हे मोबाईल ॲप
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून त्याचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतीविषयक
काळजी, व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना
मार्गदर्शन करण्यात शास्त्रज्ञांनी पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी
व्यक्त केली. ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून शेतकऱ्यांची
सेवा करण्याची संधी शास्त्रज्ञांना लाभत आहे, असेही ते
म्हणाले.
तांत्रिक सत्रात शेती उत्पादनवाढीसाठी बीज प्रक्रिया ही एक अत्यंत
महत्त्वाची व प्रभावी पद्धत मानली जाते. बीज प्रक्रियेच्या माध्यमातून केवळ
पेरणीची टक्केवारी वाढते असे नाही, तर पिकांमध्ये रोग आणि कीड
प्रतिकारशक्ती देखील बळकट होते, असे मत वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर
अंबाडकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, योग्य
पद्धतीने बीज प्रक्रिया केल्यास बीजावरून होणाऱ्या बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचे
नियंत्रण होऊ शकते. परिणामी उगमशक्ती वाढते आणि पेरणी यशस्वी होते. बीजाभोवती
रोगप्रतिबंधक संरक्षक थर तयार झाल्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि उत्पादन
खर्चात बचत होते. बीज प्रक्रिया करताना काही आवश्यक बाबींची काळजी घेणे गरजेचे
आहे. विशेषतः, जर बीजावर पूर्वीच कीटकनाशक प्रक्रिया झाली
असेल, तर ती माहिती तपासणे आवश्यक आहे. जैविक कीटकनाशक
वापरताना प्रमाणबद्धता आणि गुणवत्ता यांची विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. "बीज प्रक्रिया
केल्याने केवळ उत्पन्नात वाढ होते असे नाही, तर दर्जेदार
बीजामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत चांगला दरही मिळतो. त्यामुळे अधिकाधिक
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीतंत्रज्ञानाचा अंगीकार करून बीज प्रक्रिया करावी,"
असे आवाहन डॉ. अंबाडकर यांनी शेवटी केले.
हवामान शास्त्रज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी पुढील आठवड्याचा हवामानाचा अंदाज सांगितला.
याबरोबरच खरीप हंगामामध्ये काही ठिकाणी मुसळधार पर्जन्यमान होऊ शकते म्हणून सोयाबीन
सारख्या पिकांची पेरणी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करून करावी असे आवाहन केले.
प्रस्तावना विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केली. सूत्रसंचालन डॉ
अनंत लाड यांनी तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी
मानले. कार्यक्रमात शेतकऱ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून शास्त्रज्ञांना प्रश्न
विचारले.त्यांना शास्त्रज्ञांनीही समाधानकारक उत्तरे देऊन समाधान केले.